एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

मुंबई: मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

चारही भावंडे सुखरूप असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. यातील तक्रारदाराचे अनुक्रमे अठरा, पंधरा, आठ आणि अकरा वर्षांचे चार भाचे त्यांच्या सावत्र आईसोबत २६ मेला घर सोडून निघून गेले होते. कौटुंबिक वादातून या सर्वांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. २८ मे रोजी मुलांची आई एकटी घरी परत आली होती.

मात्र चारही भावंडे घरी न आल्याने त्यांच्या मामांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पथकाला मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

सावत्र आईच्या चौकशीतून ते सर्वजण अंधेरीहून दादर, कल्याण असे रेल्वेने पंजाब मेल पकडून दिल्लीच्या दिशेने गेले होते. मात्र मध्य प्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकात तिने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिने चौघांनाही घरी येण्याचा सल्ला दिला, मात्र ते चौघेही घरी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते पुढे निघून गेले; तर त्यांची आई पुन्हा मुंबईत निघून आली होती.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना ते चौघेही ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले होते. तिथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला होता. त्यामुळे या पथकाने ग्वाल्हेर शहरातील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या व्यक्तीने त्यांना माधव बाल निकेतन या आश्रमात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली. तिथे या चौघांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *