कपिल मोरेश्वर पाटील यांचा विश्वास, भिवंडीत हजारो कार्यकर्त्यांची सभा

भिवंडी : आगामी काळातील विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहा पट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल. आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून, कार्यकर्त्यांच्या साथीने राखेतून पुन्हा भरारी घेऊ, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. त्याचबरोबर भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिकनिमित्ताने आनंदोत्सव आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथून यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिवंडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कपिल पाटील यांनी उपस्थित हजारो कार्यकर्ते व नागरिकांबरोबर संवाद साधला. या वेळी भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी  भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून मोदी… मोदी… गजर केल्याने वातावरण दुमदुमून गेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढील पाच वर्षांत होणार्‍या कार्यातून गौरवशाली इतिहास घडविला जाईल. भाजपासह महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मोदीजींचा विकास हा घराघरांपर्यंत पोचवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अनपेक्षित पराभवाने आलेली मरगळ दूर करून विधानसभा व महापालिका निवडणुकीत विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. भिवंडीत `तो’ पॅटर्न चालल्यानंतरही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असते, तर आपली हार झाली नसती. देशात अनेक ठिकाणी चाललेल्या पॅटर्नप्रमाणे भिवंडी मतदारसंघात `घरभेदी’ हा पॅटर्नही चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा हा पराभव झाला असून, त्यात योगदान देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना खड्यासारखे बाजूला करून भाजपाला मजबूत करण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी व नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहील. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.
चौकट
तेच प्रेम…तोच विश्वास… अन् उसळलेली उत्स्फूर्त गर्दी!
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅट्रीकनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते. तर अनेकांनी कपिल पाटील यांना हस्तांदोलन करीत पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *