Author: bittambatami.com

भाईंदर पालिकेकडून म्हाडाला अकरा वर्षांत एकही घर नाही

दहा लाख लोकसंख्या नसल्याने नियम लागू होत नसल्याचा पालिकेचा दावा भाईंदर : राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसामावेश योजनेअंतर्गत म्हाडाला मिरा-भाईंदर पालिकेकडून मागील अकरा वर्षांत एकही घर सोडतीसाठी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या योजनेतील घरे मिळावीत यासाठी म्हाडाचा पालिकेकडे पाठपुरावा सुरु असताना आता मिरा-भाईंदर पालिकेची लोकसंख्या दहा लाखांच्या वर नाही. त्यामुळे अशी घरे आम्ही देऊच शकत नाही, असे लेखी उत्तर पालिकेने म्हाडाला पाठविले आहे. यावर म्हाडाने दहा लाख लोकसंख्येच्या राज्य-केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ कसा घेता असा सवाल करत घरांची मागणी लावून धरली आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी २०१३ मध्ये सरकारने २० टक्के सर्वसमावेशक योजना आणली. या योजनेनुसार मुंबई वगळता १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील ४ हजार चौ मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पातील २० टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तर ही घरे बांधून पूर्ण करत ते म्हाडाला देणेही बंधनकारक असून त्यानंतर या घराची विक्री म्हाडाच्या मार्फत केली जाते. या नियमाअंतर्गत मागील दोन-तीन वर्षांत कोकण मंडळाला मोठ्या संख्येने सोडतीसाठी ठाणे पालिका, नवी मुंबई पालिका, कल्याण-डोंबिवली पालिकेकडून २० टक्क्यांतील घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांना अर्जदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ज्या पालिकेकडून अशी घरे दिली जात नाहीत अशा पालिकांकडे म्हाडाचा पाठपुरावा सुरु आहे. त्यानुसार म्हाडाने मीरा-भाईंदरकडे २०१३ पासून मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार चौ मीटरपेक्षा अधिक बांधकामाच्या गृहप्रकल्पातील म्हाडाच्या हिश्श्याची घरे देण्याची मागणी केली आहे. यासाठी मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र मिरा-भाईंदर पालिकेकडून घरे देण्यास नकारच दिला जात आहे. म्हाडाच्या घरांच्या मागणीसंदर्भातील पत्राला मिरा-भाईंदर पालिकेने लेखी पत्राद्वारे अजब उत्तर दिले आहे. हे पत्र लोकसत्ताच्या हाती लागले आहे. या पत्रानुसार मिरा-भाईंदर पालिकेची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार पालिकेची लोकसंख्या आठ लाख १४ हजार अशी आहे. करोना काळात जनगणना झाली नसल्याने लोकसंख्येची अद्ययावत माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे लोकसंख्येनुसार ही योजना मिरा-भाईंदर पालिकेला लागू होत नाही असा दावा करत पालिकेने घरे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर म्हाडा प्राधिकरणाने नाराजी व्यक्त केली आहे. या पालिकेची लोकसंख्या जर दहा लाख नाही तर मग अमृत योजनेसह राज्य आणि केंद्र सरकारच्या दहा लाखांच्या वर असलेल्या लोकसंख्येचा लाभ कसा घेता असा सवाल म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. पालिकेकडून मोठ्या संख्येने २० टक्क्यांतील घरे मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या घरांसाठी पाठपुरावा सुरुच राहिल अशी माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याविषयी मिरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त संजय काटकर यांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सध्या आपण पश्चिम बंगलामध्ये निवडणुकीच्या कर्तव्यावर आहोत, त्यामुळे आता यावर काहीही बोलता येणार नाही असेही ते म्हणाले.

कल्याण, डोंबिवलीत विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच्या देखभालीच्या नावाखाली महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सहा तास वीज पुरवठा खंडित केला जातो. तर काही भागात वादळ-पाऊस नसताना एक तास वीज पुरवठा दररोज बंद होत आहे. दिवसाच्या उकाडयाने नागरिक हैराण आहेत. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतल्यावर पंखा, वातानुकूलित वातावरणात बसून उकाड्याचे शमन करावे, तर त्यात वीज पुरवठा बंंद होत असल्याने नागरिकांची होरपळ होत आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वाहक तारांना लागलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम महावितरण कर्मचाऱ्यांंकडून सुरू आहे. ही कामे करताना संबंधित भागाचा वीज पुरवठा बंद केला जातो. अशाप्रकारे दिवसभरात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद ठेवताना महावितरणने त्या भागात ध्वनीक्षेपक, प्रसिध्दी माध्यमातून माहिती देऊन नागरिकांना पूर्वसूचना देण्याची मागणी आहे. अशी कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण वीज पुरवठा बंद करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली, कोळसेवाडी, कैलासनगर, चिंचपाडा, एफ केबिन भागात गेल्या काही दिवसांपासून दररोज पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद केला जात आहे. यामुळे घरातील शीतकपाट, पंखे, वातानुकूलित यंत्र बंद राहत असल्याने नागरिकांना घरात सर्व सुविधा असुनही उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये लहान बाळे, वृध्द, बिछान्याला खिळून असणारे रुग्ण आहेत. त्यांचे यामध्ये सर्वाधिक हाल होतात. महावितरणचे हे अघोषित वीज भारनियमन आहे. ते तात्काळ बंद करावे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर भागात मागील दोन दिवसांपासून दिवस, रात्री पाच ते सहा वेळा वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळ, पाऊस नसताना वीज पुरवठा एक तास बंद होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाळ्यापूर्वीची देखभाल, दुरुस्तीची कामे सुरू असल्याने वीज पुरवठा बंंद ठेवण्यात येत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहापूरवासीयांवर पाण्याचे संकट

१९२ गावपाड्यांना ४२ टँकरद्वारे पाणी पुरवठा रोजंदारी बुडवून पाण्यासाठी वणवण शहापूर : एकीकडे उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे तर दुसरीकडे शहापूर तालुक्यात विहिरी, विंधनविहिरीसह पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. अनेक रोजंदारांना रोजगार बुडवून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवसागणिक टँकरसह टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील दऱ्या – खोऱ्यांमध्ये वसलेल्या ४१ गावे आणि १५१ पाडे अशा १९२ गाव-पाड्यांमधील ६१ हजार ४०६ रहिवाशांसाठी ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माणशी वीस लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी रखरखत्या उन्हात कोरड पडणाऱ्या घशामुळे नागरिकांची तहान भागते का असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई – ठाण्याला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा मोडकसागर ही मोठी धरणे असणारा शहापुर तालुका वर्षानुवर्षे तहानलेलाच राहिला आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी बिकट स्थिती शहापुर तालुक्याची झाली आहे. विशेष म्हणजे, दऱ्या खोऱ्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांतील महिलांना मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांचे पाणी डोळ्यांना दिसत असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहापुर तालुक्याची तहान भागवण्यासाठी आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी योजना राबविली जात आहे. गुरुत्वाकर्षणावर आधारित ९७ गावे आणि २५१ पाड्यांसाठी सव्वा तीनशे कोटींच्या भावली पाणीयोजनेचे काम सुरु आहे. मात्र, संथ सुरू असलेल्या या योजनेचे पाणी प्यायला कधी मिळणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावपाड्यांतील नागरिकांना पडला आहे. यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेमुळे तालुक्यातील नदी नाल्यांसह विहिरी, बोअरवेल मध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांतील महिलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. गावपाड्यांतील लोकसंख्येनुसार माणशी वीस लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येतो असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी तालुक्यातील ४१ गावे आणि १५१ पाडे अशा १९२ गावपाड्यांना ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील कसारा, वाशाळा, फुगाळे, लतीफवाडी, चिंतामणवाडी, डोळखांब, टाकीपठार या दुर्गम भागातील वाडी वस्त्यांमधील महिलांना पाण्याच्या टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. तालुक्यातील चिंतामणवाडी येथील नाविनवाडी, पारधवाडी, नारळवाडी, लतीफवाडीसह बहुतांश वाडी-वस्त्यांमधील पुरुष, महिलांना रोजंदारी बुडवून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच – सहा तास अक्षरशः फरफट होत आहे असे लतीफवाडीच्या उपसरपंच रुपाली सदगीर यांनी सांगितले. अनेकदा पदरचे पैसे मोजून खाजगी टँकर मागवावा लागत असल्याचे नाविनवाडी येथील सुनीता सदगीर यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 527 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2024 – 2025 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 527 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये…

अनेक वीज कनेक्शन ? आता बिल भरा एकाच क्लिकवर

 नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे. महावितरणने उपलब्ध केलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करून अनेक कनेक्शन असलेल्या वीज ग्राहकांना अभिनव सुविधा उपलब्ध केली आहे. राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत अशी समस्या येते. त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाते. महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केली की संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल. या सुविधेसाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयात माहिती मिळेल. महावितरणने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला बळ मिळणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल, त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयात होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणारा खर्च याची माहिती सहजपणे एकत्रित मिळेल तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तीही सहजपणे ऑनलाईन करता येईल.

मागील १२ वर्षात पदवीधरांसाठी ठोस कामच नाही!

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघात मागील १२ वर्षांत गटार, पायवाटांशिवाय पदवीधर मतदारांसाठी ठोस काम झाले नाही, असा आरोप मनसेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे. भाजपचे निरंजन डावखरे यांचे नाव न घेता अभिजित पानसे यांनी टीका केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. २७) मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा दिल्यावर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिला. आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नसेल, तर आमचा या मतदारसंघासाठी रोजगारनामा असेल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का, असा सवाल केला असता आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे; मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. आमची त्यांच्याकडे चर्चा झाली नसल्याची माहिती या वेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

भजन पंडित निवृतीबुवा चौधरी यांच्या भजनाने श्रोते मंत्रमुग्ध

गेली ५० वर्षांहून अधिक काळ अखंड भजनसेवा पनवेल : गेली ५० वर्षांहून अधिक काळ भजन सेवेची परंपरा अखंडपणे जपणारे आणि आपल्या शिकवणीतून हजारो शिष्य घडविणारे खारघर मधील रांजणपाडा गावातील रायगड भूषण भजन पंडित ह.भ. प.निवृतीबुवा चौधरी यांनी सादर केलेल्या भजन व अभंगांमुळे पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथील साईबाबा मंदिर उत्सव सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘श्री तारा माँ मिशन’च्या दहाव्या वर्धापनदिन निमित्त पिंपले सौदागर येथील साईबाबा मंदिरात भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित निवृतीबुवा चौधरी यांनी ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘जोहार मायबाप’, ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’,’ हरे कृष्णा हरे’ आदी निवडक भजने, अभंग सादर करुन श्रोत्यांचे मन जिंकले. निवृत्तीबुवा चौधरी यांनी नेहमीच भजन आणि त्या अनुषंगाने सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम केले आहे. आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण होऊनही ते कधीही या क्षेत्रात थकलेले नाहीत. स्वतःला झोकून देत हरिनामाची ते सेवा करत असतात, त्यामुळे या उत्सवात त्यांच्या गायनाने चैतन्य निर्माण झाले होते.

‘तंबाखू मुक्तीचा घेऊया वसा’

ठाणे : या वर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने ” तंबाखू उ‌द्योगाच्या हस्ताक्षेपापासून मुलांचे संरक्षण ” या थीम‌द्वारे राबवला जात आहे. तरुणांना हानिकारक तंबाखू उत्पादने आणि फसव्या जाहिरात पद्धतीपासून संरक्षण देणारे मजबूत नियम लागू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. १३ ते १५ वयोगटातील ३८ दशलक्षाहून अधिक तरुण तंबाखूचे विविध प्रकारचे सेवन करीत आहेत. डब्ल्यू.एच.ओ.नुसार १३ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये तंबाखूचा वापर ११.५% आणि १०.१% मुलींमध्ये आहे, जे तरुणांच्या तंबाखूच्या सेवनाला आळा घालण्यात एक मोठे आव्हान ठरत आहे. तंबाखू सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात आणि श्वासोच्छवासाचे आजार यासह अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. तंबाखूचे सेवन सोडल्याने ह्या आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्यात सुधारणा होते. तंबाखू सेवन सोडल्याने आपल्या सामाजिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो. तंबाखू सेवन ही एक सामाजिकरित्या अलिप्त ठेवणारी सवय ठरु शकते, कारण बरेच लोक आता तंबाखू सेवन करण्याची परवानगी असलेली ठिकाणे टाळण्याचे निवडत आहेत. तंबाखू सेवन सोडल्याने, आपण आपले सामाजिक जीवन सुधारू शकतो आणि आपल्या मित्र आणि कुटुंबासह अधिक क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतो. शेवटी, तंबाखू सेवन सोडणे ही एक जबाबदार निवड आहे, जी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात मदत करू शकते. निष्क्रिय तंबाखू सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषतः लहान मुले आणि धूमपान न करणाऱ्यांसाठी तंबाखू सेवन सोडल्याने आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना निष्क्रिय तंबाखू सेवनाच्या हानिकारक प्रभावामुळे होणारा धोका कमी करू शकतो. अशयात ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने व सातत्यपूर्ण रुग्णसेवा आणि माणुसकीपोटी कळवळा असल्याने आज ठाणे जिल्ह्यात ९३६ शाळा तंबाखू‌मुक्त झालेल्या आहेत आणि एकूण ५३,१४६ रुग्ण तंबाखू मुक्ति केंद्रातील लाभार्थी झालेले आहेत. एवढेच नव्हे, तर कोटपा कायदा २००३ अंतर्गत आतापर्यंत एकूण रु १,२६,८४९० रुपये एवढी रक्कम दंड म्हणून जमा करण्यात आलेली आहे. हा दिवस पाळताना आपण स्वतःला आठवण करून देऊया की तंबाखूचे सेवन ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याची आणि तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. चला तर मग तंबाखू विरोधाची शपथ घेऊया आणि केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र तसेच आपला भारत देश लवकरात लवकर तंबाखू मुक्त करण्याचा वसा घेऊया आणि आपले कुटुंब, आपला परिसर, आपले गाव, आपला जिल्हा, आपले राज्य आणि आपला भारत तंबाखू मुक्त करूयात.

मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याचे ठामपाकडून खुलेआम उल्लंघन – जगदीश खैरालिया

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुणे समाज कल्याण आयुक्तांची नोडल ऑफिसर नेमणुकीची शासनाची न्यायालयात माहिती अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही, याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे. यामुळे मृतक सफाई कामगारांच्या कुटुंबातील वारसांना आता नोडल ऑफिसर यांच्याकडेही दाद मागता येईल, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही. या बाबतीत श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सफाई कामगार गटारात काम करतांनाचे विडिओ आणि फोटो सहित महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रारही केली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ आणि मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याचे आरोप ही जगदीश खैरालिया यांनी केले आहे. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायद्याच्या तंतोतंत अंमलबजावणीचे अंतरिम आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला मॉनिटरिंग कमिटीची किमान सहा महिन्यांत एकदा मीटिंग घेऊन राज्यातील मैन्युअल स्कैवेंजिंग/ सीवर डेथ प्रकरणी पुनर्वसन बाबत आढावा घेण्यासाठी  आदेश श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये १० मे २०२४ रोजी दिले आहे. तसेच मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेले समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये  प्रतिवादी म्हणून सामिल करण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती  मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे.

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश

समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव होणार- हर्षलता कदम ठाणे: एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ठाणे शहरातील एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते. दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळविले आहे या विद्यार्थ्यांचा समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. श्रुती खवळे या किसन नगर मधल्या मुलीने ८९.४० % मार्क्स मिळवून किसन नगर महानगर पालिकेच्या शाळेत पाहिला नंबर मिळवला आहे. धर्मवीर नगरच्या जया इंगळे हिने ८२ % मार्क्स मिळवून ती महानगर पालिका शाळा क्रं. १८ मधे पहिली आली आहे. सावरकर नगर आदित्यकुमार ठाकूरला ८३% मार्क्स मिळाले आहेत आणि सावरकर नगर महानगर पालिकेच्या शाळेत तो प्रथम आला आहे.  राबोडीच्या हबीबा अन्सारी ला ८२%, अयान अकील शेखला ८०.२% मिळाले आहेत. किसन नगरच्या सृष्टी दळवीला ७९.४%, वारली पाड्याच्या पूर्वा रहाटवळला ७८.६ %, मानपाड्याच्या प्रतीक्षा लोखंडेला ७७.६%, किसन नगरच्या मिनाक्षी कुऱ्हाडेला ७३.८०%, मानपाड्याच्या संदीप वाडू ला ७३.८ % आणि अनिकेत लोखंडेला ७२ %, कळव्याच्या आकाश कनोजियाला ७२.२%, सावरकर नगरच्या रक्षा कादळगावकरला ७३% आणि तब्बसूम नसीर खान पठाणला ७२% मार्क्स मिळाले आहेत.  राबोडीच्या आलिया शेख ला ७९.८%, आशिया पठाणला ७८% मिळाले आहेत. ढोकाळीच्या नीता बिरादरला ७५% आणि भूमिका जाधवला ७६% मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे शाळेतील शिक्षक, पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले.  एकलव्यांमधील ३ मुली आणि १ मुलगा त्यांच्या शाळेत प्रथम आले आहेत. वडील मजुरी, आई घरकाम, पत्राचे छोटेसे घर, दाटीवाटीची वस्ती, बाजुला नाला वाहतोय, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, कधी आई वडील गावाला व विद्यार्थी इथे दुसऱ्यांकडे राहून शाळेत जातो, घरचे काम करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या एकलव्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. या सर्व एकलव्यांचं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून राहणारे, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत जे विद्यार्थी दहावी पास होतात त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले, ८१०८९४९१०२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षलता कदम यांनी केले आहे.