Author: bittambatami.com

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार ‘सुरक्षेची खात्री, मगच प्रवासाची सुसाट भरारी’ – प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर:  गेल्या दीड दशकापासून मीरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नाही,’ असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाची सविस्तर पाहणी केली. सुरक्षिततेची सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून, आगामी एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. एप्रिलमध्ये घुमणार मेट्रोची शिट्टी २००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले ‘मेट्रोचे वचन’ आज पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या संघर्षाचे फळ मिळत असल्याची भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. तसेच मेट्रोची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा विषयक (Security Certificates) प्रमाणपत्रे मिळण्यास काही काळ लागल्याने उद्घाटनाला विलंब झाला, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची बारकाईने पडताळणी केली. कोणत्याही संकटाच्या वेळी ही यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, याची त्यांनी खात्री केली. एका तासाला ४,५०० म्हणजे  दिवसाला जवळ जवळ ५० हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण पूर्तता आणि पडताळणी आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते या मेट्रोचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री प्रतात्प सरनाईक म्हणतात कि, “मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सुविधा देण्याला महत्त्व देत नाही, तर त्या सुविधेमध्ये माझ्या नागरिकांचा जीव सुरक्षित असण्याला माझे प्रथम प्राधान्य आहे. आज सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून मीरा-भाईंदरकर मेट्रोचा सुखद प्रवास अनुभवू शकतील. वाचन दिले आणि ते पूर्ण हि केले. आता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास फक्त वेगवानच नाही, तर सुरक्षित आणि सुखकरही असेल”

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’ २६ लाखांच्या मुद्देमालासह ४५७ सिलिंडर जप्त हरिभाऊ लाखे नाशिक – एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड एकिकडे होत असताना शहरात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सातपूर औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईतून उघड झाले. यावेळी ४५७ घरगुती-व्यावसायिक सिलिंडर आणि पाच वाहने असा सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गॅस वितरकासह कर्मचारी अशा आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीमधील हा माल आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर तहसीलदार अमोल निकम, एचपीसीएलचे भूपेन पाटील आणि बीपीसीएलचे राजकुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मोठ्या संख्येने सिलिंडरचा साठा आढळला. चाके जमिनीत रुतलेल्या आणि नादुरुस्त वाहनातही मोठ्या संख्येने सिलिंडर होते. दोन मालवाहू वाहनेही सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. पथकाने कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधितांनी काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात असल्याचे मान्य केल्याचे पुरवठा विभागाने तक्रारीत म्हटले आहे. या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांची ४५७ घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि तीन मालवाहू वाहने ताब्यात घेण्यात आली. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री केल्या प्रकरणी गॅस एजन्सीधारक हर्षल सरनाईक (वॉटरफ्रंट सोसायटी, जलालपूर) याच्यासह प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप या कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. सिलिंडरचा काळा बाजार जोमाने सुरू असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले. गोदाम, सिलेंडर वितरणाची छाननी समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगरला तर गोदाम विल्होळी येथे आहे. सिलिंडरचे वितरण नियमानुसार या दोनपैकी एका ठिकाणाहून होणे अपेक्षित असते. सातपूर औद्योगिक वसाहतीत एजन्सीने वाहन नेण्याचे काहीच कारण नव्हते. महत्वाचे म्हणजे ज्या वाहनात सिलिंडर आढळली. ते नादुरुस्त आहे, त्या वाहनाची चाके जमिनीत रुतलेली आहे. सिलिंडरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांना सादर करता आल्या नाही. हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने एचपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. संबंधित एजन्सीच्या गोदाम व कार्यालयाची सखोल तपासणी करावी. मागील १० दिवसांत संबंधितांकडे किती गॅस सिलिंडर आले आणि त्यांनी किती सिलिंडरचे वितरित केले याची छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षांतर्गत गेल्या तब्बल २५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठीचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. राज्यातील ३३७८ कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाकडून अजूनही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समग्र शिक्षांतर्गत गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कंत्राटी स्वरूपात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करून कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलने, निवेदने आणि विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली होती. सदर अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाला सकारात्मक अहवाल सादर केला. या अहवालातील “शिफारस ब” मंजूर करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी स्पष्ट भूमिका समितीने मांडली होती. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असूनही शासनाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर ८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ३००० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. मनोहर धोडे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले होते. मात्र आचारसंहिता संपून जवळपास एक महिना उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ मार्चपासून आझाद मैदानावर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २५ वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, प्रत्यक्षात मात्र न्याय दिला जात नाही. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही संघटनेचे राज्य सरचिटणीस पराग चाटेरेकर, राज्य चिटणीस विवेक राजन, राज्य कार्याध्यक्ष सुनिल दांडे आणि राज्य अध्यक्ष योगिता बलाखे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा स्व. किसनरावांच्या दशक्रियेला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील  पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ  मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल, सगुणा यांनी दशक्रिया विधीला जाहीर केलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  देवदत्त निकम, भाजपाचे सानपाडा येथील नगरसेवक भाऊ भापकर, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिती थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. थोरांदळे गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या विश्वासराव कुटुंबियांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  या भावनेतून दशक्रिया विधीला जाहीर केलेले प्रवेशद्वाराचे काम साडेपाच महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. साडेपाच महिन्याच्या  निमित्ताने आळंदीचे ह. भ. प. श्री. गौतमनाना बेळगावकर महाराज यांची प्रवचन रुपी चांगली सेवा झाली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गणेश यादव, डॉ.  घाडगे, डॉ. गोरडे, दत्ता हगवणे, शिवशंकर दूध डेअरीचे  चेअरमन आणि   थोरांदळे  गावातील  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेमगिरे,  लोकनियुक्त सरपंच जे. डी.  टेमगिरे, बाळासाहेब विश्वासराव, सोपान घुले, बाळासाहेब सोपान टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!

बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!  राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सव सोहळा धारावीत संपन्न मुंबई : चांभार, ढोर, मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, कक्कया आदी विविध जाती-पोटजातींमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित…

गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी (राजेंद्र साळसकर) मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्यामनगर तलाव येथे भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. यावेळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्याम नगर तलाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य गुढीचे सकाळी १० वाजता खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष तसेच तरुण सहभागी होणार असून लेझीमच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्यांकडून नृत्यही सादर करण्यात येणार असून सर्वोत्तम वेशभूषा करून येणाऱ्यांंना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच अनेक स्पॉट बक्षिसेही देण्यात येणार आहे. गुढी पूजनेनंतर भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून यात लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणार विविध विधानसभा क्षेत्रातील मिळून सुमारे १०० बाईकस्वार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ही रॅली महाकाली गुंफा, बिंद्र कॉम्प्लेस, तक्षिला, मॉडेल टाऊन, पीएमजीपी म्हाडा सर्वोदय नगर, मेघवाडी पोलीस स्टेशन, स्वामी विवेकानंद स्कूल, मेघवाडी नाका, प्रेमनगर, समर्थ नगर, ठाकूर नगर, महाराज भुवन, धोबी घाट, जोगेश्वरी स्टेशन, सदभक्ती मंदिर, सुभाष नगर, बांद्रेकर  वाडी, जेव्हीएलआर, प्रतापनगर, रामवाडी, श्यामनगर पेट्रोल पंप, ओबेरॉय स्कूल, दुर्गानगर, मातोश्री कमाल अमरोही स्टुडिओ, एमएमआरडीए कॉलनी, पूनम नगर, नमस्कार, ग्रीनफिल्ड, कल्पतरू करून इच्छापूर्ती गणेश तलाव येथे या रॅलीची समाप्ती होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजातील एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचे, आयोजक मनीषा वायकर व दीप्ती वायकर पोतनीस यांनी सांगितले