Author: bittambatami.com

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते-शुभांगी साठे

अशोक गायकवाड रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत येथील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करते. याच मराठी भाषेतील शिक्षणाने उच्च पदापर्यंत पोहोचवले, असे मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केले. दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. दामले विद्यालयाचे काम आदर्शवत असल्याचेही त्या म्हणाल्या .पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला. विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार म्हणाले. आभार मुख्याध्यापक मोटे यांनी मानले.

मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता माटुंगा येथील दादर- माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. हा प्रकाशन समारंभ मान्यवर स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. परिख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, हुसेन दलवाई व डॉ. लता प्रतिभा मधुकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राला सामाजिक व राजकीय लढ्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे ह्या इतिहासाचा वारसा व प्रेरणा घेऊन अनेक तरुण कार्यकर्त्यांनी विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक/राजकीय चळवळीत झोकून देऊन निःस्पृह काम केले आहे. आमदार, खासदार, मंत्री अशी स्वप्ने त्यांना पडली नाहीत किंवा ते अशा गोष्टींसाठी कधी लांगूनचालन करीत बसले नाहीत. अन्यायपीडित, शोषित जातीवर्गांमध्ये ते काम करत राहिले. काहींना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले, तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी निष्ठा कायम ठेवली व सातत्यपूर्वक काम करीत आहेत. स्वातंत्र्याच्या वीस-पंचवीस वर्षांत भारतीय शोषित वर्गजातींच्या जीवनमानात काही फरक पडत नाही म्हटल्यावर देशभर तरुणांचे उठाव झाले. जागृत बंडखोर तरुण आयुष्याची तमा न बाळगता श्रमिकांच्या या लढ्यात सहभागी झाले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मधुकर म्हणजेच मधु मोहिते याने शोषितांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. अनेक कठीण प्रसंग आले. प्राणघातक हल्ले, टिकाटिप्पणी व आर्थिक विवंचना खूप होती. अशा परिस्थितीत दिलेला संघर्ष त्यांनी त्यांच्या ‘शोध परिवर्तनाचा’ या पुस्तकात नमूद केला आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, मूळ ४०० रुपयांचे हे पुस्तक केवळ २५० रुपयांत मिळेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले आहे.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. आजच्या हुतात्मा दिनानिमित्त     देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत स्तब्ध उभे राहून मौन पाळण्यात आले.

ठाणे महोत्सव – भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम – संदीप लेले

अनिल ठाणेकर ठाणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत. दररोज विविध उद्बोधक,प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार.रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यंदा येथील या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील वंदे मातरम् संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवात १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन – किर्तन होणार आहे. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री ची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळी १० वाजता सामुहिक अर्थवशीर्ष पठण होईल. रात्रौ ८ वा. ‘गणेश तत्व आणि पुराण’ या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार २ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक नृत्य, सोमवार ३ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.धर्मो रक्षति रक्षित: याविषयावर डॉ. अभिजीत फडणीस धर्मजागरण करतील. मंगळवार ४ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. ‘हृदयी वसंत फुलताना’ हा सुप्रसिद्ध कलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित, आणि मनिष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांचा साहित्य, संगीत, आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम होईल. बुधवार ५ फेब्रुवारी रात्रौ ८ वा. ॲड. विमल जैन हे “पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी” या विषयावर उद्बोधक माहिती देतील. गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधाचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये दासबोधाचे निरूपण करणार असुन ७ फेब्रुवारी रोजी महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणुक निघणार आहे. या महोत्सवात होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबीर होणार असुन गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केले आहे. यावेळी वंदे मातरम संघाचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण,सुशांत मोरे,किशोर भावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा – वर्षा गायकवाड.

महायुती सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ व पाठ्यपुस्तकात कोरी पाने’ प्रयोग लादून काय साध्य केले? १- ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची? मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल विचारून महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की,तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पाठ्यपुस्तकाचे चार भाग करून त्यात कोरी वह्यांची पानं लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांशी कोणतीही चर्चा का केली नाही? या दोन्ही निर्णयांना चहूबाजूंनी प्रखर विरोध होत असताना, महायुती सरकारनं हे प्रयोग लादून नेमकं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या नुकसानाचं काय?. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्र्याचे चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी निर्णय रद्द करण्याचे धाडस दाखवले पण या बोगस आणि भ्रष्ट निर्णयांमुळे लाखो सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भुर्दंड कोण भरणार? असे प्रश्न खा. गायकवाड यांनी विचारले आहेत. ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही – जबाबदारी कोणाची? शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी, ३५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. यासाठी जबाबदार ठरवून संबंधितांवर कारवाई होणार की नाही? शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मागील शिक्षणमंत्री केसरकर यांच्या काळात अशा भोंगळ कारभार आणि अनावश्यक उद्योगांवर अधिक भर दिला गेला. यातून नेमकं कोणाचा स्वार्थ साधला गेला? ठराविक लाडक्या कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. ‘असर’ अहवालाचा इशारा……

बीडची कीड

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अखेर सव्वा महिन्याने वाल्मिक कराडवर ‌‘मोक्का‌’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका आरोपीला तपास यंत्रणा अटक करू शकलेल्या नाहीत. बीडमधील संघटित गुन्हेगारी हाताळण्यात…

मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !

  देशभरातील लक्षावधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. मंदिर प्रशासनाने एक पत्रक काढून तसे जाहीर केले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती…

देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

अहिंसेच पुजारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला साजरी करण्यात येते.त्या निमित्ताने भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. याकरीता…

करार आणि गुंतवणूक

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथील जागतिक परिषदेला हजेरी लावून गुंतवणुकीचे अनेक करार केले. दरवर्षीच असे करार होत असतात. त्यातील किती गुंतवणूक प्रत्यक्षात होते आणि…