Author: bittambatami.com

मला लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक कट-महंत श्री रामगिरी महाराज

रमेश औताडे मुंबई : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अराजक मजविण्याचा जागतिक कट होता. मला कोणत्याही धर्माला, जातीला, पंथाला दुखवायचे नव्हते. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाचा अध्यक्ष होता. मुस्लिम समाजाच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे मी सर्व समाजाला घेऊन जात आहे. जे ग्रंथात लिहिले आहे तेच मी वक्तव्य केले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी माहिती महंत श्री रामगिरी महाराज यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेकडून सखोल तपास करून कारस्थान रचणाऱ्या धर्माध देशद्रोही आणि सत्तालोलुप राजकारण्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी सत्यपाल सिंह यांनी यावेळी केली. रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक पातळीवर कट रचला गेला होता आणि त्यात परकीय शक्तींबरोबरच देशातील धर्माध शक्ती आणि सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले राजकीय पक्ष सहभागी होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशल मीडिया रिसर्च सेंटर या संशोधन संस्थेने समाज माध्यमांच्या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाला असल्याचा दाखला देत रामगिरी महाराज यांची भूमिका योग्यच होती व आहे असे मत सत्यपाल सिंह यांनी यावेळी व्यक्त केले. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तास कालावधीच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेल्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या हे योग्य नाही असे सांगत सिंह म्हणाले,  ‘गुस्ताख- ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा… यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्माध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगकसदृश्य परिस्थिति निर्माण केली  तसेच काही धर्माध व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन महंत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हे  दाखल करण्यात आले. हे योग आहे का ? असा सवाल सत्यपाल सिंह यांनी यावेळी केला.

 पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा

 ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोर येत असून, राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सभा पंचवटीतील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे. सदरची सभा ठक्कर डोम येथे घेण्यासंदर्भातही प्रस्ताव होता. मात्र ती जागा सुयोग्य नसल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे पंचवटीतील तपोवन येथील नेहमीची जागा निवडण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जागेची पाहणी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये येणार आहे. सत्ताकारणात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे संबंध असल्याने राज्यातील जागावाटपासह इतर सर्व घटनांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महायुतीतर्फे या दोन्ही नेत्यांच्या सभा संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातही त्यांच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये मोदी मैदानावर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असून, तपोवनातील मोदी मैदानातच ही सभा होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही एखादी मोठी सभा घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

संजय मधुकर मुळे यांचा ‘स्पीकर ऑफ द इयर’ म्हणून गौरव

मुंबई : द एक्सलंसीआयकॉनिक अवॉर्ड  आणि फाव अँड फेअर्स यांच्यातर्फ़े  आयोजित  कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक  संजय मधुकर मुळे यांचा “बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई येथे  वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अरबाज खान यांनी  संजय मुळे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला.  मुळे यांनी “नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ थ्रु इनडिव्ह्युज्वल  कॉन्ट्रब्युशन” या विषयावर आपले विचार मांडले होते. या भाषणास बेस्ट स्पीच तर स्पीकर ऑफ द इयर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वी द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे मुळे यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर  नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार,  एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशनतर्फे आश्रमातील मुले व व वृद्धांना कपडे व मिठाई वाटप

राजेंद्र साळसकर संगमनेर : ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, रायतवाडी फाटा, संगमनेर येथील आश्रमातील सर्व मुले व वयोवृद्ध तसेच नवजीवन वीट भट्टी उद्योगातील वंचित मुलांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वयंप्रेरित संस्थेच्या आश्रमातील मुले व वीटभट्टी वरील मुले अशा एकूण १०० मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.  ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनने आपली दिवाळी सर्व मुलांसमवेत साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री दिपक पवार, राजेन्द्र पुजारी, अनंत खडतरे,जितेंद्र पवार,प्रभाकर कुटे, उदय पुजारी, अनिल माशिट्टे तसेच नवजीवन विटभट्टी उद्योगाचे मालक दिलीप शेठ जोर्वेकर स्वयंप्रेरीत संस्थेचे नामदेव राहणे, संतोष पवार, नवजीवन उद्योगातील परिवार इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

बहुजन विकास आघाडीला ‘शिट्टी’ चिन्ह वापरता येणार – मुंबई उच्च न्यायालय

विरार : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी क्रेंद्रिय निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायलायत धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज ४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निकाल देत बहुजन विकास आघाडीला ‘शिटी’ चिन्ह वापरता येईल असे आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे. बहुजन विकास आघाडीने याचिकेत भारत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या पत्र व त्यामुळे झालेल्या परिणामांबाबत हरकत घेतली होती. बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच आज हा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून पक्षाचे चिन्ह ‘शिटी’ हे सर्वाना परिचित आहे. मात्र २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीपासून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू नये म्हणून विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक मात्र बविआने शिट्टी या चिन्हावर लढवली होती त्यामुळे या निवणुकीतही बविआला शिट्टी चिन्ह मिळेल अशी अपेक्षा होती.

मतविभागणी टाळण्यासाठी नाशिक (पश्चिम) मधून माकपची माघार – डॉ. उदय नारकर

ठाणे : मतविभागणी टाळण्यासाठी, नाशिक पश्चिमची जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक (पश्चिम) मधील उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली. राज्यातील भाजपप्रणित महायुतीचे महाराष्ट्रद्रोही, गोरगरीब जनतेवर घोर अन्याय करणारे महायुतीचे सरकार पदच्युत करून त्याजागी पर्यायी सरकार स्थापन करणे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे. नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात मतविभागणी होऊन ती जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर आणि डॉ. डी. एल. कराड यांच्या सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याआधी डॉ. उदय नारकर, डॉ. डी. एल कराड, डॉ. विवेक माँटेरो, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. तानाजी जयभावे आणि कॉ. दिनेश सातभाई यांच्या शिष्टमंडळाने खा. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली.

दिवाळी पहाट उपक्रमांतर्गत मतदानाचा हक्क बजवण्यासाठी जागरुकता कार्यक्रम – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण राज्यात एकाच दिवशी होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क कर्तव्य भावनेने बजावावा याकरिता मतदार जागरुकता कार्यक्रम मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. यामध्ये दिवाळी कालावधीत ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणा-या दिवाळी पहाट सांगितिक उपक्रमांमध्येही १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाशी संबधित अधिका-यांनी तसेच महानगरपालिकेच्या संबधित विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचे मतदानाविषयी प्रबोधन केले. वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृहात १ व ३ नोव्हेंबर रोजी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित नागरिकांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. तसेही नाटयगृहामध्ये दररोज होणा-या नाटयप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरुवातीला, मध्यंतरात व कार्यक्रम संपल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन करणारी ध्वनीफित प्रसारित करण्यात येत आहे. अशाचप्रकारे ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ येथे, करावेगाव येथे तसेच ऐरोली येथे शिवकॉलनी व विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाटच्या सांगितीक कार्यक्रमांप्रसंगी स्वीप पथकाने उपस्थित राहत मतदान करण्याविषयी आवाहन करत जागरुकता निर्माण केली. राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर, रबाळे येथील दिवाळी संध्या उपक्रमातही मतदार जनजागृती करण्यात आली. भाऊबीजेच्या दिवशी स्वीप पथकातील महिला कर्मचा-यांनी ऐरोली येथील अग्निशमन केंद्रामध्ये जाऊन अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांची ओवाळणी केली व त्यांना ओवाळणी म्हणून २० नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे मागील निवडणूकीत कमी मतदान झाले आहे अशा विभागांमध्ये मतदार जनजागृती करण्याबाबत विशेष भर देण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यादव नगर ऐरोली परिसरात घराघरात स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली तसेच तेथील रिक्षा स्टँडच्या ठिकाणी रिक्षा चालकांची ओवाळणी करुन मतदानाचे आवाहन करण्यात आले. याशिवाय परिसरात रिक्षाव्दारे आवाहन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील १५० व १५१ विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली १५० ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे व १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून स्वीप पथकांच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. अगदी दिवाळी सणातही समुहाने साज-या होणा-या दिवाळी उत्सवात कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदार जनजागृती करण्यात आली.

ठाण्यात दिवाळी काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ

चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळी काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता दिवाळी काळातील चार दिवसांत संपुर्ण शहरात एकूण ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसून त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. या आगीची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नसली तरी फटाके तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. ठाणे पालिका प्रशासनाकडून दिवाळी काळात हवा गुणवत्तेची तपासणी करण्याबरोबर ध्वनी पातळीचे मापन करण्यात येते. यंदाच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे. परंतु यंदा हरित फटाक्यांचा वापर वाढला असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा ध्वनी आणि वायु प्रदुषण कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. असे असतानाच, दिवाळी काळात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवार, ३१ ऑक्टोंबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात ११ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर १ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ९ ठिकाणी, २ नोव्हेंबरला दिपावली पाडव्याच्या दिवशी ७ आणि ३ नोव्हेंबरला भाऊबीजच्या दिवशी ६ अशा एकूण ३३ ठिकाणी आग लागल्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी दिवाळी काळात शहरात ४७ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनेत घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या आगीच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसून काही ठिकाणी मात्र आगीत साहित्य जळून खाक झाले आहे.

मायेची दिवाळी – सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न !

मुंबई  : अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ व भटकी भूत बोरिवली मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच  जिल्हा परिषद कोतीमाळ तालुका जव्हार जिल्हा पालघर या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबर मायेची दिवाळी…