Author: bittambatami.com

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी देण्यात आली असून उर्वरीत ७४ नवीन ई रिक्षा लवकरच सध्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर हातरीक्षा मालकांना मिळणार आहेत. ई रिक्षांना चार्जिंग करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दस्तुरी नाक्यावर २,कम्युनिटी हॉल परिसरात ५ आणि नगरपरिषदेच्या आवारात ५ ई रिक्षांना चार्जिंग करण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत वीस ई रिक्षांना चार्जिंग साठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य ठिकाण असणाऱ्या कम्युनिटी हॉल परिसरात आणखीन चार्जिंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी ई रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, चालक रुपेश गायकवाड, किशोर सोनावले, अक्षय वैद्य,सिताराम शिंदे, दीपक डोईफोडे, मारुती कदम, दिलीप कदम, शैलेश भोसले,विजय कदम आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेची आवश्यक सूचना लक्षात घेऊन आम्ही नगरपरिषदेच्या अभियंत्यांना याबाबतीत माहिती देऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद ०००००

 राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म फॅक्टर प्रभावी ठरल्याचे भविष्यासाठी घातक

 कपिल पाटील यांचे मत मुरबाड : लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर प्रभावी ठरला, हे देशाच्या भविष्यासाठी घातक आहे, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी काल येथे व्यक्त केले. भिवंडी व शहापूरपाठोपाठ कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिकांबरोबर गुरुवारी संवाद साधला. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, भास्कर जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभेच्या निवडणुकीत काही जणांनी जातीच्या नावावर, तर आपण राष्ट्राच्या नावाने मते मागितली. आपण मोदीजींचे कार्य पाहून मतदानाचे आवाहन केले, तर त्यांनी धर्माच्या नावाने मतांची मागणी केली. आपले राष्ट्र व कार्यही चालले नाही. देश व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर चालला, तो देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. देशभरात तीन प्रमुख फॅक्टर चालविले गेले. त्यात भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळाल्यावर, मुस्लिमांना भारत सोडून जावे लागेल, अशी भीती दाखविली गेली. केरळमधून सुरू झालेले अभियान देशभरात पोचविले गेले. केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधून भिवंडीत आलेल्या काही विशिष्ट लोकांनी ९० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. देशाच्या विविध भागात हा फॅक्टर चालविला गेला. दलित बांधवांना संविधान बदल आणि आदिवासी बांधवांना आरक्षण रद्द होणार असल्याचे भासविले गेले. या तीन फॅक्टरप्रमाणे भिवंडी मतदारसंघात जातीचा फॅक्टर सुरू होता. त्याचबरोबर भाजपाच्या जवळच्या लोकांनी विरोधी कार्य केले. सर्व फॅक्टर चालूनही आपल्या कार्यकर्त्यांनी नीट काम केले असते, तर नक्कीच पराभव झाला नसता, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. मुरबाड विधानसभा क्षेत्रात महायुतीला कमी मतांसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना पाणी पाजून मुरबाड विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांची आघाडी मिळविण्याचे कार्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. या श्रेष्ठ ताकदीच्या कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, असे आवाहनही श्री. कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. ०००००

 १६ हजार रहिवाशांची पात्रतानिश्चिती जुलैपर्यंत

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास मुंबई :  रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून तब्बल १६ हजार ५७५ रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची १,६९४ घरे रिकामी करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. ही घरे रिकामी झाल्यानंतर सप्टेंबरपासून पूर्वमूक्त मार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर छेडानगर आनंदनगर, ठाणे असा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पासाठी रमाबाई आंबेडकर नगर येथील १,६९४ घरे बाधित होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने बाधित घरांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प राबवित आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने १६ हजार ५७५ रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण करून आता परिशिष्ट २ तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. त्यांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता उर्वरित रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जुलैमध्ये निविदा खुल्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएने आचारसंहितेआधी मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. जुलैमध्ये या निविदा खुल्या करून वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून आराखडा तयार केला जाणार आहे. एकूणच रमाबाई आंबेडकर नगराच्या पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड

राहुल शेवाळे बदनामी प्रकरण मुंबई : माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच, ही रक्कम शेवाळे यांना दहा दिवसांत देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. हा अर्ज करण्यासाठी झासेसा विलंब माफ करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र, त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. महानगरदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ठाकरे आणि राऊत यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी विशेष न्यायालयासमोर न्यायालयात धाव घेतली आहे व महादंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. 00000

ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खातेधारक जबाबदार नाही

उच्च न्यायालयाचा निर्वाळा मुंबई : ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खातेधारकाला जबाबदार ठरवता येऊ शकत नाही. ही फसवणूक बँक किंवा ग्राहकामुळे होत नाही, तर यंत्रणेतील त्रुटीमुळे होते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. तसेच, सायबर फसवणुकीमुळे ७६ लाख रुपये गमवावे लागलेल्या कंपनीला ही रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने बँक ऑफ बडोदाला दिले. निरपराध व्यक्ती किती मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत, याचे हे एक उदाहरण असल्याचेही न्यायालयाने म्हटले. भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेल्या जुलै २०१७च्या परिपत्रकानुसार, तृतीय पक्षाच्या उल्लंघनामुळे एखादा अनधिकृत व्यवहार होतो. तेव्हा त्यासाठी ग्राहकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. हा व्यवहार बँक किंवा ग्राहकाच्या नाही, तर यंत्रणेतील त्रुटीमुळे होतो याकडे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. तसेच, बँक ऑफ बडोदाचे ग्राहक संरक्षण धोरणही (अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार) सारखेच असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सायबर फसवणुकीद्वारे गमावलेले ७६ लाख रुपये बँकेला परत करण्याचे आदेश देण्यास नकार देणाऱ्या बँकिंग लोकपालने दिलेल्या आदेशाला जयप्रकाश कुलकर्णी, फार्मा सर्च आयुर्वेद कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने हे आदेश दिले. याचिकेनुसार, १ ऑक्टोबर २०२२ रोजी याचिकाकर्त्याला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर कोणताही ओटीपी क्रमांक न येता काही संस्था किंवा व्यक्ती याचिकाकर्त्या कंपनीच्या बँक खात्याशी लाभार्थी म्हणून जोडल्या गेल्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी याचिकाकर्त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहारांद्वारे विविध अज्ञात व्यक्तींना ७६ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर याचिकाकर्त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली आणि कथित ऑनलाइन फसवणुकीची माहिती बँक व्यवस्थापकाला दिली. बँकेने कोणत्या उपाययोजना केल्या याची मागणी केली. बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. न्यायालयाचे ताशेरे आरबीआयच्या परिपत्रकानुसार, याचिकाकर्त्याला बँकेकडून रक्कम परत करण्याचा अधिकार आहे आणि बँक ऑफ बडोदाने सहा आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याच्या बँक खात्यात ७६ लाख रुपये परत करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले. बँक लोकपालने कोणतीही योग्य चौकशी केली नाही आणि केवळ लाभार्थी जोडल्यानंतर व्यवहार झाल्याचे सांगितल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढत याचिकाकर्त्यांना दिलासा दिला. 00000

निवडणूक कामावरून न परतणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणीही झाली, निकालही लागले, मात्र निवडणूक कर्तव्यावर गेलेल्यांपैकी मुंबई महापालिकेचे ६० टक्के कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. हे कर्मचारी १३ जूनपर्यंत रुजू न झाल्यास त्यांचे वेतन रोखण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने लोकसभेच्या निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले होते. सुमारे ४० हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे १० हजार ४०० कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा क्षेत्रीय अधिकारी या कामसाठी तीन ते चार महिन्यांच्या कालावधीपासून गेले आहेत. पालिकेच्या आरोग्य, शिक्षण, जलअभियंता अशा सर्वच विभागांतील कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे पालिकेच्या सर्व सेवांवर परिणाम झाला होता. आताही या १० हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर उर्वरित कर्मचारी अद्याप हजर झालेले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. निवडणूक कर्तव्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पालिकेतील त्यांच्या विभागात परत पाठवावे, असे पत्र पालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ६ जून रोजी पाठवले होते. मात्र तरीही अनेक कर्मचारी हजर न झाल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. पालिकेचे कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे महानगरपालिकेची पावसाळापूर्व व इतर तातडीची कामे पूर्णत: थांबलेली आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे आपापल्या खात्यातील जे कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले आहेत त्यांना परत बोलवून घ्यावेत, असे निर्देश पालिका प्रशासनाने सर्व खातेप्रमुखांना व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. १३ जूनपर्यंत कर्मचारी हजर न झाल्यास त्यांचे वेतन रोखण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेचा विरोध वेतन रोखण्याच्या निर्णयाचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीचे कामकाज पार पडले असले तरी येऊ घातलेल्या विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकांची पूर्वतयारी, तसेच इतर कामकाज अद्यापही सुरू आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे परिपत्रक तात्काळ रद्द करावे, तसेच कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी मागणी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली. 00000

धारावी पुनर्वसनासाठी आतापर्यंत सव्वातीनशे एकर अतिरिक्त भूखंड!

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी आतापर्यंत मुलुंड, कांजूरमार्ग-वडाळा येथील सुमारे ३०१ एकर  भूखंडापाठोपाठ आता कुर्ला दुग्धशाळेचा २१ एकर भूखंड नाममात्र दराने देण्याचे प्रस्तावित असल्यामुळे या पुनर्विकास करणाऱ्या अदानी समूहाला सुमारे ३२२ एकर भूखंड वितरित केला जाणार आहे. एकीकडे सामान्यांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाला भूखंड देण्यात तत्परता न दाखविणाऱ्या राज्य शासनाने धारावी पुनर्विकास कंपनीला मात्र झुकते माप दिल्याची तक्रार आहे. कुर्ला पूर्वेला नेहरूनगर परिसराजवळ असलेला हा मोक्याचा भूखंड दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांनी महसूल विभागाला हस्तांतरित केला असून आता महसूल विभागाकडून तो धारावी पुनर्विकासासाठी म्हणजेच अदानी समूहाला दिला जाणार आहे. या भूखंडावर धारावीतील अपात्र झोपडीवासीयांसाठी घरनिर्मिती केली जाणार आहे. ६०० एकर भूखंडावर पसरलेल्या या झोपडपट्टीत सुमारे तीन ते चार लाख रहिवासी आणि १३ हजार छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांचा पुनर्विकास करण्यासाठी या प्रकल्पाला विशेष दर्जा देत शासनाचा २० टक्के आणि अदानी समूहाचा ८० टक्के वाटा असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. या विशेष हेतु कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत सध्या रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू असून २००० पर्यंतच्या पात्र रहिवाशांना धारावीतच तर २०११ पर्यंतच्या पात्र रहिवाशांना अडीच लाख रुपये आकारून व त्या व्यतिरिक्त इतर अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे दिली जाणार आहेत. त्यासाठीच धारावी पुनर्विकास कंपनीला आतापर्यंत ३२२ एकर भूखंडाची तजवीज राज्य शासनाने केली आहे. कांजूरमार्ग-भांडूप-वडाळा येथील २८३ एकर खाजण भूखंड मिळावा यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ज्या पात्र झोपडीवासीयांसाठी घरे उभारली जाणार आहेत, तो रेल्वेचा एका कोपऱ्यातील भूखंड आहे. त्यामुळे उर्वरित भूखंड हा वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडून त्याचे मूल्य वाढणार असल्याचे एका वास्तुरचनाकाराने सांगितले. विकासहक्क हस्तांतरण हक्क म्हणजेच टीडीआरच्या स्वरूपात याआधीच राज्य शासनाने अदानी समूहाला दिले आहेत. आता मुंबईतील अतिरिक्त भूखंड आंदण दिले जात आहेत. याबाबत धारावी पुनर्विकास कंपनीच्या प्रवक्त्याने काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास असमर्थता दर्शविली. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह यांनीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कुर्ला दुग्धशाळेचा भूखंड महसूल विभागाला हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय १० जून रोजी जारी करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडेच महसूल व दुग्धविकास खाते आहे. त्यामुळे दुग्धविकास मंत्री म्हणून विखेपाटील यांनी त्यास मान्यता दिली आहे.  १५ मार्च २०२४ मध्ये महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करून मुंबईतली सार्वजनिक हिताच्या पायाभूत प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड सवलतीच्या दराने देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी रेडी रेकनरच्या २५ टक्के दराने शुल्क आकारून शासकीय, निमशासकीय किंवा ज्यात शासनाचा अंशत: सहभाग आहे अशा म्हाडा किंवा धारावी पुनर्वसन प्रकल्प आदी संस्थांना भूखंड वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार हा भूखंड धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. या भूखंडावर सध्या दुग्धशाळा, कर्मचारी वसाहत, शीतगृह, मुख्य इमारत आणि इतर बांधकामे आहेत. कर्मचारी वसाहतीत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी राहात आहेत. त्यामुळे जागा हस्तांतरित केल्यानंतर त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या भूखंडापैकी अडीच एकर भूखंड मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे मेट्रोसाठी देण्यात आला आहे. अशी उदारता सामान्यांच्या गृहनिर्माणासाठी दाखविली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १२५३ एकर भूखंड अतिरिक्त हवा! धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे एकूण क्षेत्र आहे ५५० एकर आणि या प्रकल्पासाठी धारावीबाहेरील रेल्वे (४५ एकर), मुलुंड जकात नाका (१८ एकर), मुलुंड कचरापट्टी (४६ एकर), मिठागरे: २८३ एकर, मानखुर्द कचरापट्टी (८२३ एकर), बीकेसी जी ब्लॅाक (१७ एकर) व मदर डेअरी कुर्ला (२१ एकर) असा एकूण १२५३ एकर भूखंड आंदण दिला जाणार असल्याचा दावा धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केला आहे. ००००००

फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत नोंदणी करावी

कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने ठाणे : कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू हे फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या १२ जून २०२४…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पेरणीच्या कामास सुरूवात झाले असून शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली. गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.बनावट अथवा भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाणांचा संपूर्ण तपशील उदा. पिकाचे नाव, वाण, संपूर्ण लॉट नं., बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे नाव व पत्ता इत्यादी बाबींचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.  खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठीच आहे याची खात्री करावी.भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे, पिशव्या सिलबंद अथवा मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची, लेबलवरील अंतिम मुदत पाहून बियाणे खरेदी करावे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमंतीने विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याकरिता 7039944689 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे निरसन तालुकास्तरीय कृषि विभागाचे अधिकारी करतील. 0000

उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई

उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, महात्माफुले कॉलनी, नालंदा शाळापरिसर, भिमशक्तीनगर, आम्रपालीनगर, पंचशीलनगर, साईबाबानगर, कानसई रोड, भारतनगर, राजपूत लाईन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी द्या त्यानंतरच पाणी बिल पाठवा, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला मनसेने याबाबत आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले आहे. उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी नेहमी पाणीटंचाईग्रस्त परिसर राहिला आहे. सुरवातीला अनियमित व कधीही पाणी पुरवठा होत होता. तर काही दिवसांपासून मध्यरात्री अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. असा आरोप स्थानिकांनी केला असून मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबत आवाज उठवून महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. तसेच खडी मशीनपासून कुर्ला कॅम्प जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी निश्चित पाणी योजना राबविण्याची मागणी होत आहे. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे, उंच जलकुंभ बांधले. मात्र त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. आयुक्त अजीज शेख यांना मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पाणी टंचाई बाबत निवेदन दिले. यावेळी सचिन बेंडके, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, प्रकाश कारंडे, सुहास बनसोडे यांच्यासह सुनील रोहिडा, अमित सिंग, विक्की जिप्पसन, सचिन सिरसाठ, रमेश जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 00000