Author: bittambatami.com

मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीची वाढ

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला भेडसावत असलेली पाणी समस्या लक्षात घेऊन मिरा भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० दशलक्ष लिटरची (एमएलडी) वाढ करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला दिले आहेत. हे पाणी उद्या…

‘प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई’

उदय सामंत यांचा इशारा ठाणे : इंडिया आघाडीने जातीय ध्रुवीकरण करीत चुकीचा प्रचार केला आणि त्या प्रचाराला जनता बळी पडली. मात्र आता अवघ्या २४ तासाच्या आतच ते त्यांना विसरले. परंतु आमच्या कुठे चुका झाल्या, कोण कुठे कमी पडले, याचे आत्मचिंतन केले जाईल आणि विधानसभेला त्यांना व्याजसकट हिसाब परत केला जाईल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दुसरीकडे कोणी चांगले काम केले कोणी केले नाही, याचा अहवाल येत्या आठ दिवसात घेतला जाणार असून प्रत्येकाचा प्रगती पुस्तक तपासले जाईल असा इशारा देत जे यात नापास झालेले असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. परंतु आम्ही गाफील राहिलो, त्यामुळेच काही ठिकाणी समीकरणे चुकीली असल्याचेही ते म्हणाले. परंतु निवडून आल्यानंतर त्याचा साधा उल्लेख सुध्दा त्यांनी केलेला नसल्याचे ते म्हणाले. उमेदवार उशीराने घोषीत करणे, प्रचाराला कमी दिवस मिळाल्याने आणि काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागल्यानेही आम्ही मागे पडलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आम्ही व्याजासकट परत करु असा दावा करीत राज्यात विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी २१ जागांवर निवडणुक लढविली. मात्र त्यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र आम्ही १५ जागा लढून ७ जागा जिंकल्या. त्यामुळे उभाठा पेक्षा आमचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी ईव्हीएमवर हल्ला झाला आणि आता निवडणुका झाल्या आणि जागा आपल्या बाजूने आल्या. मात्र आता ईव्हीमीवरील हल्ला थांबला असल्याचेही ते म्हणाले.  त्यातही ज्यांच्या हातून कोकण गेले, संभाजी नगर गेले, अशांनी आपली काय स्थिती आहे, हे समजून जावे असा इशाराही त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिवताप, डेंग्यूमुक्त मुंबईसाठी कृती आराखडा तयार करणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश मुंबई : मुंबई डेंग्यू व हिवतापमुक्त करण्यासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर भर देण्याबरोबर कृती आराखडा तया करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर जनजागृतीवर अधिक भर द्यायला हवा, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले. पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात जून हा ‘हिवताप विरोधी महिना’ म्हणून पाळण्यात येतो. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी एकत्रितरित्या मुंबईमध्ये दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. सुधाकर शिंदे बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून हिवताप निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सूचित केले. राज्य सरकारच्या हिवताप आणि कीटकजन्य आजार विभागाच्या तांत्रिक अधिकारी डॉ. रुप कुमारी यांनी रुग्णांवरील उपचाराबद्दलच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच हिवताप नियंत्रणासाठी १ – ३ – ७ धोरणचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे पथकप्रमुख डॉ. बद्री थापा यांनी हिवताप उद्रेकांचा तपास कसा करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच आवाहन केले. डॉ. एन. आर. तुली यांनी दिल्लीत विविध उपाययोजना कशा प्रकारे राबविल्या जातात, तसेच समुदाय जागरुकता कशी केली जाते यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबई महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सर्वांना सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे आवाहन केले. हिवताप, डेंग्यू नियंत्रणात आणणे, त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, कीटकनियंत्रण प्रभावीपणे राबविणे इत्यादी विषयांवर या परिसंवादात चर्चा झाली. यावेळी मुबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व ७ परिमंडळातील उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदींचा सहभाग होता.

दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी?

अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा एकतर्फी विजय झाला असला तरी याच मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांना मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबाजी पाटील यांना अंबरनाथमधून ३१ हजार मते होती. या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर ६० हजार मते मिळवून विजयी झाले होते. राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अंबरनाथ शहरात सर्वाधिक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे त्यांच्यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील लढाई तशी सोपी समजली जात होती. त्यात अंबरनाथ शहरात विरोधी पक्ष नावापुरता राहिला होता. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पडलेले खिंडार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची निष्प्रभता आणि ठाकरे गटाला नसलेले सक्षम नेतृत्व यामुळे अंबरनाथमधून विजयी आघाडी मिळण्याची आशा शिवसेनेला होता. तशी ती आघाडी मिळालीही. डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून ९३ हजार ६७० मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ८८ हजार ८१० मते डॉ. शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे यंदा मतांची संख्या वाढली. मात्र त्याचवेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांनी तब्बल ५८ हजार २८ इतकी मते मिळवली. त्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीसह अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा दरेकर यांना २६ हजार अधिक मते मिळाली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांवर विधानसभा मतांचे आकडे अवलंबून असतात. गेल्या लोकसभेत डॉ. शिंदे यांना ८८ हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना विधानसभेत ६० हजार ०८३ मते मिळाली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेस उमेदवार रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे विधानसभेतील विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लढाई आणखी कठीण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्रभावी प्रचाराचा अभाव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कमतरता आणि सहकारी पक्षांची ताकद नसतानाही ठाकरे गटाने मिळवलेल्या या मतांमुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरूवारी दहा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे. जलशुध्दीकरण केंद्रांच्या या दुरुस्ती, देखभालीच्या कामांमुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम आणि परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. त्याप्रमाणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. या जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या मुख्य जलवाहिनी, पोहच जलवाहिनींवरील पाणी गळती थांबविण्याची कामे या कालावधीत केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. या कालावधीत यांंत्रिकी आणि तांंत्रिक दुरुस्तीचीही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी दिवसभर दहा तास कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या दोन्ही शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

डोंबिवलीतील शिळफाटा  मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त

डोंबिवली : गेल्या महिन्यापासून कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महावर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा, विको नाका ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेपर्यंत सुरू केले आहे. या कामासाठी…

अनधिकृत होर्डिंग्जमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेचे २५४ कोटींच्या महसुलावर पाणी?

शहरांच्या मुख्य रस्त्यांवर ९६ बेकायदा होर्डिंग्ज कल्याण: कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर एकूण ९६ भव्य आकाराची बेकायदा होर्डिंग्ज आहेत. या होर्डिंंग्जनी पालिका हद्दीतील सुमारे दोन लाख ८२ हजार ५५४ चौरस फुटाचे क्षेत्रफळ व्यापले आहे. या होर्डिंग्जचे पालिकेकडून आकारण्यात येणारे एक ते पाच वर्ष कालावधीतील शुल्क आणि त्यावरील दंडात्मक रकमेचा विचार करता या बेकायदा होर्डिंग्ज (जाहिरात फलक) लावणाऱ्या एजन्सींनी पालिकेचे मागील अनेक वर्षात सुमारे २५४ कोटी ३० लाखाचे नुकसान केले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार एजन्सी चालक, नियंत्रक पालिका अधिकाऱी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे. ही रस्तोरस्ती लावण्यात आलेली बेकायदा होर्डिंंग्ज नैसर्गिक आपत्तीने कोसळुन सामान्यांचा जीव जातो. घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेने हे स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा होर्डिंग्जने दुर्घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तत्पूर्वीच होर्डिंंग्ज काढून टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार गोखले यांनी आयुक्तांकडे केली आहे. शिळफाटा रस्त्यावर अशाप्रकारची होर्डिंग्ज असल्याने एमएसआरडीसीने अशा होर्डिंंग्जचा शोध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलाचे नुकसान ९६ बेकायदा होर्डिंंग्जनी कडोंमपा हद्दीतील दोन लाख ८२ हजार चौरस फूट जागा व्यापली आहे. या जाहिरात फलकांचे प्रति वर्षाप्रमाणे चौरस फुटामागे २५ रुपये शुल्क धरल्यास ही रक्कम आठ कोटी ४७ लाख रूपये होते. पाच वर्षाचे हे शुल्क ४२ कोटी ३८ कोटी होते. हे जाहिरात फलक बेकायदा असल्याने त्यांच्या पाच पट दंड आकारण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. या बेकायदा जाहिरात फलकांपासून पालिकेला २५४ कोटी २९ लाखाचा महसूल मिळू शकतो. ही सर्व रक्कम जाहिरात एजन्सी चालकांनी बुडून पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. अशा एजन्सी चालक, नियंत्रक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. ठाण्याचा आशीर्वाद या बेकायदा होर्डिंग्जचा खलनायक ठाण्यात असून पालिकेने अशा होर्डिंग्जवर कारवाई केली तर राजकीय आशीर्वाद असलेला हा खलनायक थेट पालिका वरिष्ठांना संंपर्क करून ती कारवाई रोखतो. अनेक वर्षापासून हे प्रकार कल्याण, डोंबिवलीत सुरू आहेत. त्यामुळे अनेक वर्ष ही बेकायदा होर्डिंंग्ज पालिकेला महसूल न देता रस्त्यावर झळकत आहेत. या बेकायदा फलकावर जाहिरात लावण्यासाठी एक दिवसाचा खर्च चार हजार रुपये असतो. खासगी धारक ती वसूल करतो. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात अशी फलके झळकत आहेत. कोट पालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्यात आली आहेत. काही होर्डिंग्ज धारकांनी परवानगी, नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. काहींना फलक स्थिरता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जी होर्डिंंग्ज शहरात दिसतील ती सर्व काढून टाकण्यात येणार आहेत. होर्डिंग्जच्या माध्यमातून पालिकेचे महसुली नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. धैर्यशील जाधव (उपायुक्त, मालमत्ता विभाग)

मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी मुंबई: मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. चारही भावंडे सुखरूप असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. यातील तक्रारदाराचे अनुक्रमे अठरा, पंधरा, आठ आणि अकरा वर्षांचे चार भाचे त्यांच्या सावत्र आईसोबत २६ मेला घर सोडून निघून गेले होते. कौटुंबिक वादातून या सर्वांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. २८ मे रोजी मुलांची आई एकटी घरी परत आली होती. मात्र चारही भावंडे घरी न आल्याने त्यांच्या मामांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पथकाला मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. सावत्र आईच्या चौकशीतून ते सर्वजण अंधेरीहून दादर, कल्याण असे रेल्वेने पंजाब मेल पकडून दिल्लीच्या दिशेने गेले होते. मात्र मध्य प्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकात तिने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिने चौघांनाही घरी येण्याचा सल्ला दिला, मात्र ते चौघेही घरी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते पुढे निघून गेले; तर त्यांची आई पुन्हा मुंबईत निघून आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना ते चौघेही ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले होते. तिथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला होता. त्यामुळे या पथकाने ग्वाल्हेर शहरातील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या व्यक्तीने त्यांना माधव बाल निकेतन या आश्रमात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली. तिथे या चौघांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक घामाघूम

मनोर : महावितरण कंपनीकडून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ग्रामीण भागासह मनोर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे पंखे वेगाने फिरत नसल्याने ग्रामस्थांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे.…

ठाण्यातील भास्कर कॉलनीच्या रस्त्याजवळील अवाढव्य होर्डींग काढण्यासाठी

जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे! ठाणे : येथील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीच्या भर वस्तीत सिताराम भुवन या जुन्या इमारतीत फ्लड लाइट्स लावलेले आवाढव्य जाहिरात फलक व त्यावरील मोठमोठ्या लाईटमुळे परिसरात उष्णतामान वाढवले जात आहे. हा प्रखर प्रकाश रहिवाशांच्या घरात येत असल्याने त्यांना त्रास होतो. याशिवाय या होर्डींगमुळे घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करून येथील हाऊसिंग सोसायटींमधील रहिवाश्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करून हाेल्डीग हटवण्याची मागणी रहिवाश्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह ठाणे महापालिका आयुक्तांकउे केली आहे. भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्याचा आकार अंदाजे ४० फूट ४० फूट असल्याचा आंदाजही या रहिवाश्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. या हाेल्डींगच्या इमारतीजवळ हॉटेल, पानाचे दुकान, टायरवाला व सर्विस रोड हा सतत मोठ्या वर्दळीचा परिसर आहे. या भर नागरी वस्तीमध्ये अवाढव्य होर्डिंगच्या जाहिरातींबोर्डवर तब्बल वीस हाय पावरचे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत. त्यामुळे परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. परिसरातील लगतच्या सर्व इमारतीमधील रहिवाशांना प्रखर प्रकाश घरात येत असल्याने त्यांना भयानक त्रास होत आहे. याशिवाय आगामी वादळी पावसादरम्यान घाेटकाेपरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठी घटना होण्याची भीती रहिवाश्यांनी व्यक्त करून तत्काळ हाेल्डीग हटवण्याची मागणी लावून धरली आहे. या अवाढव्य हाेल्डींगमुळे दुर्दैवी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्त हानी होण्याचा संभव आहे. त्यास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हाेल्डींगवर तात्काळ कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी कंबर कसली आहे. करदात्यांच्या जीवावर बेतणाऱ्या ह्या जाहिरात फलकांच्या आथिर्क उत्पनास वेळ प्रसंगी मुकावे लागले तरी तरी चालेल, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या भव्य हाेल्डींगला हलवण्याची मागणी टीएमसी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे जेष्ठ नागरिक महेंद्र माेने यांनी स्पष्ट केले.