Category: क्रीडा

 महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६. महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल वडोदरा:- महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची…

 सिद्धांत – मितालीला प्रथम मानांकन

जिल्हा कॅरम स्पर्धा सिद्धांत – मितालीला प्रथम मानांकन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी एम बाथ बोट क्लब ट्रस्ट आयोजित मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारीला सकाळी पुरुष एकेरी गटाने सुरु होत आहे. एकंदर १३० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून पुरुष एकेरी गटात डी के से सी च्या सिद्धांत वाडवलकरला तर महिला एकेरी गटात जैन इरिगेशनच्या मिताली पाठकला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एकंदर सात सत्रात सामने खेळविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे. पुरुष एकेरी : १) सिद्धांत वाडवलकर ( डी. के.  सी सी ) २) नीरज कांबळे ( डी के सी सी ) ३) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) ४) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) ५) हरेश्वर बेतवंशी ( ए के फाऊंडेशन ) ६) सौरभ मते ( डी के सी सी ), ७) शेख महम्मद रझा ( ए के फाऊंडेशन ) ८) नीलांश चिपळूणकर ( ए के फाऊंडेशन ) महिला एकेरी : १) मिताली पथक( जैन इरिगेशन ), २) सोनाली कुमारी ( ए के फाऊंडेशन ), ३) ऐशा साजिद खान ( जैन इरिगेशन ) ४) अंजली सिरीपुरम ( भारतीय आयुर्विमा महामंडळ )

अंमलबजावणी थंड!

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अंमलबजावणी थंड! मुंबई : मुंबईतील काही मोजक्या  क्रीडा संघटक कार्यकर्त्यांनी केंद्रात नव्याने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय क्रीडाप्रेमी क्रीडामंत्री यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यावेळचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून  खेळांच्या क्रीडा संघटना संदर्भात त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीबाबत त्यावेळी पत्रव्यवहार चालू केला. केंद्राला लक्षात आले की, या कार्यपद्धतीमुळे क्रीडा संस्कृतीच्या विकासाला पायबंद बसतो आहे.याच दरम्यान पासून   त्वरित विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांसाठी   सुधारित नियमांवलींची  प्रक्रिया करण्यासाठीचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होऊ लागला. बराच कालावधी लागला पण आता याला चांगलं यश प्राप्त झालं. या गोष्टींचा आम्हा क्रीडा संघटकांना आनंद होत आहे.याची अंमलबजावणी आता नव्या वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. विविध खेळांच्या विविध स्तरांवरील क्रीडा संघटनां वरील  क्रीडा कार्यकर्ते वर्षानुवर्षे विविध पदांवर राहून वरिष्ठ क्रीडा संघटनांवर हक्क आणि अधिकार गाजवून मनमानी कारभार आजही करीत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मनमानी कार्यपद्धतीला अधिकृतपणे पायबंद बसावा हा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता. विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांच्या या कार्यपद्धतीबद्दल मी वैयक्तीक स्वरूपात विविध वर्तमानपत्रे,साप्ताहिके, मासिके,दिवाळी अंक व अन्य माध्यमातून  याच विषयावर भरपूर लिखाण गेली दशकाहून अधिक काळ केलेले आहे.त्याचाच हा परिणाम असल्याने प्रसिद्ध माध्यमांना देखील धन्यवाद देत आहे.माझ्या इतके विस्तृत स्वरूपात लिखाण  कुणीच केलेले नाही. केंद्र सरकारने क्रीडा प्रशासनात सुधारित नियमांना चालना देणारा कायदा लागू होत असताना माझ्या विविध महत्वाच्या  सूचनांचा विचार  केला गेला याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.आता क्रीडाक्षेत्राला भविष्यात विविध स्तरांवर सुवर्ण दिवस येतील. विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांच्या अंदाधुंदी कारभारावर अंकुश ठेवणारा हा कायदा आहे.परंतु याची अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे व पारदर्शक होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे क्रीडाक्षेत्रात चांगलेच स्वागत होत आहे. असं  जरी असले तरी महाराष्ट्र शासनाच्या धर्मदाय आयुक्ताकडून मात्र क्रीडा संघटनेच्या जुन्या तक्रारीबद्दल नव्याने कायदा होऊनही आजही नव्या वर्षात वाटण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत. ही मंडळी झोपेचे सोंग घेऊन बसलेली आहेत. केंद्राच्या या नियमांचे कायद्यात रूपांतर झाले तरी येथील म्हणजे राज्यातील  दावे एकतर्फी न्यायाने यावर निर्णय होणे आवश्यक आहे. असं असूनही ते तारखा देणे याच कामात आजही मग्न आहेत.  आता तर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार क्रीडा संघटनांच्या तक्रारीचा निकाल देणे सहज शक्य झालेले आहे.यानुसार नव्याने निवडणुका घेणे शक्य होणारे आहे. असं  सारं असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. तारीख वर तारीख देऊन या क्रीडा संघटनांना बेकायदेशीर रित्या पाठिंबा देत असतात. परंतु ही मंडळी आपल्या डोळ्यावर पट्टी ठेवून गप्प  बसलेली दिसतात. या अशा कृतीमुळे ही मंडळी महाराष्ट्र शासनाची देखील डोळेझाख  करून क्रीडा संघटनांना अनुदाने देण्यास भाग पाडतात. आता राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार  क्रीडा संघटनांच्या कार्यकारणी अधिकृतरित्या बरखास्त नक्कीच करू शकतात. महाराष्ट्रात राज्य शासनाच्या क्रीडा व न्याय व विधी खात्यांच्यावतीने धर्मादाय आयुक्तांना कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडावे. आवश्यक असेल तेथे या क्रीडा संघटनांची कार्यकारिणी बरखास्त करून केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या सदस्यांना प्रशासकीय नेमणूक करून नव्याने झालेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार कार्यकारिणीची निवड ठराविक मुदतीत त्वरित करण्यात यावी. विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि देशातील विविध स्तरांवरील विविध क्रीडा संघटनांवरील  भांडण, तंटा , वाद आदींवर तोडगा काढण्यासाठी प्रस्तापित राष्ट्रीय क्रीडा लवाद यांची  नेमणूक करून त्याची प्रत्यक्षात कायदेशीर अंमलबजावणी दिनांक १ जानेवारी २०२६ पासून सुरुवात करण्यास मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय , ऑलिंपिक, राष्ट्रीय  पॅरालिम्पिक, देशातील राष्ट्रीय,राज्य,जिल्हा क्रीडा संघटना या आता राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या अंतर्गत यांना कार्यपद्धत राबवावी लागणार. वरिष्ठ क्रीडा संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांना संलग्नता देताना यांना या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याचे  पालन करणे बंधनकारक असेल. आता या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी व्यवस्थापक मंडळ सदस्य मर्यादा एकूण १५ सदस्यांची राहील. मात्र ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकच्या जागतिक ऑलिम्पिक हिंवाळी, ऑलिम्पिक खेळाडूंच्या निवडणूक निवडीसाठी स्वतंत्र नियमावली आहे. राष्ट्रीय स्तरांवरील क्रीडा संघटनांवर प्रतिनिधी पाठविण्यासाठी पुरुष व महिलांना समान संधी देणे बंधनकारक आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील अध्यक्षांची निवड केंद्र सरकार करणार. या अध्यक्षांना सार्वजनिक आणि क्रीडा प्रशासना बरोबरच क्रीडा विषयक कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींची निवड करतील. केंद्र सरकारची समिती वरिष्ठ क्रीडा संघटनांना संलग्न मान्यता देताना त्यांच्या अर्थिक कारभारावर लक्ष ठेवीत असताना त्यांना दंड आकारण्याचा अधिकार असेल.या समितीचे सदस्य ६५ वर्षाच्या वयाच्या आतील असतील. यांची नियुक्ती फक्त दोन टर्म साठी   असणार. राष्ट्रीय क्रीडा लवादानांतील सदस्यांची मुदत चार वर्षांची असेल. मात्र यांच्या वयाची मर्यादा ६७ वर्षांची असेल. शिवाय केंद्र सरकारच्या या सर्व राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याचे चोख पालन करण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक पॅनल स्थापन केले जाईल आणि तेच राष्ट्रीय व राज्य संघटनांच्या निवडणुकीत उपस्थित असतील. कोणत्याही स्तरांवरील क्रीडा संघटना बरखास्त करण्याचा अधिकार हा कुणाकडे असावा याचा कुठेही उल्लेख नाही. न्यासाच्या नियमानुसार हा अधिकार त्याच नोंदणीकृत संघटनेस असतो. हा अधिकार राज्य संघटनेस नसावा.कारण ते या अधिकाराचा वापर निवडणुकीसाठी मनमानी पद्धतीने करतात.  यासाठी शासकीय समितीकडे हा अधिकार असावा. विविध खेळांच्या विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांची व्यवस्थापकीय कार्यकारिणी ही १५ सदस्यांचीच असेल. त्यात कमीतकमी २ राष्ट्रीय अथवा क्रीडा पुरस्कार पटू असतील व कमीतकमी ४ महिला सदस्यांचा समावेश असेल. या व्यवस्थापक कार्यकारिणीत कमीतकमी २५% संख्या ही खेळाडूंची असेल.यांचा कालावधी चार वर्षाचा असेल.जे शासकीय अथवा निमशासकीय सभासद कार्यकारिणीत सेवा देऊ इच्छित असतील तर त्यांना त्यांच्या नोकरीतील  आस्थापनेतील  प्रमुख व्यवस्थापनाकडून निवडणूकपूर्व संमती पत्र सादर करणे बंधनकारक राहील. अध्यक्षांचा कालावधी हा जास्तीतजास्त सलग १२ वर्षे असेल अथवा या कालावधीत एक टर्म खंड पडला किंवा नसला तरी चालू शकतो. सचिव व खजिनदार (कोषाध्यक्ष) हे सतत दोन टर्म (एक टर्म चार वर्षाची राहील.) पदावर राहू शकतात किंवा एक टर्म (चार वर्षाचा) खंड घेऊन पुन्हा सुद्धा पदावर राहू शकतात.परंतु एकूण आठ वर्षे पदावर राहिल्यावर एक टर्म खंड किंवा विश्रांती घेणे बंधनकारक असेल.नंतर या पदांवर पुन्हा येऊ शकतात. मात्र वयाच्या ७० व्या वर्षी व्यवस्थापक मंडळ   कार्यकारिणीचे सदस्य आपोआप  निवृत्ती होतील. निवडणूक प्रक्रिया आणि पदाधिकारी यांची पात्रता ही केंद्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अन्वयेच्या तरतूदीनुसार असेल. विविध खेळांच्या भारतीय महासंघांशी असलेली आपली  संलग्नता कायम राखण्यासाठी संलग्न राज्य तसेच जिल्हा क्रीडा संघटनांनीही आपल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार घटना नियमावलीत बदल करणे बंधनकारक राहील.   (१) वय फसवणूक ( वय चोरणे) प्रतिबंध ही तरतूद युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ,भारत सरकार यांच्यानुसार कायद्याचे बंधन राहील.  (२) कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध,मनाई आणि निवारण २०१३ नुसार यासाठी स्वतंत्र समिती नेमून लैंगिक स्वरूपाचे वर्तन रोखणे, त्यावर बंदी घालणं आणि पीडितांना संरक्षण देणे व आवश्यक तेव्हा योग्य निर्णय वेळेवर घेणे.  (३) डोपिंग विरोधी उपाय योजना व प्रतिबंध ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे राहून त्याचे पालन करणे भाग राहील. (४) माहितीचा अधिकार अधिनियम २००५  अंतर्गत कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याकरिता आवश्यक ती माहिती ३० दिवसाच्या आत देण्यासंदर्भात ती बंधनकारक राहील. संघटनांनी वरील सारे घटना व नियमावलीत  बदल न केल्यास राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा अन्वये राज्य, जिल्हा आणि राज्य निवडणूक मतदान  अधिकार व हक्क गमावून बसतील. या साऱ्या गोष्टींच्या  तरतुदी घटना नियमावलीत नसतील तर क्रीडाक्षेत्रात  गैरवर्तणुकीला उत्तेजन मिळू  शकेल ! म्हणूनच केंद्राने जे कायदे केले आहेत ते सारे कायदे केंद्र सरकारने पाळण्याचे बंधन क्रीडा संघटनांना ठेवले आहे. भविष्यात देशात अथवा राज्यांतून ,राष्ट्रीय,आंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धा,एशियन स्पर्धा आणि ऑलिम्पिक आदी सारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असताना अथवा होताना सहभागी खेळाडूंचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. विविध खेळांच्या वरिष्ठ क्रीडा संघटनांना येथे अधिकृत असणं फारच गरजेचे असणार आहे. यामुळे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ चे पालन करणाऱ्या संघटनांना अधिकृतरित्या मान्यता लाभणार आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्या संघटनांच्या कार्यकारिणीला त्यांचे अधिकार व हक्क गमावून बसावे लागतील! याची काळजी घेण्याची आवश्यकता विविध खेळांच्या क्रीडा संघटनांच्या क्रीडा संघटनांवर असेल! मनोहर आ.साळवी शिव छत्रपती पुरस्कार विजेते. क्रीडा संघटक

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न कल्याण: पोलीस हवालदार स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित मास्टर्स कप चॅम्प्स टी-२० स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या करण क्रिकेट अकॅडमी या संघाने…

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुख, तन्विर कोतवाल ठरले “सर्वोत्तम लिफ्टर”

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुख, तन्विर कोतवाल ठरले “सर्वोत्तम लिफ्टर” मुंबई : महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागरिक सहाय्य केंद्र, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित…

 धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न

धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा  अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी  उदय गायकवाड,  रामदास शिंदे आणि  सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उदय गायकवाड आणि  रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील  या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते.  श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली. धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मुंबई : चौथ्या आरंभ स्पोर्ट्स तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्र वर तर सेंट्रल बँकेने यजमान ओरिएंटल इन्श्युरन्स संघावर विजय मिळवला. डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्राचा ९ विकेट्स शिल्लक राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ महाराष्ट्राला ९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहिदास कोयंडे आणि कल्पेश सावंत यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. कल्पेश सावंतने १४ धावांत ४ तर रोहिदास कोयंडेने १३ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर डाटामॅटिक्स संघाने ९.३ षटकांतच ९२ धावांचे आव्हान पार केले. भुवन पाटील याने ३० चेंडूंत केलेली ५० धावांची तर उपेंद्र यादवने २५ चेंडूंत केलेली ३६ धावांची खेळी डाटामॅटिक्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. एलिट गटाच्या दुसऱ्या सामन्यात सेंट्रल बँकेने ओरिएंटल इन्श्युरन्सवर २५ धावांनी विजय मिळवला. सेंट्रल बँकेने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा उभारल्या. प्रथम परमार याने तडाखेबंद ५८ धावांची खेळी साकारली. त्याला उत्तम साथ देताना गौतम साठेने २३ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. हे उद्दिष्ट गाठताना ओरिएंटल इन्श्युरन्सच्या फलंदाजांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही, परिणामी धावांची गती कमी झाल्याने त्यांना विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. ओरिएंटलचा डावखुरा फलंदाज समीप मिसाळ याने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा तर शंतनु तांडाले याने ४० धावा करत चांगला प्रतिकार केला. मात्र विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजेश बोरकर याने दोन बळी मिळवत सेंट्रल बँकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ मार्च रोजी खेळवण्यात येतील.

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.