Category: होम

भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत श्रीलंकेविरुध्द खेळणार

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारताने साखळीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने साखळीत केलेल्या पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करताना अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. गुणतालिकेत  श्रीलंका प्रथम स्थानावर असून पाठोपाठ भारत सुध्दा दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड व सिंगापूर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर असून अंतिम सामन्यातून बाहेर फेकले गेले आहेत. आज भारतीय संघाने  इंग्लंडच्या पहिल्या पराभवाची सव्याज पराभवाची परतफेड करत स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय संघ गुणी असून अंतिम फेरीत भारत चमकदार कामगिरीची नोंद करेल असे प्रशिक्षक जयेश साळगावकर यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात १०२ धावा करताना सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले होते. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने (१६ धावा, १ बळी), धनुष भास्कर (१९धावा १ बळी), आफ्रोज पाषा (१९ धावा व २ बळी), कार्थिक सुब्रमनियन (१८ धाव ) व दैविक राय १ बळी) यांनी जोरदार कामगिरी करताना इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. तर इंग्लंडच्या अनिश पटेल (१७ धावा), टॉम क्लार्क ( १३ धावा १ बळी) व कॉर्नर रॉफ (१० धावा व २ बळी) यांची कामगिरी चांगली झाली.

उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास

मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे. १० ते १६ एप्रिल या सहा दिवसांत भटक्या प्राण्यांच्या निर्जलीकरणाची ३१६ प्रकरणे मुंबई, ठाणे जिल्ह्यात समोर आली आहेत. यामध्ये श्वान आणि मांजरींचे प्रमाण अधिक आहे. काही भटके प्राणी उष्णतेपासून बचावासाठी वाहनाखाली बसलेले असतात. या वाहनांच्या चाकाखाली येऊन प्राण्यांचे अपघातही होऊ लागली आहेत. त्यामुळे दुहेरी संकट प्राण्यांवर ओढावत आहे. श्वान आणि मांजरींप्रमाणे गाई, बैल, गाढव यांसारख्या मोठ्या प्राण्यांनाही फटका बसत आहे. गेल्याकाही दिवसांपासून तापमान वाढत आहे. नागरिकांना या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे दुपारी अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. माणसांच्या डोक्यावर छप्पर आहे. परंतु भटक्या प्राण्यांना सावली आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सिटीजन्स फॉर ॲनिमल फाऊंडेशन (कॅप) या स्वयंसेवी संस्थेकडे १० ते १६ एप्रिल या कालावधीत प्राण्यांच्या निर्जलीकरणाच्या ३१६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे श्वान आणि मांजरींची आहेत. ३१६ पैकी ९५ तक्रारी ठाणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये ६३ श्वान आणि ४२ मांजरींचा सामावेश आहे. त्याप्रमाणे पाच कबुतर, दोन खारी, चार ते पाच कावळे निर्जलीकरणाचा फटका बसला आहे. या संस्थेचे स्वंयसेवक वाहनाने ठिकठिकाणी फिरत असताना ही प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे निर्जलीकरणाची प्रकरणे आणखी जास्त असू शकतात. असा अंदाज वर्तविला जात आहे. ठाण्यातील पशू वैद्यकीय रुग्णालयांत उष्माघाताची प्रकरणे देखील वाढत असल्याचे डॉ. सुहास राणे यांनी सांगितले. भटक्या प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये निर्जलीकरणाची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ त्यांच्या बचावासाठी पुढे येणे आवश्यक आहे. भटक्या प्राण्यांच्या अंगावर ओले कपडे ठेवावे, त्यांना सावलीत न्यावे आणि पाणी द्यावे. पक्षी आढळून आल्यास त्यांना एका वाटीमध्ये पाणी आणि खाद्य ठेवावे. घराच्या खिडक्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. हे पाणी गरम झाल्यास ते बदलावे. नागरिकांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारातील प्राणी-पक्ष्यांची काळजी घेतल्यास आम्हाला मोठी मदत होईल. – सुशांक तोमर, संस्थापक, कॅप संस्था. संस्थेचे स्वंयसेवक दररोज सकाळी ८ ते रात्री उशीरापर्यंत निर्जलीकरणामुळे त्रस्त प्राण्यांचा शोध घेत असतात. या दरम्यान, काही स्वयंसेवींनाही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. आठवड्याभरात संस्थेचे दोन स्वयंसेवी आणि एका कर्मचाऱ्याला निर्जलीकरणाचा त्रास झाला. त्यामुळे स्वयंसेवीच्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

“कपिल पाटील, डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”

नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर ठाणे : जव्हार मोखाड्यापेक्षा कल्याण सुधारला असे कपिल पाटील यांचे म्हणणे असेल तर त्यांनी एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा आणि मग त्यानंतर कळेल की चष्मा कोणाला बदलण्याची गरज आहे, असे प्रत्युत्तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी दिले आहे. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमधून प्रवास करूया म्हणजे नागरिकांना प्रवासादरम्यान काय हाल सोसावे लागतात हेही समजेल, अशी टीकाही त्यांनी केले आहे खासदार कपिल पाटील यांनी सोनाळे आणि सापगाव ही दोन गावे दत्तक घेतली होती यातील भिवंडी तालुक्यामध्ये सोनाळे गाव येथे तर शहापूर तालुक्यामध्ये सापगाव येथे या दोन्ही गावांमध्ये आपण पाहणी करून लोकांची चर्चा केली तर कुणाला डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा चष्मा बदलण्याची गरज आहे हे समजून येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. जव्हार मोखाड्यापेक्षा कल्याण सुधारला असे कपिल पाटील यांचे म्हणणे असेल तर त्यांनी एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा आणि मग त्यानंतर कळेल की चष्मा कोणाला बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. कल्याणमधील मोहने गावात फिरल्यावर दिसून येते की, इथे रस्ते नाहीत. पार्टस स्मार्ट सिटी मध्ये अशी परिस्थिती आहे. बदलापूर मध्ये पाणी टंचाईची समस्या भयानक आहे. रेल्वेची समस्या ही मोठी आहे. यामुळेच खासदार कपिल पाटील यांनी संपूर्ण एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा, असे आव्हानही त्यांनी पाटील यांना दिले. खासदार कपिल पाटील हे सांगत असतील डोळ्याचा चष्मा बदल तर मी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आम्ही दोघे मान्य करून चष्मा बदलू पण, खासदार कपिल पाटील यांनी संपूर्ण एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा. जेणेकरून मतदार संघातील परिस्थिती समोर येईल आणि कुणाला चष्मा बदलण्याची गरज आहे हेही समजेल, अशी टीकाही त्यांनी केली.

दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

पनवेल : तळोजा येथील सेक्टर ३४ व ३६ येथील महागृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनी बुधवारी सकाळी बेलापूर येथील सिडको भवनासमोर एकत्र येऊन त्यांची व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली. तळोजातील महागृहनिर्माण प्रकल्पामध्ये सोडत प्रक्रियेमध्ये लाभार्थी ठरलेले साडेचार हजार सदनिकाधारकांना वेळोवेळी आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जाते. या लाभार्थ्यांची मूळ मागणी घरांचा ताबा आणि झालेल्या आर्थिक नूकसानाची भरपाई मिळणे ही आहे. रामनवमी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सिडको भवन बंद असताना अचानक झालेल्या गर्दीमुळे सिडकोत नेमके काय झाले, याची चर्चा परिसरात होती. सिडको महामंडळाने अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१९ ला तळोजा वसाहतीमधील सेक्टर ३४ व ३६ मधील भूखंडांवर ७९०५ घरांचा महागृहनिर्माण प्रकल्पासाठी सोडत जाहीर केली. यामध्ये लाभार्थ्यांची निवड केली, मात्र लाभार्थ्यांकडून सर्व रक्कम घेऊनही घरांचा ताबा सिडको मंडळाने न दिल्याने सदनिकाधार संतापले आहेत. ताबा न मिळाल्याने बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते आणि सध्या राहत असलेल्या घराचे घरभाडे असा अवाजवी खर्चाच्या कचाट्यात हे लाभार्थी अडकले आहेत. फेब्रुवारी महिन्यात मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी सिडको महामंडळाच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लाभार्थ्यांचे नूकसान भरपाईचा प्रस्ताव बनविण्याचे सिडकोने मान्य केल्याची माहिती खा. बारणे यांनी दिली. परंतू त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांची बदली झाली. सदनिकाधारकांनी सिडकोत संबंधित प्रस्तावाची माहिती घेतल्यावर प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव बनविण्याचे काम सूरु नसल्याचे उजेडात आल्याने विद्यमान सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सदनिकाधारकांनी सिडको भवन येथे एकत्र होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी उलवे येथील सदनिकाधारकांप्रमाणे तळोजातील सेक्टर ३४ व ३६ मध्ये महागृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकांना नूकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी या सदनिकाधारकांची आहे. सध्या हे लाभार्थी हवालदील झाले असून यातील एका लाभार्थ्यांने चिंतेच्या भरात आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे पत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले आहे. सिडको मंडळाने या सदनिकाधारकांना मे २०२४ ही नवी तारीख घरांचा ताबा देण्यासाठी दिली असून अजूनही महागृहनिर्माण प्रकल्पासमोर मलनिसारण वाहिनी, जलवाहिनी आणि रस्त्यांचे काम सूरु आहे. घरांचा ताबा मिळण्यासाठी अजूनही 43 दिवस शिल्लक असल्याने ही कामे तातडीने करावीत आणि नूकसान भरपाई सिडकोने द्यावी अशी मागणी सदनिकाधारकांकडून होत आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर

कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखविला आहे. वाहतूक पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी बेशिस्त चालकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. पनवेल स्थानक परिसरात बहुउद्देशीय मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम असल्याने स्थानकात रेल्वे पकडण्यासाठी वृद्ध, बालक व अपंगांना स्थानक गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागते. सुमारे काही मीटर अंतर हातामध्ये ओझे घेऊन चालणाऱ्या प्रवाशांना स्थानकाकडे जाणाऱ्या वाटेत रिक्षांना वळसा घालून जावे लागते. काही रिक्षाचालक त्यांची वाहने बेकायदा पद्धतीने स्थानकापर्यंत घालतात. सामान्य प्रवासी मात्र वाट काढत स्थानकापर्यंत जातो. दीड महिन्यापूर्वी रिक्षाचालकांच्या दोन गटांतील हाणामारीमुळे पनवेल रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम पुढे करत रिक्षांना स्थानक परिसरातील स्टॅण्डपर्यंत येण्यास बंदी केली. मात्र रिक्षांना प्रवेश नाही तर सर्वसामान्यांच्या वाहनांना स्थानक परिसरातील रस्ता बंद करण्याची वेळ आली. बेशिस्त पार्किंग व्यवस्था, रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार आणि रेल्वे तसेच वाहतूक पोलिसांची सातत्याची कारवाई नसल्याने या असमन्वयाच्या कारभारात सामान्य प्रवासी भरडले जात आहेत. सामान्यांची वाट अडवणाऱ्या या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील का, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. रात्रीच्या वेळेस बोलीभाडे पद्धतीने अवाजवी भाडे आकारले जातात. रिक्षाचालक नियमाप्रमाणे व्यवसाय करत नाहीत, याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागसुद्धा जबाबदार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने वेळीच लक्ष न घातल्याने ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. स्थानक परिसरात विस्तारीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल. मात्र एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांना दीडशे पावले चालावे लागते. रिक्षा पकडण्यासाठी शंभर पावले चालावे लागते. अपंग व वृद्धांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा ठेवली नाही. पनवेलमधील रिक्षाचालकांनी शिस्त पाळून व्यवसाय करावा यासाठी वेळोवेळी रिक्षाचालकांचे प्रबोधन केले आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांची कारवाई या परिसरात सातत्याने सुरू असते. रात्रीच्या व पहाटेच्या वेळी रिक्षाचालक रस्ता अडवून रिक्षा उभी करत असल्यास पोलीस कर्मचारी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई नक्की करतील. -संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक विभाग

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलतर्फे ‘गिफ्ट ऑफ लाइफ

सुमारे 30,000  मोफत बाल हृदय शस्त्रक्रिया पनवेल – महाराष्ट्रातील मुंबई; छत्तीसगडमधील रायपूर आणि हरियाणातील पलवल येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सने “गिफ्ट ऑफ लाइफ” या कार्यक्रमांतर्गत 30,000 मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया…

महिला आरक्षणाचे प्रमाण विधानसभा व लोकसभा उमेदवारीसाठी लागू करा  – ॲड पुजा प्रकाश

रमेश औताडे मुंबई : महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला…

अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात ॲड.सुनील चव्हाण

रमेश औताडे  मुंबई – पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर हे निवडणूक रिंगणात असून,त्यांच्या विरोधात सर्वसामन्य जनतेचे प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ऍड.सुनील चव्हाण…

स्पोर्टींग क्लब कमिटीने जेतेपद राखले

ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा ठाणे : शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने विरारच्या अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीचा तब्बल आठ गडी राखून दणदणीत पराभव करत संदीप दहाड अकॅडेमी आयोजित १२ वर्षे वयोगटाच्या १५ षटकांच्या ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. निर्णायक लढतीत स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने उपविजेत्या संघाने दिलेले ११२ धावांचे आव्हान १३.५  षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६ धावा करत अजिंक्यपद कायम राखले. सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात ११२ धावा केल्या. सोहम पलईने ४२ धावांची खेळी करत संघाच्या शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. कौशिक साळुंखेने दोन, अतुल चौधरी आणि अर्णव पांडेने प्रत्येकी एक गडी बाद केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या अनुज चौधरीने या सामन्यातही आपली छाप पाडताना नाबाद ६८ धावा करत संघाला लागोपाठ दुसऱ्या वर्षी विजयी करण्यात मोलाची कामगीरी बजावली. कर्णधार आरुष खंदारेने २० धावा बनवल्या. त्याआधी स्पोर्टींग क्लब कमिटीने उपांत्य फेरीत माटुंगा जिमखान्याच्या ९ गडी राखून फडशा पाडला होता. अर्णव वाणीने ३ गडी बाद करत माटुंगा जिमखान्याला १५ षटकात ७ बाद ८८ धावांवर रोखले होते. त्यांनतर अर्णव चौधरीने नाबाद ४१ आणि आरुष खंदारेने ३१ धावा बनवत ११.४ षटकात १ बाद ८९ धावांसह संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या १२ वर्षाखालील संघाचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या १२ वर्ष वयोगटाच्या स्पर्धेत यजमान संघ विजयी ठरला होता. एल्फ वेंगसरकर अकॅडेमी आयोजित ड्रीम इलेव्हन स्पर्धेत या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. याशिवाय त्यांच्या १६ वर्षांखालील संघानेहि शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली होती. यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने त्यस्पर्धेत एसपी ग्रुप क्रिकेट क्लबचा पराभव केला होता. संक्षिप्त धावफलक : अमेय स्पोर्ट्स अकॅडेमी : १५ षटकात ७ बाद ११२ (सोहम पलई ४२, कौशिक साळुंखे ३-०-१५-२, अतुल चौधरी ३-०-२५-१, अर्णव पांडे २-०-१३-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : १३.५ षटकात २ बाद ११६ ( अनुज चौधरी नाबाद ६८, आरुष खंदारे २०) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : सर्वोत्तम फलंदाज : अनुज चौधरी, सर्वोत्तम गोलंदाज : अर्णव वाणी (७ विकेट्स), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : अतुल चौधरी, सर्वोत्तम कर्णधार : आरुष खंदारे (सर्व स्पोर्टींग क्लब कमिटी ).

आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र असणाऱ्यांनी सुविधेचा लाभ घ्यावा – बाळासाहेब राक्षे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र असणाऱ्या (वंचित गट : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,एसटी, व्हिजे, ओबीसी, एसबीसी, दुर्बल गट- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग  बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास) जास्तीत जास्त पालकांनी आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  या वेबसाईटवर दि. १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ रोजी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असेही शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.