Category: होम

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रल्हाद केणी तसेच भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पनवेल परिसरातील रांजणपाडा, पेंधर, कोयनावेळे, तोंडरे, ढोंगऱ्याचा पाडा, कानपोली, हरिग्राम आणि इतर ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवास सदिच्छा भेट देवून प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रायगडभूषण पंडित उमेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्याचा मुलगा आयएएस

अभिषेकची आयआरपीएसवरून आयएस पदावर झेप उल्हासनगर : आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक टाले यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत आयआरपीएस वरून आयएएस पदावर झेप घेतली आहे.या…

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

भाजपच्या जाहीरात होंर्डींगवर पालिकेची कारवाई डोंबिवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ मोदी की गॅरंटी असे जाहीरातींचे होर्डींग कल्याण शीळ रोड परिसरात लागले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या लावण्यात आलेल्या या होर्डींगवर पालिका प्रशासनाच्यावतीने रातोरात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जाहीरात एजन्सीवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे होर्डींग काढताना पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहारा पालिका कर्मचाऱ्यांना घ्यावा लागला. केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा हा पहिला गुन्हा आहे. कल्याण लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे फलक, ध्वज काढण्यात आले आहेत. पक्षाची चिन्हे, नावे झाकण्यात आली आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याबाबत आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता आचारसंहितेचा भंग करत हे होर्डींग लावले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीनुसार केडीएमसीने या होर्डींगवर कारवाई करत ते रातोरात उतरविले आहेत. केडीएमसी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात कळवा येथील ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी निवडणूक विभागाच्या अॅपवर तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीत जाहीरातीचे फोटोंसह परवानगी शिवाय काही ठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत असा संदेश दिला गेला होता. सदरचे ठिकाण हे डोंबिवली असे दर्शविले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांसह फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड, अरविंद म्हसकर, सावंत पाटील, रतन खुडे, विलास पाटील, भगवान पाटील, अमित गायकर, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी यांनी दावडी रिजन्सी येथे पाहणी केली. कल्याण शीळ रोडवर साई सिटी निळजे रोडलगत लोखंडी साच्यावर अंदाजे 10 ते 12 मजले उंच असा 40 बाय 40 फुट लांबी रुंदी आकाराचा होर्डिंग लावलेला पथकास आढळला. त्यावर 4 कोटी पक्की घरे, बांधली आहेत, आणखी बांधली जातील मोदी ची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा असा मजकूर लिहिलेला होता. तसेच त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. हा जाहीरातीचा रंगीत होर्डिंग अनधिकृत रित्या लावुन आचारसंहिता कालावधीत मालमत्ता विदुपिकरन करून जाहिरात होर्डिंग लावण्यात आला असल्याचे निर्देषानास आले. याविषयी पवार यांनी केडीएमसीच्या मालमत्ता विभागाशी संपर्क करत विचारणा केली असता त्यांनी हे होर्डिंग ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस असल्याचे सांगितले. तरी नमुद कंपनीने कोणत्याही प्रकारे कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयाकडुन पुर्व परवानगी न घेता ती बेकायदेषिर रित्या लावण्यात आली असल्याचे मालमत्ता विभागाच्या निर्देषनास आल्याने सदर घटनास्थळी जात पालिका कर्मचाऱ्यांनी ते होर्डींग हटविले. त्याचा पंचनामा करुन ते ताब्यात घेत कार्यालयात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा पहिलाचा गन्हा दाखल झाला असून पालिका प्रशासन व निवडणूक विभागाने परिसरात बेकायदा होर्डींग, बॅनरची पहाणी करण्यावर जोर दिला आहे.

ठाण्यात प्रताप सरनाईक उमेदवार?

तिन्ही पोलीस आयुक्तालयांकडून गुन्ह्यांची माहिती मागविली ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविल्याने येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आले आहे. आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. सरनाईक यांनी पाठविलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचे असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढविल्याची चर्चा होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही उमेदवारी देऊ नका, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती मागविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हे पत्र जुने असले तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळेच सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावे चर्चेत आहेत. ठाणे लोकसभेच्या जागेसंदर्भात महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मिळाल्यास निवडणूक रिंगणात उतरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना घाई होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीसच आपण ही माहिती मागविली होती. – प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाची राम गर्जना

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यापाठोपाठ आता महायुतीतील भाजपने राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण केले आहे. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यांच्या माध्यमातून निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला असून त्याचबरोबर विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रौत्सवात राम मंदीराचा देखावा उभारण्यात आला होता. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुक काळात राममंदीराचा उल्लेख करणाऱ्या भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपनेही राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण करत प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. प्रभु श्रीराम गर्जना या गीताचे गीतकार आणि संगीतकार प्रकाश बोर्डे आहेत. या गीताचे गायक गणेश खांडके हे आहेत. ठाणे येथील रोहन रेकॉर्डींग स्टुडिओ यांचे संगीत संयोजन आहे. भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी महेश कदम यांचे गीतासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. कार सेवक असलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गीताचे अनावरण करण्यात आले आहे. प्रभु रामंचद्रांनी रामराज्याची कल्पना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत राम मंदीर उभारून एकप्रकारे देशात रामराज्य आणण्याचा संदेश दिला आहे. राम राज्य म्हणजे गरिबांची सेवा, सुशासन, विकास, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केली. काय आहे गीत श्वासा श्वासात राम, ध्यासाध्यासात राम, नसानसात राम, रक्तारक्तात राम, या हद्यात रामगर्जना…तुम्ही आम्ही मिळून करू राम वंदना. निष्ठेने वागा, दिली शिकवण प्रभु श्रीरामांनी. मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही आर्दश आमच्यासाठी. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये दोन लाख मतांचा महायुतीचा निश्चय

कॉंग्रेसचे नेते प्रकाश मुथा भाजपात दाखल कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळविण्याचा निश्चय केला आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने घराघरांमध्ये पोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माया कटारिया, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसच्या इंटकचे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश चिटणीस प्रकाश मुथा यांनी कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीतील सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरापर्यंत पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत आणि राज्यातील महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाची माहिती द्यावी, असे आवाहन करून दोन लाख मते मिळविण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. देशातील १४० जनतेला शांत झोप लागावी. गरीबांचे कल्याण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांना करावे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे ते म्हणाले. कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य मेळावा आहे. महायुतीची ताकद पाहून विरोधकांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मनसेची एक लाख मतांची ताकद आपल्यासोबत आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही मोठा समर्थक वर्ग आहे. रिपब्लिकन पक्ष, रासप आदींच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रचता येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. कल्याण शहरात केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीच दिली, अशी टीका कपिल पाटील यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा कल्याण पश्चिममधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने महायुतीच्या विजयासाठी झटावे, असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केले. तर कल्याण-मुरबाड रेल्वे धावणार, ही समस्त मुरबाडवासियांच्या अभिमानाची बाब असून, महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला आहे. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. मुंबई नाशिक महामार्ग, ढोकाळी-हायलँड रोड येथील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाहतुक कोंडीसोबत उन्हाचा फटका चालकांना सहन करावा लागत आहे. कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उशीराने घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने दिवसाला ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. अवजड वाहने येथील कापूरबावडी उड्ड्डाणपूलावरून प्रवेश करून वाहतुक करतात. या उड्डाणपूलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी रात्री हाती घेण्यात आले होते. परंतु या पट्टीवरील सिमेंट अद्यापही सुकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. येथील उड्डाणपुलाखालून वाहतुक सोडण्यात आली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. घोडबंदरहून हजारो नोकरदार ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. परंतु या वाहन चालकांना कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत भर पडली. पर्यायी मार्ग म्हणून काही वाहन चालकांनी ढोकाळी, हायलँड मार्गाचा पर्याय निवडला. येथीही कोंडीचा सामना सहन करावा लागला. कोंडीमुळे मुंबई नाशिक महामार्गाची वाहतुक रोखली जात आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरही भार वाढला आहे. उड्डाणपूलावरील वाहतुक दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. उन्हाचा मारा आणि कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहन चालक अडकले आहेत.

उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव

कल्याण : उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच कल्याण पू्र्व, पश्चिम भागात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण मधील नागरिक दोन दिवस हैराण आहेत. कल्याण परिसरातील तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४२ अंशच्या पुढे गेला आहे. घरात पंख्याखाली असूनही नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेत मंगळवारी दुपारपासून चिकणघर, रामबाग, खडकपाडा भागात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीच्या वेळेत दुर्गाडी किल्ला भाग, खडकपाडा भागात वीज पुरवठा बंद झाला होता. बुधवारी कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान बंद झाला होता. अगोदरच अंगाची काहिली होत असताना त्यात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेक नागरिक पहाटे, रात्री घराबाहेरील मोकळ्या जागेत उकाड्याची काहिली शमविण्यासाठी बसले होते. घरातील लहान मुले, बालके वीज पुरवठा बंद झाल्याने अस्वस्थ होती. घरात बिछान्याला खिळून असलेले, उपचार घेत असलेले विविध प्रकारचे रुग्ण उकाड्याने हैराण झाले होते. वीज पुरवठा बंद असल्याने घराचे दरवाजे, खिडक्या मोकळ्या हवेसाठी उघड्या ठेवल्या तर घरात डासांचा उपद्रव होईल या भीतीने कोणीही नागरिक दरवाजे, खिडक्यांची फडताळे उघडण्यास तयार नव्हता. कडक उन्हाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात सतत संपर्क करणे चालू ठेवल्याने महावितरणचा सेवा संपर्क क्रमांक दोन ते तीन तास व्यस्त येत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणचे कर्मचारी रात्रीतून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्रीच बाहेर पडले होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे टप्प्याने कल्याण पूर्व, पश्चिमेचा वीज पुरवठा टप्प्याने पूर्ववत झाला. त्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. प्रमाणापेक्षा विजेची मागणी वाढल्याने असे प्रकार घडतात. किंवा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा बंद होतो, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संविधान बदलण्याची अफवा विरोधक पसरवत आहेत -रामदास आठवले

रमेश औताडे   मुंबई : देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफ़वा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम…

निवडणूक प्रचारात व्यसनाजन्य पदार्थांचे वाटप नको

व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची मागणी रमेश औताडे   मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकांना दारूच्या नशेत ठेवून त्यांची मती गुंग करून त्यांच्याकडून मते मिळविली जातात. अनेकांना निवडणूक प्रचार काळात दारूचे व्यसन…