Category: होम

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे प्रतिपादन ठाणे: सर्व उमेदवारांना व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि अनुचित पद्धतीच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी आज येथे केले. 24- कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज सकाळी “सीझर कमिटीच्या” नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती सातपुते यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून म्हणजे दि. 16 मार्चपासून फिरत्या निगराणी पथकाचे  काम सुरू झाले आहे. या टीमने आक्षेपार्ह रोकड, दारू,भेटवस्तू इ.सापडल्यास कशा प्रकारे कारवाई करावी याच्या सूचना संबंधित बैठकीतील उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कार्यवाहीसाठी आयकर विभाग, वस्तू व  सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग या सर्वांचे प्राधिकृत अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. या सर्वांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशाही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी बैठकीत दिल्या. या बैठकीस 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे सह.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर,  24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, नोडल अधिकारी (खर्च) दिलीप सूर्यवंशी, सहा.खर्च निरीक्षक शरद देशमुख, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहिता पथकांचे समन्वय अधिकारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती मोहिम

 ठाणे विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्यावतीने ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने  स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत आज मो.ह विद्यालय, ठाणे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे, असे आवाहन स्वीप पथक यांनी केले. स्वीप आराखड्यानुसार मतदार नोंदणी व त्यांचा सहभाग वाढविण्यासांठी प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती मार्फत चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी स्वीप कार्यक्रम राबविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान जनजागृती’ विषयावर स्पर्धा घ्या प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मतदान जनजागृती’ या विषयांवरती माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे दिल्या. सदर कार्यक्रमात मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी  मी मतदान करणारंच…, आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा, या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने तलावपाळी येथे मतदान जनजागृती मोहिम

ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी तलावपाळी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. सुट्टीनिमित्त फिरावयास आलेल्या नागरिकांनी या…

उल्हासनगर महानगरपालिकेत सामान्य जनतेची सत्ता आणणार !

उल्हासनगर : महानगरपालिकेच्या येणारी निवडणूक कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील सर्व प्रभागांमधून लढवेल, अशी घोषणा कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी  आयोजित केलेल्या ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमात केली. उल्हासनगर पूर्वेकडील वाघमारे हाॅलमध्ये ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमाचं आयोजन कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर प्रमुख मार्गदर्शक होते. राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात मंगला मुजुमदार यांची प्रभाग क्रमांक १८ च्या अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली. कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी काय्रक्रमाची प्रस्तावना मांडली. राकेश पद्माकर मीना यांनी ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कावालो माध्यम समन्वयक प्रफुल केदारे संपूर्ण चर्चेचे सूत्रधार होते. संदेश मुकणे, शशिकांत दायमा, संजय वाघमारे, ॲड. वनिता ओवळेकर, प्रा. सिंधु रामटेके, अनिल शर्मा, उमेश देबनाथ, मुकेश माखिजा, कुमार रेड्डीयार, अभिजीत मोंडल, अरिदीप जाना, प्रकाश भोसले, ललित कवात्रा, राहुल परब, शैलेंद्र रुपेकर अशा अनेकांनी वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपापली मतं व्यक्त केली. वालधुनी नदी, भ्रष्टाचार, प्रदुषण, प्रशासनिक अव्यवस्था, अनधिकृत बांधकामे, नियोजनशून्य विकास, अनारोग्य अशा विविधांगी मुद्यांवर चर्चा झाली. राज असरोंडकर यांनी सांगितले की कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील नागरिकांकडून शिफारशी मागवेल आणि त्यातून उमेदवारांची निवड व त्यांचं प्रशिक्षण करेल. हा खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं.

भास्कर जाधव म्हणजे दुसरे संजय राऊत- अविनाश जाधव

ठाणे : सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी काही तरी बडबडत राहणारे आमदार भास्कर जाधव हे दुसरे संजय राऊत आहेत असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. तसेच लोकसभेसाठी उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीतील एकही उमेदवार निवडून येण्याच्या लायकीचा नाही असेही ते म्हणाले. येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे ही यावेळी त्यांनी भाकीत वर्तवले आहे. भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना टोमणे मारत असतील. मध्यंतरी त्यांनी स्टेटस ठेवले होते. स्वतःच्या मुलाला तिकीट मिळावी,यासाठी ते इतर राजकीय पक्षांच्या वाऱ्या करत होते अशी टीकाही त्यांनी केली. तसेच येत्या रत्नागिरीच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा महाराष्ट्र सैनिक दाखवतील. याशिवाय येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. राज ठाकरे हे परंपरेनुसार बाळासाहेबांची युती असणाऱ्या भाजपसोबत गेले आहेत, त्यामुळे भास्कर जाधवांना का मिरची लागते. असा सवालहि त्यांनी केला. याशिवाय उध्दव ठाकरे यांच्यासारखा माणूस काँग्रेस सोबत गेला त्यांच्यासोबत लाचट भास्कर जाधव सारखी माणस गेल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच भास्कर जाधव यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या निवडणुकीत कळेल राज ठाकरे गेल्यानंतर काय होत. राज ठाकरे त्यांचा नीट समाचार घेतील असेही ते म्हणाले. मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना हि टीका केली.

मॉरिशसमधील मराठी कलाकार सादर करणार नृत्य आणि नाट्याची अनोखी कलाकृती

ठाणे : मॉरिशसमधील मराठी नृत्य आणि नाट्याज कलाकारांनी साकारलेली अनोखी कलाकृती पाहण्याची संधी राज्यातील रसिकांना मिळणार आहे. मॉरिशस मराठी क्लचरल सेंटर ट्रस्ट (एमएमसीटी) यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम १० ते १९ एप्रिल या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचे सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे प्रयोग झाले असून बुधवार, १७ एप्रिल रोजी ठाण्यात सायंकाळी ६ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे त्यांचा प्रयोग होणार आहे. सहा नृत्य कलाकार आणि चार नाट्य कलाकार असा हा संच आहे. डिसेंबर-२०२३मध्ये ‘एमएमसीटी’ने आयोजित केलेल्या नृत्याविष्कार स्पर्धेतील हे कलाकार आहेत. तर, नाट्य कलाकारांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ‘एमएमसीटी’चे अध्यक्ष आणि सांस्कृतिक प्रकल्पाचे शिल्पकार अर्जून पुतला हे करत आहेत.  ठाण्यातील प्रयोग, बुधवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वा. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे होणार आहे. या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, ‘एमएमसीटी’ने केले आहे.

ठाण्यात शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा फटका

पिकांचे मोठे नुकसान ठाणे : काल रात्री साडेसातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. किन्हवली,शेणवा व डोळखांब परीसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार,काकडी, भेंडी आदी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. आपटे येथील जिल्हा परिषद शाळा, माणेखिंड येथील अनिल सपाट, काशिनाथ गोडांबे,कानडी- झापवाडी येथील दौलत धर्मा शिद, शिरवंजे येथील उत्तम बांगर, लक्ष्मण लातार,सावरोली येथील गणेश आराज यांची राईसमिल,टिकबाईपाडा आदी गावांतील अनेक आदिवासी ,शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची,गोठयांची छप्परे उडाली असून काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील कपडे, धान्य,गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणत नासधूस झाली आहे.गुरे, ढोरे व अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या, त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. काकडी,भेंडी,घोसाळे, कारले,घेवडा आदी. रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कच्च्या आंब्यांचा पडलेला खच बघून शेतकरी त्याकडे हताशपणे बघत होते. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून बधितांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती

मुंबई : उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. उन्हाळी सुटीच्या दिवसांत गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडवरील प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अतिरिक्त बसच्या संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून मुंबई विभागात दिवसाला सरासरी ४४ हजार प्रवाशांची नोंदणी होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. त्यात १३ एप्रिल रोजी ४८ हजार, तर १४ एप्रिल रोजी ५० हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे ही संख्या वाढल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली.  इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात आले. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

विद्यार्थ्यांची रॅलीव्दारे नवी मुंबईत मतदानाविषयी जनजागृती

नवी मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय व 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये यामध्येही मतदानविषयक जनजागृती करणारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. अनेक नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहचणारा रॅलीसारखा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात जात असून शाळांमार्फत आपापल्या शालेय परिसरात प्रभातफेरी काढली जात आहे. ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करुया हक्काचे मतदान’, ‘मी मतदान करणार – आपल्या देशाचे भविष्य घडवणार’ अशा स्वरुपाच्या घोषणा देत मतदान विषयक संदेश देणारे फलक उंचावत विद्यार्थी अत्यंत उत्साहाने रॅलीत सहभागी होत असून मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच मतदान करण्याविषयी आवाहन करीत आहेत. 150 व 151 या दोन्ही विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या 25 ठाणे लोकसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमात महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शानानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांचा संपूर्ण सहभाग लाभला असून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत खाजगी शाळांनीही यामध्ये सहभागी होण्याकरिता कार्यवाही करण्यात आलेली आहे. खाजगी शाळा, महाविद्यालयांचाही यामध्ये उत्तम सहभाग लाभत आहे. 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत मतदानांची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वत्र व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.