प्रदूषणाची गंभीर स्थिती असतानाही नैसर्गिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाचा महापालिकेचा आग्रह का? – पर्यावरण प्रेमीची नाराजी
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मांडली तलावासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये प्रदूषणाची गंभीर परिस्थिती यापूर्वीच शासकीय यंत्रणांच्या निदर्शनास आलेली असतानाही, महापालिकेकडून गणेशमूर्ती तसेच इतर सण-उत्सवांच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची पद्धत सुरू ठेवली जात असल्याबाबत पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अहवालानुसार मांडली तलावाच्या पाण्यात Dissolved Oxygen केवळ १.८ mg/L, BOD १४ mg/L आणि COD ४८ mg/L आढळून आले होते. पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर निरीक्षणेही नोंदविण्यात आली होती. अशा परिस्थितीत याच नैसर्गिक तलावांमध्ये पुन्हा मूर्ती विसर्जन करून प्रदूषणाचा भार वाढवायचा का? असा सवाल पर्यावरणप्रेमी हर्षद ढगे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने २०२6 साठी प्रसिद्ध केलेल्या विसर्जन यादीमध्ये नैसर्गिक स्रोत, कृत्रिम तलाव आणि पार्टिशन करून तयार केलेले कृत्रिम तलाव अशा स्वतंत्र श्रेणी केल्या आहेत. मात्र, एखाद्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये केवळ पार्टिशन किंवा तात्पुरती विभागणी केली म्हणून तो जलस्रोत कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या कृत्रिम तलाव ठरतो का, हा गंभीर प्रश्न आहे. शहरामध्ये स्वतंत्र कृत्रिम विसर्जन तलाव मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता येत असताना नैसर्गिक तलावांचे प्रदूषण का वाढवायचे? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागात किंवा आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरते/स्थायी कृत्रिम विसर्जन तलाव, टाक्या किंवा योग्य जलरोधक संरचना उपलब्ध करून द्याव्यात. या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था करून विसर्जनानंतरचे पाणी, गाळ आणि मूर्तीचे अवशेष यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. “कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्याची क्षमता आणि पर्याय उपलब्ध असताना नैसर्गिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करून त्या जलस्रोतांचे प्रदूषण वाढवणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय असू शकत नाही. प्रशासनाने उत्सव व्यवस्थापनासोबत पर्यावरण संरक्षणालाही समान महत्त्व दिले पाहिजे,” असे हर्षद ढगे यांनी म्हटले आहे.
