Category: होम

ठाणे  केंद्रावरील राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात –  बिभीषण चवरे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे सुरू होत आहे. दिनांक ५ डिसेंबर ते १३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होतील. या स्पर्धेत सकाळी ११.३० वा. व  संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघांचा सहभाग आहे. ठाणे शहरासह रायगड जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी नाममात्र रु- १५/- व १०/- तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात न्यायबंदीला मारहाण

कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीला इतर सात न्यायबंदींनी मंगळवारी सकाळी दगड आणि बादलीच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत एका न्यायबंदीच्या डोळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका…

ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त

ठाणे : ठाणे शहरात गावठी हात बाॅम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरूणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून १० हात बाॅम्ब जप्त केले…

शासनाकडून मानधन घेणाऱ्या वृध्द साहित्यिक, कलावंतांनी आधारकार्ड अपडेट करावे – रोहन घुगे

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या…

गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी आज निदर्शने – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर ठाणे : गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी, मुंबई पोर्ट प्राधिकरणातील सर्व कामगार संघटना व  लोकाधिकार समिती आणि  मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहभागाने गुरुवारी ५ डिसेंबरला दुपारी १२.०० वाजता आंबेडकर भवन समोर निदर्शने होणार आहेत. या आंदोलनात गोदी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स  )  जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केले आहे. भारतातील प्रमुख बंदरातील सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या  २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा येथे झालेल्या मिटिंगमधील  निर्णयानुसार  २८ नोव्हेंबर  रोजी प्रत्येक बंदरात वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित  करा,  असे पत्र सर्व बंदरातील कामगार संघटनांनी अध्यक्षांना दिले आहे. पी. डिमेलो भवन येथे  २ डिसेंबरला झालेल्या मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, सुधाकर अपराज व त्यांचे पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस, केेरसी पारेख व त्यांचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर, प्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन व मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे सुधीर मकासरे, मुंबई पोर्ट्र ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे बाबाजी चिपळूणकर व त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत  ५ डिसेंबर रोजी सेवेतील कामगारांचा राष्ट्रीय निषेध दिन व १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व कुटुंबीय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७ डिसेंबर रोजी किंवा नंतर बेमुदत संप  करण्याचे सर्वानुमते ठरले आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली आहे. 0000

 संविधान परिचय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

 नवी मुंबई महानगरपालिकेची संविधान साक्षरतेच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल नवी मुंबई : भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे अशा शब्दात संविधानाचे महत्व विशद करीत माजी मुख्य आयुक्त श्री. जे.एस.सहारिया यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट जनतेशी संबंध असल्याने महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडण्याची ही उत्तम संधी असल्याचे जाणून काम करावे असे सांगितले. यादृष्टीने संविधानातील मूल्यांचा आपल्या कामकाजात कसा उपयोग होईल व यातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजातील शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याचे भान राखून काम करायला हवे असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान पर्वानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित संविधान परिचय कार्यशाळेमध्ये ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या ‘संविधान परिचय कार्यशाळे’प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त श्री. समीर उन्हाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे तसेच कार्यशाळेतील व्याख्यात्या कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम. अनुया कुंवर, संविधान अभ्यासक लेखक श्री. सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम.अनुया कुंवर यांनी संविधानाचे महत्व जाणून त्याची महती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव केला. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरमच्या वतीने सुशासनासाठी करण्यात येणाऱ्या धोरणांची माहिती देत त्यांनी अबार्डिन अजेंडानुसार सुशासनासाठी प्रमाण मानके म्हणून निश्चित केलेल्या 12 तत्वांचे विवेचन केले. संविधानाने सांगितलेल्या मूल्यांचा आपण दैनंदिन कामकाजात वापर करीत आहोत काय? असा प्रश्न स्वत:लाच विचारून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आत्मचिंतन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. संविधानाचे अभ्यासक श्री.सुरेश सावंत यांनी हे ज्ञानस्मारक म्हणजे प्रेरणास्थान असून याठिकाणी आल्यानंतर समृध्द झाल्यासारखे वाटते असे सांगत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवी मुंबई संविधान साक्षर मोहीम’ राबविण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. ही मोहीम राबविताना पहिल्या टप्प्यात संविधान परिचय वर्ग आयोजन व दुसऱ्या टप्प्यात घर घर संविधान साक्षर मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियोजित मोहीमेचा आराखडा सादरीकरणाव्दारे मांडत त्यांनी संविधान समजणे ही साक्षरतेची पहिली पायरी असल्याचे सांगितले व संविधानाची उद्देशिका हे तिचे सार असून उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ उलगडून सांगितला. नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समारोप करताना कार्यशाळेत विचारमंथन झालेल्या विविध मुद्दयांचा परामर्श घेतला. संविधानाने ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यदेखील सांगितली आहेत, त्यादृष्टीने लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. मनुष्याचा विकास व्हावा हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना ‘मी इथे का आहे?’ असा प्रश्न प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला विचारला पाहिजे व आपल्याला जनतेसाठी काम करण्याची मोठी संधी महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून मिळाली याची जाणीव ठेवावी असे ते म्हणाले. आपल्या अधिकारांचा वापर शिक्षा करण्यासाठी नाही तर माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी आहे याचे भान राखून काम करावे असे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक काळाला साजेशी संगणकीय ऑनलाईन कार्यप्रणाली अंगिकृत करीत नागरिकांसाठी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, माय एनएनएमसी ॲप विकसीत केले असून नागरिकांच्या तक्रारी सोडवणुकीसाठी नियोजनबध्द कार्यप्रणाली आत्मसात केली आहे तसेच थेट संवादी दृष्टीकोन ठेवला आहे असेही आयुक्तांनी सांगितले. व्याख्यात्यांनी मांडलेल्या बाबींवर सविस्तर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधान साक्षरता मोहीम पोहोचविण्यासाठी ठोस नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात ज्ञानकेंद्र म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील उल्लेखनीय सुविधांची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात शासनाने निर्देशित केल्यानुसार ‘घर घर संविधान’ अभियान व्यापक स्वरुपात राबविले जाणार असून त्याचा प्रारंभ या संविधान परिचय कार्यशाळेने झाला. 00000

महालक्ष्मी मंदिराबद्दल मला खूप सात्विक अनुभव आहे- डॉ. अनिल काकोडकर

केतन खेडेकर मुंबई : मला मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबद्दल खूप श्रध्दा असून सात्विक अनुभव आहे. तसा मी आस्तिक आहे. असे उद्‌गार डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. महालक्ष्मी मंदिरामध्ये “श्री महालक्ष्मी नमोस्तुते” या कॉपी टेबल पुस्तकाचे अनावरण झाले त्यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले आई आणि मी मुंबईत आलो तेव्हा परिस्थिती हलाखीची होती. शिकण्यासाठी मुंबई गाठली. राहता येईल की नाही अशी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली. माझ्या आईने महालक्ष्मीला नवस केला की, गौरी गणपती दरम्यान देवीची ओटी भरण्यास येईन, १९५६ सालापासून आजतागायत जवळजवळ ६७ वर्षे महालक्ष्मीला येतो (कोरोनाचा काळ सोडला), पूर्वी पाठीमाने खडकांवर बसून लाटांच्या सान्निध्यात मूग भजी खात असे, पण आता कोस्टल रोड झाल्यामुळे ती मजा नाही. महालक्ष्मीच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या प्रचंड आहे. कालनिर्णयकार जयंत साळगावकर म्हणाले डॉ. काकोडकर यांची मिसाईल बनविण्यात खूप ताकद आहे. या तिन्ही देर्वीच्या मूर्त्यांमध्ये सरस्वती महत्वाची असून कालिका संहार करते तर लक्ष्मी पैसे देते, नमस्कार केला की प्रेरणा मिळते. मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष विजय गुपचूप म्हणाले डॉ. काकोडकरांना बघून आनंद मिळतो. काकोडकरांचे जीवन सामान्य माणसाला समर्पित आहे हिच त्यांची ओळख आहे. कार्यकारी विश्वस्त-चार्टड अकांउटंट शेखर दांडेकर म्हणाले या पुस्तकामुळे भक्तांना प्रेरणा मिळेल हे मोठे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचे काम घैसास यांनी उत्कृष्ट केलेले आहे. प्रत्येकाची वेळ सारखीच असते पण घैसास यांनी त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी आभार प्रदर्शनानंतर प्रत्येक भाविकाला विनामूल्य पुस्तकाची प्रत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अशीश चेंबूरकर, प्रकाश राऊत, उदय लाड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण मंत्री, चित्रा वैद्य आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. 000

मुरबाडच्या लेखणीचा गोवा राज्याच्या राजधानीत सन्मान…

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेली 20 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये काम करत ,समता सामाजिक फाउंडेशनआणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष, वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यभर सामाजिक काम करणारे, शांत संयमी, अभ्यासु पत्रकार शंकर करडे  त्यांच्या कामाची दखल घेत,गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया, एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने 2024 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस, आरपीआय आठवले गटाचे,अध्यक्ष दिनेश उघडे, रमेश देसले, समाजसेवक भगवान भालेराव, दयानंद रातांबे, संतोष उघडे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, तसेच देशातुन व राज्यातून मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ.बी एन खरात,यांनी केले होते. करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्याचें विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ०००००

 दिव्यांगांच्या आरोग्यासाठी पायाभूत उपक्रमाचा शुभारंभ

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार   मुंबई : स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणाऱ्या बोरिवली पूर्व येथील संस्थेने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग(HMPD) हा उपक्रम सुरू केला आहे. जवळजवळ 100 दिव्यांग व्यक्ती आणि 40 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या समाजात दुर्लक्षित आहे. दिव्यांग व्यक्तीला आलेल्या अपंगत्वामुळे वयोमानपरत्वे त्यांच्या शारीरिक अडचणी वाढत जातात आणि या शारीरिक व्याधी त्याचे जीवन अत्यंत त्रासाचे करतात आणि म्हणूनच जर वेळीच बेसिक हेल्थ चेकअप, डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य ती औषधे, आवश्यक फिजिओथेरपी अशी बेसिक हेल्थकेअर जर दिव्यांग व्यक्तींना अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली तर त्यांचे एकंदरीत शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल, या एकमेव उद्देशाने हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग (HMPD)हा अभिनव उपक्रम स्नेहज्योत संस्थेने हाती घेतला आहे, ज्याचा शुभारंभ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील एन आय सी ऑडिटोरियम मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करण्यात आला. गेली जवळजवळ 35 वर्षाहून जास्त मेडिकल क्षेत्रात अनुभव असणारे प्रोफेसर डॉ. हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाला येणार आहे. HnG पॅथॉलॉजी आणि डायग्नोस्टिक हेल्थकेअर, आशा हेल्थकेअर, NM मेडिकल सेंटर या उपक्रमाशी संलग्न आहेत. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आयुष्मान कार्ड काढून देण्यात येईल, आवश्यक असणाऱ्या टेस्ट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच त्यांच्या विभागात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आवश्यकता भासल्यास मोठ्या सर्जरीज मोफत करून घेण्यात येऊ शकतील, अशा पद्धतीचा आरोग्य संबंधीचा डेटाबेस एका हेल्थ डेस्क च्या माध्यमातून करता येईल का? या दिशेने या उपक्रमाचा विस्तार केला जाईल. कृष्णा शेठ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दृष्टिहीन तायक्वांडो प्लेयर चा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच आपल्या अपंगत्वावर मात करून झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे काम करत स्वतःचे आयुष्य स्वावलंबनाने जगणाऱ्या श्री हरिशंकर शर्मा यांचा ‘स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ देऊन गौरव करण्यात आला. या दोघांनी आपले अनुभव कथन करत उपस्थितांसमोर एका वेगळ्या जिद्दीचे आणि मनोबलाचे उदाहरण ठेवले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व दिव्यांग मुलांना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल पार्क मधील लायन सफारी टूर घडवून आणली आणि मग मस्तपैकी चिंचा, बोरे, कैऱ्या खाऊन सर्व दिव्यांग व्यक्तींच्या दिवसाची आनंदाने सांगता झाली. या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे तहसीलदार अतुल सावे, अकाउंटंट रविदास गवळी, तलाठी चिराग सुळे, फेरो इक्विपचे रोड्रिक्स फर्डी, सुविद्या प्रसारक संघाचे श्री महादेव रानडे, एन एम मेडिकल सेंटरचे प्रतिनिधी हर्षिल परमार, स्नेहज्योत शुभचिंतक सौ अहिल्या कुलकर्णी, डॉ. श्रीकांत ठाकूर, एस एस बॅग्स चे संजय दळवी तसेच प्रोफेसर हेमंत शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले.  लायन सफारी ही इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, दहिसर यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली होती. हे दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य स्नेहज्योत परिवारातील सर्व सेवाव्रतींमुळेच होऊ शकते, असे संस्थेच्या संस्थापिका व सचिव सौ सुधा वाघ यांनी आवर्जूनपणे नमूद केले. ००००

नाशिक शहरासाठी ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज,

 गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक   हरिभाऊ लाखे नाशिक : जलशुध्दीकरण केंद्रात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, वाहिन्यांमधील गळती, पाणी चोरी, अनधिकृत जोडण्या, पाणी मापनासाठी मीटर नसणे वा संथ चालणे आदी कारणांस्तव ४३ टक्के पाणी महसूल नसणारे आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी विहित मापदंडापेक्षा जादा पाण्याची आवश्यकता भासते. याकडे लक्ष वेधत शहरासाठी २०२४-२५ या वर्षात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. महापालिकेला गतवर्षी ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले होते. दुष्काळी स्थितीत अतिरिक्त ४०० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची मुभा दिली गेली होती. या काळात महापालिकेने प्रत्यक्षात अधिक म्हणजे ५६६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला. आता आगामी वर्षात म्हणजे १५ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या २९० दिवसांसाठी गंगापूर, दारणा धरण (चेहेडी बंधारा) आणि मुकणे या धरणांमधून एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी वापरलेल्या पाण्यापेक्षा हे प्रमाण ५३२ दशलक्ष घनफुटने जास्त आहे. शासन निकषानुसार शहरात प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाणी वापर गृहीत धरला जातो. या सुत्रानुसार एकूण लोकसंख्येला लागणारे पाणी लक्षात घेऊन पाणी आरक्षित केले जाते. उपरोक्त निकषापेक्षा अधिक प्रमाणात प्रतिमाणसी पाणी वापर होत आहे. मागील दुष्काळी वर्षात राजकीय दबावामुळे मनपाने अखेरपर्यंत पाणी कपातीचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. वाढीव पाणी आरक्षणाचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आकस्मित पाणी आरक्षण समितीकडून घेतले जातात. एरवी पावसाळा संपताच या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यासाठी १५ ऑक्टोबर रोजीच्या धरणांतील जलसाठ्यांचा आधार घेतला जातो. आचारसंहिता व नवीन सरकार स्थापन होत असल्याने ही प्रक्रिया थांबलेली आहे. पालकमंत्री नियुक्तीनंतर या विषयावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले जाते. २६ लाख लोकसंख्या गृहित पिण्याच्या पाण्याकरिता २०२४-२५ वर्षासाठी मागणी नोंदविताना महापालिकेने २३ लाख निवासी आणि तीन लाख तरती अशी एकूण २६ लाख लोकसंख्या गृहीत धरली आहे. बिगर निवासी वापरात शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये, रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय व खासगी रुग्णालये, तरण तलाव, अग्निशमन दल यांची गरजही समाविष्ट आहे. शहरात दोन लाख पशूधन असल्याचा अंदाज आहे. कोणत्या धरणातून, किती मागणी ? गंगापूर धरण समूह – ४५०० दशलक्ष घनफूट दारणा धरण (चेहेडी बंधारा) – २०० दशलक्ष घनफूट मुकणे धरण – १५०० दशलक्ष घनफूट