Category: होम

भायखळा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून मधु अण्णा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मा.निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे रितसर सादर केला. याप्रसंगी भायखळा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

‘ठोस कृतीचा’ जाहिरनामा काढणाऱ्या पक्षालाच मतदान करा – जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

रमेश औताडे मुंबई : आजपर्यंत कुठल्याही सरकारने मुंबईत मराठी टक्का घसरु नये म्हणून प्रामाणिकपणे काहीही प्रयत्न केलेले नाहीत. निव्वळ भावनेचे खेळ करुन फायदा उचलला आहे. आता मात्र मराठी माणसाने या दिखाऊ प्रेमाला किंमत न देता ” ठोस कृतीचा ”  जाहिरनामा काढणाऱ्या पक्षालाच मतदान करा असे आवाहन पार्ले पंचम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर व जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले. गिरगावात भूमीपुत्राला तो मराठी आहे म्हणून रोजगार नाकारण्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार नंतर मरोळ येथील गुजराती मालकाच्या कंपनीत घडला होता. मुलूंड येथे देवरुखकर नावाच्या उद्योजिकेला गुजरातीबहुल सोसायटीत मराठी आहे म्हणून जागा नाकारण्यात आली होती. मध्यंतरी विलेपार्ले  येथे देखील असाच प्रकार घडला होता. त्यावेळी  शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. घाटकोपर  जगदुशानगर येथे मराठी माणसांना मालकीचे व भाड्याने घर घेणे कठीण झाले आहे. मुंबईतील बहुतेक ठिकाणी मासांहारी म्हणून मराठी माणसांना घरे नाकारण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणांत होत आहे. मराठी माणूस ,भाषा, परंपरा, संस्कृती टिकून राहावी म्हणून मुंबईत नवीन इमारतीत इमारतीचे बुकींग सुरु झाल्यावर एक वर्षापर्यंत ५० टक्के फ्लॅट हे मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवावेत. एक वर्षानंतर मात्र ते खरेदी केले नाहीत तर ते कोणालाही विकण्याची मुभा असावी. प्रत्येक इमारतीत २० टक्के फ्लॅट हे लहान आकाराचे असावेत. ५०० फूट किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे फ्लॅट असावेत. जेणे करुन सर्वसामान्य मराठी माणसाला देखील त्या फ्लॅटची किंमत व देखभाल खर्च परवडू शकेल. मुंबईत अनेक गृहनिर्माण इमारतीत हे धनदांडगे अमराठी लोक मराठी माणसांवर अन्याय करत असतात. अशा प्रकरणांत मराठी माणमांना त्वरेने न्याय मिळावा म्हणून सहकारी खात्याचे उपनिबंधक, मुंबई महानगर पालिकेचे प्रत्येक विभागातील सहाय्यक आयुक्त व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना सुचना देण्यात द्याव्यात. तसेच या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मुंबईत होत असलेल्या मेट्रो स्टेशनना मराठी लेखक, कवी, कलाकार, संगीतकार याची नावे देऊन मराठी संस्कृतीची आठवण वृध्दिगंत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यासाठी मराठी भाषेसाठी भरघोस निधी उपलब्ध करावा,  मराठी तरुणांसाठी औद्यागिक वसाहती बांधून त्यांत त्यांना गाळे उपलब्ध करावेत. सरकारने त्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारुन सढळ हस्ते सबसिडी द्यावी.आदी मागण्यांसाठीचा जाहीरनामा श्रीधर खानोलकर व  हेमंत देसाई यांनी प्रसिद्ध केला.

उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन आणि दिवाळी खरेदीच्या गर्दीने

  वाहतूक विस्कळीत हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू राहिली. पक्षीय उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अनेक जण वाहतूक कोंडीत अडकले. कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी नाशिक मध्य, निफाड मतदारसंघात महायुतीकडून तर, चांदवड मतदारसंघात मविआकडून उमेदवार उशिरा जाहीर करण्यात आले. शहरातील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी अशोक स्तंभ ते महात्मा गांधी रोड अशी फेरी काढली. फेरीतील सुशोभित वाहनावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) वसंत गिते, हनिफ बशीर यांनीही अर्ज दाखल केले. नाशिक पश्चिममधून भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे, शशिकांत जाधव यांनी अपक्ष, मनसेचे दिनकर पाटील, माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. देवळालीतून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता अशोकस्तंभ ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या बहुसंख्य नागरिकांना उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाची पूर्वकल्पना नसल्याने शालिमार, मेनरोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूर रोडसह अन्य रस्त्यांवर ते वाहतूक कोंडीत अडकले. कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही गर्दीतून वाट काढण्यासाठी वेळ लागत होता. दुचाकी धारकांना अर्धा तास एकाच ठिकाणी थांबावे लागत होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतर ठिकाणाहूनही अधिक कुमक मागविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभे केले होते. कोट विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सोमवारचा दिवस निवडला. त्यातच दिवाळीतील खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे काही अंशी नियोजन कोलमडले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली -चंद्रकांत खांडवी (पोलीस उपायुक्त- वाहतूक)

बोंडारपाडा वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी

ठाणे :श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे ठाणे शहर, पालघर जिल्हातील बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील  बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी. दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव उपक्रमा अंतर्गत २६ व २७ ऑक्टोंबर २०२४ पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील व जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय बोंडारपाडा आणि वागणपाड्यातील एकूण १५० आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. आदिवासी पाड्यांवर कोणतेही साधन नसताना गेली ६ वर्ष सत्यात काम करीत आहे व त्यातून अनेक रंग मुलांमधून फुलताना दिसत आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळे मध्ये जि.प. शाळा बोंडारपाडा शाळेचा तिसरा क्रमांक आला. जी परसबाग संस्थेने माहिती देत तेथील विध्यार्थी व शिक्षकांनी मेहेनत घुन ती निर्माण केली व त्याचे आज फलित मिळत आहे, तसेच ठाणे शहरातील वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, वागणंपाडा शाळेचे मुख्याध्यापक तवर सर व शिक्षक वर्ग आणि गावकरी कुटुंब उपस्थित होते तसेच संस्थेचे आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे, निशांत कोळी, स्नेहल गुळीक, चेतन जामगांवकर, रितिक राऊत, वसंत कुळेकर, नितीन कुळेकर, अभि कुळेकर तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते.

हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट या महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी सोमवारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,  शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती,राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांनी, सोमवारी २८ ऑक्टोबर, रोजी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून हजारो महायुती कार्यकर्त्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजन किणे, अनिता किणे, राजेंद्र साप्ते, उमेश पाटील, मोरेश्वर किणी, विश्वनाथ भगत, गणेश साळवी, मनोज लासे,  विजया लासे,  गणेश कांबळे, वहिदा खान, अंकिता शिंदे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, हफिजा नाईक, प्रियांका पाटील, हसिना अब्दुल अजीज शेख, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दत्तुवाडी, मुंब्रा स्टेशन जवळ,  मुंब्रा स्टेशन फ्लायओव्हर, दत्तुवाडी-शंकर मंदिर-कौसा कब्रस्तान,-कौसा तलावपाळी ते एम. एम. व्हॅली सर्कल, कौसा या मार्गाने, मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन हजारो लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. यावेळी महायुती शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे  पदाधिकारी, कार्यकर्ते हे भगवे, तिरंगी आदी विविध रंगी झेंडे फडकावत, ढोलताशांच्या गजरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या टोप्या घालून मोठ्यासंख्येने रॅलीत सहभागी झाले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. चौकट पाणी प्रश्न सोडविणार, विकास भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्याचा विकास करणार, सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार, घोषणा कमी करणार जास्त कृती करुन लोकांची कामे करणार ,१५ वर्ष खोटी आश्वासने, कृती शून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली आहे. कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट तयार करणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल बांधणार, पारसिक च्या मागून नवीन सर्विस रोड बांधणार आहोत. या मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदा संघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले आहे.

वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ

  विरार : विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असतानाही महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नव्हता. यामध्ये वसई आणि नालासोपारा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने वसईमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नालासोपारा मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाने पालघर आणि बोईसर मतदारसंघामधून उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विजय पाटील यांना स्थान देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच वसईत हितेंद्र ठाकूर विरुद्ध विजय पाटील, असा सामना रंगणार आहे. मागील वेळी हितेंद्र ठाकूर हे २६ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी शिवसेना महायुतीकडून उमेदवार राहिले होते. या वेळी पक्षबदल करत काँग्रेसमध्ये गेले आहेत. महायुतीमधून अद्याप उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ठाकरे गट की काँग्रेस ही जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

 कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी;

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पवार, महेश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल कल्याण : महायुती, महाविकास आघाडीचे नेते कल्याण पूर्व, पश्चिमेतील विधानसभेसाठी इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे नरेंद्र पवार, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या कारवाईची तमा न बाळगता सोमवारी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दाखल केले. सोमवार मुहुर्ताचा चांगला दिवस असल्याने भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून कल्याण पश्चिमेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी नरेंद्र पवार शक्तिप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांसह दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारी अर्जामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेश नेते पवार यांची समजूत काढण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षापूर्वी नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेतून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप, संघाचा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. ही ताकद ओळखून पवार यांनी पक्ष कारवाईची तमा न बाळगता उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. तीन वर्षापासून पवार कल्याण पश्चिम मतदारसंघात विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनसंघटन करत होते. या बळावर आपण ही निवडणूक लढवित असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. पवार यांची उमेदवारी महायुतीचे कल्याण पश्चिमेतील उमेदवार विश्वनाथ भोईर यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. या मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अभ्यासू, माजी नगरसेवक सचिन बासरे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघातून शहरप्रमुख रवी पाटील इच्छुक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भोईर यांनी त्यांच्या एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आहे. कल्याण पूर्वेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल करू नये असे शिवसेना वरिष्ठांचे आदेश होते. या आदेशामुळे काही इच्छुक शांत झाले. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे दुखावलेले शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी मात्र पक्षादेश बाजुला ठेवत सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर पाटील या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोघांनीही कल्याणमध्ये काँग्रेसला उमेदवारी न देण्यात आल्याने पदाचे राजीनामे दिले आहेत. कोट पंधरा वर्ष कल्याण पूर्वेचे शोषण झाले. सामान्य लोकांना आता विकास पाहिजे म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे आपण ही निवडणूक लढवित आहोत. ठाकरे गटाच्या यापूर्वीच्या उमेदवाराला आताच्या महायुतीच्या उमेदवाराने मदत केली होती. त्यामुळे बंडखोरीची भाषाला आम्हाली कोणी शिकवू नये. महेश गायकवाड– शहरप्रमुख, शिंदे शिवसेना. कोट महेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कोणीही कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी सामील होऊ नये. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. जे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गोपाळ लांडगे- जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.  

१३४ कामगारांना मुक्त न करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना शिस्तभंग कारवाईच्या नोटिसा

फेरीवाला, अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगार बदली प्रकरण कल्याण –कल्याण डोंबिवली पालिकेतील अनेक वर्ष एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेल्या दहा प्रभागातील फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केल्या आहेत. हे…

स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;

चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असतानाच सोमवारी किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक शिवसैनिकांचा निर्णय बदलण्यासाठी ही भेट होती का अशीही चर्चा रंगली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे ते निवडणुकीपूर्वीच विद्यमान आमदार किसन कथोरे यांना मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे. यात स्वपक्षीय भाजपासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. तसेच आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू असेही संकेत दिले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तेच आमदार किसन कथोरे यांनी म्हात्रे यांचे निकटवर्तीय असलेले आणि बदलापूर शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख तेजस म्हसकर यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार किसन कथोरे यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे प्रमुख माजी नगरसेवक अनुपस्थित दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसैनिकांची अस्वस्थता बोलून दाखवली. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आम्हाला उत्तर द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली होती. एकीकडे महायुतीतील शिवसेना हा महत्त्वाचा घटक पक्ष किसन कथोरे यांच्या विरुद्ध उभा राहतो की काय असा प्रश्न आहे. त्यातच शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला कथोरे यांनी भाजपात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेत कथोरे यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत एक वाक्यता नाही. स्थानिक पातळीवर महायुतीत अशी विरोधाभासी परिस्थिती असताना सोमवारी आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र स्वतः किसन कथोरे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या भेटीची माहिती आणि फोटो पोस्ट केला. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना महायुतीचा धर्म पाळत प्रचारात सहभागी होण्यासाठी समज देण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर शिवसेना शहर शाखेचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनधिकृत फलक, पोस्टर्स यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश

ठाणे : निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्याप्रकारचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे (तात्परुत्या फ्रेम) कायम असल्याचे निर्दशनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करावाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्याने पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल, त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचे संचालन केले. मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे नियोजन करावे. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. त्याचबरोबर, बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते, चिखल आणि धूळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागाने सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत, त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात, असेही आयुक्त राव म्हणाले.