Category: होम

तरच वाचन प्रेरणा दिनाचे सार्थक होईल – प्रज्ञा जांभेकर

रमेश औताडे मुंबई : वाचन प्रेरणा दिन एका दिवसापुरता मर्यादित नसावा वर्षभर त्याची जनजागृती मोहीम सुरू रहावी. त्यासाठी अमेरिका व पॅरिस येथील वाचनालयाचा आदर्श घ्यावा व विद्यार्थी घटकाला समोर ठेऊन…

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज

नवी मुंबई : सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केल्याने या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरीक अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोने संकेतस्थळावर या योजनेची माहिती दिली असली तरी घरांच्या किमती अद्याप जाहीर केल्या नाहीत. तसेच विनापरताव्याच्या २३६ रुपये भरुन इच्छुक नागरीक त्यांचे अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोचे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेमध्ये वाशी, खारघर, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वेस्थानकाजवळील सदनिकांसह तळोजातील पनवेल मुंब्रा महामार्गालगतच्या सदनिकांचा समावेश आहे. या योजनेत लाखो नागरीक आपले नशीब आजमावतील असा अंदाज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) च्या सदनिकांचा या योजनेमध्ये समावेश असून सिडकोच्या https:\.cidcohomes.com संकेतस्थळावर नागरिक अर्ज नोंदवू शकतील. सिडको मंडळ नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७ हजार सदनिका बांधत आहेत. यापैकी २६ हजार सदनिका (घर) सोडतीच्या पहिल्या टप्यात उपलब्ध आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेंट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सोडतीची वैशिष्ट्ये अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल. या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.  

ठाणे स्थानकातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसणार

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली काही मुजोर रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवासी हैराण झाले होते. अखेर या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत स्थानक परिसरात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यास सुरूवात केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून शेवटचा प्रवासी असे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा मालकांना पांढरा गणवेश आणि चालकांना खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानक परिसरात महापालिकेने सॅटीस पूलाखाली रिक्षा थांबा तयार केला आहे. काही रिक्षा चालक थांबा सोडून बाहेर उभे राहतात आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून दुप्पट रिक्षा भाडे आकारून त्यांची लुट करतात. विशेष म्हणजे, या भागात वाहतूक पोलिसांची चौकी आणि ठाणेनगर पोलिसांचे वाहन उभे असते. पोलिसांदेखत हे सर्व घडत असतानाही ते कारवाई करण्याचे टाळत असल्याचे चित्र होते. या बाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी प्राप्त होत्या. काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्थानक परिसराची पाहाणी केली. त्यानंतर येथील गावदेवी रिक्षा थांबा, स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याविषयी नव्याने आराखडा तयार केला आहे. गर्दीच्या वेळेत रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूटमार किंवा रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीने वाहन चालवित असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळी १०- १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यास सुरूवात केली आहे. वाहतूकीचे नियमन करण्यासाठी हे कर्मचारी उपलब्ध असतील. तसेच रात्रीच्या वेळेत अनेकदा महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्यावर शेवटचा प्रवासी निघे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रात्री संबंधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित आहे. याचे छायाचित्र काढून ते वरिष्ठांना पाठवावे लागणार आहे. या नियमामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळा आहे. गावदेवी परिसरातही रिक्षा चालक दुहेरी पद्धतीने रांग उभी करून वाहतूकीस अडथळा आणत होते. या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस, व्यापारी आणि रिक्षा चालक संघटनेची बैठक पार पडली. रिक्षा चालकांना गर्दीच्या वेळेत आता एकेरी पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नियमांची कडेकोट अंमलबाजवणी झाल्यास सॅटीस पूलाखालील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसू शकतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सॅटीस पूलाखालील वाहतूकीचे नियमन करण्यासाठी गर्दीच्या वेळेत सकाळी १० आणि रात्री १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पूलाखाली रिक्षा थांब्यावरील प्रवाशांसाठी एक अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही नियमन केले जाणार आहे. – पंंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस. 00000

लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत

 दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित ठाणे : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका स्विकारतील असे सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला अंगणवाडीत जाताच त्यांना शेजारील दुकानांमधून अर्ज विकत घेण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांवर उघडकीस आला आहे. दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला हे अर्ज प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत भरले जात होते. त्यानंतर, या योजनेचे संकेतस्थळ तसेच ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांनी घरबसल्या या योजनेचा अर्ज भरला होता. अर्ज ऑफलाईन भरलेला असो किंवा ऑनालईन या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. यापैकी ज्या महिलांच्या अर्जाला मंजूरी मिळाली, त्यांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवाती झाली. परंतू, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारने या योजनेचा अर्ज भरंण्यासाठी मुदत वाढ दिली. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत भरता येतील, असे सांगण्यात आले. सरकारकडून १५ ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, अंगणवाडी केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत होत्या. परंतू, ठाणे शहरातील काही केंद्रांवर महिलांना योजनेचा अर्ज शेजारील दुकानांमधून पाच किंवा दहा रुपयास विकत घेण्यास सांगितले जात होते. त्यामुळे महिलांची अंगणवाडी केंद्रावर तसेच दुकानांमध्ये गर्दी होत होती. परंतू, सरकारी योजनेचा हा अर्ज खासगी दुकान चालकांकडे पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने सुरुवाती या योजनेचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क स्विकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतू, आता याच योजनेचा अर्ज विकत घ्यावा लागला असल्यामुळे महिलांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, यांसदर्भात माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ?

 कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आता भाजपातून उघड आव्हान दिले जात असून मुरबाडमध्ये नुकताच निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कपिल पाटील यांनी किसन कथोरेंना नाव न घेता भाजप सोडून अपक्ष लढा आणि ताकद दाखवा असे थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी कथोरे यांच्या भाजप प्रवेशासाठी आघाडीवर असलेले पदाधिकारीही यात मंचावर बसून होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात जुन्या जाणत्यांची वेगळी फळी उभारून कथोरेंना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे. दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या शासकीय बंगल्यावर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी कथोरे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी फळी भाजपात आली. कथोरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ स्विकारले. मात्र कालांतराने भाजपातील जुने पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेले पदाधिकारी असे दोन गट अनेकदा दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात उघड दुफळी दिसली. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघातही पाटील समर्थक आणि कथोरे समर्थक असे गट दिसले. पाटील यांनी कथोरे यांच्यावर वेळोवेळी हल्ले चढवले आहेत. त्यातच रविवारी मुरबाडमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वात निष्ठावंतांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर, संघ आणि भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे शरद म्हात्रे, आण्णा कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. किसन कथोर विरूद्ध कपिल पाटील संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होत असतानाच झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. लोकसभेला काही जणांनी पक्षविरोधी काम केले. आता केंद्र सरकारकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय काही लोक घेत आहेत. त्यांना उत्तर दिले पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले. आधी काही लोक बोलायचे माझ्या मतदारसंघात काम शिल्लक राहिली नाहीत. मग आता कसली भूमीपूजन करत आहात, असा सवालही पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कथोरे यांना विचारला. निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्याला भाजपची भूमिका मांडू न देणाऱ्यांना थांबवल पाहिजे. भाजपची ताकद बाजूला करून तुम्ही अपक्ष लढून दाखवा, असे थेट आव्हानच पाटील यांनी कथोरे यांना दिले. तसेच मतदारसंघात निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत विधानसभेत कथोरे यांना पाटील यांनी इशाराच दिला दिला. या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोट मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या निष्ठावंत शब्दामुळे मेळाव्याला गेलो. पक्षातील जुन्या, निष्ठावंतांना बाजूला सारण्यात आले आहे हे खरे आहे. ही कृतघ्नता आहे. आम्हाला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे भावना मांडण्यासाठी मेळाव्यात होतो. शरद म्हात्रे, जुने भाजप पदाधिकारी, बदलापूर. कोट अपक्ष लढण्याचा प्रश्नच येत नाही. मला पक्षच विधानसेभेचे तिकीट देत आहे तर मी का अपक्ष लढू. किसन कथोरे, आमदार, मुरबाड. 0000

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

रमेश औताडे मुंबई : शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक घेण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी सांगितले. या आनंदाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कल्याण कुलकर्णी, हणमंत शेवाळे, रघुनाथ पाटील, संभाजी खोचरे,  सदानंद शेवाळे, रमेश वीर काका,  हणमंत चव्हाण भाऊ उपस्थित होते. स्नेहमेळावा नियोजन वैशाली माने, वंदना पाटील, सिमा पोळ, उज्वला मोळावडे, स्वाती गुरव, स्वाती मोरे, बाबासो खोत, अमोल मोरे, अभिषेक वीर, हिम्मत वीर, भगवान वीर यांनी नियोजन केले तर विजय मोहिते यांनी सूत्रसंचालन व सीमा पोळ यांनी आभार मानले.

 टोल माफीवरून राजकीय श्रेयवादासाठी चढाओढ

lठाण्यातील टोलनाक्यावर मनसे, शिंदेसेना, भाजपचा जल्लोष ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल माफीचा निर्णय जाहीर करताच श्रेयवादावरून आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या निमित्ताने ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मनसेने जल्लोष करीत पेढे वाटले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यामागोमाग भाजप कार्यकर्त्यांनीही टोलनाक्याकडे धाव घेतली. टोलनाक्यावर खोळंबा टोलमाफीचा निर्णय सोमवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर वाहन चालकांना लाडू  आणि पेढे वाटले. मनसेचे पदाधिकारी तेथून निघाल्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.  या श्रेयवादामुळे टोलनाक्यावर सोमवारी वाहनांचा अक्षरश: खोळंबा झाला. १२ वर्षे आमचा टोलमाफीसाठी संघर्ष सुरू होता. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. टोलमाफी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. कोणी आता काही बोलत असेल तरी खरे श्रेय राज ठाकरे यांचेच आहे. – रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे हे टोलनाके आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई ठाण्यातील लोकांवर लादले. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. २००९ साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. मी आणि शिंदे हे विरोधी पक्षाचे सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केले होते. पाच वर्षांपूर्वी जे वचन दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखविले आहे. -प्रताप सरनाईक, आमदार, शिंदेसेना     नऊ वर्षांपूर्वी मी याच आनंदनगर टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात असो, सातत्याने टोलमुक्ती करा आणि मुंबई एन्ट्री पॉइंटला टोल लावू नका, अशी वारंवार मागणी केली. आंदोलन आणि उपोषण केले. आज खऱ्या अर्थाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. – संजय केळकर, आमदार, भाजप

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार

 कोअर कमिटीत निर्णय नालासोपारा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन मंगळवारी बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जागांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी केला आहे. सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली असून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जागाचा आढावा घेण्यात आला. बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा स्वबळावर लढणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकाणी, जितूभाई शहा, माजी खासदार बळीराम जाधव, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण मानकर यांनी सांगितले की, ही पहिली सभा पालघर जिल्ह्यासाठी झाली असून या पुढील बैठका राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे मुंबई, मराठवाडा आदी भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्तेशी बोलून होणार आहे. दरम्यान, बविआ राज्यात जवळपास ५० विधानसभेच्या जागा लढणार आहे. यावेळी पत्रकारांनी बविआचे जेष्ठ नेते व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशा बाबतीतला प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी स्पष्ट केले की, याबाबत अद्याप पक्षापर्यंत कुठलीही अधिकृतपणे माहिती आलेली नाही. त्यामुळे जर तरच्या गोष्टीवर उत्तर देणे सयुक्तिक ठरणार नाही त्यानिमित्ताने या विषयावर अधिक चर्चा झाली नाही.  

जिल्ह्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र; आयुष्मान आरोग्य मंदिर

उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना  कायाकल्प पुरस्कार –  रोहन घुगे ठाणे :केंद्र व राज्यशासनाच्या वतीने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कायाकल्प पुरस्कार रुग्णालयांना देण्यात येतो. यावर्षी कायाकल्प पुरस्कारांची घोषणा राज्यस्तरावरून करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र  स्तरावर ९ संस्थाना व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रमुख यांचा  सन्मान करण्यात आला. कायाकल्प परितोषिक मिळवण्यामध्ये सर्व संस्थांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ,  प्रशासकीय विभाग व विशेषतः सर्व सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांचे विशेष अभिनंदन आणि ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून पुढील कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.स) डॉ. मृणाली राहुड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कायाकल्प पुरस्कार सुरू करण्यात आला असून आरोग्य सेवेतील गुणवत्ता व सोयी सुविधा उत्तम करणे हे या योजनेचे उदिष्ट आहे. बाह्य परिसर स्वच्छता व सुशोभिकरण, जैविक घन कचरा व्यवस्थापन, सांड पाणी व्यवस्थापन, आंतरिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच रुग्णांचे अभिप्राय याबाबींवर मुल्यांकन गुण कायाकल्प अंतर्गत ठरविण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रा .आ केंद्र खारबाव  यांनी रक्कम रुपये २ लक्ष पारितोषिक व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर उपकेंद्र लाप  ता .भिवंडी  यांनी रक्कम रुपये १ लक्ष पारितोषिक घेऊन  जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी ,धसई, शेणवा ,कसारा ,दाभाड ,शिरोशी ,खडवली ,बदलापूर यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रु.  पारितोषिक प्राप्त झाले आहे. उपकेंद्र स्तरावरील उपकेंद्र सापगाव ता. शहापूर प्रथम उपविजेता ५० हजार रु, उपकेंद्र फळेगाव ता.कल्याण दुसरे उपविजेता  ३५ हजार रु पारितोषिक घेऊन  यशस्वी झाले आहेत.  उपकेंद्र भिसोल, ओजीवले, कान्होर, दापोडे, वडूनवघर, पहारे, नडगाव, मानिवली, साने, खांबाला, बोहोनोली, भिणार, कालवर, उसगाव, आमने या उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे.

 कल्याणमधील चिकणघर येथील मालमत्ता कर थकविणारा पेट्रोल पंप सील

मालमत्ता कर विभागाची कारवाई कल्याण : नियमित नोटिसा बजावुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप मालकाचा पेट्रोल पंप कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे अधिकारी आणि ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांनी मंगळवारी सील केला. रोशन पेट्रोल पंप मालकाकडे मालमत्ता कराची पालिकेची ९५ लाख १४ हजार रूपयांची थकबाकी आहे. रोशन पेट्रोल पंप हा कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील महत्वाचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर सीलबंद करण्याची कारवाई केली तर त्याचा त्रास वाहन चालकांना होईल. या सहानुभूती विचारातून पालिकेने या थकबाकीदार पेट्रोल पंप चालकाला थकित कर भरणा करण्यासाठी मुभा दिली होती. अलीकडेच रोशन पेट्रोल पंप मालकाला थकित कर भरण्यासाठी ब प्रभागाच्या कर विभागातून नोटीस बजावण्यात आली होती. या रकमेचा टप्प्याने भरणा करावा, असेही प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केले. त्यालाही पंप मालकाने दाद दिली नाही. अखेर मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, मालमत्ता कर विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी चिकणघर येथे जाऊन रोशन पेट्रोल पंप सील करण्याची कारवाई केली. जोपर्यंत मालमत्ता कराची थकित रक्कम पंंप मालकाकडून पालिकेत भरणा केली जात नाही तोपर्यंत सील न काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यांनी तातडीने आपली चालू, थकित रक्कम पालिकेत भरणा करावी आणि पालिकेकडून होत असलेली कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.