Category: होम

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000

पालघरमध्ये जोर”धार”

पालघर : पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपनगरीय गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर काही ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरल्याने येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला होता. केळवे रोड रेल्वे स्थानक मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती. पालघरमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पालघर परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १३० मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही काळ रस्त्यावर पाणी आले. सकाळच्या वेळी काही ठिकाणची वाहतूक बंद होती. केळवे रोड परिसरात पुलाखालून जोरदार पाणी वाहत होते. उमरोळी येथे रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले, तर काहींना दांडी मारावी लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. बोईसर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे वाहतूक मंदगतीने सुरू होती.

राज्‍यातील घरकामगरांना न्याय द्यावा!

दादरमधील हक्‍क सभेत हजारो घरकामगारांची उपस्‍थिती   धारावी : राज्यातील लाखो घरेलु कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मंगळवारी झालेल्‍या हक्‍क सभेत करण्यात आली. राज्यातील १२०० घरकामगार, प्रतिनिधींची यावेळी उपस्‍थिती होती.घरकामगारांना सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्तीवेतन मिळावे, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यांतर्गत सुधारणा, घोषित योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने या हक्क सभेचे नियाेजन करण्यात आले होते. घरकामगार हक्क सभेला राज्य मानव अधिकार आयोगाचे (स्टेट ह्युमन कमिशन) एम. ए. सयीद, राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला शिफारस व सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी सांगितले. 0000

शनिवारी व रविवारी ठाण्यात मोफत दाखले वाटप शिबीर – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २२ जून व रविवार, दिनांक २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, 1.अधिवास (डोमेसाईल) दाखला, 2. रहिवासी दाखला, 3. उत्पन्नाचा दाखला आणि 4. ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा,  त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. 00000

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत

शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप   ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आरटीई प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे न्यायालयात गेले आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जेच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला. या कायद्यांतर्गत शासकीय, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवली जाते. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार १७ मे ते ४ जून या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते. परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागावरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. राज्य शासन आणि खासगी शाळा या वादात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळा सुरु झाल्या असून अभ्यासक्रमाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु, आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 00000

कल्याणमध्ये शिळफाटा रस्त्यावर मतदान ओळखपत्रांचा ढीग

कल्याण : कल्याण- ळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गाव हद्दीत बुधवारी एका पोतळीमध्ये भरलेली हजारो मतदारांची ओळखपत्रे रस्त्यावर फेकलेली आढळून आली आहेत. बहुतांशी मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्व भागातील…

मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ठाणे : वस्तू व सेवा कर कार्यालय, ठाणे येथील कार्यालयीन कामकाजाकरिता ठाणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिक स्वरुपाची सुमारे 12000 चौ.फुट ते 14000 चौ.फुट इतक्या जागेची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्यकर सह आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक मालमत्ता धारकांनी मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावासह राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), कार्यालय, ठाणे, 3 रा मजला वस्तु व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, येथे संपर्क साधावा, असे ठाणे राज्यकर सह आयुक्त (प्रशासन) यांनी कळविले आहे. 00000000

शेतकऱ्यांनी डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. चालू खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक (खते) संदिप तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

परळ बीआयटी वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारावे

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची महापालिका आयुक्तांकडे मागणी   मुंबई : परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे साक्षी दरेकर, भरत घोलप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. परळ विभागात बीआयटी वसाहत असून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१२ ते १९३२ या कालावधीत आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास होते. त्यांनी या ठिकाणाहून सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती. त्यामुळे ही वास्तु पाहण्यासाठी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच अनुयायी येत असतात. परंतु त्या वास्तुपर्यंत पोहचण्यासाठी लोकांना अडचण होते. त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक तसेच कमान नाही. त्यामुळे पर्यटक तसेच अनुयायींना अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी बीआयटी वसाहतीच्या दोन्ही बाजूला म्हणजेच परेल ब्रीजच्या बाजूस विठ्ठल चव्हाण मार्ग या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे तसेच प्रभादेवी परेल स्थानक येथून येणाऱ्या मार्गावर सुभाष डांबरे रोड या ठिकाणी सन्माननीय माता रमाई यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केली. 00000

दिव्यात घाणीचे साम्राज्य

कचऱ्यातून होतोय नागरिक, लहान मुलांचा प्रवास   ठाणे :  रात्री धुवाधार पडलेल्या पावसामुळे दिव्यात बऱ्याच भागात पावसाचे पाणी साठले. तर आता दिव्यात पावसात नालेसाफाई सुरु असून नाल्यातील कचऱ्याचा गाळ हा बाहेरच टाकला गेल्याने ठामपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकल्याचे चित्र दिसत आहे. त्या नाल्या बाहेरच्या कचऱ्याच्या गाळातून, पावसाच्या साठलेल्या घाण पाण्यातून आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना तर शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यातूनच मार्गक्रमण करावे लागले. ठामपा क्षेत्रातील सर्व प्रभाग समितींमध्ये नालेसफाई सुरु आहे. तर या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. याने परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरणार नाही, अशा सूचना ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या होत्या. पण या आयुक्तांच्या आदेशाला दिव्यात कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. दिव्यातील प्रत्येक नाल्याच्या सफाईनंतर त्यातील गाळ हा बाहेरच ठेवला गेल्याचे नागरिक सांगत आहेत. त्या गाळातूनच नागरिकांना चालावे लागत आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती तर्फे पावसात नालेसफाईची कामे सुरु आहे. एकाच वेळी दोन तीन नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. तर दिवा स्टेशन जवळील पूर्वेत श्लोक नगर येथील नारायण भगत परिसरात मोठ्या नाल्याची सफाई गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु आहे. पण परवा या नाल्यातून कचऱ्याचा गाळ काढण्यात आला. पण तो कचऱ्याचा गाळ लगेचच न उचलल्याने रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तेथे गुडघाभर पाणी साचले.या गुडघाभर घाण पाण्यातून न जाता नाल्याच्या भिंतीवर चढून सकाळी नागरिक कामाला गेले आहेत. तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी उचलून तेथून मार्ग काढला आहे. या नारायण भगत परिसरात अंदाजे पन्नास हजार ते दिड लाखांची लोकवस्ती आहे. तसेच या सर्वांना कामाला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, दिवा स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पण तोच नाल्याच्या कचऱ्यामुळे, घाण पाण्याने भरलेला असल्याने तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.डोंगर परेदशी, उप मुख्य स्वच्छता निरिक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभाग – दिव्यात एकाच वेळी दोन, तीन नाल्यांची सफाई सुरु आहे. आम्ही नाल्यातील कचऱ्याचा गाळ काढल्यावर एक दोन दिवस तो कचरा तसाच ठोवतो. कारण उचलून नेताना नाल्यातील कचऱ्यासोबत आलेले घाण पाणी इतरत्र पडत जाते. त्यामुळे तो पूर्ण रस्ता घाण होतो. तर त्या गाळाच्या, घाण पाण्याच्या दुर्गंधीने रोगराई पसरु शकते. तर आता पाऊस सुरु झाल्यापासून आम्ही तो कचरा तातडीने उचलून टाकतो.