Category: होम

गद्दारांना गाढण्यासाठी सांगवीमध्ये धडाडणार महाविकास आघाडीच्या तोफा

८ मे रोजी महाविकास आघाडीची महासभा ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता राज भंडारी पनवेल : एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे.”तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही”. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम),आर पी आय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत भाई पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आर पी आय ( ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे  विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ८० उलटून देखील असाध्य व्याधींना नामोहरम करत संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. भाई जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांच्या कडून एक टक्का देखील प्रत्युत्तर होत नाही. संजय सिंह आणि दीपक भाऊ निकाळजे यांची सडेतोड भाषणे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील आठ मे रोजी महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळापूर्व कामे  वेळेत पूर्ण करण्याचे नमुंमपा आयुक्त शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

नवी मुंबई :नवी मुंबई शहरातील सर्व प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय रहावा व पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याचे तत्परतेने निराकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वी सर्व प्राधिकरणांच्या संयुक्त बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केल्या जाणा-या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. सुरु असलेली कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरु होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले. बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देश दिले. गटारांची सफाई करताना काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. काही ठिकाणी बंद गटारांवरील झाकणे तुटली असल्यास ती तत्परतेने बदलावीत तसेच झाकणांच्या अधिकच्या चाव्या बनवून घ्याव्यात असेही सूचित करण्यात आले. मोठे नाले सफाईची कामे सुरु झाली असून त्या कामांना वेग दयावा आणि ती लवकरात लवकर विहित वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दयावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. या नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात कोणताही अडथळा राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सूचित करतानाच काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात झोपडया असल्यास त्या हटविण्याची कार्यवाही करावी असेही निेर्देश देण्यात आले. आठही विभागांचे सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी यांनी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे असे आयुक्तांनी सूचित केले. विभागवार सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांची सदयस्थिती काम निहाय लेखी स्वरुपात घेण्यात यावी तसेच 15 मे आणि 30 मे लाही त्या त्या वेळची स्थिती लेखी स्वरुपात आठही कार्यकारी अभियंत्यांकडून संकलित करावी व एकत्रित स्वरुपात सादर करावी असे निर्देश आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिले. मोठया उधाण भरतीची वेळीच अतिवृष्टी झाल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणी पाणी उपसा पंपांची व जनरेटरची पुरेशा संख्येने व्यवस्था करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी झोपडया असल्यास त्या स्थलांतरित कराव्यात असेही सूचित करण्यात आले. या कालावधीत पिण्याचे पाणी शुध्द राहील याची विशेष दक्षता घेण्यात यावी तसेच पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वित राहील याचीही काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. सोसायटयांच्या कुंपण भिंती पडून दूर्घटना होऊ नये याची पूर्वदक्षता घेऊन तशा प्रकारच्या धोकादायक कुंपण भिंती आढळल्यास त्या दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना विभाग कार्यालयामार्फत सोसायटींना दयाव्यात असेही सूचित करण्यात आले. सायन-पनवेल हायवेवरील सबवे तसेच रेल्वे स्टेशन नजिकचे सबवे यांची स्वच्छता करुन घ्यावी व त्या ठिकाणी विदयुत व्यवस्था व सीसीटीव्ही व्यवस्था राहील याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळा कालावधीत रस्त्यावरील दिवाबत्ती तसेच सिग्नल यंत्रणा सुस्थितीत राहील याची काळजी घेण्याच्या विदयुत विभागास सूचना देण्यात आल्या. शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अतिधोकादायक इमारतींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आलेले आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने सदर इमारती रिक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत साथीचे रोग उद्भवू नयेत यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा अशा सूचना देण्यासोबतच नमुंमपा रुग्णालयांमध्ये साथरोग वॉर्ड कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. उदयान विभागामार्फत होणाऱ्या वृक्षछाटणीमध्ये धोकादायक व अडथळा आणणाऱ्याच फांदयांची छाटणी केली जावी तसेच छाटणीनंतर होणारा हरित कचरा उचलून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून विनाविलंब कार्यवाही करावी असेही सूचित करण्यात आले. अग्निशमन दलाने उपलब्ध यंत्रसामग्रीची तपासणी करून घ्यावी तसेच मदतकार्याची सज्जता करून ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत मदतकार्य करण्यासाठी तत्पर असणारे विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्र येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत राहतील याचे नियोजन करावे व त्याठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करुन ठेवावी असे निर्देश देण्यात आले. तसेच आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्ती काळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी स्थलांतरित करावे लागल्यास तात्पुरत्या निवा-याच्या जागा निश्चित करुन ठेवून तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या. पावसाळापूर्व नालेसफाई व गटारे सफाई या कामांना गती दयावी तसेच सुविधा कामांसाठी झालेले खोदकाम 15 मे पर्यंत पूर्ववत करुन घ्यावे असे सूचित करतानाच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी सुयोग्य रितीने पार पाडावी व सुसज्ज राहावे असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी विविध विभागांनी करावयाच्या कामांचा बाबनिहाय आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त्‍ श्री. चंद्रकांत तायडे व इतर विभागप्रमुख तसेच आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

माकपचे जे पी गावित यांची उमेदवारी मागे,

राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना पाठिंबा – डॉ. उदय नारकर अनिल ठाणेकर ठाणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डाॅ उदय नारकर यांनी दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज, वाढता जनाधार, सर्व जनविभागांच्या उपजीविकेसाठी केलेले जोमदार सातत्यपूर्ण लढे आणि प्रभावी उमेदवार या जोरावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी  राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरच्चंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार  भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे असे डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा, विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार  व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील. तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे. कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ- कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत†कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त  जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत. निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

पुरवठा वाहनात चक्क तीन क्विंटल पन्नास किलो धान्य कमी

ग्रामस्थांच्या तपासणी अंती जरंडीला प्रकार उघडकीस सोयगाव : सोयगाव च्या पुरवठा विभागाकडून जरंडी गावासाठी आलेल्या रेशनचे धान्याचे वाहनाची ग्रामस्थांसह दक्षता समितीने वाहनातील रेशनचे धान्याची तपासणी करून घटनास्थळी च धान्य मोजणी केली त्या वाहनातील तीन क्विंटल धान्य कमी भरल्या चा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे याप्रकरणी ग्रामस्थांच्या मागणी वरून ग्रामपंचायत ने पंचनामा केला आहे. जरंडी गावात खरेदी विक्री संघाचे दुकान आहे गावातील विविध योजनेच्या ८८९ शिधापत्रिका धारक आहे त्यासाठी १२८ क्विंटल रेशनचे धान्य लागते मे महिन्यासाठी पुरवठा विभागाकडून शुक्रवारी जरंडी च्या रेशन दुकानाला सोयगाव वरून धान्य पुरवठा करण्यासाठी आलेल्या वाहनाला दुकानाजवळ येताच ग्रामस्थांसह दक्षता समितीचे सदस्त व उपसरपंच संजय पाटील यांनी हे वाहन खाली करण्याचा आधी वाहनाखाली वजन काटा लावून वाहनातील गहू तांदुळाच्या गोण्याची मोजणी केली असता प्रत्येक धान्याच्या गोणीत प्रत्येकी एक किलो याप्रमाणे धान्य कमी भरून गोनी चे वजन पन्नास किलो ऐवजी ४८ ते ४९ पन्नास किलो भरल्या मुळे २५६ गोण्या मध्ये तब्बल दोन क्विंटल पन्नास किलो व एक गव्हाची गोनी याप्रमाणे तीन क्विंटल धान्य कमी भरले असून जरंडी च्या लाभार्थ्यांच्या धान्य ला ऐन दुष्काळात कात्री लावली आहे ऐन दुष्काळात मे महिन्यात तब्बल शंभराहून अधिक कुटुंबियांना धान्य वाचून उपास मार होणार असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून सोयगाव तहसील व खरेदी विक्री संघ यांना लेखी पत्र दिले आहे यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही.

पत्रकारितेत राजकारणाशिवाय दुसरे विषयही महत्वाचे – विजय कुवळेकर

रमेश औताडे मुंबई : राजकारणाशिवाय दुसरे इतर विषय ही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक संपादक पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र इतर विषयाचे आकलन नाही. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याची गरज आहे.असे मत ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी महाराष्ट्र संपादक परिषद ने आयोजित केलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार व विशेष पुरस्कार २०२३ सोहळ्यावेळी व्यक्त केले. शनिवार ४ मे रोजी मुंबईतील  दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला. होता. महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार श्यमाजी मालकर, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ संपादक शविजय कुवळेकर आणि जेष्ठ नाटककार शसुरेश खरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दैनिक देशोन्नतीचे संपादक श प्रकाश पोहरे आणि जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसंवादिनी शिबानी जोशी यांनी केले.तर मुंबई आऊटलूक मीडिया हाऊस चे मुख्य संपादक व महाराष्ट्र संपादक परिषद चे अध्यक्षसंजय मलमे यांनी आभार मानले. पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कारासाठी झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक शकमलेश सुतार, दैनिक ठाणे वैभवचे संपादक  मिलिंद बल्लाळ, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, आयबीएन लोकमत चे प्रतिनिधी  महेश तिवारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम,  पुण्य नगरी – ठाणे चे निवासी संपादक हेमंत जुवेकर, महाराष्ट्र टाइम्स चे प्रतिनिधी  वैभव वझे, सीएनएन न्यूज १८ च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे (पंडित), मराठवाडा साहित्य संमेलन २०२३ चे माजी अध्यक्ष महेश माळवे, साप्ताहिक लोकवृत्तान्त चे संपादक एकनाथ बिरवटकर यांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारिता साहित्य गौरव विशेष पुरस्कारासाठी जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, दैनिक नांदेड एकजूटच्या जेष्ठ संपादिका अनुराधा विष्णूपुरीकर, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना पुरस्कार दिले. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहणारी संस्था आहे. ही संस्था म्हणजे संपादक-मालक प्रामुख्याने दैनिकांचे व त्यांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी यांची संघटना आहे. ही संस्था ध्येयासक्त, पारदर्शी आणि विश्वासार्ह आदर्श पत्रकारितेसाठी वचनबद्ध असेलेली संस्था आहे. ही संस्था मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेशी वचनबद्ध असून, या संस्थेने वाचन संस्कृतीचे संवर्धन व ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. विविध प्रसार माध्यमांशी अनुबंध निर्माण करून त्यांच्या सहयोगातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकजागृती यांसाठी सहभाग घेणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणे, पत्रकारिता आणि साहित्य यांचा अनुबंध राखणे आणि नैसर्गिक आणि आपदग्रस्त पत्रकारांसाठी साहाय्य करणे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच या संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो.

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला उपविजेतेपद 

मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे वतीने परळ येथे नुकतयाच आयोजित करण्यात आलेलया राज्य सब ज्युनिअर ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धत रायगडने  उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळ जवळ २२५ खेळाडूंनी (मुले व मुली)भाग घेतला होता. रायगडचे सब ज्युनिअर,ज्युनिअर मुला मुलींनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत 06 रौप्य आणि 05 कांस्य पदक एकुण  11 पदके रायगडने पटकावली. त्याचबरोबर सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे सांघिक उपविजेतेपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. उपविजेतेपदाचा चषक कार्यकारणी सदस्य संदीप कृष्णा पाटकर” यांनी  स्वीकारला. विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला. रायगडच्या या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड”ने खेळाडुंचे खास अभिनंदन केले आहे. रायगडच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून यशवंत मोकल, सहाय्यक म्हणून संदीप पाटकर, सुभाष टेंबे आणि विक्रांत गायकवाड यांनी जबाबदारी पार पडली. पदक विजेते खेळाडू.. सब ज्युनिअर मुली– *१)आर्या भारती. (४३ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली.)*२)गार्गी मसुरकर (५२ किलो वजनी गट-रौप्य  आयर्न मेट जिम खोपोली.) ३) आर्या शिंदे (५७ किलो वजनी गट-रौप्य  जीव्हीआर जिम कर्जत) ज्युनिअर मुली– १) दिव्या महाडिक (४३ किलो वजनी गट- कांस्य, आयर्न मेट जिम खोपोली) २) अमृता भगत (४७किलो वजनी गट-रौप्य  पॉवर हाऊस क्लब खोपोली) ३) दिव्या शिंदे (७६ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली) सब ज्युनिअर मुले- १) विष्णू कल्ला(५९ किलो वजनी गट-कांस्य, संसारे फिटनेस पेण) २) संस्कार सरदार (६६ किलो वजनी गट-कांस्य, स्पार्टन जिम खालापूर) ज्युनिअर मुले– १) विनय पाटील (६६ किलो वजनी गट-कांस्य संसारे फिटनेस पेण) २) अथर्व लोधी (८३ किलो वजनी गट- रौप्य , संसारे फिटनेस पेण) ३) तन्मय पाटील (९३किलो वजनी गट-पदक, संसारे फिटनेस पेण)

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंग ठरले सरस ठाणे : नियमित डावानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने सर्वाधिक चौकरांमुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने फटीएल एकादश संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले. त्यानंतर ही बरोबरी सुपर ओव्हरमध्ये १० धावांवर कायम राहिल्याने दोन्ही डावात मिळून एकूण २२ चौकार मारणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला विजयी घोषित करण्यात आले. कमनशिबी ठरलेल्या एफटीएल एकादश नावावर १८ चौकार जमा होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एफटीएल एकादश संघाला सुर्यांश शेडगे(७७), यतीन मढवी(३२) आणि अर्जुन थापाने २० धावा करत एफटीएल एकादश संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या डावात सौद अंसारीने सहा, परिक्षित वळसंगकरने दोन आणि प्रथमेश महालेने एक बळी मिळवला. त्यानंतर अनिल रोनंकी ने ३३ आणि परिक्षित वळसंगकरने ६१ धावांच्या धडाकेबाज खेळीने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला बरोबरी साधून दिली. या डावात सुर्यांश शेडगेने दोन बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्ये अर्जुन थापाच्या सात धावांमुळे एफटीएल एकादश संघाला १० धावा जमवता आल्या. परिक्षितने ९ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेले.शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवशयकता असताना फलंदाज धावचित झाल्याने सामन्यात पुन्हा बरोबरी झाली. संक्षिप्त धावफलक : एटीपीएल एकादश : २० षटकात सर्वबाद १५१ ( सुर्यांश शेडगे ७७, यतीन मढवी ३२, अर्जुन थापा २०, सौद मंसूरी ४-२६-६, परिक्षित वळसंगकर ४-२४-२, प्रथमेश महाले ३-२७-१) बरोबरीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब :  २० षटकात ८ बाद १५१ ( परिक्षित वळसंगकर ६१, अनिल रोनंकी ३३, सुर्यांश शेडगे ४-३७-२, नविन शर्मा ४-३०-१, अजय पाटील ४-३७-१, विकास पाटील ४-२५-१, अक्ष शर्मा ४-२०-१), सुपर ओव्हर : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : एक षटकात २ बाद १० ( परिक्षित वळसंगकर ९, विकास पांडे १-१०-१) बरोबरीत एफटीएल एकादश : एका षटकात २ बाद १० ( अर्जुन थापा  ७, परिक्षित वळसंगकर १-१०-१).

भाजपाच्या पोटातील पुन्हा ओठावर

सत्तेत आले की संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळणार: –प्रा. वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांच्या कलीना येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मुंबई : लोकसभा निवडणूक ही केवळ भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून यावेळची लढाई संविधानासाठी, लोकशाहीसाठी देशाची एकता, अखंडता जपण्यासाठी आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गद्दारांना गाडण्याचे आणि देशाला वाचवण्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून करायचे आहे. इंडिया आघाडी देशभरात भक्कम असून १० वर्षांच्या तानाशाही सरकारचे शेवटचे ३० दिवस राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचाच विजय होणार असा विश्वास उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपाचा ‘अब की बार ४०० पार’चा नारा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्यासाठी आहे हे विरोधी पक्ष सातत्याने सांगत असताना काँग्रेसच संविधान बदलणार असा उलटा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेते करत आहेत. पण भाजपाच्या जे पोटात आहे ते पुन्हा एकदा ओठावर आले आहे. भाजपाचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनीच संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष शब्द काढणार असल्याचे सांगून भाजपाचा कुटील डाव उघड केला. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी आतातरी खोटे आरोप करणे बंद करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात घालण्याचा भाजपाचा मनसुबा जनताच हाणून पाडणार आहे असेही गायकवाड म्हणाल्या. प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराने वेग घेतला आहे. आज कुर्ला विधानसभा मतदार संघातील शिवाजी मैदान नेहरुनगर येथे मार्निंग वॉक व स्थानिकांशी चर्चा केली. संध्याकाळी कुर्ला पूर्व भागातील श्रमजीवी नगर ते जागृती नगर पदयात्रा काढली. या पत्रयात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलिना विधानसभा मतदार संघातील विद्यानगरी सांताक्रुज पूर्व येथे महिला व सामाजिक संस्था यांच्या बरोबर बैठक घेतली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखांनाही भेटी दिल्या. कलीना येथे इंडिया- महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख महेश पेडणेकर आदी नेते उपस्थित होते.

श्री मावळी मंडळच्या ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सूरुवात

मुंबई : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने ९९ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी वैयक्तिक संघाची स्पर्धा रविवार दिनांक ०५/०५/२०२४ ते गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.  या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता  संस्थेचे सर्व सभासद व खेळाडू अतोनात मेहनत घेत आहेत. स्पर्धेचे  उदघाटन रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता मा. श्री. विनयकुमार राठोड (पोलीस उपायुक्त ठाणे वाहतूक विभाग) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच, स्पर्धेचा बक्षीस समारंभ व समारोप गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ रोजी रात्रौ ९:०० वाजता मा. श्री. संजय काटकर  (आयुक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका)  यांच्या शुभहस्ते होणार आहे. या स्पर्धेत  पुरुष गटात ६२ संघानी व महिला गटात  ३०  संघानी अशा एकूण ९२ संघानी भाग घेतला आहे. ह्यामध्ये पुरुष गटात  गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), ईच्छाशक्ती क्रीडा मंडळ (पालघर), श्री साई स्पोर्ट्स (नाशिक), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) ,  मिडलाईन कर्जत (ठाणे), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड)    ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. तर, महिला गटात शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), श्री राम कबड्डी संघ (पालघर), स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी (चिपळूण), अमर हिंद मंडळ (मुंबई शहर) , शिवतेज क्रीडा मंडळ (ठाणे),प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण  २,५०,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विजेता, उपविजेत्याउपविजेत्या आणि उप उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या संघाना रोख रकमेची पारितोषिके, चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच विजेत्या संघाला  ४४,४४४/-, उपविजेता :  ३३,३३३/- आणि उप उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना  ११,१११/- रोख रकमेची पारितोषिके देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू  ५,०००/- चा मानकरी ठरेल. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पक्कडपटू यांना प्रत्येकी  ३,०००/- चे पारितोषिक मिळेल. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट चढाईपटू व पक्कडपटूला  १,०००/- प्रत्येकी बक्षिस रक्कम रोख मिळेल.