Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘हेच होणे बाकी होते!’ नाशिकमध्ये ‘लज्जास्पद’ राजकारण

 महिला नगरसेविकांसमोर आई-बहिणीवरुन शिवीगाळ हरिभाऊ लाखे नाशिक – राजकारणात आता नीतीमत्ता, तत्वनिष्ठता, पक्षनिष्ठता, आचार-विचार या सर्व बाबी खुंटीला टांगल्या गेल्या असून कोणालाच त्याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. नाशिकसह जिल्ह्यातील राजकारणही त्यापासून दूर नाही. त्यामुळेच कालपर्यंत दुसऱ्या पक्षात असताना त्यांची भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे तसेच देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेलेल्यांना आपल्याच पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश देण्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. याचा परिणाम जो होणे अपेक्षितआहे, तोच होत आहे. लोकप्रतिनिधींकडून लोकशाहीचे ओंगळवाणे दर्शन घडविले जात आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपल्यातील लज्जास्पद राजकारणाचे दर्शन घडविले. आणि सर्व नाशिककरांच्या माना खाली गेल्या. नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. सिडको परिसरातील दूषित पाण्याचा विषय चर्चेत आला. महिला नगरसेविका साधना मटाले यांनी दुषित पाण्याची बाटली आपल्याबरोबर आणली. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी निवेदन खुर्चीत बसूनच स्वीकारावे, असा सल्ला अपक्ष नगरसेवक शहाणे यांनी सभापतींना दिला. त्यावरुन भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि शहाणे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. दोन्ही लोकप्रतिनिधी मधील शाब्दिक वाद चांगलाच चिघळला. बडगुजर आणि शहाणे यांच्यात महापालिका निवडणुकीपासून वाद आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद वारंवार हे दोन्ही नगरसेवक जेव्हां समोरासमोर येतात, तेव्हा पडत असतात. प्रभाग समिती बैठकीत मात्र दोन्ही नगरसेवकांनी आपण किती असभ्य आहोत, हे दाखविण्याची जणूकाही स्पर्धाच सुरु केली. वैयक्तिक आरोपांमध्ये आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एकमेकांच्या आईबहिणींचा उध्दार करण्यात आला. हे करताना सभागृहात अनेक महिला नगरसेविका उपस्थित असल्याचे भानही बडगुजर आणि शहाणे यांना राहिले नाही.आपण जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आहोत, हे विसरून दोन्ही लोकप्रतिनिधींनी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारणाचे दर्शन घडविले. इतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. काही काळ प्रभाग समितीच्या बैठकीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. नंतर बडगुजर आणि शहाणे यांनी सभागृहाची आणि उपस्थित सदस्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. परंतु, नाशिककरांपुढे अशा असभ्य लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात आपणही तितकेच दोषी आहोत, अशी अपरादपणाची भावना या प्रकारामुळे निर्माण झाली आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींवर कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, तसे होईलच याची हमी नाही. ००००००००००

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे ठामपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ठाणे- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.…

 खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना जाहिर

– लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूरः  पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना गौरव करण्यात येणार आहे. कोल्हापूरात ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार २३ जून रोजी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खाशाबा जाधव पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूर, कराडमध्ये ऑलिम्पिक दिनानिमित्त होत आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या सभागृहात सकाळी १० वाजता ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने बंडा पाटील  गौरवित केले जाणार आहे. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, रोख ५ हजार रूपये, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्योजक रोहित मुसळे, मनिष झंवर यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शासनाचे कुस्तीचे क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराचा समारंभ करणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिकपटूंच्या परिवारातील शामराव जाधव व माणिक माणगावे, राष्ट्रीय खो-खो  खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज  मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे यांनी दिली आहे. १९६४ च्या टोकिओमधील ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरातील शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावातील बंडा पाटील यांनी सलग ७ वेळा राज्य तर २ वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकाचा पराक्रम केला आहे. राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत कोल्हापूरच्या सानिका चाफेने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा यांचा खाशाबा जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला आहे. चौकट लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम ऑलिम्पिक दिनानिमित्त लेखक संजय दुधाणेंचे याचे कराड व कोल्हापूर येथे सलग ३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे महान मल्ल खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी त्यांच्या चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचा विशेष संवाद कार्यक्रम सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्हापरकरांनी नागरी सत्कार केला होता. आता याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्कार समारंभ ऑलिम्पिक दिनी रंगणार आहे. यावेळी खाशाबामय असणारे संजय दुधाणे हे कोल्हापूरातील खाशाबांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.  कराडमध्येही लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम होणार आहे.

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश

ठाणे- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला.…

सारडा सर्कल परिसरातील ६५ अतिक्रमणे जमीनदोस्त

हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेने शनिवारी पहाटे धडक कारवाई करीत जुन्या नाशिकमधील सारडा सर्कल ते चौक मंडई, जहांगीर मशीद परिसर, डिलक्स हॉटेलमागील भागासह विविध ठिकाणांवरील सुमारे ६० ते ७० अनधिकृत दुकाने, टपऱ्या, पत्र्याचे शेड्स आणि इतर अतिक्रमणे हटविली. महापौर हिमगौरी आहेर आडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्णा दखणे यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यासाठी महापालिकेचे सहाही विभाग पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सहभागी झाली होती. कारवाईपूर्वी दोन दिवस परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक व्यावसायीकांनी आपल्या दुकानातील साहित्य मित्रपरिवाराच्या मदतीने पिकअप वाहनांमधून इतरत्र हलविण्यास सुरुवात केली होती. काहींनी स्वखुशीने अतिक्रमणे हटविली, तर काहींनी प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही दुकानदारांनी उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी मागितला. मात्र मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सारडा सर्कल परिसरातील कब्रस्तान आरक्षणाची जागा, विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता तसेच मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवर उभारण्यात आलेली अतिक्रमण हटविण्यात आली. डिलक्स हॉटेल मागील बाजूस मनपाच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले वाहनांचे भंगार साहित्यही हटविण्यात आले. आजच्या मोहिमेत फॅब्रिकेशन दुकाने, कपाट व कोट बनविणारे व्यवसाय, फूड स्टॉल, गॅरेज, मोबाइल रिपेअरिंग व मोबाइल शॉप्स, सर्व्हिस स्टेशन, फुलांची दुकाने तसेच अन्य अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. आ. फरांदे यांनी मानले आभार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागत केले. आयुक्तांची भेट घेत त्यांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत पखाल रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर मंगळवारी  कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये अनधिकृत लॉन्स, मटण व चिकन दुकाने तसेच स्क्रॅप दुकाने यांचा समावेश आहे. रहिवाशांना पावसाळ्यानंतर मुदत हॉटेल यात्रिक परिसरातील तसेच काही अन्य ठिकाणांवरील अनधिकृत निवासी बांधकामांबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई टाळली आहे. शत्रुघ्न वाघचौरे, भरत वाघचौरे, कैलास हनुमान गांगुर्डे आणि किसन गांगुर्डे यांच्या घरांसह काही रहिवाशांना सप्टेंबर -ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानंतर जागा रिकामी न केल्यास अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. होर्डिंग हटविताना निर्माण झाला धोका साक्षी हॉटेलजवळील इमारतीवर लावण्यात आलेले मोठे जाहिरात होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने हटविताना ते खाली कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी तातडीने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्याचे आदेश दिले. परिसर रिकामा केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. गॅस गळतीमुळे धावपळ लोखंडी संरचना कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस कटरच्या सिलिंडरमधून काही काळ गॅस गळतीची घटना घडली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे अघटित घडण्याचा धोका होता. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मोठा फौजफाटा तैनात मोहिमेसाठी सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर, क्रेन, गॅस कटरसह अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे सुमारे १०० ते १५० कर्मचारी, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, एनएमसी सुरक्षा पथक आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच मुंबई नाका, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

संजीव साबडे यांच्या ‘खाऊगल्ली’ या पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांच्या ‘खाऊ गल्ली’  पुस्तकाचे लज्जतदार प्रकाशन बुधवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (रवींद्र नाट्य मंदिर) होणार आहे.…

शिळफाट्यात २९ अनधिकृत गोडाऊनवर प्रशासनाची कारवाई

 नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील यांच्या लक्षवेधीनंतर आरती परब दिवा,: प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर प्रशासनाने…

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे…

एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आरती परब दिवा : एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात २० जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच मन एकाग्र व शांत राहते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने आणि प्राणायाम करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे एस. एम. जी. विद्यामंदिर प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन आनंददायी, उत्साहपूर्ण आणि आरोग्यदायी संदेश देणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.