Category: मुंबई

Mumbai news

पदपथांना फेरीवाल्यांचा वेढा, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची कसरत

मुंबई : कायम वर्दळ असलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका प्रशासन अधूनमधून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र, पदपथांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात पालिका पूर्ण अपयशी ठरली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या पथाऱ्यांमुळे पादचारी, प्रवाशांना अडथळा ठरत आहेत. बोरिवली पोलीस ठाण्याच्या आसपासच्या परिसरातही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. तसेच, सातत्याने फेरीवाल्यांची संख्या वाढत असून ही समस्या सोडविण्यात यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एस. व्ही. मार्ग, जांभळी गल्ली आणि आसपासच्या परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना फेरीवाल्यांचे अडथळे पार करून स्थानक गाठावे लागत आहे. गरोदर स्त्रिया, वृद्ध, अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित ठिकाणच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल होताच काही वेळ रस्ते मोकळे होतात. मात्र, पथक निघून गेल्यानंतर काही वेळात फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करतात. अनधिकृत फेरीवाल्यांना आता पालिकेप्रमाणेच पोलिसांचीही भीती राहिलेली नाही. बोरिवली स्थानकाबाहेरील पोलीस ठाण्याला लागूनच अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरले आहेत. पादचारी आणि फेरीवाल्यांमध्ये अनेक वेळा वाद होतात. फेरीवाले अर्वाच्च भाषेत पादचाऱ्यांना शिवीगाळ करतात. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही ही समस्या जैसे थे आहे. न्यायालयाने रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. मात्र, बोरिवलीसह विलेपार्ले येथील तेजपाल नगर, मोंघीबाई मार्ग, मालाडमधील आनंद मार्ग, अंधेरीतील एम. ए मार्ग, स्टेशन रोड, एस. बी मार्ग आदी भागात फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. विलेपार्ले स्थानकाबाहेरील रस्त्यांवर थेट अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. दादरमधील सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, एन. सी केळकर मार्ग, छबिलदास मार्गावरही फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. वांद्रे येथील हिल रोड आणि आसपासच्या परिसरातही अशीच स्थिती आहे. गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आदी परिसरातही फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ‘केवळ विचारमंथन नको’ उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई पालिकेला अनेकदा खडसावले आहे. मात्र, मुंबईतील पदपथ अद्यापही फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मोकळे झालेले नाहीत.काही पदपथ अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केलेले आहेत. तर, अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच, न्यायालयाने अतिक्रमणाची समस्या सोडवण्याबाबत विचारमंथन करण्यात वेळ खर्ची घालण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. 0000

‘आयडॉल’चे प्रवेशसाठी विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘आयडॉल’मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’च्या चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी या विभागीय केंद्रांवर प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तसेच, पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. ‘ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घ्यावा’, असे आवाहन ‘आयडॉल’चे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे. प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. , एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, जनसंपर्क), एम. ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम. कॉम. , एमएमएस, एम.एस. सी. , एम. एस. सी. (संगणकशास्त्र), एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू होतील. ०००००

 महाराष्ट्राला दारूबंदी नव्हे तर दारू नीतीची गरज

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन     मुंबई : दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दारूबंदी नव्हे, तर दारू नितीची गरज आहे. दारूबंदीमुळे मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, पण ते शून्य होणार नाही. त्यासाठी दारू नीतीची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. यशवंतराव चव्हाण केंद्र, प्रथम आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे माजी सनदी अधिकारी व यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस शरद काळे यांच्या प्रथम स्मृतीप्रितर्थ्य मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दारू नीतीची अंमलबजावणी करून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण गडचिरोलीत ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीत राबवण्यात येत असलेला ‘मुक्तिपथ’ हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले, ‘प्रथम’च्या संचालिका फरीदा लांबे, शरद काळे यांच्या पत्नी सुनीती काळे, त्यांच्या कन्या डॉ. सुचित्रा काळे-दळवी, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया, यशवंतराव चव्हाण केंद्राचे विश्वस्त अजित निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले उपस्थित होते. 00000

तुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

नवी मुंबई : शहर प्लास्टिकमुक्त असण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या तसेच एकल वापर प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमाही राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना राबविली जात आहे. या मार्केटमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कापडी पिशव्या वेंडींग मशीन लावण्यात येत आहेत. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिम राबवताना तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या दोन व्यावसायिकांवर कारवाई करत प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम जमा केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवणा-या दोन व्यावसायिकांविरुध्द कारवाई करुन प्रत्येकी रु. 250/- प्रमाणे एकूण रु. 500/- इतका दंड वसूल केला. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील आणि स्वच्छता निरीक्षक सहभागी होते. 00000

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

राज्य कॅरम प्रशिक्षण केंद्र – नोंदणी प्रक्रिया सुरु

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथे सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची  नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान या वातानुकूलित केंद्रात खेळाडूंना सराव करता येणार आहे. शिवाय दर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत राज्यातील युवा मुला मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून सरावासाठी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० खेळाडूंची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. असोसिएशनने राज्यातील राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय विजेते तसेच छत्रपती पुरस्कारार्थी कॅरम खेळाडूंना या केंद्रात मोफत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दिनांक २९ जुन २०२४ पर्यंत संजय बर्वे भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ / ९९६९६०६०८२ यांच्याशी संपर्क साधावा. ००००००

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR करु – फडणवीस

मुंबई : शेतकऱ्यांना सीबीलची अट लागू करु नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सीबीलचे कारण सांगून बँकांनी…

कोकणसह प. महाराष्ट्रात ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं…

आज मतदान

शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी चुरस मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा निवडणूकीसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघासाठी आज बुधवार दिनांक २६ जुलैला मतदान होत आहे. मुंबई आणि कोकण…

स्वच्छता कार्यात महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी सक्रिय होण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : ‘स्वच्छ शहर’ ही आपल्या नवी मुंबईची ओळख असून ती कायम राखण्यासाठी तसेच स्वच्छतेची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जोडीने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी सक्रिय व्हावे तसेच आपल्या शहराचा नावलौकिक उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक विभागाने करावयाची कामे तसेच राबवावयाचे उपक्रम याविषयीच्या अपेक्षा तपशीलवार सांगत त्या अनुषंगाने गतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. स्वच्छता कार्यामध्ये नागरिकांचा सहभाग सर्वात महत्वाचा असून नागरिकांनी दररोज आपापल्या घरातूनच    कच-याचे वर्गीकरण करणे व वर्गीकृत कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत वेगवेगळा देण्याची सवय अंगिकारावी याकरिता त्यांच्यापर्यंत सातत्याने हा संदेश पोहचविण्याची गरज आयुक्तांनी विशद केली. तसेच सर्व विभागांमध्ये स्वच्छतेच्या मोहीमा राबवून त्यामध्येही लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याचप्रकारे एपीएमसी मार्केटमध्येही कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यावर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. मोठ्या सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर अधिक कृतीशील व्हावे असे निर्देशित करण्यात आले. शालेय व महाविदयालयीन विदयार्थी हे या शहराचे भविष्य असून त्यांच्या मनावर आत्तापासूनच स्वच्छतेचा संस्कार व्हावा या भूमिकेतून शालेय व महाविदयालयीन पातळीवर स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे तसेच स्वच्छता शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर व्यापक स्वरुपात राबविण्यात यावा असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विदयार्थ्यांना आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पुढे काय प्रक्रिया होते याची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शाळांच्या अभ्यास भेटी आयोजित करण्याची कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती मोहिमा राबवाव्यात त्याचप्रमाणे दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे प्रतिबंध करुन त्या ठिकाणी कापडी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी वेन्डींग मशिन बसवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या. याकामी महिला बचत गटांचे सहकार्य घ्यावे असे सूचित करण्यात आले. बेलापूर ते वाशी पर्यंत शहरातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून त्यावरून इतर शहरांतील हजारो नागरिक दररोज प्रवास करीत असून त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ज्याप्रमाणे शनिवारी यशस्वीरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ती ठराविक कालावधीनंतर नियमीतपणे राबविण्यात यावी व त्यासोबत शहरातील इतरही मुख्य मार्गांवर स्वच्छता मोहिमा लोकसहभाग घेऊन राबवाव्यात अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. सफाईमित्रांसाठी राबवावयाच्या कल्याणकारी योजनांची कार्यवाही तत्परतेने करावी यामधील विमाविषयक बाबींकरिता पोस्ट ऑफिसचे सहकार्य घेण्यात यावे त्याचप्रमाणे समाजविकास विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेची 10 टक्के अंमलबजावणी 15 ऑगस्टपर्यंत व्हावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छता विषयक कामांचा दैनंदिन आढावा घेता यावा याकरिता स्वतंत्र डॅशबोर्ड असावा अशा सूचना देतानाच स्वच्छता‍विषयक जनजागृतीची व्याप्ती विविध माध्यमांतून वाढविण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये एनएमएमटीच्या बसेसमध्ये फलक प्रदर्शन, उद्घोषणा याव्दारे स्वच्छता संदेश प्रसारित करण्याचे सूचित करण्यात आले. शहरातील मुख्य चौक, कॉर्नर, उदयाने याठिकाणच्या शिल्पाकृती व्यवस्थित करुन घ्याव्यात व त्याची स्थलनिहाय छायाचित्रे सादर करावीत अशा सूचना देण्यात आल्या. विविध उदयाने, पार्क याठिकाणी स्वच्छतागृहांची तसेच स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जलद कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. उदयानांमधील एका कोपऱ्यात नर्सरी निर्माण करणेबाबत कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय पार्किंग पॉलिसी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद पावले उचलावीत असेही निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.