Category: ठाणे

Thane news

‘एचएमपीव्ही’ या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये!

 ठाणे महापालिकेचे आवाहन  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विशेष वॉर्ड तयार ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumo virus) साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत.…

रस्ते विकासाशी निगडित सर्व विषय तातडीने मार्गी लावणार

 ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही ठाणे :  ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीए मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. एमएमआरडीएमार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे,  नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे,  पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडी पूल, कासारवडवली ते खारबाव खाडी पूल, कोलशेत ते काल्हेर खाडी पूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली. ऐरोली ते कटाई नाका ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ऐरोली ते कटाई या रस्त्यासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता. त्यात वाढ होऊन आणखी जागा किती लागेल, तसेच त्याचा खर्च किती येईल यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर, भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. घोडबंदर रस्ता एकत्रीकरण घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रिकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण हे मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका यांनी पुढील आठ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे. तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. सुरक्षा अनामत रकमेबाबत सवलत नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेत एमएमआरडीएला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे, बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन झाडे लावणे ही कामेही ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीएकडून दिला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मल-जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच, अमृत जल योजनेअंतर्गत पंधराशे एमएम आकाराच्या जलवाहिनीच्या मार्ग स्थलांतराबाबतही आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले. गायमुख ते पायेगाव खाडीपूल गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वनविभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा पंधरा दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले.

‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान – डॉ भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग :*रायगड जिल्ह्यात १ हजार ८३० गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येणार असून, अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय, शोष् खड्डा, अथवा परसबाग, कंपोष्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरण साठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्ट बिन असणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. २१ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन या चार बाबी वापरात आहेत का याची माहिती ते घेणार आहेत. २६ जानेवारी रोजी या कुटुंबांचा ग्रामपंचायत चे वतीने सत्कार होणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरी चे प्रमाणपत्र देऊन पात्र कुटुंबांना गौरविण्यात येईल.ग्रामीण भागातील सर्व गावात दृश्यमान स्वच्छता राहावी. व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देनेसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गाव स्वच्छ, सुंदर राहण्यास याची मदत होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी असे आवाहन पाणी व व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. 00000

 रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार!

 १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार   बदलापूर: बदलापूर शहरातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणारी जुनी जलवाहिनी सातत्याने फुटत असल्याने त्यातून निघणारे सांडपाणी नैसर्गिक नाल्यामार्गे थेट उल्हास नदीत जाऊन मिळत होते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत होता. आता हे सांडपाणी नेण्यासाठी भुयारी गटार योजना राबवली जाते आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते १२८ कोटींच्या या योजनेचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यामुळे बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्य मार्गावर होणारा त्रास कमी होणार आहे. बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी कल्याणच्या खाडीपर्यंत वाहून नेण्यासाठी एमआयडीसीत जुनी वाहिनी होती. मात्र ती जीर्ण झाल्याने वारंवार वाहिनी फुटून शहरी भागात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत होत्या. ही वाहिनी बदलापूर पूर्वेतील वर्दळीच्या कर्जत राज्यमार्गावरून जात होती. अनेक मोठे वाणिज्य आस्थापना, कार्यालये आणि हॉटेल या मार्गावर होते. जलवाहिनी फुटल्याने अनेकदा हेच सांडपाणी शेजारच्या रहिवासी इमारतींमध्ये जात होते. तर शेजारी असलेल्या नाल्यामार्गे हेच सांडपाणी उल्हास नदीतही जात होते. उल्हास नदीवरील आपटी बंधारा येथून उचललेले पाणी जिल्ह्यातील बहुतांश शहरांना दिले जाते. त्यामुळे सांडपाणी मिसळल्याने पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या सगळ्यावर उपाय म्हणून रासायनिक सांडपाण्याची ही वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला. त्याला उद्योग विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार आता १२८ कोटी रुपयांच्या खर्चातून बदलापूर औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशी ही रासायनिक सांडपाण्याची भुयारी गटार योजना राबवली जाणार जाते आहे. नुकतेच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन रासायनिक सांडपाण्याचा त्रास पूर्णपणे बंद होईल, असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. ००००००

 दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची विजय साळवी यांची मागणी  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना पत्र दिले आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थान आहे. त्या स्थानामुळेच कल्याण शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. किल्यावरील दुर्गा देवी हे अत्यंत जागृत दैवत आहे. हे दैवत कल्याणकरांचे ग्रामदैवत, कुलदैवत आहे. त्यामुळेच या पवित्र स्थानाने सर्व कल्याणकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. किल्ले दुर्गाडी ही सरकारी मालमत्ता आहे असा न्यायालयाने नुकताच निर्णय आदेश दिलेला आहे. या आदेशा नुसार किल्ले दुर्गाडी जागेचा संपूर्ण कब्जा सरकारकडे आला आहे. किल्ले दुर्गाडी हे स्थान कल्याणकरांसाठी एक श्रध्देचा व प्रेरणेचा विषय आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडी व त्या सभोवतीच्या परिसराचे नुतनीकरण करुन ते एक पर्यटन स्थळ होईल असे सुंदरीकरण व्हावे अशी सर्व कल्याणकरांची इच्छा आहे. सध्या किल्ले दुर्गाडीच्या बुरुजाचे काम सुरु आहे.  नंतर मंदिराच्या चौथऱ्याचे काम होणार आहे असे समजते. परंतु असे थोड्या थोड्या भागाचे डागडुजीचे काम न करता संपूर्ण किल्याचा रचनाकाराकडून एक सुंदर आराखडा तयार करुन त्याप्रमाणे एक सुंदर कलाकृती कशी निर्माण होईल याबाबत विचार करुन आदर्शवत काम करावे. महापालिकेकडून असे सुंदर स्थान निर्माण झाले तर कल्याणकर सदैव महानगरपालिकेचे व आपले ऋणी राहतील. सध्या दुर्गाडीच्या गेटला संपुर्ण तडे जाऊन ते जीर्ण झालेले आहे, श्री दुर्गादेवीच्या मंदिराचा चौथरा घुशींनी पोखरलेला आहे, चौथऱ्यावरील लाद्या संपूर्ण तुटलेल्या आवस्थेत आहेत.  चौथऱ्याला तटबंदी नसल्यामुळे तो ढासळण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत असलेला छत्रपतींचा किल्ला पाहुन मनाला फार वेदना होत असतात. त्यामुळे हा विषय कल्याणकरांच्या श्रध्देचा व भावनीक आहे याचा विचार करुन संपूर्ण लक्ष घालावे व ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीची अप्रतिम नुतन  कलाकृती निर्माण करावी अशी मागणी शिवसेना उपनेता विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

मुलांचा भाव विश्वास जाणून ‘वासाची किंमत’ या लघुपटाची निर्मिती – डाएट प्राचार्य संजय वाघ

कल्याण : “इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयातील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित अजय पाटील यांनी पटकथा, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, दिग्दर्शन असे पंचरंगी भूमिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीचा लघुपट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे,” असे गौरव उद्गार डायटचे प्राचार्य संजय वाघ यांनी काढले. नुकताच “वासाची किंमत” या लघुपटाचे उद्घाटन संजय वाघ यांच्याहस्ते जिल्हा डाएट शिक्षण प्रशिक्षण सभागृह राहटोली बदलापूर येथे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या विषय तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर डाएट प्राध्यापक खरोटमल, कुमार पाटील, लेखक दिग्दर्शक अजय पाटील, या लघुपटात अभिनय करणारे विद्या शिर्के, करण राजपूत, पांडुरंग पाटील, रणजित पाटील आणि बालकलाकार आदिती पाटील हे उपस्थित होते. संजय वाघ पुढे म्हणाले की,  “ही नवनिर्मिती असून या नव्या निर्मितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या लघुपटाचा फायदा होणार आहे. दृश्य माध्यम मुलांना निश्चितच अध्ययन प्रकिया समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. शिवानीच्या धाडसाची, बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची कथा या लघुपटात दाखवलेली आहे. लहान मुलं सुद्धा समाजामध्ये वावरत असताना जशास तसे कसे वागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे “वासाची किंमत”  हा लघुपट‌ आहे. वैजोळ शाळेत शिकणाऱ्या आदिती पाटील या विद्यार्थ्यीनीने अत्यंत उत्तम पद्धतीने भूमिका शिवानीची भूमिका साकारली आहे. अजय पाटील त्याचबरोबर सर्व कलाकारचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” असे हे गौरव उद्गार वाघ यांनी काढले. खरोटमल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून ही एक नवनिर्मित असून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल आणि अत्यंत उत्तम पद्धतीने फिल्म तयार केल्याचे सांगितलं. लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितलं की, हा लघुपट बनवताना इयत्ता तिसरीतील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित लघुपट बनवलेला असला तरीसुद्धा यामध्ये अनेक बारकावे घेण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतीच्या कामात मदत करणारी शिवानी,  खेळ, हसणं, अभ्यास आणि एकट्याने बाजारामध्ये अत्यंत बिंधासपणे वावरताना स्वतःची काळजी घेणं. समाजामध्ये जर आपल्याला कोणी फसवत असेल, ठकवत असेल तर त्यालाही त्याच भाषेत उत्तर कसे द्यावे, असा सर्वांगीण विचार करून हा लघुपट केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण राजपूत तर आभार प्रदर्शन पांडुरंग पाटील यांनी केले. 00000

नवीन पनवेलमध्ये वेळेवर बस सोडण्यासाठी प्रवाशांचे आंदोलन   

पनवेल : प्रवाशांना असाच त्रास होत राहिला तर, यापुढेही असेच आंदोलन होत राहील व त्यास गंभीर स्वरूप येईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, बस संघटनेच्या सभासद या आंदोलनात सहभागी झाले होते.…

दोन वेळा गुलाब देणार; तिसऱ्यांदा थेट रिकामे हंडे फेकणार – मर्जिया पठाण

अनिल ठाणेकर ठाणे : पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा – कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठामपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे. आणखी दोनवेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू, असा इशारा पठाण यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा,  कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी ठामपा आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डींगचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल,  असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या. ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे १७ लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत आहे. या चोरीमागे पाणी माफिया की व्हाॅल्वमॅन आहेत, याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. पण, तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झाले आहे. पुन्हा दोन वेळा आम्ही ठामपा अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊ त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळश्या अधिकाऱ्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला. 0000

विशाळगड परिसरातील सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकार

अनिल ठाणेकर विशाळगड आणि परिसरातील सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष व संघटना पुढे सरसावल्या आहेत. जुलै २०२४ मध्ये विशाळगड आणि परिसरात जाणिवपूर्वक घडवून आणलेल्या संघटित हिंसाचाराने या परिसरातील समाजजीवन उध्वस्त झाले आहे. या परिसरातील नागरिकांचा काहीही गुन्हा नसताना गेले सहा महिने त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बहिष्कार टाकण्यात आला आहे. इतके महिने ते जणू कैदेची शिक्षा भोगत आहेत. सर्व जातिधर्माच्या नागरिकांना देण्यात येणारी ही शिक्षा त्वरित थांबवली पाहिजे. या शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी कित्येक निरपराध नागरिकांना वडिलोपार्जित घरदार सोडून जावे लागत आहे. दैनंदिन गरजा भागविणे दुरापास्त झाले आहे. शिवप्रेमी आणि भाविकांचे पर्यटन हे आणि एकमेव हेच या परिसरातील काही हजार नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. या नागरिकांची जीवन वाहिनी असलेल्या पर्यटनावर बंदी घालून स्वतः शासनानेच या भारतीय नागरिकांचा संविधानाने दिलेला जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतला आहे. हा संविधानाने दिलेला अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याची पहिली पावले म्हणून शासनाने नागरिकांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी माकप आणि समविचारी पक्ष, संघटना यांनी केली आहे. विलंब न करता विशाळगड पर्यटन सुरु करण्यात यावे. या परिसरातील दैनंदिन समाजजीवन पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत  विशाळगडावर साजऱ्या होणाऱ्या सर्व समाजांच्या सण समारंभ उत्सवांत सर्वांना सहभागीहोण्याची मुभा असावी. १२-१३-१४ जानेवारी रोजी येणाऱ्या वार्षिक उरुसात सर्व भाविकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी. या उरुसात जिल्ह्यातील खासदार, मंत्री आणि सर्व आमदारांनी सहभागी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात यावेत. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरु करावी. शालेय सहलींना त्वरित परवानगी देण्यात यावी. विशाळगडावर घालण्यात आलेली मांसाहार बंदी त्वरित उठवण्यात यावी.विशाळगड येथील प्राथमिक शाळेत सात इयतांसाठी फक्त तीन खोल्या आहेत. त्यातील एक खोली पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. त्याऐवजी पोलीस प्रशासनाने वेगळी व्यवस्था करावी, अश्या मागण्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. 00000

ठाण्यात रविवारी वैश्य समाजबांधवांचा भव्य स्नेहमेळावा

ठाणे : वैश्य समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा `लक्ष्य 2025′ रविवार, 12 जानेवारीला वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आला…