Category: ठाणे

Thane news

झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली : दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे. दीपक अमृतलाल करोडिया (५४, रा. लेकसाईड, पलावा, खोणी), दीपक यांचा मुलगा दर्शन (३२) अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा येथील लेकशोअर ग्रीनमधील संजीवनी मेडिकल दुकानात हा प्रकार घडला आहे. या दुकानातील अंबरनाथ कोहजगाव भागात राहणारा कामगार अजय रामचंद्र स्वामी (३२) यांनी मारहाणप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजय स्वामी हे संजीवनी मेडिकल दुकानात ग्राहकांना औषध विक्रीची कामे करतात. सोमवारी रात्री दुकान बंंद केले जात असताना दुकानात पलावा भागात राहणारे आरोपी दीपक करोडिया आणि त्यांचा मुलगा दर्शन दुकानात आले. त्यांनी जवळ डाॅक्टरांची औषध चिठ्ठी नसताना औषध विक्रेता अजय यांना झोपेची गोळी मागितली. अजयने झोपेची गोळी नाही असे उत्तर दिले. त्याचा राग दीपक यांना आला. त्यांनी अजय यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा दर्शन याने दुकानात शिरून दुकानात असलेला लाकडी दांडका घेऊन त्या दांडक्याने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. 00000

अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या!

जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन     अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणारे पिण्यायोग्य पाणी गेल्या दिवसांपासून गढूळ येत असून त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना गढूळ पाण्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही प्राधिकरण्याच्या वतीने करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरातील मोठा भाग आणि संपूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरणाच्या वतीने बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीतून बॅरेज बंधाराय येथे पाणी उचलले जाते. प्राधिकरणाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात यावर प्रक्रिया करून ते विविध जलकुंभांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. पावसाळा सुरू होताच नदीत गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रक्रिया केल्यानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होता. गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. गळक्या जलवाहिन्या शोधा नागरिकांनी आपल्या पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळजोडणी गटार भागातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ही जलवाहिनी गटारीतून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सोबतच बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी, असेही आवाहन प्राधिकरणाने केले आहे. इथे नोंदवा तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अंबरनाथ (पूर्व / पश्चिम) :- ९२२०६०६८५४, ९८६०३२४२३६. तर बदलापूर पूर्व ९८६९७८६१५१, पश्चिम ८९८३२८०२३२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक तक्रार नोंदवू शकतात.

डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार

वाणगाव : डहाणूतील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतात पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीचा परिस्थितीनुसार बदल होत असतो. यंदाही तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने, तर ५० हेक्टरवर एसआरटी पद्धतीने भातलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार आहे. भातशेती हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. डहाणू तालुक्याचे एकूण ९८,५३७.३८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातील १५,७४३.६० हेक्टरवर भातलागवड आणि २३४.७५ हेक्टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यंदा तालुक्यात ५० हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने आणि ५० हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भातलागवड होणार आहे. डहाणूतील नरेशवाडी येथेही २० एकर क्षेत्रावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात येणार आहे. नरेशवाडी, डेहणेपळे, रानशेत, रणकोळ, ऐना, वाघाडी या भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सहायकांनी आपापल्या सजेतील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब करत आहेत, असे डहाणूचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. नरेशवाडी संस्थेने नुकतेच नवीन भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही यंत्राद्वारे लागवड करावी. यासाठी ते यंत्रांचे कमीत कमी भाडे आकारून लागवडीस प्रोत्साहन देणार आहेत. ट्रे तयार करण्याची पद्धती रोपे ट्रे किंवा प्लास्टिक कागदावर चौकट करता येतात. पेरणीच्या सुरुवातीला माती व शेणाचे ७०:३०चे प्रमाण ठेवून ट्रे भरावे. एकरी फक्त आठ किलो बियाणे लागते. पारंपरिक पद्धतीपेक्षा साधारणत: दहा ते बारा किलो बियाण्याची बचत होते. एका ट्रे मध्ये ८० ग्रॅम बियाणे पेरले जाते. एकरीसाठी १०० ट्रे लागवडीसाठी लागतात. रोपवाटिका तयार करताना सर्वप्रथम ६० ते ७० टक्के ट्रे मातीने भरून घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मिसळून त्यावर एकसमान बियाणे पसरवावे. खरीप हंगामात कृषी विभाग डहाणू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. भातपिकाचे विविध प्रात्यक्षिके, एसआरटी, यंत्राद्वारे भातलागवड, चारसूत्री लागवड पद्धत, ⁠भात व नाचणी पिकासाठी शेतीशाळा, ⁠एक रुपयात पीकविमा, लागवडीनंतर त्यावर येणाऱ्या कीडरोगाबाबत माहिती, क्रॉपसॅपअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मदत करणे आदी कामे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. भात प्रमुख पीक असल्याने त्याचे लागवड क्षेत्र कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहेत.

घनकचरा विभागाने सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईत

1 क्व‍िंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त     ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या पथकाने केली. सदर कारवाईअंतर्गत विविध प्रभागसमितीतील दुकाने व आस्थापना यांचेकडून सिंगल युज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण रु. 9 हजार रु. दंड, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार 500 रुपये दंड,  दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 3 हजार 500 रु दंड, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 09 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार रु. दंड, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, लोकमान्य सावरकर प्रभागसमिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 5 हजार 700 रु. दंड, वागळे प्रभाग समिती क्षेत्रातून 13 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार 250 रु. दंड, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 2 हजार 500 रु.दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या 9 प्रभागसमिती क्षेत्रातून एकूण 38 हजार 450 रु. दंड वसूल करण्यात आला असल्याची मा‍हिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सिंगल यूज प्लॅस्टिकबाबतची कारवाई ही  नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा व दुकानदारांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकची विक्री करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 0000

आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास

ठाणे : आईला भेटण्यासाठी सातासमुद्रापार असलेल्या लेकानं तब्बल १६ देशांचा अनोखा प्रवास केला आहे. विराजित मुंगळे असं या मुलाचं नाव असून त्यांनी लंडन ते मुंबई असा कारने प्रवास केला. विराजित यांना या प्रवासासाठी ५९ दिवस लागले. या काळात जवळपास १८ हजार किलोमीटरचा रस्त्याने प्रवास केला. १६ देशांमधून सुरु झालेला हा प्रवास ठाण्यात येऊन थांबला आहे. विराजित मुंगळे हे एक ब्रिटीश भारतीय आहेत. त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून बाय कारने मुंबई गाठली. विराजित हे फ्लाईटनेही येऊ शकले असते परंतु एक थरारक अनुभव घ्यायची इच्छा असल्याने त्यांनी हा कारने मुंबईत यायचे ठरवले. विराजित यांनी लंडनहून ठाणे यात १८३०० किमी प्रवास कारने केला. या प्रवासात १६ देश, ज्यात जर्मनी, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. प्रत्येक देशात त्यांनी जेवणाचा, राहण्याचा अनुभव घेतला. विराजित ऐतिहासिक सिल्क रोडशी प्रेरित आहेत. त्यामुळे अशीच रोड ट्रिप करण्याची त्यांची इच्छा होती. या रस्ते प्रवासात विराजित यांनी दिवसाला ४०० ते ६०० किमी अंतर दिवसाला कापले. त्यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचा प्रवास करणेही टाळले. मात्र इतका मोठा प्रवास करून घरी पोहचताच आईचा ओरडाही विराजित यांना ऐकावा लागला. इतक्या देशातून प्रवास करण्यासाठी विराजित यांनी आधीच सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या. सोबतच ट्रिपसाठी ऑफिसहून २ महिन्याची सुट्टीही घेतली परंतु हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. रस्त्यात अनेक ठिकाणी उंच पर्वत, कमी ऑक्सिजन यामुळे त्यांना आजारपणाचाही सामना करावा लागला. ५२०० मीटर उंच आणि खराब वातावरणामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यानंतर ठाण्यात पोहचून विराजित हे त्यांच्या आईला भेटले. आता ठाण्याहून पुन्हा लंडनाला जाण्यासाठी ते लाँग ड्राईव्ह करत जाणार नाही. आता ते त्यांची चारचाकी लंडनला शिपमधून पाठवतील आणि स्वत: विमानाने लंडनला जाणार आहेत.

इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर यांची तपासणी व धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार !

समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांच्या तक्रारीची ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी घेतली दखल अनिल ठाणेकर     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा उपशहरप्रमुख, समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी, युवासेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा सचिव सागर बैरीशेट्टी, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, संजय मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ठाण्यातील गावंडबाग क्षेत्रातील टर्फ बाजूच्या इमारतीतील वेदर शेड उडून झालेल्या अपघातामुळे ९ मुले जखमी झाल्याची दुर्घटना कानावर घालून ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी करण्याची तसेच धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याची तत्काळ दखल घेत सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या घेतलेल्या बैठकीत अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा होऊन महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी तसेच धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी.महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत.त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश दिले. वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी ९ मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्यास त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.इतर प्रभागातील ८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 0000

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र.…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी. 0000

दरड कोसळण्याच्या घटनांपासून ‘मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य!

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार- एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर     ठाणे : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असाल्फ व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त देविदास क्षीरसागर इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई मध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी येथील सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आत मध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, २००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली कारण, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. चौकट स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धीका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले. चौकट असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे.हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त – तहसीलदार अभिजित खोले

ठाणे : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई करण्यात येऊन २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली. अवैध वाळू उपसाविरोधात आज जिल्हा प्रशासनाच्या भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात कारवाई करून 1 बार्ज, 1 संक्शन जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईतील मुद्देमालाची अंदाजे किंमत २४ लाख असून, यासंबंधी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार २६ जून रोजी सकाळी ९ वा काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात खारबाव मंडळ अधिकारी व भिवंडी मंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त तलाठी यांच्या मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये १ बार्ज, १ संक्शन आढळून आले. बार्जवरील कामगार पथकाची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार झाले. पळून जाण्यापूर्वी बार्ज वॉल काढण्यात आल्याने व बोटीच्या सहाय्याने ओढून आणणे शक्य नसल्याने तेथेच पाण्यात बुडवण्यात आला. १ सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर आणून खाडी किनारी काढून पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कट करुन नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.