Category: ठाणे

Thane news

वर्तकनगर रहिवाशांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे !

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकास रखडल्याने वर्तकनगर येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आता या रहिवाशांनी  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नं. १२ इमारतीचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. पाठपुरावा करूनही विकासक दाद देत नव्हता. अखेर येथील ३२ कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी राजू फाटक यांनी विनंती करत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट करून दिली. आमदार प्रताप सरनाईक यांनी रहिवाशांच्या बैठकीत विकासकाला फोन केला. विकासकाने येत्या ८ दिवसात रहिवाशांशी चर्चा करतो असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांना लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शब्दाला मान देऊन मतदान बहिष्कार निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मतदान साहित्य पोहोचले मतदान केंद्रांवर !

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण,  ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना* बजावता येणार मतदानाचा हक्क – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण ६६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ   – एकूण मतदार – २०८७६०४ (पुरुष मतदार-११२९७१४, महिला मतदार- ९५७१९१, तृतीय पंथी मतदार-३३९, सेवा मतदार-३६०). भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68). शहापूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39). भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14) कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140). मुरबाड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83). कल्याण लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579). अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).…

‘वोट जिहाद’ला ‘वोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत इशारा भिवंडी : लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनुसुचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजपाचे आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना `जो मोदी का नही, वो हमारे काम का नही’, असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर `वोट’ ने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौघुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे प्रतिपादन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्यामा-श्याम सत्संग समितीचा भिवंडीत कपिल पाटील यांना पाठिंबा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करून मला पाठिंबा दिला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्यामबाबू गुप्ता, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, महासचिव सत्यनारायण लोहिया, सचिव प्रशांत धुमाळ, खजिनदार भरत शहा यांच्यासह समितीचे सत्संगी उपस्थित होते. चौकट फडणवीसांच्या ११५ व्या सभेने भिवंडीत प्रचाराचा समारोप देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात ११५ सभा घेतल्या. भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडीतील मतदान केंद्रावर होणार आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

महिला, युवा, दिव्यांग या नाविन्यपूर्ण मतदान केंद्रावर होणार मतदान – अशोक शिनगारे अनिल ठाणेकर ठाणे: २० मे रोजी होत असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, १८ युवा मतदान केंद्रे, १७ दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे  महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत. युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांचे फोटो लावण्यात येणार आहेत,ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी फिक्कट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणा-या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.

रामदास आठवले यांचे कर्जत येथे रिपाइं तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड कर्जत:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री, खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून कर्जत…

शिवाजीपार्कवर ‘सावरकर’ बीकेसीत ‘आंबेडकर’

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…

कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील गोविंंद करसन चौकात प्रवासी वाहतुकीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस उभ्या करून ठेवण्यात येतात. या बस मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने या भागात दररोज वाहन कोंडी होते. या बस प्रवासी वाहतुकीसाठी गोविंद करसन चौकात वळविल्या जातात. या मोठ्या बस वळविताना अनेक वेळा वाहन कोंडी होते. या बसचा थांबा बाजारपेठ विभागातील आतील रस्त्यांवर, बाजार समिती भागातील रस्त्यांवर करण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता आता काँक्रीटचा आणि प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अलीकडे वाहन कोंडी होत नाही. परंतु, गोविंद करसन चौकात केडीएमटीच्या प्रवासी वाहतुकीच्या बस या भागात असतात. या बससाठी उभे असलेले प्रवासी चौकात मुख्य रस्त्यावर उभे असतात. एका पाठोपाठ बस रांगेत उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याचा मुख्य भाग व्यापला जातो. त्यामुळे पत्रीपुलाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एका मार्गिकेतून जावे लागते. या रस्त्यावरून अवजड वाहन जात असेल तर ते या बसच्या कोंडीत अडकते. अनेक वेळा वाहने करसन चौकात वळण घेऊन वलीपीर रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात ही वाहने या बसमुळे अडकतात. आणि शिवाजी चौकातील वाहने या वाहनांचामागे अडकून पडतात. करसन चौकात केडीएमटीच्या बसमुळे दररोजची कोंडी होत असल्याने या चौकातील बस इतर भागातून प्रवाशांंच्या सोयीप्रमाणे सोडण्यात याव्यात, अशा मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या चौकाच्या परिसरात राहणारे व्यापारी, रहिवासी या सततच्या कोंडीमुळे हैराण आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी अडथळा नको म्हणून केडीएमटीच्या बस करसन चौकातून सोडल्या जात असल्याचे समजते.

चार महिन्यात वाढले ८३ हजार नवमतदार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात ३ जानेवारी २४ ते ३ मे २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ८३ हजार ८०७ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली. हे नव मतदार प्रथमच कल्याण लोकसभा आणि पुढील होणाऱ्या निवडणुकांसाठी यापुढे मतदान करतील, अशी माहिती कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी गुरूवारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील निवडणूक कार्यालयात दिली. ३ जानेवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या १९ लाख ९८ हजार ४२४ होती. जानेवारी ते ३ मे या कालावधीत निवडणूक आयोगाकडून नव मतदार नोंदणी मोहीम विविध स्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात ८३ हजार ८०७ नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ८२ हजार २३१ आहे, असे सातपुते यांनी सांगितले. मतदान केंद्रे कल्याण लोकसभा हद्दीतील सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार ९६० मतदान केंद्रे आहेत. यावेळी या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. एकाच भागात १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या एक हजार १२ ठिकाणी वेब कास्टिंग आणि तेथे सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रातील मतदान प्रक्रियेचे (मतदान कक्ष वगळून) काम निवडणूक नियंत्रण अधिकारी कक्षात बसून पाहू शकणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर अपंगांसाठी रॅम्प, व्हिलचेअर सज्ज ठेवली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, पाणी, औषधांचा संच तयार ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी साहाय्यक म्हणून आशा सेविका, आरोग्य सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. अपंगांना घर ते मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही मतदार व्याधीग्रस्त असतात, हा विचार करून मतदारांना कोणताही त्रास नको म्हणून बहुतांशी मतदान केंद्रे इमारतीच्या तळ मजल्याला प्रस्तावित केली आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली. कर्मचारी सज्ज कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस, गृहरक्षक दलासह एकूण १० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी योग्य त्या प्रशिक्षणासह सज्ज करण्यात आले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांतील काही ठिकाणी एक मतदान केंद्र महिला, एक केंद्र युवा आणि एक केंद्र अपंग व्यक्तिंच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. या निवडणुकीतील हे वैशिष्टय आहे, असे सातपुते यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील दिवंगत सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. नाट्यगृह बंद सावळाराम महाराज क्रीडासंकुलाजवळ सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या भुयारात मतपेट्या ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था असल्याने कल्याण लोकसभेतील मतपेट्या याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था येथे आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसर करण्यात आला आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत सावित्रीबाई नाट्यगृहातील सर्व नाट्यप्रयोग, इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कपिल पाटील यांच्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले 

बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कुळगाव-बदलापूर शहरात गुरुवारी काढलेल्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करीत उत्साह व जल्लोषात महायुतीच्या प्रचारासाठी निघालेल्या कुळगाव-बदलापूरच्या रॅलीत जनसागर उसळला होता. बदलापूर शहरातील पूर्व भागापाठोपाठ पश्चिम भागातील बदलापूरवासियांनी महायुतीच्या कार्याला पसंती देत ठिकठिकाणी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरामध्ये जय श्रीराम व मोदी… मोदी…च्या घोषणांमध्ये वातावरण दुमदुमून गेल्याने कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला विजय यात्रेचे स्वरुप आले होते. माऊली चौकातून सुरू झालेला महायुतीचा हा झंझावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील घोरपडे चौक, उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन, सानेवाडी, झेंडा चौक, पृथ्वी बिल्डिंग, रितू वर्ल्ड, स्वामी समर्थ चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महायुतीच्या नेत्यांनी वंदन केले. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले, प्रभाकर पाटील, भाजपाचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर, राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष  संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली, मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, आरपीआयचे शहराध्यक्ष धनराज गायकवाड आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या आजच्या रॅलीमुळे बदलापूरकरांचे प्रेम व विश्वास अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील हजारो नागरिकांना विकासाची प्रचिती आली. त्यामुळे आजच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रेमाबद्दल नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीला महायुतीच्या हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.