Category: ठाणे

Thane news

  दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान

दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान बालविकास क्षेत्रातील कार्याची आंतरराष्ट्रीय दखल दिवा : Early Childhood Development Forum यांच्या वतीने दुबई येथील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष समारंभात दिवा शहरातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विशेषतः बालविकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभात एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव स्वप्निल मारुती गायकर आणि विश्वस्त प्रणाल मारुती गायकर यांनी सन्मान स्वीकारला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि बालकेंद्रित उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे दिवा शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे : गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने  गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी , बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. १० फेब्रुवारी २०२६ रोजी, बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा-मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. या प्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दिपाली भगत,  मनिषा भगत  यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले. दरम्यान, सोहम कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्याने ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धिम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी; पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धिम्या रेल्वेगाड्या चालविणे गरजेचे असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी, कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. त्यामुळे तिसऱ्या (अप)  व चौथ्या (डाऊन)  मार्गिकेवर गर्दीच्या वेळात ( अनुक्रमे सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्रौ नऊ ) धिम्या गाड्या चालवाव्यात;  पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धिम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात;  दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि  मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस लोकल सुरू करावी आदी मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना  निवेदन देण्यात आले. हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळास सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी,  मध्य रेल्वेवर वर्षाकाठी २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला २८7 अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होत आहेत. हे मृत्यू फक्त गर्दीमुळे होत आहेत. एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीचा निचरा होणे सोयीचे होणार आहे.  मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तेथेही होम प्लॅटफाॅर्मची गरज आहे, असे सांगितले. तसेच, आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी विनंती शिक्षण खात्याला करणार असून परिक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवण्यासाठीही रेल्वेकडे आपण मागणी केली असल्याचेही मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर,  वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर स्लो लोकल चालविणे गरजेचे आहे, असे सुधीर भगत यांनी सांगितले. या वेळी  नगरसेविका दिपाली भगत, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान , जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , मेहरबानो पटेल , गजानन चौधरी, ज्योती निबार्गी, शशिकला पुजारी, राजु चापले,विष्णू माने , जगत सिंग,  सुनील तिवारी , साहिल उदुगडे , श्रीकांत बर्वे, वनिता भोर, दिलीप नाईक, पद्माकर पाटील, शिवा कालू सिंह, रुबीना शेख, दिपा गावंड, बबन सांगळे, नथु चव्हाण, रेश्मा भानुशाली, निलेश जाधव, पुजा जाधव, चंद्रकांत गायकवाड, मेघराज पांडे, मंदार गांगळ, धर्मेंद्र अस्थाना, सायना आझमी, हाजी बेगम शेख आदी उपस्थित होते.

  जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद!

जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद! भाजपा नगरसेविका नम्रता कोळी यांनी वेधले लक्ष ठाणे : शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. तर शहरातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जुने अग्निशमन केंद्र म्हणून जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राची नोंद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून अवघ्या ५०० ते ७०० मीटर अंतरावर केंद्राची जागा आहे. ठाणे रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, जुनी बाजारपेठ, जांभळी नाका होलसेल मार्केट, शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास काही मिनिटांतच जवाहरबाग केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी पोचत होती. त्यामुळे तत्काळ मदत कार्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवता येत होते. दुर्घटनेची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाचे जवान अन्य केंद्रातूनही कुमक बोलत असत. मात्र, केंद्राच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे आता जवाहरबाग केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे तत्काळ मदतकार्यात अडचणी येत आहेत, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिका आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी महागिरीतील दाभोळकरवाडी येथे आग लागल्यानंतर कळवा येथून अग्निशमन दलाला बोलाविण्याची वेळ आली. सुदैवाने आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्तीतील संभाव्य हानी टाळण्यासाठी जवाहरबाग अग्निशमन केंद्र तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेट क्र. १ जवळ सुरू ठेवावे. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ठेवाव्यात, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

 महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोळी समाजाची संस्कृती व खाद्यपदार्थांची ओळख ठाणे: कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या कोळी महोत्सवाला यंदा सलग १४ व्या वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभागी होण्याचा आनंद लुटला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महागिरी कोळीवाडा कोळी समाजाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या महोत्सवाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, भाजपाचे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, संजय तरे यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना कलांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच खवय्यांना कोळी समाजातील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली.

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली (पूर्व) विभागातील दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभुमी (मोक्षधाम) ही जुनी स्मशानभुमी तोडून तेथे आधुनिक पध्दतीच्या नविन स्मशानभूमी प्रकल्पास महापालिकेने मंजुरी देऊन सन २०२४ मध्ये कार्यादेश प्रदान केलेला आहे. या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करण्यासाठी, जुनी स्मशानभुमी तोडण्याचे काम रविवार १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शिवमंदिर स्मशानभुमीमध्ये फक्त गॅस शवदाहिनी सुरु राहिल, उर्वरित स्मशानभुमी संपुर्णपणे बंद राहील. तरी नागरीकांनी अंत्यविधीसाठी  डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा स्मशानभुमी, डोंबिवली पूर्वेतील ⁠पाथर्ली स्मशानभुमी, कल्याण रोड, आणि ⁠म्हसोबा चौक स्मशानभुमी, ठाकुर्ली या  स्मशानभुमींचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे अनिल ठाणेकर ठाणे: अयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिक वर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित,  प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर!

ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर! जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे भव्य ‘शिवजयंती उत्सव २०२६’ चे आयोजन ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘जनस्वराज्य प्रतिष्ठान’ च्या वतीने गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम ९० फिट रोड, पारसिक नगर, खारीगांव, कळवा येथे ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर कृष्णा दादु पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. मुख्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  संजय केळकर उपस्थित राहणार असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. संदिप लेले (जिल्हाध्यक्ष, भाजपा), राजाराम साळवी (अध्यक्ष, आगरी सेना), दशरथ पाटील (उपनेते, शिवसेना) ,संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे (ज्येष्ठ नगरसेवक), विकास पाटील (नगरसेवक), अशोक भोईर (माजी उपमहापौर), सचिन मोरे (अध्यक्ष, के.बी.पी. कॉलेज) आणि विक्रम भोईर (सरचिटणीस, भाजपा) मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील सर्व स्थानिक नगरसेवकांची देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात गायक नंदेश उमप यांचा ‘शिवगिते व पोवाड्यांचा नजराणा’. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून जिवंत केला जाईल. तसेच, प्रा. विशाल गरुड यांचे ओघवते व्याख्यान तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. शिवताल ढोल ताशा पथक (नाशिक) यांच्या कडकडाटात निघणारी मिरवणूक आणि वाद्यवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.. केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत जनस्वराज्य ही संस्था विविध उपक्रम राबवते आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ठाणेकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील व त्यांचे विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथे विशेष पोक्सो न्यायालय (मा. न्यायाधीश रुबी मालवणकर) यांनी विशेष सत्र प्रकरण क्र. ०९/२०२६…

 आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई

आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई बिल्डर मेहता यांच्या कंपनीविरुद्ध खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने मोठा निर्णय मिरा – भाईंदर/ अरविंद जोशी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण कोर्टाने सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणात खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने निकाल दिला. कंपनीचे प्रवर्तक आणि जबाबदार अधिकारी आमदार नरेंद्र एल. मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला कडक शब्दांत फटकारले. कोर्टाने या प्रकरणाला सेवेतील कमतरता, फसवणूक आणि अनुचित व्यापार असल्याचे म्हटले आहे. मनोज दुबे यांनी १२ फेब्रुवारी २०१३ रोजी भाईंदर (पूर्व) येथील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक डी/७०६ साठी नोंदणीकृत करार केला आणि मोठी रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्याने इंडियाबुल्स फायनान्सकडून गृहकर्जासाठी अर्ज केला, परंतु बिल्डरकडे ७ व्या मजल्याच्या बांधकामासाठी मंजूर आराखडा नव्हता, कारण परवानगी फक्त ४ थ्या मजल्यापर्यंतच देण्यात आली होती. या कारणास्तव, बँकेने कर्ज रद्द केले. नंतर, बिल्डरने सुधारित परवानगी घेतली, परंतु मेहता अँड कंपनीने तरीही भरीव व्याज आणि दंडाची मागणी केली, पेमेंटमध्ये विलंब झाल्याचे कारण खरेदीदाराला जबाबदार धरले. कंपनीच्या मागणीबाबत, कोर्टाने म्हटले की बिल्डर स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही, कारण परवानगीशिवाय ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकण्याचा करार करणे हा गंभीर गुन्हा आहे. रद्द करणे आणि धमकावणे वृत्ती खरेदीदार मनोज दुबे यांनी दुसऱ्या बँकेकडून कर्जाची व्यवस्था करून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ९ जानेवारी २०१४ रोजी, बिल्डरने एकतर्फीपणे करार रद्द करणारे पत्र जारी केले आणि पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला. मेहताच्या वर्तनाबाबत, कोर्टाने म्हटले की नोंदणीकृत करार केवळ पत्राद्वारे रद्द करता येत नाही आणि बिल्डरचे वर्तन स्पष्टपणे अन्याय्य होते. कोर्टाला असेही आढळून आले की वाटप पत्रात क्षेत्रफळ ५९० चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे, तर करारात कार्पेट क्षेत्रफळ ४७२ चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे. ही तफावत देखील बेकायदेशीर आणि अस्पष्ट आहे. कोर्टाचा आदेश आयोगाने बिल्डर, प्रवर्तक नरेंद्र एल. मेहता आणि रजनीकांत सिंग यांना संयुक्तपणे जबाबदार धरले आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्यांनी खरेदीदाराला मानसिक छळासाठी भरपाई म्हणून ₹२.५ लाख, खटल्याचा खर्च म्हणून ₹५०,००० आणि प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत दररोज ₹१,००० देण्याचे आदेश दिले. आयोगाच्या या आदेशात स्पष्ट केले आहे की बांधकाम व्यावसायिक वैध परवानगीशिवाय करार करू शकत नाहीत आणि बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे होणाऱ्या विलंबासाठी खरेदीदारांना दंड आकारला जाऊ शकत नाही. रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आवश्यक आहे.…

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे. `टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.