Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

शहापूर वनविभागाचे सरकारी फलक भंगारात

शहापूर वनविभागाचे सरकारी फलक भंगारात धक्कादायक वास्तव उजेडात अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासनाकडून जनजागृतीपर बसविण्यात येणारे सरकारी फलक चक्कं आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून आहेत.अगदी निष्काळजीपणे हे फलक येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. वनसंपत्तीचे नुकसान होऊ नये,यासाठी वनविभागाची सरकारी नियमावली त्यांचे कडक कायदे,याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे सुचना फलक शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या शहापूर, धसई,डोळखांब, वाशाळा, विहीगाव, खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात लावण्यात येणारे होते. परंतु हे सुचना फलक जंगलात लावण्यातच न आल्याने यातील बहुतांश फलक वनविभागाच्या आसनगाव काष्ट विक्री आगारातील आवारात अक्षरशः भंगारात अस्तव्यस्त, अवस्थेत अडगळीत, धुळखात, कचऱ्यात पडून आहेत. या सरकारी फलकांवर वनक्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणे,वन हद्दीतील खुणा व बुरुज नष्ट करणे, झाडांना इजा पोहचविणे व त्यांची तोड करणे, अतिक्रमण करणे, खोदकाम करणे, दगड,माती, वाळू काढणे व वाहतूक करणे, वणवे पेटविणे, वनास आग लावणे,धूम्रपान करणे,मद्यपान करणे,आदी कृत्य आढळून आल्यास सदर व्यक्ती भारतीय वन अधिनियमानुसार नुकसान भरपाई व्यतीरिक्त कारावास,तसेच द्रव्य दंडास पात्र असेल हा गुन्हा अजामीन पात्र आहे.गुन्हयात वापरलेली हत्यारे,अवजारे व वाहने,शासन जमा करण्यात येतील असं हुकुमावरून उपवनसंरक्षक शहापूर वनविभाग असा वनविभागाच्या या शासकीय कठोर नियमावली बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संदेशपर माहीती या सरकारी फलकांवर लिहिण्यात आलेली आहे.असे हे वनखात्याचे फलक वनविभागाकडून जंगलात लावण्यासाठी संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना पुरवठा करण्यात येणार होते.तथापि हे सरकारी फलक वेळेवर काही वनपरिक्षेत्र कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून नेण्यात आले नाहीत.परिणामी यातील बरेच फलक जंगलात बसविण्यात न आल्याने हे फलक आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळीजपणामुळे हे सरकारी फलक भंगार जमा झाल्याचे चित्र काष्ट विक्री आगारात दिसत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू अद्याप थांबले नसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सातत्य आणि प्रभावी अंमलबजावणीचा अभाव दिसून येत असल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व पोषण सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसला पाहिजे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये माता व बाल आरोग्याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली. राज्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, अजूनही मोठ्या लोकसंख्येला मूलभूत पोषण, स्वच्छ पाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.  आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवणे आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू ही प्रशासनाच्या अपयशाची बाब असून, या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असा स्पष्ट इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे.

 तानसा अभयारण्यात मद्यपी टोळक्यांचा उच्छाद

तानसा अभयारण्यात मद्यपी टोळक्यांचा उच्छाद जंगलात शेकडो दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचऱ्याचे ढीग; वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात वन्यजीव विभाग, पोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अविनाश उबाळे ठाणे : तानसा वन्यजीव अभयारण्यातील संरक्षित जंगल…

आगामी जनगणना २०२७ मध्ये होणार डिजिटल स्वरुपात!

आगामी जनगणना २०२७ मध्ये होणार डिजिटल स्वरुपात! ठाणे- जनगणना २०२७ Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत महत्वाचे प्रशिक्षण १९ जानेवारी रोजी समिती सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.   यावेळी जनगणना संचालनालयाचे अधिकारी प्रवीण भगत, सहाय्यक निर्देशक व सांख्यिकी अन्वेशक  अरुण साळगांवकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त जनगणना विषयक कामकाज हाताळणारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणासाठी स्वतः जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, भिवंडी तहसिलदार अभिजित खोले, मुरबाड तहसिलदार अभिजित देशमुख, शहापूर तहसिलदार .परमेश्वर कासुळे, अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

गोवेली येथे २३ जानेवारीला मराठी भाषेच्या ‘बोलींचा जागर’

गोवेली येथे २३ जानेवारीला मराठी भाषेच्या ‘बोलींचा जागर’ कल्याण: मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सशक्त भाषा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठी भाषेचे वैभव असून त्या त्या प्रदेशाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख जपतात. या बोलींचे जतन, संवर्धन व अभ्यास घडावा, या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ जानेवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेतील विविध बोली या भाषेची ताकद असून त्या लोकजीवन, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासन मराठी विभाग , भाषा संचालनालय, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल. मुख्य कार्यक्रमात बोलींचा जागर, प्रातिनिधिक वारली व कुपारी या स्थानिक बोलींतील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण, संवाद तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. नेहा सावंत आणि डॉ. रुपेश कोडिलकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  रवींद्र घोडविंदे राहणार आहेत. या उपक्रमाचे निमंत्रण मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, तसेच महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय भाषा संचालक अरुण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून मराठी विभाग प्रमुख प्रा. हरेंद्र सोष्टे आणि प्रा. सतीश लकडे हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेच्या विविध बोलींचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ठाणे: मराठी भाषेचे जतन, संवर्धन तसेच नव्या पिढीमध्ये भाषेविषयी प्रेम व अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिकेच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या उपक्रमांतर्गत उद्या बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वा. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते ‘जगणे व्हावे गाणे’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. मराठी साहित्य परंपरेचा गौरव करण्यासाठी  मंगळवार २७ जानेवारी सायंकाळी ४.०० वा. मराठी कवी संमेलनाचे आयोजन महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले आहे यामुळे साहित्यप्रेमींना समकालीन मराठी काव्याचा आस्वाद घेता येणार आहे. मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपाच्या दिवशी दिनांक २8 जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. ठाणे महापालिका परिसरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रसार, ग्रंथांचे महत्त्व आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ठाण्यात प्रथमच ‘शरद पवार शिल्ड’ क्रिकेट स्पर्धेचा थाटात प्रारंभ

ठाण्यात प्रथमच ‘शरद पवार शिल्ड’ क्रिकेट स्पर्धेचा थाटात प्रारंभ अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्याच्या सेन्ट्रल मैदानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘शरद पवार शिल्ड’ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील १९ वर्षांखालील गुणवंत क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून ठाण्यातील नव्या खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सुमारे ५५० मुलांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या ६० खेळाडूंच्या चार संघांची निर्मिती करण्यात आली असून, हे संघ सध्या लिग पद्धतीने एकमेकांविरुद्ध सामना खेळत आहेत. लिग फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई अंडर-१९ संघात निवड झालेले अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता आणि रंगत अधिक वाढली आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उमेष खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खेळाडूंच्या निवडीसाठी रवि कुलकर्णी, अमित दानी, उमेश गोतखिंडिकर प्रशांत सावत आणि जुल्फिकार पारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘डॉ. जितेंद्र आव्हाड स्पोर्ट्स फाउंडेशन’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेसाठी रणजित कुमार पिल्लै (डायरेक्टर – स्पेशल प्रोजेक्ट्स, JSW) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या स्पर्धेमुळे ठाण्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी नवे खेळाडू घडण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेचे अंतिम सामने येत्या २७ व २८ जानेवारी रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेळविले जाणार आहेत. या सामन्यांकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई सुरू

पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई सुरू ठाणे- ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुली मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा  केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे.  थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत पाणीबिल भरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.जे नागरिक आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती कारवाई सुरू आहे. तरी नागरिकांनी पाणी बिल भरुन कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

ठामपा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ७४ टक्के – संजय केळकर

ठामपा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ७४ टक्के – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महापालिका निवडणुकीत  भाजपाने कमी जागा लढवत तब्बल ७४ टक्के स्ट्राइक रेट ठेवून ३८ पैकी २८ नगरसेवक निवडून आणले. या कामगिरीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांचे पक्ष वर्तुळात कौतुक होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपची शिवसेना शिंदे गटाशी युती न होता स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांची होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांची पक्षाने नियुक्ती केली.  केळकर यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळानंतर त्यांनी विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक तीन वेळा जिंकली. त्यांची ठाणे शहरातील चौफेर विकासकामे आणि दीर्घकालीन सामाजिक कार्यावर खऱ्या अर्थाने ठाणेकरांनी पसंतीची मोहोर उमटवली. त्यांच्या मतदार संघात महायुतीचे ३५ पैकी ३१ उमेदवार निवडून आले. शहरात विविध क्षेत्रात केलेल्या कामांबरोबरच आमदार आपल्या दारी आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या आणि गृहसंकुलांच्या अडचणी सोडवत शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. या उपक्रमांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याचा फायदा नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जागावाटपात १३१ पैकी किमान ५० ते ५५ जागा मिळाव्यात याबाबत संजय केळकर यांनी कायम आग्रह धरला होता. मात्र अवघ्या ४० जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची समजूत काढण्यात त्यांना यशही आले. अशात आणखी दोन जागा कमी झाल्याने भाजपाने ३८ जागांवर उमेदवार दिले. संजय केळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घेत पक्षातील नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली. यात …सौ. यादव, उषा वाघ, अनिता ठाकूर, माधुरी मेटांगे, वैभव कदम, सीताराम राणे, विकास पाटील आदींचा समावेश होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजीची जागा उत्साहाने घेतल्याने प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी त्यांचा सहभाग मोठा दिसून आला. शिवाय मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशात आमदार संजय केळकर यांनी देखील प्रचार काळात नियमितपणे व्यक्तिशः नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले, उमेदवारांच्या प्रचार रॅलीतून नागरिकांशी संवाद साधला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि भाजपचे ३८ पैकी २८ उमेदवार निवडून आले. हा स्ट्राइक रेट ७४ टक्के होता. विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेले नगरसेवक हे वागळे इस्टेट, वर्तकनगर ते घोडबंदरपासून दिवा-शिळ या भागातील होते. त्यामुळे भाजप दुपटीने वाढल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. जागा जास्त मिळाल्या असत्या किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाला असता तर महापौरही भाजपचा झाला असता एवढे नगरसेवक निवडून आले असते, असा विश्वास कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी देखील निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. उमेदवारांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. त्यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचाही फायदा झाल्याचे नागरिकांच्या संवादातून दिसून आले.शहर अध्यक्ष संदीप लेले यांनीही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला.एकूणच भाजपचे केवळ नगसेवकच वाढले नाहीत तर पक्षाला झालेले मतदानही लक्षणीय वाढले. याबाबत संजय केळकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले. भाजपला वाढत असलेला जनाधार आणि यश पक्ष कार्यकर्त्यांसाठी आणि पुढील पिढीसाठी फायदेशीरच ठरणार आहे यात वाद नाही.

 महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे- डॉ. हर्षदीप कांबळे अशोक गायकवाड महाड: बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत पाईक आहेत, त्यांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे, असे आवाहान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे संस्थेच्या वतीने १९ व २० जानेवारी रोजी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा क्रांतीभूमी महाड, जिल्हा रायगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे दुरुस्तथ प्रणालीद्वारे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, आदी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग शासनाच्या १७ विभागांना योजनांसाठी निधी देत असतो. या सर्व योजनांचा प्रचार -प्रसार समदुतांनी करावा. शासनाच्या विकास योजनेच्या प्रक्रियेत समतादुतांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कामाचा ठसा उंचवावा असे,आवाहनही त्यांनी केले. कार्यशाळेला संबोधित करताना महासंचालक सुनील वारे म्हणाले की, महाड ही क्रांतिकारी भूमी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच क्रांतीभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता प्रस्थापित केली. तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समतादूत हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या तसेच बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करतात. समतादूतांना अवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ. समतादुतांनी बदलत्या काळानुसार आपल्यात बदल केला पाहिजे. नवे ज्ञान, नवे कौशल्य विकसित केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी सर्व राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले समतादूत चांगले काम करत असून समतादूतांच्या कामात गतिशीलता येण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या समतादूत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सांगितले. समतादूत प्रकल्पाचे गतीने काम करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा समतादुतांनी वापर करवा, असे आवाहनही त्यानी केले. कार्यालयीन कामात शिस्त याविषयी निबंधक विशाल लोंढे यांनी सर्व समतादुतांना मौलिक मार्गदर्शन करून संवाद साधला. या कार्यशाळेला संपूर्ण राज्यातून ३०० समतादूत व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते . कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, माहिती जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.