Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ठाणे महापालिकेतील ‘बिनविरोध’ प्रभागांमध्ये मतदान बंधनकारक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका -अजय जेया

ठाणे महापालिकेतील ‘बिनविरोध’ प्रभागांमध्ये मतदान बंधनकारक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका -अजय जेया अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि ‘नोटा’ (NOTA – None of the Above) द्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेचा संबंध ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५(अ), १४(अ), १७(ब), १८(ब), १८(क) आणि १८(ड) या सहा प्रभागांशी आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर २ जानेवारी २०२६ रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, उर्वरित उमेदवारांना कोणतेही मतदान न घेता बिनविरोध निवडून घोषित करण्यात आले. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवार्य प्रक्रिया आहे. मात्र, बिनविरोध निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळली जात असून त्यामुळे मतदारांचा नोटा निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोटा हा मतदाराचा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार असून तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकेत पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, नोटा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर ‘बिनविरोध निवडणूक’ ही संकल्पनाच बदलली आहे. एकच उमेदवार रिंगणात असला, तरी मतदार त्या उमेदवारास नाकारण्याचा अधिकार नोटा द्वारे वापरू शकतात. अशा परिस्थितीत नोटाला अधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणूक घेण्याची गरज भासू शकते, ज्यामुळे लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवारांच्या फायद्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव टाकून सामूहिक माघारी घडवून आणल्या जात असल्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दलही याचिकेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारांमुळे मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेला धक्का बसतो आणि लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होतो, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ही याचिका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या निवडीला थेट आव्हान देत नसून, मतदान न घेता उमेदवार बिनविरोध निवडून घोषित करण्याच्या कायदेशीर आणि घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करते, असे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित प्रभागांमध्ये मतदान घेऊन, उमेदवारांसह नोटा मतांची मोजणी करूनच निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या जनहित याचिकेची सुनावणी लवकरच बॉम्बे उच्च न्यायालयात होण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे राजकीय तसेच नागरिकांच्या वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पी. वेलरासू

निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पी. वेलरासू अनिल ठाणेकर ठाणे : आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू तसेच निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी ठाणे महानगरपालिकेतील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच  प्रशासनाच्या निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत, निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश दिले. यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या आढावा बैठकीदरम्यान निवडणुकीशी संबंधित मतदार यादी, मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व , स्ट्राँग रूम सुरक्षा, निवडणूक कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, टपाली मतदान, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.निरीक्षकांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत माहिती घेत पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वेबकास्टिंग, चेकनाके व फ्लाइंग स्क्वॉड्स यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ईव्हीएम मशीनचे कमिशनिंग, सीलिंग व सुरक्षित साठवणूक याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. स्ट्राँग रूमवर २४ तास सुरक्षा, प्रवेश नोंदणी व सीसीटीव्ही निरीक्षण काटेकोरपणे राबवावे, असे निर्देश देण्यात आले. मतमोजणी प्रक्रियेतील नियोजन, मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींची वेळेत चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी ठेवण्यावर निरीक्षकांनी भर दिला.एकूणच ठाणे महानगरपालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याबाबत निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त करीत कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांतील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता ठाण्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना टक्कर देणार आहे. पाठबळ मिळाल्याने ठाणे महानगरपालिका निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला. तर या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, उमेदवारांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रिपब्लिकन बहुजन सेनेचे अध्यक्ष विजय घाटे यांनी दिले. महाराष्ट्रातील २२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाला एकत्र घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्या रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या माध्यमातून दलित-बहुजन समाजासाठी सातत्याने समाजकार्य केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याचा निर्धार रिपब्लिकन बहुजन सेनेने केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन बहुजन सेना ताकदीने मैदानात उतरली आहे. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची व विकासाची लढाई असल्याचे विजय घाटे यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार दिव्यातील प्रभाग क्रमांक २८ अ च्या त्यांच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली असल्याने मदत करू शकत नाही परंतु ही लढत मैत्रीपूर्वक करण्यात येईल असे ठरले असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रही देण्यात आले.

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा – हर्षवर्धन सपकाळ अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक – २०२६ साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या जाहिरनाम्या द्वारे काँग्रेसचे एक प्रकारे सर्वसामान्य ठाणेकरांना साद घातली आहे. यावेळी बोलताना सपकाळ यांनी, सत्ताधारी पक्षांवर चौफेर टीका करीत महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले.ठाणे व उर्वरित महाराष्ट्रात सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड भाष्य केले. महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असुन हा पैसा चार मार्गाने उकळला जात आहे. यात समृद्धी महामार्ग सारख्या शासकीय योजनांच्या भ्रष्टाचारातून पैसा, बदल्यांमध्ये पैसे उकळणारे देवाभाऊ, भूमाफियांमार्फत शासकीय जमिनी विकून पैसे कमावले, एकनाथ शिंदे भावाच्या माध्यमातून अंमलीपदार्थ सारख्या अवैध धंद्यातुन पैसा कमवित असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ठाणे महापालिका निवडणुक- २०२६ च्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात काँग्रेसने १५ कलमी उपक्रमांची घोषणा केली आहे. यात खड्डे विरहीत रस्त्यांची सुरक्षित सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, दिवाबत्ती, नियोजनपूर्वक पाठीपुरवठा करताना पाण्याच्या बचती बरोबरच वॉटर ऑडीट करणे, सार्वजनिक स्वच्छता, नुक्कड दवाखान्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाची सुरक्षा, स्मशानभूमी – दफनभूमीत मोफत अंत्यसंस्कार, खेळासाठी मैदाने व खेळाडूंना प्राधान्य, कला – साहित्य – वाचन संस्कृतीची जपणुक तसेच, व्यवसाय आणि स्थानिक भुमिपुत्रांकरीता रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन देण्याच्या योजनांचा समावेश केला आहे.विशेष म्हणजे, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे रोखुन आरक्षित भुखंड अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने जाहिरनाम्यात व्यक्त केला आहे.तसेच, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारां समवेत संवाद साधत अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढविणाऱ्या या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर ठाण्याचे प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, राजेश जाधव, प्रदीप राव, महेंद्र म्हात्रे, स्मिता वैती, रवींद्र कोळी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चौकट काँग्रेसचे खेड्याकडे चला ठाणे महापालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यात काँग्रेसने खेड्याकडे चला… हा महात्मा गांधींचा मार्ग अवलंबला आहे. ग्रामीण धर्तीवर विहिरींचे पुर्नभरण आणि पुर्नजिवीत करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त केला आहे. पालिका शाळांमध्ये सुतारकाम, गवंडीकाम अशा बारा बलुतेदारी कार्याच्या प्रशिक्षणासोबत शाळेत चरखा प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्याचे जाहिर केले आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातुनही ज्येष्ठांना चरखा चालविण्यास शिकवले जाणार आहे. प्राचीन मुलभुत आयुर्वेदाचेही शिक्षण पालिका शाळेतुन दिले जाणार असल्याचे काँग्रेसने नमुद केले आहे.

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ दीवच्‍या खेलो इंडिया मैदानात परभणीच्‍या अक्षय कोटलवारांचे कौतुक दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धा सलग दुसऱ्या वर्षी दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर यशस्‍वी पार पडली. या यशामागे परभणीचा मराठमोळा अक्षय कोटलवारांचे मेहनत दिसून आली. यामुळेच साऱ्या देशभरात कोटलवार यांच्‍या संयोजनाचे कौतुक होत आहे. मूळचे परभणी येथील अक्षय कोटलवार हे सध्या  दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकारी आहेत.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खेलो इंडिया बीच स्‍पर्धेची संकल्‍पना त्‍यांच्‍यासमोर येताच भव्‍य आयोजनात ध्येय पाहिले. आणि ते यशस्‍वी करून दाखवलीही.  कोटलवार हे  राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्‍यानंतर त्‍यांनी बीच स्‍पर्धेसाठी प्रत्‍यक्ष मैदानात उतरून अनोखे आयोजनाचा अध्याय लिहिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पहिल्या मल्टी-स्पोर्ट्स बीच गेम्ससाठी नोडल अधिकारी म्हणून अक्षय कोटलवार यांनी जबाबदारी यशस्‍वी पेलली. याबाबत बोलताना कोटलवार म्‍हणाले की, पहिल्‍या स्‍पर्धेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.  या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केल्यामुळे संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.पहिल्‍सा यशस्वी आयोजनानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली. दुसऱ्या पर्वातही आम्‍ही यशस्‍वी ठरलो. स्‍पर्धा संयोजनाच्‍या प्रवासात नैसर्गिक वाळूवरील खेळ, बदलते हवामान, समुद्रकिनारी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, खेळाडूंची सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्स यांसारखी अनेक आव्हाने समोर आली. मात्र, टीमवर्क, योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्ही ही सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पार केल्‍याचेही सांगून कोटलवार पुढे म्‍हणाले की हा अनुभव केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हता, तर भारतात बीच स्पोर्ट्सच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गतवर्षीच्‍या स्‍पर्धेत समरोपाच्‍या आधीच्‍या रात्री भरतीमुळे साऱ्या  मैदानात पाणी भरून आले होते. बीच सॉकरचा अंतिम लढत होणार की नाही असो सवाल उपस्‍थित झाला होता.  तेव्‍हा रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत उभे राहून पाणी काढण्यासाठी अक्षय कोटलवार यांच्‍या टीमने शर्थीचे प्रयत्‍न करीत नव्‍याने मैदान तयार केले. सॉकर लढत खेळवून स्‍पर्धा यशस्‍वी करून दाखवली होती. यंदाही स्‍पर्धा काळात  महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्‍या खेळाडूंना अक्षय कोटलवार विशेष पाहुणचार देत होते. खेळाडूंची गैरसोय होऊ नये  स्‍वतः  मैदानात उपस्‍थित होते. खेलो इंडिया बीच स्‍पर्धेच्‍या यशानंतर आशियाई बीच स्‍पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे प्रयत्‍नशील आहेत.

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची पदक अष्टमी, सागरी जलतरणात उपविजेतेपद दीव ः  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची लयलटू केली आहे. साताऱ्याच्‍या दीक्षा यादव पदकाचा डबल धमाका केला. दीक्षाच्‍या १ रौप्‍य व १ कांस्य पदकामुळे सागरी जलतरणात महाराष्टाने उपविजेतेपद पटकावले. दीवमधील अरबी समुद्रातील  सागरी जलतरणाचा महाराष्ट्राच्‍या मुलींनी पदकाचा करिश्मा घडविला. साताऱ्याच्‍या दीक्षा यादवे ५ किमी शर्यतीत रौप्‍य तर १० किमी शर्यतीत कांस्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाने दोन्‍ही शर्यतीत पदकाचा पराक्रम केला आहे. या यशामुळे सागरी जलतरणातील महिलांचे  उपविजेतपद महाराष्ट्राने संपादन केले. कर्नाटकला विजेतेपदाची तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक पथकप्रमुख नवनाथ फरताडे  यांच्‍या हस्‍ते देण्यात आला. दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर  दुसर्‍या खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा थरार रंगला.  सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकविला. तामिळनाडूने स्‍पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले. या तिन्‍ही संघानी प्रत्‍येकी 3 सुवर्ण, 2 रौप्य पदके जिंकल्‍याने सर्वसाधारण विजेतेपदाचा फैसला कांस्य पदकावर घेण्यात आला. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने  स्‍पर्धेत बाजी मारली. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते.  या्मध्ये ३१ पुरूष व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे. बीच पेंचक सिलट स्‍पर्धेत २ रौप्‍य व १ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकली. बीच कबड्डी दोन्‍ही संघाना तर बीच सॉकरमध्ये पुरूष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सर्व पदकविजेत्‍यांचे क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस यांनी अभिनदंन केले आहे. सर्व पदकविजेत्‍यांचे कौतुक करीत सहसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले की खेलो इंडिया बीच स्पर्धा ही खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरली. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या पर्वातही महाराष्ट्राची चमकदार कामगिरी केली आहे.

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढती नंतर मुंबई उपनगरच्या जावेद शेखवर पहिला सेट १९-२० असा गमावल्यानंतर दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१४ व २५-८ असा जिंकून पाचव्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात संदीपने ब्लॅक स्लॅम नोंदवला. दुसरीकडे मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या जाधवचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवत आगेकूच केली. स्पर्धेच्या चौथ्या फेरी अखेरीस २० व्हाईट स्लॅम व २ ब्लॅक स्लॅमची नोंद करण्यात आली आहे. पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल  पुढील प्रमाणे. झैदी अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि अनंत सुर्वे ( मुंबई ) २५-८, २५-६ विकास धारिया ( मुंबई ) वि वि अजगर शेख ( मुंबई उपनगर ) २५-१, २५-१ रवींद्र हांगे ( पुणे ) वि वि मिहीर शेख ( मुंबई ) १९-१३, २५-६ स्वप्नील गोलतकर ( मुंबई ) वि वि जयचंद बेतवंशी ( मुंबई ) २५-१९, २३-१२ संजय मोहिते ( मुंबई ) वि वि  कुणाल राऊत ( मुंबई ) २३-१९, २५-२० महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि हिदायत अन्सारी ( मुंबई ) २०-३, २५-० योगेश परदेशी ( पुणे ) वि वि नरसींग राव सकारी ( मुंबई उपनगर ) २५-१५, २५-४ प्रफुल मोरे ( मुंबई ) वि वि विश्वजीत भावे ( ठाणे ) २५-१०, २५-४ निलांश चिपळूणकर ( मुंबई ) वि वि मंगेश पंडित ( मुंबई उपनगर ) २५-४, २५-१२ संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि अश्रफ खान ( रायगड ) २२-९, २५-७ दिनेश केदार ( मुंबई ) वि वि सुधीर शिंदे ( ठाणे ) २५-०, २१-१० दीपक गनिका ( ठाणे ) वि वि हेमंत पांचाळ ( मुंबई ) ११-२५, १९-१६, १७-१२

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम!

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम! ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पहिल्याच दिवशी तेलंगणा, आसाम, मध्यभारत, राजस्थान, हरयाणा व विदर्भाची दमदार विजयी सलामी काझीपेठ, तेलंगणा : रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये आज खेळ, वेग, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा खो-खो असोसिएशन आयोजित या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील सामन्यांनी चांगलीच रंगत आणली. महिलांमध्ये तेलंगणा व आसाम, तर पुरुषांमध्ये विदर्भ व हरियाणा संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात करत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. महिला गट : यजमान तेलंगणाचा जल्लोष : ऑल इंडिया पोलिसवर निर्विवाद विजय यजमान तेलंगणा संघाने महिला गटातील लढतीत ऑल इंडिया पोलिसचा २८–८ असा एक डाव २० गुणांनी सहज पराभव करत गटात पहिला विजय नोंदवला. तेलंगणाकडून अखिला (३.१० मि. संरक्षण व २ गुण) आणि अनुषा के. (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी सलग दमदार कामगिरी नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर पोलिस संघाकडून रमणदीप कौर (१.२० मि. संरक्षण, २ गुण) हिने चांगला प्रतिकार केला. महिला गट : आसामची धडाकेबाज सुरुवात : जम्मू-काश्मीरवर एकतर्फी मात महिला गटातील सामन्यात आसामने जम्मू-काश्मीरचा एक डाव २० गुणांनी (२८–८) सहज पराभव केला. आसामकडून रांजणा (३.१० व १.३० मि. संरक्षण, २ गुण) आणि कल्याणी (५.१० मि. संरक्षण) यांनी भक्कम संरक्षण करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली, तर जम्मू-काश्मीरकडून रूची माला (१.२० व १.४० मि. संरक्षण, ४ गुण) हिने झुंजार खेळ केला. मध्यभारतचा झंझावात : बिहारवर मोठ्या फरकाने विजय आणखी एका सामन्यात मध्यभारत संघाने बिहारचा एक डाव ३६ गुणांनी (४०–४) धुव्वा उडवला. मध्यभारतकडून रोहिणी (२.२० व ३.५० मि. संरक्षण, ६ गुण) आणि ईरा भट्ट (४.४० मि. संरक्षण) यांनी अप्रतिम खेळ करत सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. पुरुष गट : विदर्भाची गोव्यावर एकतर्फी विजय पुरुष गटात विदर्भ संघाने आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत गोव्याचा ३८-४ असा  ३४ गुण व एक डाव राखून धुव्वा उडवला. विदर्भकडून दिलराज सिंग (२.५० मि. संरक्षण व ८ गुण) याने आक्रमणात आघाडी घेतली, तर फैजल खान (३.४० मि. संरक्षण व २ गुण) याने संयमी खेळ करत संघाच्या मोठ्या विजयात भर घातली. तर गोव्याकडून रौश (१ मि. संरक्षण, २ गुण) याने चांगले प्रदर्शन केले. पुरुष गट : हरियाणाची निर्णायक झेप दुसऱ्या पुरुष सामन्यात हरयाणाने हिमाचल प्रदेशचा ३४–२४ असा १० गुणांनी पराभव केला. मध्यंतराला २ गुणांनी पिछाडीवर (१२–१४) असतानाही हरयाणाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत २२ गुणांची कमाई केली. हरयाणाकडून ध्रुव (१.४२ मि. संरक्षण, १० गुण) आणि गौरव (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली, तर हिमाचलकडून शिवम (२ मि. संरक्षण, ६ गुण) आणि ललित (१.२० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी चांगला खेळ केला. राजस्थानची विजयी घोडदौड : चंदिगडवर मात पुरुष गटात राजस्थानने चंदिगडचा एक डाव ९ गुणांनी (२५–१६) पराभव केला. राजस्थानकडून मनिष (३.१० मि. संरक्षण, २ गुण) आणि हरिष (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर चंदिगडसाठी दीपक सिंग (४ गुण) आणि संदीप कुमार (२.२० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ थरार, चपळाई आणि इतिहासनिर्मितीचा संगम! मुलींच्या गटात रा. फ. नाईकची सरशी, मुलांच्या गटात ज्ञानविकास विद्यालयाची ऐतिहासिक बाजी मुंबई . दादरच्या अमर हिंद मातीत च्या उसळले खो-खोचे रण. धुळीचे लोट उडवत, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पकडी, सेकंदाच्या फरकाने दिलेल्या हुलकावण्या आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ दादरच्या ऐतिहासिक अमर हिंद मंडळाच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेने अक्षरशः क्रीडाप्रेमींना वेड लावले! कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबई, उपनगर व ठाण्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदवत खो-खोची परंपरा, वेग आणि डावपेच यांचा अप्रतिम संगम सादर केला. प्रत्येक सामना म्हणजे जिद्दीची चाचणी आणि कौशल्याची कसोटी ठरली. उद्घाटनाचा मंगल शंखनाद. प्रेरणेची स्फूर्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन अमर हिंद मंडळाचे माजी राज्यस्तरीय व विद्यापीठीय खेळाडू तसेच सध्या ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले अमित चिखलकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली. स्पर्धेत १२ मुलींचे व १५ मुलांचे संघ विजयाच्या ध्यासाने मैदानात उतरले. मुलींचा अंतिम रणसंग्राम , रा. फ. नाईकचे वर्चस्व मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे विरुद्ध ज्ञानविकास विद्यालय, ठाणे यांच्यात चुरशीची लढत झाली. रा. फ. नाईकने ९–५ असा १ डाव राखून ४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. श्रुती चोरमारे (४ मि. संरक्षण व ३ गुण) वैष्णवी जाधव (४ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणिती जगदाळे (२.३० मि. संरक्षण १ गुण) अशी सलग व ठोस कामगिरी नोंदली. पराभूत ज्ञानविकासकडून समृद्धी कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रांजल पाटे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), श्रावणी मोरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र रा. फ. नाईकच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुलांचा थरार . ज्ञानविकासची ‘किंगमेकर’ बाजी मुलांच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, ठाणे संघाने महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे संघावर १०–७ असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला. ज्ञानविकासच्या साहिल शिंदे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), विनायक भणगे (३.५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज बैकर (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक वांगडे (३.५० मि. संरक्षण व १ गुण) अशी निर्णायक कामगिरी नोंदवली. तर पराभूत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तन्मय पूजारे (१ मि. संरक्षण व २ गुण), बाळकृष्ण हरळे (१.४० व १.१० मि. संरक्षण), संदेश गोमणी (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेला लढा कौतुकास्पद ठरला. सन्मानाचा क्षण . विजेत्यांचा गौरव…

 महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार!

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार! ५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज! मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी पुणे : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी,  दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोश स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले. गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे. पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.…