Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशीर्वाद देण्यासाठी नागरिक रस्त्यावर दिवा, दि. ११ डिसेंबर : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शिवसेना–भाजपा– आर.पी.आय. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २७ च्या शैलेश पाटील, स्नेहा पाटील, दिपाली भगत आणि ऍड. आदेश भगत या चारही उमेदवारांच्या महाप्रचार रॅलीला दिवा परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सायंकाळी आयोजित या रॅलीदरम्यान उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, घोषणा देत उमेदवारांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून आला. नागरिकांची गर्दी एवढी वाढली की काही काळासाठी मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला, त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. “काम करत आलो… काम करत राहू…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीमुळे दिवा शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. या महाप्रचार रॅलीने महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

 अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग

अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी दिवा: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग क्रमांक २७ (क) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीमा गणेश भगत यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. सीमा गणेश भगत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही, त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार पत्रिकेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीराज यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नसताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडून सीमा भगत यांना “हेलिकॉप्टर” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरण्यात येत आहे. सदर प्रकार हा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित प्रचार साहित्य जप्त करावे, आचारसंहितेचा भंग सिद्ध झाल्यास सीमा गणेश भगत यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा प्रचार त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान नवी मुंबई : (अशोक गायकवाड ) नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता पॅम्पेलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजीटल तसेच सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्वरुपात प्रचार प्रसार करतांनाच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणा-या शासकीय – निमशासकीय कर्मचारी यांचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रे कार्यरत करण्यात आलेली आहेत. १५ जानेवारी रोजी होणा-या नमुंमपा निवडणूकीमध्ये कर्तव्यासाठी नेमणूक झालेल्या १३९ महिला व २९१ पुरुष अशा ४३० कर्मचा-यांनी शनिवार १० जानेवारी रोजी पहिल्या दिवशी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपआयुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचा-यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन सेल्फी काढत सर्व मतदार नागरिकांना केले. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर कार्यरत असल्याने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार नसल्याने महानगरपालिकेने पोस्टल मतदानाची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली आहे. त्यासाठी आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये टपाली मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधान्याने रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय – निमशासकीय कार्यालये, खाजगी शाळा तसेच पोलीस विभाग येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांकरिता तसेच जे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदार आहेत मात्र त्यांची नेमणूक इतर शहरांमध्ये निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचा-यांना मतदान करता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विशेष टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेऊन निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती आता एका क्लिकवर कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेमार्फत विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ऑनलाईन सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव सर्च केल्यावर, मतदान केंद्राचे जीपीएस लोकेशनसह माहिती उपलब्ध होणार आहे. या माध्यमाद्वारे मतदारांना मतदान कोणत्या केंद्रात करावयाचे आहे, मतदार यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक ही वैयक्तिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी https:kdmc.localbody.org/Home/Voter_Search या लिंकचा किंवा  QR Code चा वापर करावा. या सुविधेमुळे मतदारांना वोटर स्लिपवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि घर बसल्या आपापल्या मतदान केंद्राची माहिती जीपीएस लोकेशनसह सहजरित्या उपलब्ध होईल. यामुळे मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

ठाण्यात आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

ठाण्यात आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची तोफ धडाडणार अनिल ठाणेकर ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी, १२ जानेवारीला ठाण्यात तोफ धडाडणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्यानंतर त्यांची ठाण्यात पहिलीच संयुक्त सभा होणार असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस या महत्वाचा मुद्यावर आणि तत्वावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्याने महाराष्टात उत्साहाचे वातावरण आहे. सध्याच्या पालिका निवडणुकीत दोघे ही  ताकदीने उतरले असून महाराष्ट्राचे प्रश्न आणि सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर दोन्ही नेते मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार हजेरी लावणार आहेत. सभेसाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी  १२ जानेवारी संध्याकाळी ठीक ६ वाजता ठाणे गडकरी रंगायतन समोर सभा पार पडणार आहे. ठाण्याच्या या सभेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज

नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने काम करीत असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या ईव्हीएम यंत्रे निवडणूकीसाठी सज्ज करण्याच्या कामकाजाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांनी कोपरखैरणे व तुर्भे येथे पाहणी केली. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीकरिता नुकत्याच रायगड जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणूकीसाठी वापरलेली ३५०० हून अधिक निवडणूक यंत्रे महानगरपालिकेने १३ ठिकाणांहून ताब्यात घेतली असून त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. मध्यप्रदेशातून आणलेल्या या ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात व वाहनांना जीपीएस ट्रॅकर लावून सुरक्षितपणे नवी मुंबईत आणल्यानंतर या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी बेलापूर येथील वारकरी भवन या ठिकाणी ईव्हीएम मशीन कार्यवाहीचे नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता विद्युत  प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली ३५ निवडणूक मास्टर ट्रेनर्स यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रथम स्तरीय तपासणी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात आलेली आहे. हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक कमिशन ऑफ इंडिया यांच्या ३ तज्ज्ञ अभियंत्यांकडून या प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली असून या मशीन प्रमाणित करुन घेण्यात आलेल्या आहेत. या प्रमाणित मशीनपैकी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १० याप्रमाणे एकूण ८० ईव्हीएम मशीन ८ विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत व त्यावर सर्व विभागांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. ही १५०० हून अधिक कन्ट्रोल युनिट व ३५०० हून अधिक बॅलेट युनिट असलेली मतदान यंत्रे आठही विभागांमधील निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाकडे मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन व त्यामध्ये अधिकच्या २० टक्के मशीन देऊन वितरीत करण्यात आलेली आहेत. या मशीनचे निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान केंद्रनिहाय बॅलेट पेपर लावून पुनर्तपासणी करुन  घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सहा. संचालक नगररचना  सोमनाथ केकाण यांच्यासह कोपरखैरणे व तुर्भे येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक यंत्र सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. या प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी उद्भवणा-या तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी स्वप्निल देसाई, राजेश पाटील, प्रविण पाटील हे अभियंत्यांचे मास्टर ट्रेनर्स पथक तयार असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ईसीआयचे ८ तज्ज्ञ  अभियंतेही कार्यरत असणार आहेत. ईव्हीएम मशीनची वाहतूक, तपासणी, वर्गीकरण आणि वितरण या सर्व प्रक्रिया काटेकोरपणे नियमानुसार पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कालबध्द व काटेकोर नियोजनाद्वारे महापालिका प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, सुरक्षा आणि तांत्रिक अचूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूटमार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूटमार्च कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पोलिसांच्या वतीने  रूटमार्च काढण्यात आला. कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा रूटमार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये १०० हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून विशेषता संवेदनशील ठिकाणी हा रूटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचे  आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले.

कल्याण पूर्वेत जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती

कल्याण पूर्वेत जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती कल्याण: महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. अशातच कल्याण पूर्वेतील जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली. या फेरीला संस्थेच्या कार्यलयापासून सुरवात होऊन ड प्रभाग समिती कार्यालयामार्गे तिसगाव नाका, म्हसोबा चौक ते संस्थेचे कार्यलय कोळसेवाडी येथे सांगता झाली. या अभियानास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कालिदास कदम सचिव डी. आर. उंरकर, उपाध्यक्ष दुधराम सहारे, बाळसाहेब बागुल, कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, खजिनदार केशव जाधव, सहसचिव वासुदेव वाडे, संस्थापक एम. जी. कवडे, के. एल. वासनकर, शशिकांत आंबेरकर आदींनी परिश्रम घेतले. तर या अभियानास केडीएमसीचे अधिकारी विजय सरकटे यांचे सहकार्य लाभले.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त तथा ‍निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेचे मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या दोन्ही दिवशी निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे महापालिकेतील ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रे असून या ठिकाणी राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण ११५०० कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.  ‍विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले हे सर्व कर्मचारी असून त्यांची नावे मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल आदी ठिकाणच्या मतदार यादीत नोंदलेली आहे. निवडणूक कर्तव्यामुळे हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने टपाली मतदानाची व्यवस्था केली असून, या सुविधेचा कर्मचारी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतपत्रिकांचा स्वीकार केला आहे.कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील टपाली मतपत्रिका भरुन त्या ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहणार असल्याचे टपाली मतदानाचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त दिनेश तायडे यांनी सांगितले.राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मतदान इतर महानगरपालिका क्षेत्रात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही तायडे यांनी नमूद केले.अद्यापपर्यंत ज्यांनी टपाली मतपत्रिका घेतलेल्या नाहीत, त्यांनी त्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या सुविधेमुळे निवडणूक ड्युटीवर असलेले अधिकारी व कर्मचारी टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

पालिका निवडणुकीच्या शेवटचा रविवार घरोघरी प्रचाराचा धुराळा

पालिका निवडणुकीच्या शेवटचा रविवार घरोघरी प्रचाराचा धुराळा कल्याण:  कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी अवघे दहा दिवसच मिळाले. त्या दहा दिवसात केवळ दोनच रविवार उमेदवारांच्या हाती लागले. आज शेवटचा रविवार असल्याने कल्याण डोंबिवलीत बहुतांश मतदार नोकरदार वर्ग असल्याने नोकरदार मतदारांना रविवारी सुट्टी असल्याने मतदारांना भेटण्यासाठी सर्वच उमेदवारांनी नियोजन केल्याने दिवसभर मतदारांची गाठीभेटी घेण्यावर भर घातला जाणार असल्याने रविवारचा दिवस प्रचाराचा धुमाकुळ घालणारा  सुपर संडे ठरणार आहे. महापालिका निवडणूकीत काही उमेदवारांनी एआयचा आधार घेत त्यांनी केलेल्या प्रचाराच्या कामांचे व्हीडीओ तयार करुन ते सोशल मिडियावर टाकले आहेत. या निवडणूकीत प्रचारासाठी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. त्याचबरोबर फेसबूक, व्हाटसअप ग्रुप आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून प्रचार केला जात आहे. महापालिका निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन्य प्रचार तंत्रापेक्षा घरोघरी जाऊन भेटी देताना सुट्टीचा दिवस गाठला जात आहे. प्रचाराच्या अंतिम चरणात मतदारांच्या घरी जाऊन उमेदवार आम्हाला निवडून द्या असे आवाहन करीत आहे. प्रचाराचा हा रविवार  सुपर संडे ठरणार आहे. सुट्टीच्या दिवशी मतदार घरी असतात. त्यांना उमेदवार गाठतात. त्यामुळे प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वत्रच प्रचार फेऱ्यानी धुमाकूळ घालणारा असणार आहे.