Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

कर्जत स्टेशनवर गुटखा तस्करीचा पर्दाफाश उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

अशोक गायकवाड कर्जत : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून सुमारे ₹ २,००,७१५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे शनिवारी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत ड्युटीवर होते. यावेळी ट्रेन क्रमांक २२९४४ डाउन इंदौर–दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सकाळी ७:१२ वाजता दाखल झाली. ट्रेनची नियमित तपासणी सुरू असताना एस-२ डब्यातून दोन व्यक्ती मोठ्या ४ ते ५ बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर दोघांना आरपीएफ कर्जत येथे आणण्यात आले. उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय २३, रा. कामोठे, पनवेल), अंकुश कुमार हरी कुमार (वय २१, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली. त्यानंतर त्यांच्या पाच बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, व्ही -१ तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण ₹२,००,७१५/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस यांनी के.र.नं.३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) कलम १२३, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३०(२)(ए) ५९, ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच क्लस्टर योजनेविरोधात प्रत्येक गावात करणार जनजागृती कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतील २७ गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या क्लस्टर योजनेला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच या कार्यक्रमाच्या माध्यमातून २७ गावांतील प्रत्येक गावांमध्ये क्लस्टर योजने विरोधात जनजागृती केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोनारपाडा येथील साई बाबा मंदिरात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत कशाप्रकारे क्लस्टर योजना २७ गावांवर लादून येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले. क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक  महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक  गणेश  भाने, संदीप माळी, संतोष केणे आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. क्लस्टरमुळे पूर्ण गावंच्या गावं उध्वस्त होणार आहेत. याबाबत केडीएमसी आयुक्तांना निवेदने दिली, मोर्चा देखील काढला. त्याअनुषंगाने गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी सभा लावली होती. जो पर्यंत २७ गावांची स्वतंत्र महानगरपालिका होत नाही तोपर्यंत क्लस्टरचे भूत आपोआप उडून जाईल. यासाठी आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढणार आणि आमचा विजय होणार असा विश्वास सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या मर्जीविरुद्ध २७ गावांना समाविष्ट केले आहे. याविरोधात सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती लढा देत आहे. या समितीच्या नेत्तृत्वात नुकतेच केडीएमसी मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये क्लस्टर आणि कर या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांसह बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. क्लस्टर योजनेबाबत माहिती देण्यासाठी २७ गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांना या सभेसाठी बोलविण्यात आले होते. २७ गावात क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरविण्यात येत होत्या मात्र क्लस्टर योजनेचे शासन परिपत्रक आणि नकाशे नागरिकांना दिले असून या अफवा पसरवीणार्यांना उत्तर जनताच देणार आहे. या सभेबाबत चर्चा तर होणारच अशी जाहिरातबाजी २७ गावांमध्ये करण्यात आली होती. चर्चा तर होणारच हा संघर्ष समितीचा नवा अध्याय असून यामाध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार असल्याचे सुमित वझे यांनी सांगितले. तर क्लस्टर योजना हि झोपडपट्टी भागासाठी असते मात्र २७ गावांत सरसकट क्लस्टर योजना लादली  आहे. यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या क्लस्टर योजनेला विरोध असून याबाबत महापालिकेत देखील विरोध केला जाणार असून, कायदेशीर लढाई लढू, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देखील लढाई लढण्याचा इशारा भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला आहे.

महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी व्यक्तीचा सत्कार

कल्याण : कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात एका धाडसी व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात संत रोहिदास वाडा येथे राहणारे शैलेंद्र भोईर  यांनी पाण्यात बुडणाऱ्या…

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत आजपासून

१४ हॉस्पिटलमध्ये चुरस  मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर-उपनगर व ठाणे जिल्ह्यातील १४ नामवंत हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये २३ मार्चपासून चुरस होईल. लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई आणि बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द जे.जे. हॉस्पिटल यामधील उद्घाटनीय लढती क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे व क्रीडाप्रेमी संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्कमध्ये सोमवारी सकाळी ९.१५ वा. होणार आहेत. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटमधील संघटक हिंदुजा हॉस्पिटलचे अधिकारी जॉय चक्रबर्ती यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दिली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी गतविजेता नानावटी हॉस्पिटल, उपविजेता ब्रीच कँडी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, के.आय.एम.एस. हॉस्पिटल-ठाणे आदी रुग्णालयीन क्रिकेट संघ दावेदारीच्या रुबाबात अटीतटीच्या लढती देतील. एलआयसी सहप्रायोजित टॉप-१२ संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक असून सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यामधील दोन्ही संघातील एका उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध जाळीच्या कंपाऊंडमुळे प्राण्यांचा अधिवास लुप्त होण्याच्या मार्गावर मुकुंद रांजाणे माथेरान : घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी सुध्दा याबाबत लेखी पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही या प्रकरणाकडे वरिष्ठांचा आदेश असतानाही हेतुपुरस्सर कानाडोळा केला असून निश्चितच यामागे मोठे अर्थकारण झाल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले. माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे टी शर्ट अनावरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील खेळाडूंसाठी खास गणवेश म्हणून रंगीत टी शर्ट तयार केला असून त्याचे अनावरण आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी…

सुखटणकर सावित्री मोहन यांना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी…

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’!

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’! मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांचे नाशिकमध्ये कडक निर्देश हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवू नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव मनपाचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, २००२ च्या यादीतील नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांच्या जुळवणी कामाला गती द्यावी. मतदारांची अस्पष्ट छायाचित्रे, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत सुस्पष्ट रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठ वर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही चोक्कलिंगम् यांनी दिले. जिल्ह्यात ५१ लाख ५६ हजार मतदार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून, एकूण ५१ लाख ५६ हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी २००२ मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या यादीशी विद्यमान मतदारांची नावे जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख १६ हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.

तोष्णीवाल-श्रॉफ यांचा डबल सुवर्ण धमाका

 मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत अनुभवांचे स्मॅश मुंबई :  मुंबईच्या टेबल टेनिसच्या टेबलवर अनुभवी खेळाडूंनी अक्षरशः धमाका केला. विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात नुकत्याच रंगलेल्या मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरचे डॉ. नितीन तोष्णीवाल आणि मुंबईचे सरोष श्रॉफ यांनी आपल्या खेळाचा झंझावात उडवत दुहेरी सुवर्णपदकांवर शिक्कामोर्तब केले. ५० वर्षावरील गटात डॉ. तोष्णीवाल यांनी आपल्या अचूक फटक्यांनी आणि धारदार रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गुडघ्यावर आणले. अंतिम फेरीत कपिल कुमारला ११-९, ११-८, १२-१० अशा सरळ गेममध्ये हरवत त्यांनी एकेरी किताब पटकावला. इतक्यावरच न थांबता तेजस नाईकच्या साथीने दुहेरीतही त्यांनी दबदबा कायम ठेवत सरोष श्रॉफ-जोगेश मोटानी जोडीचा ११-९, १२-१०, १३-११ असा पराभव करत दुहेरी सुवर्णाचा झेंडा रोवला. दुसरीकडे, ६० वर्षावरील गटात सरोष श्रॉफ यांनी अनुभव आणि अचूकतेचा परिपूर्ण मिलाफ सादर करत एल. व्ही. ठाकरे यांना ११-५, ११-५, ११-८ ने धूळ चारली. त्यानंतर दुहेरीत जोगेश मोटानीच्या जोडीने त्यांनी एल. व्ही. ठाकरे-शैलेश गोसाईन यांच्यावर ११-८, १४-१२, १४-१२ अशी मात करत आणखी एक सुवर्ण पटकावले. या स्पर्धेत गुजरातचे एल. व्ही. ठाकरे, हैदराबादचे निजामुद्दीन ताहेर आणि आर. जे. हरी कृष्ण यांनीही आपल्या खेळातून चुरस निर्माण केली. महिला गटात शिवप्रिया हिने दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले, तर सुकन्या उपविजेती ठरली. ज्येष्ठ आणि अनुभवी टेबल टेनिसपटूंच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू आणि व्यायाममहर्षी मधुकर तळवळकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. 00000000

महाड क्रांती अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

महाड क्रांती अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर केलेल्या सामाजिक क्रांतीची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या महाड क्रांतीचा इतिहास विद्यालय, महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गाढे अभ्यासक असलेल्या तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या महाड क्रांती शताब्दी महोत्सवानिमित्त ‘ समान संधी अभियान ‘ चे अध्यक्ष सुनील कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. अभ्यासक्रमात समावेशासाठी महाड क्रांतीच्या इतिहासावर आधारित धड्यांचे स्वरूप ही तज्ज्ञांची समिती निश्चित करणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ प्रल्हाद जोगदंड हे या अभ्यासक्रम तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून प्रा. राजेश सोनावणे हे समन्वयक आहेत. या समितीमध्ये एकूण १७ अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात डॉ. मृदुल निळे, डॉ.सुंदर राजदीप, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.कृष्णा गायकवाड, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. प्रदीप वाघमारे, प्रा अतुल रणपिसे, प्रा. सुहास चव्हाण ( मुंबई ), प्रा. विजय मोहिते ( कोकण), डॉ. सुनील नरवडे (मराठवाडा ), डॉ विद्या चोरपगार,  डॉ चेतना सवाई,  डॉ . गौतम कांबळे, डॉ सुधीर जिंदे ( विदर्भ) सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी पत्रकात दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांचा महाड क्रांती शताब्दीचा प्रारंभिक समारंभ गेल्या आठवड्यात पत्रकार भवनात पार पडला होता. त्यातून महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनेक संस्था – संघटनांनी पाठींबा यापूर्वीच जाहीर केला आहे.