Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम ठाणे: शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी तसेच आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार, पालकांना ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आल्यामुळे पालकांना अधिक शाळांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, ज्या पालकांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. याबाबत पालकांना पोर्टलवरील पॉप-अप सूचनांद्वारे माहिती देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे श्री. बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करून प्रक्रिया पूर्ण करावी.” तरी सर्व पात्र पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन नवीन अर्ज सादर करावेत किंवा पूर्वीच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर कल्याण : कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते.  कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजू या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात. गुरूवार झालेल्या अन्नधान्य वितरण व आरोग्य तपासणी शिबिर या उपक्राला विशेष अतिथी म्हणून कल्याण पोलीस परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, नगरसेवक प्रतिक पेणकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व तुषार दाणी यांनी संस्थे तर्फे त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित विमल ठक्कर, केशु लिमानी, डॉक्टर अवधूत शेट्ये, मोनीस चंदाराणा,  सुभाष रायचुरा, विष्णूकुमार चौधरी, राजीव चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले. यावेळी नगर सेवक प्रतिक पेणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या संस्थेचे चांगले कार्य असून आपल्या सेवा कार्य मघ्ये सहभागी होवू अशी खात्री दिली आणी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक करुन कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व त्या कामात सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक     

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक कल्याण: दोन अल्पवयीन मुलींशी छेडछाड़ केलेल्या प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला पोलिसांनी अटक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलिस हद्दीतील ५९ वर्षीय आरोपी खासगी क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शेजारच्या दोन अल्पवयीन मुलींशी विनयभंग केला होता. पीडित कुटुंबांच्या तक्रारीवर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षे आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात आरोपीने एका मुलीशी अयोग्य पद्धतीने स्पर्श केला होता, तर नुकत्याच एका मुलीशी त्याने अशीच कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच्या घटनेची माहिती जेव्हा दुसऱ्या मुलीने आपल्या पालकांना दिली, तेव्हा त्यांनी परिसरातील लोकांना सांगितले. तेव्हा त्यांना कळले की आरोपीने शेजारच्या दुसऱ्या मुलीशीही अशीच चूक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दोन्ही पीडितांच्या पालकांनी बुधवारी कल्याण तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! 

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! शहरातील असंख्य भाविकांनी केली अलोट गर्दी मुकुंद रांजणे माथेरान: २७ मार्चला, गोरेगांव येथे बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभाग आणि श्रीराम नवमी उत्सव समितीचे वतीने श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. श्रीरामांच्या जयंतीनिमित्त गोरेगांव नागरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या अधिक होती. श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी, त्यांची आरती करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. पहिल्यांदाच दलित वस्तीतून, अर्थात संत रोहिदास महाराज नगर येथून अखंड शहराची श्रीराम नवमी उत्सव मिरवणूक काढण्यात आली. संत रोहिदास नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम गेले १३ वर्षे, काही कारणास्तव प्रलंबित होते. असंख्य प्रयत्न करून सुद्धा मंदिराचे काम बरेच वर्षे रखडले होते. परंतू, या वर्षी योगायोगाने श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापनाचे कार्यक्रम आणि श्रीराम नवमी उत्सव एका पाठोपाठ आल्याने, संत रोहिदास नगरातील जनतेने, श्रीराम नवमी समितीला मिरवणुकीचे प्रारंभ आमच्या मंदिरातून व्हावे अशी विनंती केली. समितीने यावर सभा आयोजित करून संगनमताने होकार देत हा ऐतिहासिक निर्णय घेतला व हे हिंदू एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण कायम केले. आदित्य रमेश गोरेगांवकर (बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक ), दिनेश हरवंडकर ( रा. जि. प. सदस्य ), हरेश शेठ (भा.ज.पा. वरीष्ठ नेते), युवराज मुंढे (भा.ज.पा. माणगांव ता. प्र.), जहेंद्र मुंढे (ता. सरचिटणीस भा.ज.पा), शैलेश महाडिक (विभाग प्र. शिवसेना) राजीव परांजपे, महावीर जैन, गौतम जैन, साई मळेकर, चिंतन गोरेगांवकर, अमोल गोरेगांवकर, राज भाटिया, अक्षय गांधी, राहुल पालीवाल, विवेक भाटिया, दीपक पालीवाल, दीपक भाटिया, दीप शेठ, साहिल चिंनके, दिनेश चव्हाण, अक्षय यादव, ओम गोरेगांवकर, आराध्य आंबेतकर, पियुष पहेलकर, गौरव घोसाळकर, रणजित कनोजिया, जयेश खामगांवकर, जय दोशी, आकाश वाठोरे यांनी या उत्सवासाठी अहोरात्र श्रम केले असून भव्य मिरवणूकीने संपूर्ण गोरेगांव शहर राममय झाले. बजरंग दल कार्यकर्ते “अयोध्या में जन्मे दशरथ के ललनवा…मेरी रामजी की सेना चली…एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए…भैरोबा तू है भैरवनाथ, उतारे तेरी आरती..हम” अश्या भक्तीगीतांमध्ये तल्लीन झाले. संपूर्ण अयोध्यानगरी गोरेगांव शहरात उतरल्याचा भास होत होते. रथ, श्रीरामांची भव्य मूर्ती, खालू बाजा, भगवे ध्वज, अश्या पारंपरिक पद्धतीत प्रभू श्रीरामाची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. रणरागिणी लेझीम पथक महाड, यांनी पारंपरिक नृत्यकला दाखवत संपूर्ण गोरेगांव वासीयांचे मने जिंकले व ताराराणी ढोल-ताशा पथक मुरुड, यांनी पुणेरी ढोल गरजनेतून समस्त शहर हादरवले. स्त्री-पुरुषांनी घराबाहेर पडून आपल्या आराध्य श्रीरामांचे दर्शन घेतले व आरती केली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला व पुरुषांनी आपापल्या घराच्या दारात रांगोळ्या काढल्या, आरत्या सजवल्या आणि भक्त भगवान श्रीराम व आपले आराध्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. रामचरितमानस, आरती, सोहरगीत, प्रसाद, रथ शोभायात्रेचे २४ तास अखंड पठण करून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी खात्यांचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि शिवसेना उ. बा. ठा. रायगड जिल्हा महिला संघटीका डॉ. स्वीटी गिरासे उपस्थित होते. गोरेगांव पोलीस दलाने संपूर्ण मिरवणूकीवर नियंत्रण ठेवत चोख कामगिरी पार पाडली व श्रीराम नवमी उत्सव अबाधित पणे साजरे जाहले.

धोरणात्मक बदलावर जोर द्या- प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या- प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे: ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५ टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.

केडीएमसी क्षेत्रात रविवारी ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत साक्षरता परीक्षेचे आयोजन

केडीएमसी क्षेत्रात रविवारी ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत साक्षरता परीक्षेचे आयोजन कल्याण: भारत सरकारच्या ‘नवभारत साक्षरता अभियान’  अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे येत्या २९ मार्च  रविवारी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे शहरातील असाक्षरांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेने २००० साक्षरांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आतापर्यंत १७८१व्यक्तींची नोंदणी पूर्ण झाली असून उद्दिष्टा पर्यंत प्रतिसाद लाभला आहे.  आगामी २9 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण १७८१परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये २५६पुरुष आणि १५२५ महिला परीक्षार्थींचा समावेश आहे. महिला वर्गाचा या अभियानातील सहभाग अत्यंत उत्साहवर्धक आहे. शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी माहिती दिली की, महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त असाक्षर नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. “केवळ अक्षरांची ओळखच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील मूलभूत संख्याज्ञान आणि व्यवहार ज्ञान नागरिकांना मिळावे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण विभाग, शिक्षक आणि स्वयंसेवक पूर्णतः सज्ज झाले आहेत.

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग रमेश औताडे मुंबई: हवामान बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील जनतेच्या बेरोजगारीवर झाला आहे. यावर उपाय म्हणून समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. पर्यावरण बिघडले असले तरी माणसाला नवीन संधी मिळत असून उदरनिर्वाह करण्याची नवनवीन प्रयत्न यशस्वी होत आहेत. डीपी वर्ल्डचा सागरी सेवा व्यवसाय असलेल्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयएनईसीसी) आणि क्लाइमाक्रू यांच्या भागीदारीत राबवला जात आहे. डीपी वर्ल्डच्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए-मरीन सर्व्हिसेसचे प्रादेशिक संचालक-भारत सी. एम. मुरलीधरन म्हणालेः “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सागरी शैवाल शेती किनारपट्टीवरील समुदायांना लवचिक उपजीविका देते. उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून समुद्री शैवाल लागवडीला जागतिक स्तरावर वाढत्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूलन आणि परिसंस्थेचे पुनरुत्पादन या दोहोंना आधार देणारी कमी परिणाम करणारी सागरी उपजीविका उपलब्ध होते.

ठाणे मनपाचा ६,२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

ठाणे मनपाचा ६,२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करवाढ नाही, विकासाला गती – सौरव राव सिद्धेश शिगवण ठाणे: ठाणे महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत सादर केला. सुमारे ६ हजार २२१ कोटी १२ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, यंदाही नागरिकांवर कोणतीही नवीन करवाढ करण्यात आलेली नाही, ही विशेष बाब ठरली आहे. हा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर आयुक्तांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.रस्ते विकास, आरोग्य सेवा बळकटीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण तसेच नाट्यगृहांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ ठाणेकरांना २०२७ अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे. पर्यायी महसूल स्रोतांचा वापर करून आर्थिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, शहराच्या विकासासाठी काही प्रमाणात महसूल वाढ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी शासन निधी आणि खाजगी लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महापालिकेवर सुमारे ३३ कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक असून, २०२६-२७ मध्ये सुमारे ६२ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून मागील दोन वर्षांत बिनव्याजी अर्थसहाय्यही उपलब्ध झाले आहे. दरम्यान, अमृत २.० योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विस्तार आणि तलाव संवर्धनासाठी ५५५.१६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी २५ टक्के आणि महापालिकेचा ५० टक्के हिस्सा राहणार आहे. महापालिकेच्या वाट्याचे सुमारे २७७ कोटी रुपये म्युनिसिपल बॉण्ड किंवा कर्जाद्वारे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच शाश्वत पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन आणि क्लस्टर योजनेसाठीही म्युनिसिपल व ग्रीन बॉण्ड उभारले जाणार आहेत. या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त, महसुली उत्पन्न वाढ, आरोग्य व शिक्षणातील गुंतवणूक, पर्यावरण संरक्षण, हरित ठाणे संकल्पना, वाहतूक सुधारणा आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापालिका शाळांचा दर्जा उंचावणे, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण योजनांना गती देणे, तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत तृतीयपंथीयांसाठी शौचालयांची उभारणी करण्याचाही समावेश आहे.एकूणच, कोणतीही करवाढ न करता विकासाला गती देणारा आणि नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’ राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ…

खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’

खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’ मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी  स्थापन करण्यात आलेल्या विकास खारगे समितीचा  तब्बल ४ हजार ३९२ पानांचा जंबो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. या अहवालात कुणालाही स्पष्टपणे क्लीन चिट देण्यात आलेली नाही, पार्थ…