Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

साडी ते स्ट्रक्चर्ड स्टाईल… ‘AFEW’ने रॅम्पवर घडवला नवा ट्रेंड

मुंबई – भारतीय फॅशनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रख्यात डिझायनर राहुल मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण करत यंदाच्या मार्चमध्ये लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर ‘AFEW’ या ‘प्रेट’ (ready-to-wear)…

 मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात

मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात मुंबई : मध्य रेल्वेच्या “तिकीट चेकिंग परिवार”तर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला १८ मार्चला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष…

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे अनिल ठाणेकर पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल. हे प्रकरण म्हणजे “सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी” या धोकादायक संगनमताचे स्पष्ट उदाहरण आहे. समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत, तथाकथित अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र आहे. या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की अशा प्रकारची बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे. यावेळी डॉ. ठकसेन गोराने, विनायक सावळे, विजय परब, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर काशीद, शहाजी भोसले, आरती नाईक, उत्तम जोगदंड, ॲड मनीषा महाजन, ॲड. परिक्रमा खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक खरात प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) पूर्णपणे निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी. कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३ या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची नियमावली तयार करण्याची रखडलेली प्रक्रिया शासनाने त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके तयार करून अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर तात्काळ कारवाई केली जावी. अशोक खरातच्या या भयंकर शोषणाच्या प्रकरणात फलज्योतिष हे प्रमुख साधन म्हणून वापरले गेले. स्वतःला तो अंक आणि हस्तरेषाशास्त्राचा तज्ञ म्हणून मिरवत होता. प्रत्यक्षात फलज्योतिष ही मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करणारी बुवाबाजी आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण प्रस्थापित करावे. या प्रकरणातील सर्व पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी. त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि संरक्षण देण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी. साक्ष देणाऱ्या महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जावी.आरोपी व्यक्तीचे विविध राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबद्दल स्वतंत्र निवेदन करावे.सर्व राजकीय पक्षांनी तथाकथित बुवा-बाबा, मांत्रिक आणि ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तात्काळ तोडावेत. अशा व्यक्तींना सार्वजनिक पाठबळ देणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची आचारसंहिता सर्व पक्षांनी तयार करावे.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने व्यापक जनजागृती अभियान राबवावे. शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर विवेकवादी विचारांचा प्रसार करावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ३ एप्रिल, शुक्रवार रोजी नाशिक येथे “फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद” आयोजित करण्यात येणार आहे. तसेच फलज्योतिषविरोधी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रेचे आयोजनही करण्यात येणार आहे.हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचा मुद्दा नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि महिलांवरील अत्याचार यांचा संगम आहे. त्यामुळे यावर केवळ तात्पुरती कारवाई नव्हे, तर दीर्घकालीन धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे.महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही.समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हीच महा अंनिसची ठाम भूमिका आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ठाणे- ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ, ठाणे यांच्या वतीने तिसावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, २९ मार्च , दुपारी ४.०० ते ८.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा एन. के. टी. कॉलेज हॉल, खारकर आळी, ठाणे (प.) येथे पार पडणार असून, राज्यभरातील धनगर समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र आणून योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वधू-वर, पालक व नातेवाईक सहभागी होणार आहेत.सदर मेळाव्याचे आयोजन  प्रमुख मार्गदर्शक  ॲड. नानासाहेब मोटे, अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे, खजिनदार रमेश तोंडे व चिटणीस सुनील राहींज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होत असून, ही माहिती संघटक प्रा. प्रमोद वाघमोडे यांनी जाहीर केली. या प्रसंगी प्रा. वाघमोडे यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, ‘राज्यस्तरीय वधू-वर मेळावा हा समाजातील एकोपा वाढवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे.’ तसेच इच्छुक वधू-वरांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सुरेश पिंगळे -९००४८९४२१२, बाळकृष्ण लवटे ९९६७५९१९५५

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली कल्याण : येत्या मंगळवारी २४ मार्च रोजी डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी अभिवादन मिरवणुकीद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील कॅप्टन विनयकुमार सचान या सचान कुटूंबातील सुपुत्राने देशहित रक्षणासाठी प्राण पणाला लावले. त्याला वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवार २४ मार्च या स्मृतीदिनी त्यांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण करण्याकरिता सकाळी ठिक ८ वाजता वीर सावरकर वाचनालय एम.आय.डी.सी. निवासी विभाग येथे उपस्थित राहून तद्नंतर सचान यांच्या राहत्या घरी जावून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. तेथून दिव्यज्योत प्रज्वलीत करुन सर्वाच्या समवेत घरडा सर्कल येथील  कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकापर्यंत मिरवणुकीने ज्योत नेण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानची स्थापना २०१० साली झाली असून यंदा त्यांच्या या उपक्रमाचे १६ वे वर्ष आहे. कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे जागृत देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकावर स्मृतिगंधाच्या सुमनांची आदरांजली वाहण्याकरिता मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकूंद म्हात्रे यांनी केले आहे.

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक अनिल ठाणेकर ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, गायमुख ते फाऊंटन दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच पेण येथे “तिसरी मुंबई” विकसित करण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात MSEM केंद्र उभारण्यात येणार असून, यामुळे सुमारे ५० लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड मा के नाम’ या अभियानालाही चालना देण्यात येणार आहे.पालघर येथे आशिया खंडातील दहावे सर्वात मोठे बंदर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहितीही गणेश नाईक यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधार देणारा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला गती देणारा आणि महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेणारा आहे.गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.“मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना” सुरूच राहणार असून, यासाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊन १००% कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.राज्यातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत. वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, नार-पार-गिरणा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० किमीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११, तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. विविध द्रुतगती मार्ग, उन्नत मार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.“महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना” अंतर्गत हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारले जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्याद्वारे दुर्गम भागांना जोडण्यावर भर दिला जाणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार ‘सुरक्षेची खात्री, मगच प्रवासाची सुसाट भरारी’ – प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर:  गेल्या दीड दशकापासून मीरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नाही,’ असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाची सविस्तर पाहणी केली. सुरक्षिततेची सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून, आगामी एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. एप्रिलमध्ये घुमणार मेट्रोची शिट्टी २००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले ‘मेट्रोचे वचन’ आज पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या संघर्षाचे फळ मिळत असल्याची भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. तसेच मेट्रोची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा विषयक (Security Certificates) प्रमाणपत्रे मिळण्यास काही काळ लागल्याने उद्घाटनाला विलंब झाला, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची बारकाईने पडताळणी केली. कोणत्याही संकटाच्या वेळी ही यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, याची त्यांनी खात्री केली. एका तासाला ४,५०० म्हणजे  दिवसाला जवळ जवळ ५० हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण पूर्तता आणि पडताळणी आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते या मेट्रोचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री प्रतात्प सरनाईक म्हणतात कि, “मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सुविधा देण्याला महत्त्व देत नाही, तर त्या सुविधेमध्ये माझ्या नागरिकांचा जीव सुरक्षित असण्याला माझे प्रथम प्राधान्य आहे. आज सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून मीरा-भाईंदरकर मेट्रोचा सुखद प्रवास अनुभवू शकतील. वाचन दिले आणि ते पूर्ण हि केले. आता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास फक्त वेगवानच नाही, तर सुरक्षित आणि सुखकरही असेल”

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’ २६ लाखांच्या मुद्देमालासह ४५७ सिलिंडर जप्त हरिभाऊ लाखे नाशिक – एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड एकिकडे होत असताना शहरात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सातपूर औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईतून उघड झाले. यावेळी ४५७ घरगुती-व्यावसायिक सिलिंडर आणि पाच वाहने असा सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गॅस वितरकासह कर्मचारी अशा आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीमधील हा माल आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर तहसीलदार अमोल निकम, एचपीसीएलचे भूपेन पाटील आणि बीपीसीएलचे राजकुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मोठ्या संख्येने सिलिंडरचा साठा आढळला. चाके जमिनीत रुतलेल्या आणि नादुरुस्त वाहनातही मोठ्या संख्येने सिलिंडर होते. दोन मालवाहू वाहनेही सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. पथकाने कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधितांनी काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात असल्याचे मान्य केल्याचे पुरवठा विभागाने तक्रारीत म्हटले आहे. या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांची ४५७ घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि तीन मालवाहू वाहने ताब्यात घेण्यात आली. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री केल्या प्रकरणी गॅस एजन्सीधारक हर्षल सरनाईक (वॉटरफ्रंट सोसायटी, जलालपूर) याच्यासह प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप या कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. सिलिंडरचा काळा बाजार जोमाने सुरू असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले. गोदाम, सिलेंडर वितरणाची छाननी समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगरला तर गोदाम विल्होळी येथे आहे. सिलिंडरचे वितरण नियमानुसार या दोनपैकी एका ठिकाणाहून होणे अपेक्षित असते. सातपूर औद्योगिक वसाहतीत एजन्सीने वाहन नेण्याचे काहीच कारण नव्हते. महत्वाचे म्हणजे ज्या वाहनात सिलिंडर आढळली. ते नादुरुस्त आहे, त्या वाहनाची चाके जमिनीत रुतलेली आहे. सिलिंडरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांना सादर करता आल्या नाही. हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने एचपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. संबंधित एजन्सीच्या गोदाम व कार्यालयाची सखोल तपासणी करावी. मागील १० दिवसांत संबंधितांकडे किती गॅस सिलिंडर आले आणि त्यांनी किती सिलिंडरचे वितरित केले याची छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षांतर्गत गेल्या तब्बल २५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठीचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. राज्यातील ३३७८ कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाकडून अजूनही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समग्र शिक्षांतर्गत गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कंत्राटी स्वरूपात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करून कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलने, निवेदने आणि विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली होती. सदर अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाला सकारात्मक अहवाल सादर केला. या अहवालातील “शिफारस ब” मंजूर करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी स्पष्ट भूमिका समितीने मांडली होती. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असूनही शासनाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर ८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ३००० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. मनोहर धोडे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले होते. मात्र आचारसंहिता संपून जवळपास एक महिना उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ मार्चपासून आझाद मैदानावर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २५ वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, प्रत्यक्षात मात्र न्याय दिला जात नाही. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही संघटनेचे राज्य सरचिटणीस पराग चाटेरेकर, राज्य चिटणीस विवेक राजन, राज्य कार्याध्यक्ष सुनिल दांडे आणि राज्य अध्यक्ष योगिता बलाखे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा स्व. किसनरावांच्या दशक्रियेला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील  पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ  मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल, सगुणा यांनी दशक्रिया विधीला जाहीर केलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  देवदत्त निकम, भाजपाचे सानपाडा येथील नगरसेवक भाऊ भापकर, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिती थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. थोरांदळे गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या विश्वासराव कुटुंबियांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  या भावनेतून दशक्रिया विधीला जाहीर केलेले प्रवेशद्वाराचे काम साडेपाच महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. साडेपाच महिन्याच्या  निमित्ताने आळंदीचे ह. भ. प. श्री. गौतमनाना बेळगावकर महाराज यांची प्रवचन रुपी चांगली सेवा झाली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गणेश यादव, डॉ.  घाडगे, डॉ. गोरडे, दत्ता हगवणे, शिवशंकर दूध डेअरीचे  चेअरमन आणि   थोरांदळे  गावातील  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेमगिरे,  लोकनियुक्त सरपंच जे. डी.  टेमगिरे, बाळासाहेब विश्वासराव, सोपान घुले, बाळासाहेब सोपान टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.