Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

बेघर लाडक्या बहिणींचा आझाद मैदानात मोर्चा

बेघर लाडक्या बहिणींचा आझाद मैदानात मोर्चा रमेश औताडे मुंबई : गरिबांची झोपडी तोडायची अन् त्या ठिकाणी गगनचुंबी इमारत उभी करायची. असा डाव आखलेल्या बिल्डर साठी सरकार पण सहकार्य करत आहे. मात्र सरकारने या झोपडीत राहणाऱ्या लाडक्या गरीब बहिणीचा विचार करत तिला पण निवारा द्यावा. गगनचुंबी इमारती आम्ही घर मागत नाही. आमच्या परिस्थिती प्रमाणे आर्थिक गणिक जुळवत निवारा द्यावा. अशी मागणी आझाद मैदानात युवा भिम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी जयभीमनगर पवई व संभाजी नगर येथील पंतप्रधान गृह निर्माण विकास ठिकाणी असणाऱ्या पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या बेघर झालेल्या कुटुंबातील महिलांना घेऊन आझाद मैदानात मोर्चा काढला आहे. स्थानिक पोलिस नगरसेवक आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी हिरानंदानी बिल्डर साठी आम्हाला बेघर केले आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महापौर, उपमहापौर यांच्याकडून डॉ अग्रवाल हॉस्पिटलचा सन्मान

महापौर, उपमहापौर यांच्याकडून डॉ अग्रवाल हॉस्पिटलचा सन्मान रमेश औताडे मुंबई : डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये आता मोतीबिंदू ऑपरेशनसाठी अत्याधुनिक रोबोटिक लेझर मशीन आले असून या नवीन तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन आता ब्लेड शिवाय अधिक सुरक्षित, अचूक आणि कमी त्रासदायक होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते डोळ्यांसाठी जगप्रसिद्ध असणारे डॉ.अग्रवाल हॉस्पीटल येथे झाले. या मशीनच्या माध्यमातून विना ब्लेड शस्त्रक्रिया होणार असल्याने  महापौर सुजाता पाटील यांनी हॉस्पिटलचे अभिनंदन केले. उपमहापौर दशरथ भगत यांनी गरीबांना सवलत देण्याची मागणी केली असता हॉस्पिटलच्या डॉ. वंदना जैन यांनी सवलत देण्याचे भगत यांना आश्वासन दिले. मर्यादित कालावधीसाठी मोतिबिंदू तपासणीवर ५० टक्के सूट आणि रोबोटिक शस्त्रक्रियेवर विशेष सवलत दिली जात आहे. हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू, नंबरचा चष्मा, रेटिना आणि मुलांच्या डोळ्यांचे आजार यावरही उपचार केले जातात. नवी मुंबईतच कमी त्रासात आणि सुरक्षित पद्धतीने डोळ्यांचे ऑपरेशन होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकार आमच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण करणार !

सरकार आमच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण करणार ! अन्यायग्रस्तांचा न्यायासाठी आंदोलनाचा इशारा मुंबई  / रमेश औताडे मुंबईतील रेल्वे मार्गालगत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो झोपडीधारकांना पुनर्वसनाचे गोड स्वप्न दाखवण्यात आले. पण आजही अनेक कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. आयुष्यभर कष्ट करून, मुलाबाळांसह छोट्या झोपडीत आयुष्य काढणाऱ्या या नागरिकांना आजही स्वतःच्या घराची आस लागलेली आहे. “आम्ही वर्षानुवर्षे आशा धरून बसलो आहोत. सरकारने आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता आमच्याच हक्काची घरे दुसऱ्यांना विकली जात असल्याचे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली,” असे दुःखी शब्द अनेक बाधित नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व सर्वेक्षण कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि खऱ्या बाधित झोपडीधारकांना तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे. रेल्वे विभाग, MRVC आणि MMRDA यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र नागरिकांना घरे न देता, त्यांच्या नावावर असलेली घरे परस्पर इतर व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप सचिन लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे गरीब आणि कष्टकरी कुटुंबांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे.

 ८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करावा

८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करावा जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांचे आवाहन अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : -शासनाच्या ८० वर्षे व त्यावरील निवृत वेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी जन्मदाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना,भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी (यापैकी कोणताही एक पुरावा) कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे. ८० वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा. तसेच अर्जामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक नमूद करावा. वयाचा पुरावा सोबत जोडण्यात यावा. ज्या निवृत्तीवेतनधारकांना ८० वर्षाचा लाभ मिळत आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत. तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा.

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न दिवा: धर्मराज फाउंडेशनच्या वतीने निळजे लोढा पलावा येथे आयोजित करण्यात आलेला ‘निळजे लोढा पलावा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे येथे २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात उदघाटन समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीतांचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, ब्युटी मेकअप स्पर्धा, फॅशन शो तसेच महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडले. विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन व खेळ पैठणी यांसारख्या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “एक शाम बुजुर्गों के नाम” या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र धर्मराज पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य, महिला कमिटी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, सहकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल अनिल ठाणेकर ठाणे, विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘समता सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, गीतकार व गायक शाहीर सिताराम शिंदे तसेच लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जनता केंद्र, ताडदेव, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, पत्रकार अमेय तिरोडकर, व्हिजन फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शिंदे यांनी अंनिससाठी लिहिलेल्या गीतांनी झाली. घाटकोपर शाखेच्या निर्मला माने यांनीही स्वरचित गीत सादर केले. ‘Give to Gain’ या महिला दिनाच्या थीमवर आधारित सत्रातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश यांनी प्रास्ताविक करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांचे व्हिडिओ प्रदर्शित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुषार शिंदे यांनी दीपा पवार यांची, तर संदेश बालगुडे यांनी शाहीर सिताराम शिंदे यांची मुलाखत घेतली. दीपा पवार यांनी आपल्या खडतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या जीवनप्रवासाविषयी सांगताना भारतातील सुमारे ११ टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी लोक नोंद नसलेल्या श्रेणीत जगत असल्याचे वास्तव मांडले.पालावरच्या जीवनातून आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंतचा प्रवास ‘माझ्या समस्या मीच मांडेन’ या प्रेरणेने घडल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या समस्या जगासमोर मांडत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाहीर सिताराम शिंदे यांनी पत्रिकेतील भाकितामुळे परिचित कुटुंबातील लग्न मोडल्याची घटना पाहिल्यानंतर अशा अंधश्रद्धांविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र अंनिसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. महिलांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी आशयसंपन्न गाणी त्यांनी लिहिली असून ती महाराष्ट्रभर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. “मला सत्कार करून निवृत्त करू नका; तुमच्यासोबत काम करत राहायचे आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकार अमेय तिरोडकर म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करत समाजात प्रश्न निर्माण करणारी पत्रकारिता आवश्यक आहे. दीपा पवार व शाहीर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. ‘समता सन्मान’ हा केवळ सोहळा नसून विचार पुढे नेणारा उपक्रम आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सवाखंडे यांनी केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे :- शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत उपांत्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यापूर्व फेरीत कल्याणच्या शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा प्रतिकार ४१-३१ असा मोडून काढत उपांत्या फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मंगेश सोनावणे, सुमित साळुंखे यांच्या धारदार चढयांना तुषार भोईर याची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विघ्नेश चौधरी, रोनक पाटील यांचा चढाई पकडीचा खेळ विजय मंडळाचा पराभव टाळण्यास दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी सहज मात केली. आक्रमक खेळ करीत जय बजरंगने पहिल्या डावात २ लोण देत २५-०८ अशी आघाडी घेत आपला विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजू कथोरे, दर्शन पवार यांच्या झंझावाती चढयांना अतुल देसलेची मिळालेली पकडीची साथ यामुळे जय बजरंगने सहज विजय मिळविला. श्री समर्थच्या ओमकार म्हात्रेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. मोरया मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा पाडाव करीत उपांत्या फेरी गाठली. विश्रांतीपर्यंत ३लोण देत ३०-१० अशी आघाडी घेत मोरयाने आपला विजय आधीच  निश्चित केला होता. विश्रांतीनंतर औपचारिकता पूर्ण करीत आणखी एक लोण देत सामना आपल्या खिशात टाकला. परेश हरड, धीरज तरे, अजय पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय बजरंगच्या सोहम मोरे, आर्यन पाटील यांची या सामन्यात मात्र चालली नाही. शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा सहज विजय मिळविला. गौरव पाटील, हर्ष भोईर, वैभव पाटील यांच्या तुफानी खेळाने हा विजय सोपा केला.

आकाश शिंदे, समरीन बुरोंडकर यांच्या कडे महाराष्ट्राचे नेतृत्व.

५वी वरिष्ठ पुरुष व महिला गट फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-मध्य प्रदेश-२०२६ मुंबई :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने “५व्या वरिष्ठ गट कबड्डी” स्पर्धेकरिता आपले दोन्ही संघ जाहीर केले. संता, मध्य प्रदेश येथे  १९ ते २२ मार्च या कालावधित ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदे कडे पुरुष संघाचे, तर रत्नागिरीच्या सिमरन बुरोंडकर कडे महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही संघाना स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सोमवार १६ मार्च रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. निवडण्यात आलेला हा संघ १७ मार्चला दुपारी ०१-३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रवाना झाला. अशी माहिती व संघाची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे सचिव माधव गायकवाड यांनी सर्व प्रसार माध्यमाकरिता केली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे. पुरुष संघ :- १) आकाश शिंदे-संघनायक, नाशिक, २)सुरज दूंदले – ठाणे, ३)आकाश अरसूल – मुं. उपनगर, ४) सौरभ राऊत – अ. नगर, ५) संकेत सावंत – मुंबई शहर, ६) सुरेश जाधव – पुणे, ७)साईप्रसाद पाटील – कोल्हापूर, ८)अजित चौहान – पुणे, ९) आदित्य शशिकांत शिंदे – रत्नागिरी, १०)आदित्य पोवार – कोल्हापूर, ११)अनुज गावडे – पुणे, १२)सौरभ फागरे – कोल्हापूर, १३) साहिल राणे – मुंबई शहर, १४) अभिषेक गुंगे – सांगली. प्रशिक्षक :- निलेश शिंदे, मुंबई उपनगर                व्यवस्थापक :- भगीरथ पाटील, ठाणे. महिला संघ :- १) समरीन बुरोंडकर, संघनायिका – रत्नागिरी, २) माधुरी गवंडी – ठाणे, ३) कोमल देवकर – मुंबई उपनगर, ४)तसनिम बुरोंडकर – रत्नागिरी, ५) शुभदा खोत – मुंबई उपनगर, ६) आम्रपाली गलांडे – पुणे, ७) प्रतिक्षा तांडेल – मुंबई शहर, ८) हर्षा शेट्टी – पुणे, ९) याशिका पुजारी – मुंबई उपनगर, १०) समृद्धी मोहिते – मुंबई उपनगर, ११) निकिता पडवळ – पुणे, १२) प्रणाली नागदेवता – मुंबई उपनगर, १३) संजना भोईर – पालघर, १४) साक्षी सावंत – मुंबई शहर. प्रशिक्षिका :- मेघाली म्हसकर         व्यवस्थापिका :- अश्विनी ईश्वलकर.

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’ पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्मृत्यर्थ विशेष कार्यक्रम ठाणे : पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २८ मार्च रोजी दुपारी `मर्मबंधातली ठेव’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांचे दादा पाटील वाडी येथील जनसंपर्क कार्यालय व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या गायकीचा ठसा रसिकमनांवर गेली अनेक वर्षे उमटविणारे अलौकिक स्वरप्रतिभा, कसदार आणि भारदस्त आवाज लाभलेले तसेच दाणेदार आकर्षक तानांसाठी ओळखले जाणारे गुरुतुल्य गायक आणि गोमंतकीय रत्न, पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर अर्थात सर्वांचे लाडके कारेकर बुवा होत. शास्त्रीय गायनाव्यतिरिक्त त्यांनी अभंग, नाट्यसंगीतात आपली विशेष छाप पाडली आणि नाट्यसंगीताचे वेड असलेल्या रसिकमनावर अधिराज्य गाजवले. बऱ्याच संगीत नाटकातील प्रसिद्ध नाट्यपदं तसेच अभंग,भावगीतं कारेकर बुवांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली, त्यांच्या नावावर कोरली गेली आणि लोकप्रिय झाली. प्रिये पहा, चंद्रिका ही जणू, सुकांत चंद्रानना, धन्य आनंद दिन, शतजन्म शोधिताना, बोलावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, ही त्यातील काही निवडक गाजलेली गीते आहेत. कारेकर बुवांच्या याच गाजलेल्या, आणि काही निवडक रचनांचा “मर्मबंधातली ठेव” हा कार्यक्रम होणार आहे. गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर आणि कारेकर बुवांचे जेष्ठ शिष्य आणि ठाण्यातील नामवंत गायक पंडित सुरेश बापट हे कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना देतील. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री आणि धनंजय पुराणिक या प्रतिथयश वादकांची समर्पक साथ लाभणार आहे. तसेच अनघा मोडक या निवेदनाची धुरा सांभाळतील.

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस अनिल ठाणेकर ठाणे, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली. मंदा म्हात्रे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना धीर देत, “आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल,” असे सांगितले. या घटनेनंतर बेलापूर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातील सक्रिय आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समजताच अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.