नागपूर : देशभरात जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप असून तो मतांमधून दिसून आला आहे. मात्र, असे असतानाही जर निकाल विरोधात लागले तर दाल मे कुछ काला हो सकता है, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.आमच्या सर्व्हेनुसार आम्ही 295 पर्यंत जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विविध माध्यमांचे सर्व्हे हे केवळ सत्ताधार्यांना खुश करण्यासाठी केलेला आहेत. महाराष्ट्रात महविकास आघाडी 35 पेक्षा अधिक जागा जिंकत सर्वत्र मविआचे वर्चस्व निर्माण करेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
राज्यात लोकसभा निवडणुकांची सुरुवात विदर्भपासून झाली. पहिल्या दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला अधिक काळ निकालाची प्रतीक्षा करावी लागली आहे. अशातच या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, विदर्भात महाविकास आघाडीचीच लाट तयार झाली आहे. विदर्भातील जनतेचा उत्तम प्रतिसाद होता. त्यामुळे विदर्भातील 10 पैकी 10 जागा मविआ जिंकेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला. सध्या जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप असून तो मतांमधून दिसून आला आहे. मात्र असे असतानाही जर निकाल विरोधात लागले तर दाल मे कुछ काला हो सकता है, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
मतमोजणीच्या दिवशी स्टँगरुममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलणार तर नाहीत ना ? अशी शंका काँग्रेसला आहे. म्हणूनच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्टँगरुमवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. या बाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेऊन आहोत, अंतिम निकाल येईपर्यंत बाहेर पडायचे नाही, सी- १७ फॉर्मला टॅली केल्याशिवाय बाहेर पडायचे नाही. तसेच टॅली बरोबर असेल तरच मतमोजणीला सुरवात करायची, असे आदेश आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
