ब्लॅकमेल करणाऱ्यांना पक्षात थारा नाही
मुंबई: पक्ष अडचणीत असताना ब्लॅकमेल करणाऱ्यांना यापुढे पक्षात थार नाही अशी आक्रमक भुमिका ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात मोठ्याप्रमाणावर पुन्हा फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज आपली रोखठोक भुमिका स्पष्ट केली.
ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मातोश्रीवरील ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांना नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी खंत अनेकांना बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक जुन्या नगरसेवकांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवले जात नाही. विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी तक्रार एका नगरसेवकाने केली होती.
२०१७ साली ठाकरे गटाचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले होते. नंतरच्या काळात मनसेच्या ६ नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर २ नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले होते. मविआ सरकारच्या काळात ७ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. या सगळ्याची गोळाबेरीज करुन शिवसेनेकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.