Month: March 2026

महिला दिनीच नवजात बालिका वसईच्या रस्त्यावर बेवारस सापडली

    वसई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी अवघं जग स्त्रिशक्तीचा जयजयकार करीत असताना वसईत आक्रीत घडले. वसई पूर्व परिसरात नवजात बालिकेला रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.…

युद्धाचा भारताला चटका गॅस ६० रुपयांनी महागला

मुंबई : अमेरिका- इस्रालयने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा चटका अखेर भारताला बसला आहे. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच नाही तर आता युद्धजन्य स्थिती पहाता २५ दिवसात एकच गॅस सिलेंडर मिळणार असल्याने गॅसचा पुरवून वापर…

नाहीशा होणाऱ्या मुलीं जातात कुठे ? प्रवीण दीक्षित निवृत्त पोलीस महासंचालक लहान मुले व विशेषतः लहान मुली नाहीशा झाल्यास त्यासाबंधी पोलिसांकडे तक्रार मिळाल्यानंतर त्यावर तातडीने त्यांना पळविण्यात आले असण्याची शक्यता…

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचा विश्वास अलिबाग 🙁 अशोक गायकवाड )— ‘लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत’, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यव्यापी मोहिमेतून प्रशासनाचा कायापालट. यावेळी मार्गदर्शन करताना खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात (सर्कल) राबविला जात आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या शिबिरांचे नियोजन केले जाईल, जेणेकरून एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही. कार्यक्रमात बोलताना शिवाजी चौरे यांनी नमूद केले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हातात हात घालून काम करतात, तिथे विकासकामांचा वेग अधिक असतो. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून तो सर्व शासकीय विभागांना एकत्र बांधणारा समन्वय साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध दाखले, परवाने आणि शासकीय योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे आणि विनाविलंब मिळावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.’ या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला असून, प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय

सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय मुंबई, ८ मार्च:  सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज कर्नाड, आशीष गोरे आणि झेनुल अर्सिवालाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवले. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत ऋतुराजने नौजद मुन्शीचा ३-२(५२-७१, ६७-३१, ६६-२८, ४४-५९, ५५-१७) असा पराभव केला. अन्य सामन्यात, आशीषने प्रदीप जाधववर ३-२ (५७-५२, १३-५३, ६१-४४, १५-५8, ४8-४४) त्याच फरकाने विजय मिळवला. झेनुल अर्सिवालाने प्रसाद वानखेडकरला ३-१ असे हरविले. निकाल (पहिली फेरी): झेनुल अर्सिवाला विजयी वि. प्रसाद वानखेडकर ३-१ (२२-६४, ५४-३६. ५२-११, ६१-११); इमदाद खान विजयी वि. मिथुन मर्चंट ३-० (५७-१३, ५०-४०, ५३-९); एजाज मर्चंट विजयी वि. मनन शाह ३-१ (५२-३९, ६६-१, ३२-७४, ७२-३४).

जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात

जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात दिवा: जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि ओम साई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिव्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यातील महिला वकील, सीए, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाजसेविका, शाळा व्यवस्थापिका, कीर्तनकार तसेच बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला रोटरी ३१४२ जिल्हा सचिव विनेश नायर आणि नगरसेविका साक्षी मढवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरीच्या अध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, सचिव, इतर सदस्यांच्या हस्ते महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून ‘दुसरी मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध कलावंत साधना चौधरी- भरे यांनी सादर केलेल्या या नाटकाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम दिवा (पूर्व) येथील एस.एम.जी. विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि सचिव स्वप्नील गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे समुपदेशन

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे समुपदेशन कल्याण : महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याणमधील अचिव्हर्स महाविद्यालयातील विद्यार्थीनीसाठी समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाध्ये विद्यार्थिनींना, आत्मविश्वास आणि स्व-ओळख, किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीबद्दल योग्य माहिती व स्वच्छता, सुरक्षितता व स्वतःचे संरक्षण,चांगला स्पर्श – वाईट स्पर्श, ऑनलाइन सुरक्षितता, ‘नाही’ म्हणण्याचे धाडस, शिक्षणाचे महत्त्व व करिअर स्वप्ने, डिजिटल जगात जबाबदारी, सोशल मीडिया वापराचे फायदे-तोटे, सायबर बुलिंग ओळखणे, ड्रग व त्याचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्ट डायरेक्टर आरती बनसोडे यांनी सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले . यावेळी समाज विकास विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.  महेश भिवंडीकर, रेखा भिवंडीकर, सना खान, सिद्धी चव्हाण,वूमन्स वेलफेअर फाऊंडेशन टीम विनिता माने, स्वाती डोलारे, कृतीका मोरे, रुतीका दामले, अमृता गायकवाड, ज्योत्स्ना हांडे, हर्षिला नरवडे, वैष्णवी लोखंडे उपस्थित होते.

रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम आयोजित१०, ५ व ३ किमीच्या “रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस” महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सुमारे साडेसातशे महिलांनी या रणरागिणी स्पर्धेत सहभाग घेत रणरागिणी हे नाव सार्थ ठरविले. इतकेच नव्हे तर बेस्ट थीम या कॅटेगरीअंतर्गत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन महिलांनी शिक्षणाचा, समतेचा संदेशही या स्पर्धेमार्फत जनमानसापर्यंत पोहोचविला. या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील महिला या प्रेरणास्त्रोत आहेत तसेच प्रत्येकासाठी मदतीचा स्त्रोतही आहेत, आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात महिला हाच मोठा आधारस्तंभ आहेत असे संबोधत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉ. अश्विन कक्कर, ट्रायमॅटिक्स संस्थेच्या डॉ .शोभा पाटील, स्पर्धेचे सर्व प्रायोजक ,सर्व सहभागी महिला यांचे अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत )प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  महापालिकेच्या विद्युत विभागाने उभारलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृती कक्षास महापौर हर्षाली चौधरी व आयुक्त अभिनव गोयल यांनी भेट देऊन प्रशंसा केली आणि ऊर्जा संवर्धनाची अशी जनजागृती सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले.

बेपत्ता ओला चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

बेपत्ता ओला चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक कल्याण : चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या ओला चालकाचा मृत्यूदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्याची ओला कार कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवेलीच्या जंगलात आढळून आली. या घटनेचा ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (राहणार टिटवाळा) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर नासिर अहमद असं मृतदेह आढळून आलेल्या कार चालकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नासिर अहमद हा नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. गेल्या चार दिवसापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल होती. याच घटनेचा पोलीस तपास सुरू असताना शनिवारी निसारचा मृतदेह माळशेज घाटावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना आढळून आला. तर त्याची ओला कार कल्याण – मुरबाड मार्गावरील गोवेली गावच्या हद्दीतील जंगलात आढळून आली. या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसले आहेत. या घटनेचा तपास ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी पथकासह सुरू केला. यावेळी निसारचा मृतदेह ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला. यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरवत आरोपी आदर्श भालेराव याला टिटवाळ्यातून गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून अद्यापपर्यंत ओला चालक नासिर अहमदची हत्या ही कुठल्या कारणामुळे झाली याचं ठोस कारण उघड झालं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली आहे.

 ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’चा उच्छाद;

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’चा उच्छाद; प्रवाशांचे मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद कल्याण : ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात धावत्या लोकलमधून प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सुमित कमलेश सिंग (वय २७) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली-आडिवली भागातील गावदेवी संकुल येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शैलेश नवले हे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील निक्की नगर येथे राहतात. गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते त्यांचे मित्र स्वप्निल भूषण यांच्यासह कल्याण रेल्वे स्थानकातून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होते. गाडीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने ते डब्याच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. ही एक्सप्रेस जेव्हा ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली, तेव्हा तिचा वेग मंदावला होता. याच संधीचा फायदा घेत रेल्वे मार्गालगत दबा धरून बसलेल्या सुमित सिंग याने हातात असलेल्या काठीने शैलेश नवले यांच्या हातावर जोराचा फटका मारला. या अचानक झालेल्या प्रहारामुळे नवले यांच्या हातातील महागडा मोबाईल रेल्वे रुळांवर पडला. एक्सप्रेसचा वेग संथ असला तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना खाली उतरणे शक्य नव्हते. दरम्यान, आरोपीने रेल्वे रुळांवर पडलेला तो मोबाईल उचलला आणि बाजूला उभ्या असलेल्या एका मेल गाडीच्या खालून पळ काढत कचोरे व खंबाळपाडा दिशेने पळ काढला. नवले यांनी तत्काळ आपल्या पत्नीच्या मोबाईलवरून चोरीला गेलेल्या फोनचे लोकेशन तपासले असता, ते कचोरे मंदिर परिसरात असल्याचे दिसून आले. एक्सप्रेस कळवा रेल्वे स्थानकात पोहोचताच त्यांनी घाईघाईने उतरून पुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पथक तयार केले आणि तक्रारदारासह घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी करत असताना पोलिसांना एक संशयास्पद तरुण फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीला गेलेला तो मौल्यवान मोबाईल सापडला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या ‘फटका गँग’ने रेल्वे प्रवाशांना अशाच प्रकारे इतर ठिकाणीही लुटले आहे का, याचा सखोल तपास सुरू केला आहे.