मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्रातील लाखो ऑटोरिक्षा – टॅक्सी चालकांची उपजिवीका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा डाव आम्ही आंदोलन करून हाणून पडणार असल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष मारुती कोंडे म्हणाले, परिवहन मंत्री यांनी या प्रकरणी गांभीर्याने विचार करावा व हा निर्णय मागे घ्यावा. रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कल्याण शहराध्यक्ष मोहन पाठारे म्हणाले, सरकारने परवाना देण्याअगोदर विचार केला पाहिजे होता. १ मे, २०२६ पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक निषेध आंदोलन करणार आहेत.
महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्यास असलेल्यांनाच ऑटोरिक्षा टॅक्सीचे परवाने दिले जातात. परवाने देताना त्यांची पोलिस पडताळणी केली जाते व त्यानंतर ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना परवाने दिले जातात.
राज्यात बेकायदेशीररीत्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाईक टॅक्सी सुरू आहे आणि या सेवेवर जाणिवपूर्वक कारवाई केली जात नाही.आता आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांना देणार आहे. ४ मे, २०२६ पासून रोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
