अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा आदी महत्वाच्या नद्या वाहतात. ऐन पावसाळ्यात या नद्यांमधील गाळामुळे पाण्याची पातळी धोकादायक रीतीने वाढून यातील पाणी नदीकाठच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये, शहरामध्ये घुसून नागरिकांचे अतोनात नुकसान होत होते. मात्र रायगड जिल्हा प्रशासनाने २०२२ पासून या समस्येवर निश्चितपणाने मात करण्यासाठी ठोस पावले उचलली. २०२२ पासून या नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम तातडीने सुरू केले. पहिल्या टप्प्यात जवळपास पाच लाख घनमीटर इतका गाळ उपसण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात मागील वर्षापर्यंत जवळपास पंधरा लाख घनमीटर गाळ उपसण्यात आला. अशाप्रकारे मागील जवळपास चार वर्षात १९ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. ही एक मोठी उपलब्धी होती. जून २०२६ पर्यंत आणखी बारा लाख घनमीटर गाळ उपसण्यात आला. यामुळे नदीची पाणी पातळी ०.७५ मीटरने कमी राहण्यास मदत झाली. याचा सर्वात मोठा लाभ झाला तो या नदीकाठच्या शहरांना वस्त्यांना. नदीची पाणी पातळी जवळपास एक मीटरने कमी झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे नदीतील पाणी हे आसपासच्या परिसरामध्ये पसरले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पुराची दहशत बाळगून असलेल्या नागरिकांची भीती यावर्षी मात्र संपुष्टात आल्याचे दिसून आले. रायगड महसूल आणि पाटबंधारे विभागाने गेल्या काही वर्षात सातत्याने केलेल्या प्रामाणिक कामाचे हे फलित आहे. वर्षानुवर्षे पुराच्या भीतीने पछाडलेल्या नागरिकांना या भीतीपासून मिळालेल्या सुटकेचे जिल्हा प्रशासनालाही मनापासून अत्यंत समाधान मिळाल्याची भावना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी व्यक्त केली आहे.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *