रमेश औताडे
मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कचरा संकलन केंद्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा सुनावणी पार पडली. टाकळकरवाडी व जऊळकेखुर्द ग्रामस्थांनी केलेल्या रिट याचिका प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए.एस.गडकरी व न्यायमूर्ती अजय खट्टा यांच्या खंडपीठाने पर्यायी जागेबाबत याचिकाकर्त्यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश देऊन पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.विराज कदम यांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी दिली.
राजगुरुनगर नगरपरिषदेस गायरान जमीन कचरा संकलन केंद्रासाठी जागा देताना ग्रामपंचायतीची मंजुरी घेतली नव्हती.१२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभा ठराव व ग्रामपंचायत मंजुरी आवश्यक असताना त्याची पुर्तता झाली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारच्या बांधकामास मनाईचा आदेश मागील वर्षी पारित केला असून पर्यायी जागा उपलब्ध असेल तर ग्रामस्थांनी तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वर्षभर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावण्यांमध्ये ॲड.वासिम सामलेवाले ॲड.विराज कदम व ॲड. तेजपाल इंगळे यांनी ग्रामसथांच्या वतीने प्रभावी बाजु मांडल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
