मुकुंद रांजाणे माथेरान : आषाढी एकादशीनिमित्त माथेरान ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या आयोजनातून ज्ञानदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शाळा,आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने ‘ज्ञानदिंडी’ सोहळ्याचे अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. अध्यात्माची जोड देत शिक्षणाचे आणि विचारांचे महत्त्व समाजात रुजवावे,या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडीतील मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी,वारकरी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आणि संत जनाबाई यांचे रूप परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाचा गजर:”विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. केवळ धार्मिक सोहळा न ठेवता दिंडीमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’,’प्लास्टिक मुक्ती’, ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ आणि ‘ग्रंथ हेच आमचे गुरु’ अशा विविध सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या आणि फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. अभंग आणि फुगड्या: दिंडीच्या मार्गावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभंग गायले आणि फुगड्यांचा आनंद लुटला. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या नामघोषात आणि रिंगण सोहळ्यात तल्लीन झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामुळे संपूर्ण परिसरात पंढरपूरच्या वारीचा भास होत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, सामाजिक भान आणि वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होते,अशी भावना शिक्षकांनी व पालकांनी व्यक्त केली.सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक मा सुनील शिंदे,पर्यावरण सभापती शिवाजी शिंदे ग्रामस्थ उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार उपाध्यक्षा सुहासिनी शिंदे, चंद्रकांत जाधव, अनंत शेलार मुख्याध्यापक रमेश ढोले ,शिक्षक संघपाल वाठोरे, अंधारे,शिक्षिका विदुला गोसावी,अंगणवाडी सेविका सुरेखा जमदाडे, रमा आखाडे, मनिषा दळवी, श्रद्धा रामाणे, वनिता कदम, अनिता चव्हाण, कांचन केतकर मनिषा चौधरी,साक्षी कदम, शीतल कदम, हरिपाठ वारकरी संप्रदायचे विजय सनगरे, नंदू साबळे,भालचंद्र सावंत,मृदूंगमणी संदीप जाबरे,नंदू सनगरे,शैलेंद्र दळवी,दत्तात्रय सनगरे,प्रदीप शिंदे,प्रदीप घावरे राजेश चौधरी, शैलेश चाफेरकर, नरेश शिंदे,सर्व शिक्षक वृंद अंगणवाडीतील बालविद्यार्थी व शालेय विद्यार्थी आदिनी उपस्थित राहून ज्ञानदिंडीमध्ये सहभाग घेतला.