किन्हवली : आदिवासी दुर्गम भागात गुंज सामाजिक संस्थेचे समन्वयक दत्तात्रय एस. पाटील यांच्या माध्यमातून विविधपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. शहापूर तालुक्यातील अनेक शाळा, आदिवासी पाड्यांवर गुंज संस्थेने ग्रामविकास, महिलांचे आरोग्य, शिक्षण या विषयावर प्रबोधन केले. तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा तिन्ही स्तरांवर शिक्षणविषयक जागरुकता निर्माण करून विविध उपयोगी वस्तूंचे वाटप केले.
आदिवासी पठार भागातील शिदपाडा केंद्रात गुंज संस्थेने नऊ शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांना नवीन दप्तरासह शैक्षणिक साहित्य वाटप केले. यात वह्या, पेन्सिल बॉक्स, खोडरबर, शार्पनर, कापडी पिशवी, पेन पेन्सिल पाउच, नेलकटर, कंगवा, अशा वैयक्तिक स्वच्छतेसह शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक वस्तूंचे पालक, शिक्षकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेत पालकांचा सहभाग वाढावा, यासाठी शाळेच्या परिसरात पालकांकडून श्रमदान करून घेण्यात आले. यात संस्थेच्या वतीने परसबाग बियाणे देऊन पालेभाज्यांची लागवड करण्यात आले. तसेच, शाळेला कंपाउंड केले. शैक्षणिक साहित्य वाटप करताना गुंज संस्थेचे समन्वयक दत्तात्रय एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत विविध प्रकारचे खेळ, उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
0000
