राज भंडारी
रायगड : राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळणं कठीण झालं आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता मुख्यामंत्र्यांनी मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे आवाहन प्रदेश एमआयएम विद्यार्थी आघाडी महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे.
मुंबई विद्यापिठाचा देशातच नाही तर जगभरात नावलौकीक आहे. या विद्यापिठातंर्गत येणाऱ्या वसतीगृहातील समस्यांबाबत, असुविधांबाबत विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १२ ऑगस्ट) उपोषण आंदोलन पुकारले. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ याविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त करत विद्यार्थ्यानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ आणि सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ या गैरसोयींना विद्यार्थी त्रासले आहेत.
याशिवाय वसतीगृहाच्या भोजनगृहातील अस्वच्छता, मध्यवर्ती वाचनालयाच्या वेळा, वायफाय सुविधा, विद्यापिठातील कलिना संकुलातील पाणी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांनी या समस्या आणि सुविधांबाबत वारंवार लेखी पाठपुरावा करुनही विद्यार्थ्याची दखल घेतली जात नाही. चर्चेसाठी बोलावतात, आश्वासने देतात, अंमलबजावणी होत नाही. हा घडत असलेला प्रकार योग्य नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला व गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण तातडीने मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश द्यावेत असे निवेदन त्यांनी केले आहे.
00000
