– चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘उबाठा ‘ सेनेला आश्वासन…!
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे. ‘उबाठा ‘सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन यावेळी त्यांना देण्यात आले.
जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश खनिकर्म अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे वॅगन मालवाहतूक दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य मातीच्या वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा त्रास होत आहे. शिवाय या परिसरातील अरुंद रस्ते यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत याकडे लक्ष वेधण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे, कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी ‘एमआयडीसी’ क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
