Author: bittambatami.com

वसईच्या पूर्व पट्टीत भीषण पाणी टंचाई

७० हजार नागरिकांना होतोय पाच टँकरनी पाणी पुरवठा विरार : वसईच्या पूर्वपट्टीतील काही गावांना आजही नदीच्या खड्डयांतून पाँइगोला करून आपली तहान भागवावी लागत आहे. य गावासाठी ६९ गावाची पाणी पुरवठा योजना १५ वर्षा पूर्वी मंजूर झाली असून, पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु त्यात पाणी नसल्याने आज या ठिकाणच्या जवळपास ७० हजार नागरिकांना पालिकेच्या ५ टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातील कोल्ही, चिंचोटी, देवदल, कामण सागपाडा आणि खिंडीपाडा येथील नागरिकांना बोअरवेल आटल्याने पालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या गावांची लोकसंख्या साधारण पणे ७० हजारच्या आसपास आहे. त्यातच या भागात मोठ्या प्रमाणात छोटे छोटे कारखाने असल्याने त्यांची पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील गावामध्ये १०० च्यावर बोअरवेल असून त्यांनी तळ गाठल्याने ते बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. या भागात कामाण नदी असून त्या नदीचे पाणी व्यवस्थित पणे अडविले जात नसल्याने ते एका बाजूला वाया जात आहे. तर दुसऱ्या बाजूला तबेल्यामुळे ही नदीही दूषित झाली आहे. येथील नागरिक पाण्यासाठी महापालिका अस्तित्वात आल्यापासून संघर्ष करत आले आहेत त्यांच्या या संघर्षाला अजून पर्यंत यश काही आले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील दोन पाणी पुरवठा योजना ही बंद पडल्या आहेत. त्यामुळे मार्च पासूनच येथील नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजने या गावाचा समावेश असून, त्या अंतर्गत याठिकाणी उंच पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु पाणी येत नसल्याने त्याही पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी येथी नगरसेविका आणि नागरिक पाठपुरावा करत असून यावेळी मात्र त्यांच्या पाठपुराव्याला यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संधर्भात येथील नागरिकांनी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची वस्तुस्थिती सांगितल्यावर क्षितिज ठाकूर यांनी पालिका अधिकर्त्यांशी बोलून तातडीने उद्या (मंगळवार) एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी पुरवठ्यातून पाणी मिळते कि, सूर्याचे पाणी तातडीने देण्यात येते याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागात विचारले असता पूर्वपट्टीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यातले.

डोंबिवलीत कंपनी स्फोटाने नुकसान झालेल्या ९४१ मालमत्तांचे पंचनामे

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटामुळे नुकसान झालेल्या एक ते दोन किलोमीटर परिसरातील कंपन्या, हॉटेल्स, इमारती, घरे अशा एकूण ९४१ मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळे यांनी दिली. अनेक मृतदेहांची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या माध्यमातून बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नुमने घेऊन ते फोरेन्सिक प्रयोगशाळा आणि डीएनए चाचणीसाठी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या बेपत्ता कामगाराची अद्याप ओळख पटत नसल्याने आणि त्याचा शोध लागत नसल्याने अनेक कामगार कुटुंबीय शोकाकूल आहेत. आमच्या कामगारांचा शोध लावून द्या, असा दबाव या कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर वाढत आहे. तज्ज्ञांचा सहभाग अमुदान स्फोट प्रकरण तपासात कोणतेही कच्चे दुवे राहू नयेत म्हणून रासायनिक तज्ज्ञ आणि कंपनीशी संबंधित इतर तज्ज्ञांचे सहभाग आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. याशिवाय फोरेन्सिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयातील अधिकारी यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. सबळ पुरावे या प्रकरणात आरोपींविरुध्द गोळा करून हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यापूर्वी भक्कम केले जात आहे. कंपनी स्थळावरून विविध प्रकारचे रासायनिक आणि अन्य नमुने गोळा केले जात आहेत, असे या प्रकरणातील तपास अधिकारी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कोळी यांनी सांगितले. या स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मलय मेहता याच्या घरातून कंपनी, उत्पादन निगडित काही महत्वाची कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांचे आधारे, परवाने, नुतनीकरण आणि त्याप्रमाणे कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरू होती का हे तपासले जाणार आहे. या कंपनीतील बाष्पकला परवानगी नसल्याचे बाष्पक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या अनुषंगाने तपास केला जाणार आहे, असे कोळी यांनी सांगितले. अमुदान आणि लगतच्या सप्तवर्ण, कॉसमॉस केमिकल कंपनीतील एकूण नऊ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. बचाव कार्य करताना कामगारांचे विविध अवशेष सापडतात. ते एकत्रित करून शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात येतात, असे पालिका अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आठ कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय स्फोटातील मृतदेहांच्या विविध अवेशषांचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कलिना येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांनी दिली. आतापर्यंत १८ विविध प्रकारचे नमुने फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जसे विविध अवयव बचाव पथकाकडून रुग्णालयात येतात. त्याप्रमाणे ते नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जातात, असे डॉ. रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले. अमुदान कंपनी स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकूण २५ तलाठी नेमण्यात आले होते. कंपनी परिसरातील नुकसान झालेल्या मालमत्ता, आस्थापना यांचे एकूण ९४१ पंचनामे करण्यात आले आहेत. -सचिन शेजाळे, तहसीलदार, कल्याण.

ठाण्यातील घोसाळे तलाव, कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घोषित करावा – नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करून, ठाणे महापालिकेने  पर्यावरण, जैवविविधता याबाबत, संपूर्ण भारतातील आगळेवेगळे स्थान निर्माण करण्याची संधी घालवू नये व ठाण्यातील नैसर्गिक जैवविविधतेची साखळी अबाधित रहाण्यास प्रयत्नपूर्वक काम करावे, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत, ठाणे शहरातील घोसाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम मुदत संपली तरी चालू आहे. हा तलाव ऐतिहासिक असून, ठाणे गॅझेटमधे या तलावाचा उल्लेख असून, ८२५ फूट लांब आणि ४९५ फूट रुंद असलेल्या या तलावाची  जास्तीतजास्त खोली १६ फूट आहे. या तलावात  वर्षभर पाणी असते व सिंचनासाठी यातील पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने, अनैसर्गिकरित्या घोसाळे तलावाचे सुशोभीकरण केल्यामुळेच, यातील कासवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असल्याने, या तलावाला कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घोषित करण्यात यावे, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २३ मे हा दिवस, ‘कासव दिन’ म्हणून भारतासह, संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून, मोठ्याप्रमाणावर कासवांची तस्करी होत असल्यामुळे, काही दुर्मिळ प्रजाती धोक्यात आल्या आहेत. निसर्ग आणि जैवविविधतेचे महत्त्व, काळाची गरज आणि पर्यावरण-साखळी अबाधित राहावी म्हणून कासव वाचविणे व संवर्धन करणे महत्त्वाचे असून, भारतीय संविधान ५१-अ (जी) नुसार नैसर्गिक जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे शासनास कटिबद्ध रहाणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, कासवांमध्ये नैसर्गिकरीत्या पाणी स्वच्छ व निर्मळ करण्याची क्षमता प्रचंड असून, भविष्यात पाणी स्वच्छ रहाण्यासाठी विजेवर चालणारी उपकरणे लावण्याची गरजही भासणार नाही. घोसाळे तलावात प्रचंड प्रमाणात कासवे असणे याचा, जैवविविधता व पर्यावरणीय संबंध आहे व त्याचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य असल्याचे, नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी आयुक्तांचे लक्ष वेधताना, देशपांडे यांनी पुढे म्हटले आहे की, तलावात केलेल्या पिचिंग कामामुळे एकाच बाजूला कासवे दिसत आहेत, याची गंभीर दखल घ्यावी. सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण कासवांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा आणत आहात, हेच यावरून स्पष्ट होत असून, संविधानानुसार ही बाब अजिबात मान्य नसल्याने, याची तत्काळ दखल घेण्यात यावी आणि सुशोभीकरण करताना, कासवांच्या व इतर जलचरांच्या संरक्षण, संवर्धनासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नेमकी काय व्यवस्था केली, याची माहिती जाहीर करावी वा तशी केली नसल्यास, तत्काळ तज्ज्ञाकडून सल्ला घेऊन अंमलात आणावी व कासवांची शिकार होऊ नये म्हणून, तत्काळ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्यासोबतच, घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करावा असे नितीन देशपांडे यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारायला लाज वाटते का ?

मुख्यमंत्र्यांना भेटणार-ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ ठाणे: पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी  यांचा पुतळा पुन्हा उभारायला लाज वाटते का ? असा सवाल प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी केला आहे. गडकरी पुतळ्याबाबत आपण त्वरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पुतळा उभारणीबाबत विनंती करणार आहोत असेही अशोक समेळ यांनी सांगितले. कल्याणच्या भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार व रविवारी व्याख्यानाचे आयोजन केले होते. रविवारी नाटककार अशोक समेळ यांनी गडकरी यांच्या नाटकातील सौदर्यस्थळे या विषयावर सुमारे सव्वा तास अभिनयासह विवेचन केले. गडकरी यांच्या नाटकातील `स्वगत’ त्यांनी साभिनय सादर केले. नाटकात स्वगत हा प्रकार आता संपला आहे असे सांगतांना गडकरी यांचे नाटके कशी अजरामर आहेत याबाबत त्यांनी विविध दाखले देत प्रतिपादन केले. `भावबंधन’ पासून ते `राजसंन्यास’पर्यंत त्यांची नाटके आणि त्यांचे महत्व विशद केले. त्यांच्या नाटकातून नायिका ज्या घराघरात पोहचल्या त्या मालती, सिंधू, सुशिला, वसुंधरा इत्यांदी नायीकांची सोशिकवृत्ती ते कुलवधू मधील बंडखोर लतिकाचे वर्णन केले. शारदा या नाटकाने राम गणेश गडकरी यांना सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले. पैसे असलेल्या म्हातार्‍यांशी लहान मुलींचे लग्न लावून देण्याची त्या काळी प्रथा होती. त्यावर केलेल्या विडंबनाला तोड नाही असे सांगतांनाच त्या नाटकातील अनेक गाणी रसिक गुणगुणत असत. `म्हातारा तितुका’ हे सर्वांत लोकप्रिय गाणे होते. त्या काळातील पौराहित्य संस्कारावर आधारलेले `प्रेमसंन्यास’ आणि `दारुची संगत माणसाला संपवते त्यावरील `एकच प्याला’ नाटकाचे त्यांनी रसभरीत वर्णन केले राम गणेश गडकरी एकदा सहजच बालगंधर्वाना म्हणाले `तुला एक दिवस फाटक्या वस्त्रात आणून उभा करीन हे त्यांनी `एकच प्याला’मध्ये शब्दश: करुन दाखविले. ब्रिटीशांच्या राजवटीत `राकट देशा कणखर देशा, माझा महाराष्ट्र देशा’ हे त्यांचे स्फूर्ती गीत अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. आयुष्यभर खस्ता खाणारा हा माणूस शारीरिक व्याधींशी लढत होता. परंतु सारखे लिहित होते. त्यांना माहिती होते माझे आयुष्य एवढेच आहे. जेवढे देता येईल तेवढे मी समाजाचे देणे लागतो. या पध्दतीने त्यांनी लिखाण केले. २२ जानेवारी १९१८ रोजी रात्री झोपतांना आपल्या सेवकाला राजसंन्यासचे कागद काढून ठेव मला उद्या नाटक पूर्ण करायचे आहे. असे सांगून झोपी गेलेले राम गणेश गडकरी उठलेच नाही. त्यांचा झोपतच २३ जानेवारी १९१८ रोजी मृत्यू झाला. गडकरी यांना त्यांचा नाटकाचा आनंद कधीच घेता आला नाही. गडकरी जयंती निमित्ताने कल्याणच्या गडकरी कट्ट्यावर त्यांच्यासाठी एवढी माणसे जमतात हे ते स्वर्गातून पाहत असतील. खरं तर गडकरी कट्टा ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ती राबविली गेली पाहिजे. मराठी भाषेला खर्‍या अर्थाने वैभव प्राप्त करुन देण्याचे काम राम गणेश गडकरी यांनी केले. त्याला साज बालगंधर्व, कुसुमाग्रज, कानिटकर यांनी नंतर चढविला असे सांगून पुन्हा एकदा गडकरी यांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी गडकरी कट्ट्यांचे तुषार राजे यांनी प्रास्ताविक केले. २ जानेवारी २०१७ रोजी गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि २०१८ साली त्यांच्या शताब्दी महोत्सवाप्रसंगी कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याची स्थापना करण्यात आली. गडकरी कट्ट्याने राबविलेल्या विविध उपक्रमाची  माहिती देण्यात आली. गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते यांच्या हस्ते अशोक समेळ यांचा सत्कार करण्यात आला. सैनिकी शिक्षण आवश्यक शनिवारी सावरकर जयंती निमित्त `सैन्यांपुढील आव्हाने व `सैन्यातील संधी’ या विषयावर वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले विचार प्रगट केले. केवळ बंदूक चालविणाराच सैन्यात काम करु शकतो असे नव्हे तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्यांच्या कुटुंबाला शासन कधीच वार्‍यावर सोडत नाही. त्यामुळे आपला पहिला अग्रव्रâम हा सैन्य असायला हवा असे आवाहन केले. शनिवार दि. २५ व रविवार दि. २६ मे रोजी झालेल्या दोन दिवसाच्या जयंती महोत्सवात कल्याणकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रत्ना हिले व योगेश बुडुक यांनी केले. कार्यव्रâमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री तुषार राजे, पुरुषोत्तम फडणीस, प्रविण देशमुख, मेघन गुप्ते, प्रा. मुकुंद बापट, दिपक देशपांडे, प्रसन्न कापसे, दिपक अग्रवाल, नविन राजे, अनुश्री फडणीस इत्यांदींनी मेहनत घेतली.

अंमली पदार्थ विरोधात शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी – एम. देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली आहे. नार्को को ऑर्डीनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदी उपस्थित होते. २४ एप्रिलच्या रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एनडीपीएस अंतर्गत दाखल गुन्हे तसेच इतर प्रकरणातील प्रलंबित असणारे हद्दपारीचे गुन्हे त्यांनी मार्गी लावावेत. आप-आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठी विविध यंत्रणांचे सहकार्य घ्यावे. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत जनजागृती करणाऱ्या छोट्या फिल्मस् बनविण्यात आल्या आहेत. त्याचा प्रसारही सर्वत्र करावा. या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार सहभागी झाले होते.

‘कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्या’!

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांची आग्रही भूमिका जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला  उत्साहात संपन्न मुंबई : कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात आग्र्याला जाऊन ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाचे दर्शन घ्यावे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी आग्रही भूमिका मांडली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत एका प्रकट मुलाखतीत शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी ही भूमिका मांडली. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजू देसाई यांनी १७ मार्च २०२४ रोजी पाचशेव्यांदा रायगड सर करुन एक ऐतिहासिक अभिनव विक्रम पूर्ण केला. यानिमित्ताने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. सौ. नयना रेगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम यंदाच्या ४२ व्या वर्षाच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत आयोजित करण्यात आला होता. पाचशेव्यांदा रायगड सर केल्याबद्दल राजू देसाई यांना शिवरायांच्या मावळ्याची पगडी आणि संपूर्ण मावळ्याची वस्त्रे, शाल श्रीफळ देऊन विजय वैद्य यांच्या शुभहस्ते तर सौ. रेवा राजू देसाई यांना साडी, खण आणि श्रीफळाची ओटी भरुन सौ. माया योगेश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी प्रकट मुलाखत घेतांना प्रश्नांच्या उत्तरांच्या ओघात राजू देसाई यांनी संपूर्ण शिवकाल उपस्थितांसमोर उभा केला.  प्रत्येक शाळेमध्ये रोज शिवरायांची आरती प्रार्थनेवेळी लावण्यात यावी. तसेच कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल नावाचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्यावे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल विचारले असता देसाई म्हणाले की, या स्मारक बांधणीचा कोट्यावधी रुपयांचा खर्च गडकिल्यांसाठी वापरावा कारण गडकिल्ले हेच छत्रपतींचे खरे स्मारक आहे‌. छत्रपती शंभूराजे यांचे औरंगजेबाने जे अतोनात हाल केले तो संपूर्ण प्रसंग राजू देसाई यांनी उपस्थितांसमोर सादर केला तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच भारलेल्या वातावरणात प्रकट मुलाखतीची सांगता झाली. एका रात्रीत टकमक टोक चढून जाण्याचा रोमांचकारी आणि अंगावर काटा उभा राहण्याचा प्रसंग, राजू आणि रेवा देसाई यांचा मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने झालेला शुभविवाह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगण्यात येणे, राज्याभिषेक नव्हे तर राजाभिषेक असे ठासून सांगणे या शिवचरित्र कथनामुळे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतील या कार्यक्रमास श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ‌. नयना रेगे यांनी केले. पाच दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेत  लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरांचा पोवाडा, रवींद्र देवधर, हृषिकेश कानडे आणि नयना रहाळकर यांनी सादर केलेला ‘मी भारतीय’ हा दीर्घांक; ख्यातनाम सदाबहार चित्रपट अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात चित्रपट समीक्षक श्री. दिलीप ठाकूर यांनी सांगितलेल्या असंख्य आठवणी आणि संतोष पिसाट, प्रमोद कुंभार, संगीता मिरकर, रश्मी मुळे व सहकाऱ्यांनी सादर केलेली अजरामर गाणी; विजय मडव(शारदा), दिलीप चव्हाण, वसंत सावंत(जय महाराष्ट्र नगर भूषण), विजय घरटकर(प्रेरणा), हर्षिता वायंगणकर(मल्लखांब सुवर्ण पदक) यांना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आलेले विविध पुरस्कार; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम यांनी ४२ व्या व्याख्यानमाले निमित्त श्री. विजय वैद्य यांना ४२ गुलाबपुष्पांची माळा व शाल देऊन सन्मानित केले. सातत्याने ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत उपस्थिती लावणारे वर्तक गुरुजी यांनाही सन्मानित करण्यात आले. अनेकांनी आठवणी कथन केल्या. सचिन वगळ यांनी पुरस्कार सन्मानित मान्यवरांच्या सन्मान पत्राचे आपल्या खड्या आवाजात वाचन केले.

पथनाट्यांतून पर्यावरण विषयक जनजागृती

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नवी मुंबई : शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ 4.0 अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून 21 मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य 22 ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे. पथनाट्याप्रमाणेच मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करूनही जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (2) श्री. शिरिष आरदवाड यांनी दिली आहे.

कोकण पदवीधर निवडणूक मतदान 26 जूनला

28 मेपर्यंत करता येईल पदवीधर मतदार नोंदणी ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे  आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मुदत दि.7 जुलै, 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :- निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 7 जून, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार) आणि मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दिनांक 1 जुलै 2024 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 5 जुलै 2024 (शुक्रवार). दि. 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. 28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. ही मतदारयादी नव्याने तयार करावयाची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पदवीधर मतदारास नमुना नं.18 पुढील ठिकाणी सादर करता येईल 1) संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा 2) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा अशोक गायकवाड नवी मुंबई : एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.* नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सर्वच विभाग कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अशा एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत १५ ते २२ मे २०२४ या आठवड्याभराच्या कालावधीत विभागीय कार्यक्षेत्रात ७१ ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या १७ व्यावसायिक व आस्थापनांकडून एकूण रू. ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९ किलो ७५० ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात ७ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत ३५ हजार दंडात्मक रक्कम व २४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात ३ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत १५ हजार दंडात्मक रक्कम व ३ किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. ऐरोली विभागातही व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये 15 हजार दंड वसूली व 10 किलो 500 ग्रॅम एकल वापराचे प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकाने 4 व्यावसायिकांवरील कारवाईत 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2 किलो 250 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे या आठवड्यात 17 व्यावसायिक / आस्थापनांकडून 85 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 39 किलो 750 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा, मोठागाव, गणेशनगर उल्हास खाडी किनारा भागात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, चरस-गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ वाढली आहे. या भागातील झाडे, झुडपे, मोकळ्या मैदानांचा आधार घेऊन ही मंडळी पोलिसांचा धाक नसल्याने बिनधास्त नागरिकांना उपद्रव देत आहेत. रविवारी रात्री देवीचापाडा गोपीनाथ चौक येथे एका रिक्षा चालकावर एका गर्दुल्ल्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. जगदीश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते गोपीनाथ चौकातील सद्गुरू दर्शन सोसायटीत राहतात. माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे ते नातेवाईक आहेत. रविवारी रात्री वाढत्या उष्णतेमुळे जगदीश म्हात्रे घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेत सद्गुरू दर्शन सोसायटी लगतच्या भरत भोईर नाल्याच्या कट्ट्यावर, काही जण नाल्या जवळील झाडाखाली चरस-गांजा यांचे सेवन करत बसले होते. काही जण मद्यपान करत टोळक्याने बसले होते. ही टोळकी मद्य सेवन करून या भागात ओरडा करत होती. रात्रीची वेळ झाली असल्याने लोकांना सोमवारी कामाला जायचे आहे. ओरडा करू नका असे रिक्षा चालक जगदीश म्हात्रे यांनी घरा जवळून चाललेल्या गर्दुल्ल्यांना सांगितले. त्याचा राग एका गर्दुल्ल्याला आला. त्याने काही क्षणात जगदीश म्हात्रे यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत हातामधील धारदार स्टीलच्या कड्याचा वार रिक्षा चालक जगदीश यांच्या नाकावर केला. नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर दुसरा वार हल्लेखोराने रिक्षा चालकाच्या डोळ्यावर करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गर्दुल्ल्याने रिक्षा चालकाला जोराने जमिनीवर ढकलून देऊन हल्लेखोर पळून गेला. विष्णुनगर पोलिसांना ही माहिती म्हात्रे यांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी परिसरात घेतला पण ते या भागातून पळून गेले होते. देवीचापाडा येथील कलावती आई मंदिराजवळील एका मोकळ्या भूखंडावर दररोज रात्री आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यपींचे एक टोळके उघड्यावर मद्य सेवन करण्यासाठी बसते. मद्याची गुंगी चढल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. पादचाऱ्यांना टोमणे मारतात. कलावती आई मंदिरात अनेक भाविक उपसना करण्यासाठी आलेले असतात. काही जण प्रार्थना करतात. त्यांनाही या मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. परिसरातील सोसायटी, चाळींमधील रहिवासी या मद्यपींच्या त्रासाला कंटाळले आहेत. मागील काही महिन्यांपासून उघड्यावर हे मद्यपी मद्य सेवन करत आहेत. विष्णुनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत खाडी किनारची झुडपे, झाडे परिसरात गस्त घातली तर गांजा सेवन करणारे, मद्यपी टोळकी सापडण्याची शक्यता रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. रिक्षा चालकावर हल्ला झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.