Author: bittambatami.com

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेशी जास्त वाट लावणारा हा म्हस्केच

नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो;आयुष्यभर शकुनीमामा कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा थेट आरोप ठाणे : नरेश मस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो, आयुष्यभर त्यांनी शकुनीमामाचे काम केले आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हक्से घ्यायचा असा थेट आरोप ठाणे कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. नरेश म्हस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपती कशी आली? हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,उध्दव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमावले आहेत ना, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला विजयी करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

ब्रिटिश काळातल्या पोर्ट ट्रस्ट कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण

रमेश औताडे मुंबई : कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते.  त्यामुळे कामगार  संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात.  असे मत ज्येष्ठ कामगार नेते ॲड.  एस.के. शेट्ये यांनी ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दीन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. ब्रिटिश काळात ३ मे  १९२० रोजी स्थापन झालेल्या बी. पी. टी. एम्प्लॉईज जुनियनला ( आताचे नाव – मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन )     १०४ वर्ष पूर्ण झाली असून, ३ मे २०२४  रोजी माझगाव येथील  कामगार सदन सभागृहात या संघटनेचा वर्धापन दिन संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड . एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले  की, कामगारांच्या मागण्या मिळवण्यासाठी संप हे कामगारांचे शेवटचे हत्यार आहे. परंतु हे हत्यार देखील आता बोथट झाले आहे.  सध्याच्या काळात काम करताना सहकार्य, सामंजस्य व सुसंवाद हा त्रिसूत्री  मार्ग फार उपयोगी  आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात कामगार विरोधी  बदल केले असून,  भविष्यात कामगार संघटनांमध्ये कार्य करणे फार कठीण जाणार आहे.  केंद्र सरकारच्या धोरणामुळे कायमस्वरूपी कामगार कमी होत असून,  प्रत्येक उद्योगात कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे असंघटितांना  संघटित करणे हे खऱ्या अर्थाने कामगार चळवळी समोर मोठे आव्हान आहे.  त्या दृष्टीने कामगार कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.  शेवटी  कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे असतील तर कामगारांची एकजूट फार महत्त्वाची आहे.  या एकजूटीवरच कामगारांच्या मागण्या मान्य होऊ शकतात. असे शेट्ये म्हणाले. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल,  सेक्रेटरी विद्याधर राणे,  सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत,  निसार युनूस,  प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मनीष पाटील यांनी युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  युनियनचे पदाधिकारी विकास नलावडे, संदीप कदम, विष्णू पोळ,  संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, त्याचप्रमाणे  कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी

मतदान केंद्रांबाहेर मंडपाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा,–सुरेश म्हात्रे राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

श्री गणेश आखाड्यातर्फे निवासी कुस्ती शिबिर

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर पश्चिम  यांच्यातर्फे येत्या २१ मे ते १० जून २०२४ या कालावधीत उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू, पंच यांच्याकडून कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाईल. तसेच नविन नियमांची माहिती करुन देण्यात येईल. कुस्तीसोबत योगासने, प्राणायामाचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. २० मेपर्यंत शिबिराच्या प्रवेशिका स्विकारण्यात येतील. शिबिराचे प्रवेश शुल्क ७०००/- रुपये आहे. नितिन शिंदे, महेंद्र जाधव, विवेक नायकल, वैभव माने, अनिल बागाव, कोमल देसाई हे सर्व एन आय एस प्रशिक्षक कुस्तीपटूंना या खेळाचे धडे देतील. शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यांना प्रमाणपत्र, ट्रॅकसूट, सन्मान चिन्ह भेट देण्यात येईल. शिबिराच्या प्रवेशासाठी मिलिंद लिमये, ९६१९०२४३३३, वसंतराव पाटील ८३२९६०९०३८, सदानंद पाटील ९३७२४१३३२५, रुपचंद माने ९८६९१०४१२२,  कोमल देसाई ७०३९१२५९८५ यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे २०२४ रोजी लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, डॉ. सी. जी. देसाई मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धेची नावे ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, मुंबई – ४०० ०१६ येथे क्लब मार्फत स्वीकारण्यात येतील.

रिक्षा-टॅक्सीच्या उत्पन्नात तापमानवाढीमुळे घट

उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले. मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.  यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक दारू, गांजा, गुटखा आदी साहित्य पुरवीत असल्याचे उघड झाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण नातेवाईकांच्या अंगझडतीत दारू, गांजा, गुटका सापडल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे यांनी दिली आहे. उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या भिंती व स्वच्छतागृह गुटक्याच्या फिचकाऱ्याने रंगल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची रुग्णालय प्रवेशद्वारवर अंगझडती घेण्याचे आदेश दिले. या अंगझडतीत रुग्णांच्या नातेवाईकडे दारू, गांजा, गुटखा, तंबाखू आदी पदार्थ सापडत असल्याचे उघड झाले. काही रुग्णाच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून आणलेल्या दारूच्या बॉटल रुग्णालय सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याने, एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र याला काही रुग्णांचे नातेवाईक छेद देत असल्याचे डॉ मनोहर बनसोडे म्हणाले. रविवारी रात्री असाच प्रकार उघड झाला असून रुग्णांच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बॉटल सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. यापुढे रुग्णांच्या नातेवाईकसह संबंधितांवर कारवाईचे संकेत रुग्णालय प्रशासन यांनी दिले आहे. थेट रुग्णालयात नशेली प्रदार्थाची विक्री रुग्णांना होत असल्याने, मध्यवर्ती रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे.

विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

१० जूनला होणार मतदान अशोक गायकवाड मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गारगाई प्रकल्पाला येणार वेग

मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबई : मुंबईची तहान भागविणा-ऱ्या गारगाई प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याने बहुतांशी पेच सुटणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला ४०० दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या प्रकल्पाची मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी तसेच बाधित होणारी शेतजमीन, येथील चार गावातील रहिवाशांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. मात्र पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत. प्रकल्पात पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे. यावर अभ्यास करून उपाययोजनाही सूचवणार असल्याचे सांगण्यात आले. पुनरावलोकन होणार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे, पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे, प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील, झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार, बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय य़ाबाबींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. अभ्यासानंतर अहवालातील शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

उथळसर प्रभाग समिती कार्यालयात स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती

ठाणे :  मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन स्वीप पथकाकडून उथळसर प्रभागसमिती कार्यालयात करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला.  या  वेळी प्रभाग समिती कार्यालयात ५० हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले.