Author: bittambatami.com

गणवेश सक्ती करणाऱ्या शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी पालकांचे ठिय्या आंदोलन

मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र कल्याण : टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातुच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले.  शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे. के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त पालकांनी शाळेकडून करण्यात येत असलेल्या कथित सक्तीच्या गणवेश विक्री, शैक्षणिक साहित्याबाबतच्या तक्रारी आणि इतर मुद्द्यांसंदर्भात २५ जून  रोजी प्रशासन अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भारत बोरनारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कागदपत्रे व उपलब्ध पुरावे सादर केले होते. पालकांच्या म्हणण्यानुसार, त्या बैठकीत संबंधित प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आले असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास संबंधित प्रस्ताव मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच काही पालकांना संबंधित गणवेश विक्रेत्याकडे गणवेश परत जमा करण्याबाबत आणि शैक्षणिक साहित्याबाबत पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही कोणताही लेखी निर्णय, बैठक किंवा पालकांना दिलासा देणारी ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी दिनांक २ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्रही सादर केले. मात्र आजपर्यंत कोणताही अंतिम निर्णय अथवा स्पष्ट आदेश प्राप्त झालेला नसल्याचा पालकांचा दावा आहे. यामुळे अनेक पालकांनी गणवेश विक्रेत्याकडे परत जमा केले असले तरी त्यांना अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच शैक्षणिक साहित्याबाबतही निर्णय प्रलंबित असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमाच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून तातडीने निर्णय व्हावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि पालकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज  शिक्षण मंडळ कार्यालय येथे पालकांनी निषेध आंदोलन केले. 00000000

 गेल्या सहा महिन्यात सिंधुदुर्गात अपघाती मृत्यूंमध्ये घट

संसदीय सुरक्षा समितीची बैठक संपन्न सिंधुदुर्ग: जानेवारी ते जून, या गेल्या सहा महिन्यात, गतवर्षीच्या (२०२५)   तुलनेत यावर्षी  (२०२६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. विविध विभागांनी समन्वयाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.  संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व संबंधित विभागांनी अधिक प्रभावी नियोजन करावे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा, व्यापक जनजागृती तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अपघातमुक्त जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने विविध विभागांनी राबविणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली. विशेष अंमलबजावणी मोहिमा, वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती, अपघातप्रवण स्थळांवरील सुधारणा, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव उपस्थित होत्या. बैठकीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा, अपघातप्रवण स्थळांवर कायमस्वरूपी उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक उपायांचा अवलंब, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करणे, तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करावा. रस्ता सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्य केल्यासच अपघातांमध्ये आणखी घट साध्य होऊ शकते असे पालकमंत्री नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले. 000000

 माऊली फाऊंडेशनचा अनुकरणीय उपक्रम

वारकऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या माऊली फाउंडेशन, सानपाडा,ज्ञनवी मुंबई यांनी यंदाही मोठ्या उत्साहात सेवा उपक्रम राबवून हजारो वारकऱ्यांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले. वारकऱ्यांच्या गरजा ओळखून सातत्याने सेवा देणाऱ्या फाउंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय साधनांच्या संचाचे वाटप करण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. यावर्षी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, हितचिंतक आणि सेवाभावी नागरिकांनी माऊली फाउंडेशनच्या कार्यावर विश्वास ठेवून उदंड सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे वैद्यकीय साधनांच्या संचासोबतच रेनकोट, पिण्याचे पाणी, बिस्किटे, हल्दिराम उपवास चिवडा, तुळशीची माळ आणि श्रीमद् भगवद्गीता यांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप केले. विशेष म्हणजे सेवा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न ठेवता, वाटप पूर्ण झाल्यानंतर माऊली फाउंडेशनच्या संपूर्ण पथकाने सेवा केंद्र आणि परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता हीसुद्धा सेवा  या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी आणि उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले. माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सायली कैलास मुद्रास यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सेवा जितकी महत्त्वाची आहे तितकेच वारीचे पावित्र्य आणि परिसराची स्वच्छता राखणेही प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा जप करत फाऊंडेशन सातत्याने समाजकार्यात योगदान देत आहे. वारकरी संप्रदायाच्या या सेवाभावी कार्यात माऊली फाउंडेशनचे खजिनदार अजय पवार आणि सचिव विकास वाघुले यांचे फार मोठे योगदान आहे.  या सेवाकार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक, सहकारी आणि समाजातील नागरिकांप्रती माऊली फाउंडेशनने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येक देणगीमागील समाजसेवेची भावना हीच या कार्याची प्रेरणा असून, त्याच बळावर अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे शक्य झाल्याचे फाऊंडेशनने नमूद केले. पुढील वर्षी हा सेवायज्ञ आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प माऊली फाऊंडेशनने केला असून आमच्या कार्याची दखल घेऊन कालच एका भक्ताने आम्हाला पुढील वर्षासाठी देणगी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. दान करणारा हात आणि सेवा करणारा हात,  दोन्ही विठ्ठलाचेच रूप आहेत. स्वच्छता ही सुद्धा सेवा आहे. माऊली फाऊंडेशन या दोन्ही मूल्यांचा जप करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जविकिरण काव्य मैफिलीला कवी व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरा – भाईंदर : पँथर नेते ज. वि.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जविकिरण काव्य मैफल, मुंबई व स्वर संगम फाऊंडेशन, मीरा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या जविकिरण…

११६ वा आषाढी हरीनाम सप्ताह १८ ते २५ जुलैदरम्यान

ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी समाज ट्रस्ट, ठाणे आणि श्री आनंद भारती समाज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २५ जुलैदरम्यान चेंदणी कोळीवाडा येथील श्री विठ्ठल मंदिर, ठाणे (पूर्व) येथे…

उपवर्गीकरण परिषदेत नारायण बागडे उपस्थित राहणार

रमेश औताडे मुंबई : उपवर्गिकरण पोलखोल परिषदेचे आयोजन रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे यांनी नाशिक येथे केले असून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा नेते रविंद्र अहिरे यांनी दिली. अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण  अ.ब.क.ड. करून देऊ अशी बतावणी म्हणजे थोतांड आहे. तुम्ही फक्त निळ्या सावलीत आसरा घेवू नका. तसेच फुले शाहु आंबेडकरी विचारांपासून फारकत घ्या  यासाठी आहे असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह गोल्ड क्लब येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीला बागडे सर संबोधित करणार आहेत . करिता कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र अहिरे यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पालिकेचे प्रयत्न यशस्वी

रमेश औताडे मुंबई : साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिकेतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच धरतीवर अशा प्रकारच्या उत्सवाच्या आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेत  तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेत व्हावे याकरिता आमदार अमित गोरखे सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे राजीव मानकर आणि प्रकाश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिका तथा मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेत या उत्सवाचे आयोजन करण्याकरिता महानगरपालिकेकडून प्रस्तावना मान्य करून घेतलेली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. मातंग समाजाने आमदार अमित गोरखे आणि राजीव मानकर यांचे आभार मानले आहेत.

आयुक्त कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली

शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचा पराक्रम ठाणे : आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाने ०४.११.२०२५ अन्वये, सन २०२५-२६ ते सन २०२९-३० या कालावधीत ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील शेंडेगाव येथे आश्रम शाळांचे ‘सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेश प्राप्त होऊन जवळपास एक महिन्याचा  कालावधी उलटून गेला तरी अद्यापही शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यलय यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे सेंटर किचन अद्याप सुरू केलेले दिसत नाही. आयुक्त यांच्या आदेशाचे अशा प्रकारे उल्लंघन करणे हे प्रशासकीय शिस्तीच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असून आयुक्तस्तरावरून आदेश देऊनही शेंडेगाव येथे सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर मिळणाऱ्या आहारापासून वंचित राहावे लागत असून, प्रशासकीय दिरंगाईबद्दल पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश देऊनही कंत्राटदारांच्या संगनमताने हे प्रकल्प रखडवले  जात आहे की काय अशी चर्चा पालक वर्गात सुरु आहे. सेंटर किचन सुरू झाल्यास धान्याची नासाडी थांबेल, गैरव्यवहाराला आळा बसेल आणि विद्यार्थ्यांना एकसमान व सकस आहार देणे शक्य होईल. या प्रक्रियेत कंत्राटदार अडथळे निर्माण करत असल्याचा दाट शक्यता असल्याचा संशय पालक वर्गात निर्माण झाला आहे. या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि पोषण आहाराशी खेळ सुरू असून, तात्काळ शेंडेगाव येथे आयुक्त यांच्या आदेशाचे पालन करून सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरु करावे अशी मागणी रिपब्लिकन ए. फेडरेशनचे तालुका सरचिटणीस राजू लोखंडे यांनी केली आहे.

 चिमुकलीच्या डोळ्यांत फुलला आशेचा नवा प्रकाश!

ठाणे सिव्हिल रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे : एखाद्या चिमुकलीच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलणे, यापेक्षा मोठे समाधान डॉक्टरांसाठी दुसरे कोणते असू शकत नाही. जन्मापासूनच जग धूसर पाहणाऱ्या सात वर्षीय मुलीच्या आयुष्यात ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाने आशेचा नवा किरण आणला असून, यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता तिला दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागले आहे. मुरबाड येथील छोट्या मुलीला जन्मजात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता. त्यामुळे तिचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे ठरत होते. गेल्या वर्षी तिच्या एका डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेत उच्च दर्जाच्या कृत्रिम लेन्स बसविण्यात आली असून या मुलीला आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली. जन्मजात मोतीबिंदू असलेल्या लहान मुलावर शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या मोठे आव्हान असते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे मुलीच्या आयुष्यातील अंधार दूर झाला. सर्वसामान्य कुटुंबातील या चिमुकलीला नव्या दृष्टीसह उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. चौकट जन्मजात मोतीबिंदूचे वेळेत निदान आणि उपचार झाल्यास मुलांची दृष्टी वाचू शकते. लहान मुलाला नीट दिसत नसल्याचा संशय आल्यास, डोळ्यात पांढरेपणा दिसल्यास किंवा प्रकाशाकडे प्रतिसाद कमी असल्यास कोणताही विलंब न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. – डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

महावितरणचे शनिवारी ७२ ग्राहक मेळावे

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार? हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे. औद्योगिक ग्राहकांना साकडे? स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. 000000000