Author: bittambatami.com

प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून नागला बंदर खाडी किनाऱ्याचा विकास

अनिल ठाणेकर   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागला बंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची  प्रतिकृती उभारण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या ठिकाणी ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. या कामासाठी १५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची, सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनार्याचा सुनियोजित पध्दतीने विकास झाल्यास स्थानिकांना चार निवांत क्षण घालविण्यासाठी हक्काची जागा मिळेल, त्या-त्या परिसराचे सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदयात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल. ठाणे शहराला लाभलेल्या नागला बंदर खाडी किनार्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ केली जावी अशी मागणी आमदार  प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिजाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले. परदेशात जसे ‘वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट’ करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याच पद्धतीने नागला बंदर खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च १५० कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. ठाणे महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्याने त्याठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.  ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. नागला बंदर खाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा इतिहास देखील या खाडी किनार्याला असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक असे महत्व आहे. घोडबंदर गावात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतात. खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे “आरमार केंद्राची“ प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाणार आहे. तसेच खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी मोठा ‘पाथ वे’, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉक वे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल – फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लायटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मँग्रोज आहेत तिथे ‘लाकडाचे’ म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या  कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात शहरात पर्यटक येऊन पर्यटनाला चालना मिळेल व त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशा पद्धतीने येथे खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हा खाडी किनारा सुशोभीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिल्या टप्प्यात १५० कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरु होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच न्हवे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल, असे आमदार सरनाईक म्हणाले. 0000

कर्जत-माथेरानच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी निरंजन डावखरेंचा पुढाकार

 पायाभूत सुविधांची कामे वेगात करण्याचा निर्णय   ठाणे : कर्जत व माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली. कर्जत व माथेरान परिसरातील वीज समस्येबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महावितरण अधिकारी व संघर्ष समितीची काल एकत्रितरित्या ठाण्यात बैठक झाली. या बैठकीला महावितरणच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम मा्ने, कार्यकारी अभियंता विद्यानंद शिंदे, कर्जत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे, भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे संयोजक कैलास मोरे, सदस्य रंजन दातार आदी उपस्थित होते. या बैठकीत वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. कर्जत व माथेरान शहरासाठी स्वतंत्रपणे एक्सप्रेस फीडर कार्यरत असून, वीजपुरवठा सलग सुरू राहण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शिरसे येथे वीज उपकेंद्राचे कामे वेगाने पूर्ण केले जाईल, वाढत्या वीज मागणीनुसार ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या मागणीला प्राधान्य दिले जाईल, कर्जत शहर आणि नेरळ ते माथेरानपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, केंद्र सरकारच्या आरडीएसएस योजनेतून पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, आणखी दोन इनकमर बसविण्याचे काम सुरू आहे. तर ४१ नवे ट्रान्सफॉर्मर व १०२ ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेत वाढ केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण शिबीर रविवारी आयोजित करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली. 0000

ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘एक झाड…

 ‘भिवंडीतील गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू’

 विश्व हिंदू परिषदेचा ठाणे पोलिसांना इशारा   ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदूत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिली. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला होता. या घनटेनंतर आयपीएस अधिकारी डाॅ. श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली. हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचा प्रकार घडले. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे ? आठ दिवसांत १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा भारतभरातील साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेस ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद

माथेरान : राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होत असताना जेष्ठ नागरिकांना सुध्दा राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सुरुवात करण्यात आली असून त्यास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद लाभत…

जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार

मुंबई : जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये भरघोस पगारवाढीचा करार करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख बंदरांमधील सर्वात जुनी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे. एम बक्षी या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८  असा ४  वर्षाचा वेतन करार केला आहेम या वेतन  करारामुळे कामगारांना कमीत कमी ४४९६ रुपये तर जास्तीत जास्त ६९५३ रुपये पगार वाढ झाली आहे. सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये आहे. या वेतन करारावर युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे,  खजिनदार विकास नलावडे,  कामगार प्रतिनिधी म्हणून  अरुण खाडे आणि  प्रवीण जाधव तर व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष व एच. आर. ई. अरुमुगम आणि मॅनेजर व एच. आर. रितूराज ढाकणे यांनी सह्या केल्या आहेत, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000

मुंबईत सुरू होणार पॅराडॉक्स संग्रहालय

मुंबई : भारतातील पहिले पॅराडॉक्स संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे. कला, विज्ञानाबाबत मनोरंजनात्मक अनुभव या संग्रहालयात मिळणार आहे. २०२२ मध्ये मिलटोस कंबोरिड्स आणि साकिस तानिमानिडीस यांनी सुरू केलेले पॅराडॉक्स संग्रहालय…

मूर्तीशाळांमध्ये देवीच्या साजशृंगाराची लगबग

पेण-  : नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती बनवण्याची, त्‍यांचा साजशृंगार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. पेण हे गणपतीमूर्तींचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीही साकारण्याचे काम…

 डेब्रिजचे भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली

डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, माणकोली उड्डाण पूल भागात खाडी किनारी शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. रात्रीच्या वेळेत हा मलबा गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला जात असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. रात्रीच्या वेळेत हे भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटीचे थोडेफार जंगल असलेला मोठागाव, कोपर, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव पट्टा डोंबिवलीत शिल्लक आहे. या भागातील खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून पर्यावरणप्रेमींचा एक गट या भागात सक्रिय आहे. त्यांनाही खाडी बुजून टाकण्यात आलेले भराव पाहून धक्का बसला आहे. एकीकडे वाळू तस्करांकडून वाळू उपशासाठी खारफुटीची बेसमुर कत्तल मुंब्रा ते डोंबिवली परिसरात करण्यात आली आहे. आता खाडीमध्ये भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. मोठागाव भागात खाडीवर माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतचे काम सुरू आहे. रेल्वे मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. पालिकेचा टिटवाळा ते काटई वळण रस्ता या भागातून जाणारआहे. या भागातील जमिनींचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे या भागातील सरकारी, कांदळवन नियंत्रणाखालील सरकारी जागा हडप करण्यासाठी. या जागांवर बेकायदा गाळे, इमारती, चाळी बांधण्यासाठी भूमाफियांनी मोठागाव खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरू केले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. माणकोली पुलाच्या भागात खासगी, सरकारी अशा दोनच प्रकारच्या जमिनी आहेत. या भागात येत्या काळात पेट्रोलपंप, व्यापारी गाळे, वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा अधिक संख्येने चालतील या विचारातून माफियांनी मोठागाव खाडी किनारच्या जागा हडप करण्याचे षडयंत्र रचले आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात. योग्य नियोजन करून मोठागाव भागातील खाडीकिनारा, खारफुटी नष्ट करून बुजविण्याचे काम सुरू असल्याने पालिका, कांदळवन, महसूल अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करावी. हे कृत्य करणाऱ्या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या वर्षी मोठागाव जवळील देवीचापाडा येथील खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांविरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळाच्या तक्रारीवरून चौकशीनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून भूमाफिया दिवसा भराव टाकण्याऐवजी आता रात्रीच्या वेळेत खाडी किनारी भागात मलबा किंवा भराव टाकण्याची कामे करत आहेत, अशा तक्रारी आहेत. कोट मोठागाव खाडी किनारी खारफुटी नष्ट करून, खाडी किनारा बुजवून कोणी भराव टाकत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल. याप्रकरणी महसूल, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून संंबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील. अतुल पाटील उपायुक्त,घनकचरा विभाग. 0000

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत स्वच्छता ही दैनंदिन…