Author: bittambatami.com

विविध आयुधांचा उपयोग करून सभागृहाचा जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर- जितेंद्र भोळे

मुंबई : राज्याचे कायदेमंडळ हे सार्वभौम आहे. जनतेच्या हिताचे कायदे करणे, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य कायदेमंडळाच्या  माध्यमातून होत असते. विविध संसदीय आयुधांचा उपयोग करून सदस्य जनतेचे प्रश्न, समस्या, भोवतालच्या परिस्थितीची माहिती सभागृहाला देतात. या माहितीच्या आधारावर कार्यवाही करून सभागृहात जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येतो. सभागृहातील या कार्यवाहीची माहिती जनतेला देण्याचे महत्वाचे काम प्रसारमाध्यमे करीत असतात, असे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी आज केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात ‘माध्यम साक्षरता अभियान’अंतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना’ या विषयावर सचिव (1) श्री. भोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रावेळी व्यासपीठावर मातिही व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. विधिमंडळाला आर्थिक, कायदे निर्मिती व माहिती घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत सचिव (1) श्री. भोळे म्हणाले, सदस्य आपआपल्या मतदासंघातील प्रश्न सभागृहात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, नियम 293 अन्वये चर्चा आदींच्या माध्यमातून मांडत असतात. कामकाजातील या सर्व प्रकारांमध्ये विधेयक हे सर्वात महत्वाचे असते. विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर विधान परिषदेकडे पाठविली जातात. आवश्यकता असल्यास संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात येते. वित्तीय बाबींशी संबधित विधेयक हे सर्वप्रथम विधान सभेत मांडण्यात येते. धन विधेयक ठरविण्याचा अधिकारी विधानसभा अध्यक्षंना असतो. सचिव (1) श्री. भोळे पुढे म्हणाले, सभागृहातील वित्तीय कामकाज महत्वाचे असते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विनियोजन विधेयक पारीत करावे लागते. विधेयक पारीत न झाल्यास अर्थसंकल्पीय तरतूदींचा विनियोग करता येत नाही. तसेच शासकीय विधेयकांसोबत अशासकीय विधेयकेसुद्धा मांडण्यात येतात. शासकीय विधेयकाप्रमाणेच अशासकीय विधेयक राजपत्रात प्रसिद्ध होत असते. सभागृहात सदस्यांना विशेषाधिकार मिळालेले असतात. त्यांना भाषण स्वातंत्र्य असते. तसेच अधिवेशन काळात त्यांना अटक करता येत नाही. यासोबतच विधीमंडळाच्या विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असून सध्या 40 समित्या आहेत. या समित्यांचे कामकाज वर्षभर सुरू असते. समित्या शासनाला शिफारशी करू शकतात. कामकाजाचे वार्तांकन करताना प्रसार माध्यम प्रतिनिधींना या आजच्या कार्यशाळेचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह मुंबई : विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमांची असल्याचे प्रतिपादन करीत या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटनीय कार्यक्रमात महासंचालक श्री. सिंह बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक श्री. सिंह म्हणाले, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोड म्हणाले, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी  बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले,  लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या गुणवत्ता वाढ होणे गरजेची आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचलन पल्लवी मुजुमदार यांनी तर आभार वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू

मिरारोड: येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत कंपनीतर्फे क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आल्या होत्या. बॉक्स क्रिकेट खेळत असताना कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी हा तरुण  फलंदाजी करत होता.क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला व  त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका 4२ वर्षीय तरुणाचा खेळताना हृदयविकाराने दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून तपास करत आहेत. मयत रामगणेश कृष्णन तेवर (42)हा एका बिल्डर कडे कामाला असून त्या बिल्डर मार्फत कर्मचाऱ्या करता  क्रिकेट स्पर्धा काशिगांव येथील खाजगी जागेत  रविवारी  आयोजित करण्यात आल्या होत्या.

शालेय विद्यार्थ्यांकरिता कबड्डी प्रशिक्षण शिबिर संपन्न

मुंबई : सचिंद्र आयरे फाउंडेशन व लालबागचा राजाच्या आशिर्वादाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शनि. व रवि. दिनांक ०१ व ०२ जून २०२४ रोजी कबड्डी खेळाचे दोन दिवसांचे ‘विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता अर्जुन पुरस्कार सौ. माया मेहेर यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार तारक राऊळ, महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र सुर्वे, द्रोणाचार्य पुरस्कार भार्गव कदम, सचिंद्र फाऊंडेशनचे सचिंद्र आयरे, प्रशिक्षक मिलिंद कोलते, संदीप काणेकर, अशोक लोटणकर, सुरेश गोरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना रविंद्र सुर्वे म्हणाले की, शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही मनसोक्त खेळा. खेळात प्रगती करताना ध्येय निश्चित करा, पण शॉर्ट – कट मारू नका. या खेळाडूंना मिलिंद कोलते, मोरे यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय खेळाडू पांडुरंग भोगले यांनी केले.

शक्तीप्रदर्शन करत ॲड. अनिल परब यांची उमेदवारी दाखल

महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी  नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सोमवारी दि. ३ जून रोजी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. हि निवडणूक प्रचंड मताधिक्यांनी जिंकण्याचा विश्वास यावेळी ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला. गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड. अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ॲड. परब सकाळी ११ वाजता वांद्रे येथील निवासस्थानातून बाहेर पडले. एमआयजी क्लब येथेून हजारो शिवसैनिकांसह ते नवी मुंबईत आले. यावेळी ॲड. परब यांच्याबरोबर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, पदवीधर मतदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते सोबत होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी बेलापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड.परब म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी मुंबई पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी दाखल केली. मी शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विजय मिळवून देईन. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली त्याच्या जोरावर प्रचंड मताधिक्यानी विजयी होण्याचा मला विश्वास आहे, असा विश्वास ॲड. परब यांनी व्यक्त केला. त्यापुढे बोलताना ॲड परब म्हणाले कि, समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी त्यांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा केला. मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो. शिंदे गट किंवा भाजप कोणीही माझ्यासमोर येऊ देत. बाळासाहेबांच्या आशीर्वादासमोर आणि शिवसैनिकांच्या ताकतीसमोर कोणीही टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड परब म्हणाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शेकापचे आमदार जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आमदार सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार विलास पोतनीस, आमदार रमेश कोरगावकर, आमदार प्रकाश फातर्फेकर इत्यादी उपस्थित होते. शिवसेनेचे विलास पोतनिस यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. त्या जागी ॲड. परब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. ७ जून उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

आकाश सावला अजिंक्य ठाणे : आकाश सावलाने अश्विन माळीचा पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे  विजेतेपद मिळवले. प्रथम फलंदाजी करताना अश्विन माळीने २ षटकात दोन षटकारांच्या सहाय्याने १२ धावा केल्या होत्या. पण या दरम्यान तो तीनवेळा बाद झाल्याने त्याच्या एकूण धावसंख्येतून ९ धावा वजा करण्यात आल्या. विजयावर शिक्कामोर्तब करताना आकाश सावलाने एकदाही बाद न होता २ षटकात १६ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन वेळा चेंडू सीमापार पाठवला.  याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकाशने आर्यन देशमुखचा पराभव केला होता. या लढतीत ८ चेंडूत आकाशाच्या खात्यात १३ धावा जमा झाल्या तर आर्यनला केवळ ९ धावा करता आल्या. अन्य लढतीत अश्विन माळीने सिद्धेश गावंडेंचा पराभव केला. अश्विनने १९ धावा बनवल्या तर सिद्धेशने १६ धावपर्यंत मजल मारली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्यन देशमुख विजेता ठरला . आर्यनने ३९ धावा जमवल्या. या धावसंख्येला उत्तर देताना सिद्धेशने ३१ धावा केल्या. स्पर्धेत एकूण चार झेल आणि एक धावचीत करणाऱ्या  रोहित राजभरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मोतीराम मोरेकर स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

वस्ताद वसंतराव पाटील यांचा गौरव

मुंबई : सांगली येथील ईगल फाऊंडेशनने भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील यांनी कुस्ती खेळात चार दशके केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची २०२४च्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या ९ जून रोजी ईगल फाऊंडेशनच्यावतीने होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभ डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, उप संचालक श्रीमती निशादेवी बंडगर (वाघमोडे), दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील, आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, डॉ. मीना श्रीवास्तव,  पत्रकार सुनिल पाटील, अमोल पांढरे, बाळासाहेब कोळेकर, अविनाश रामचंद्र यांचादेखील समावेश आहे. वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री गणेश आखाड्यातील सर्व कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पालकवर्गानी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करा

भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी कल्याण: मुरबाड विधानसभेतील भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी उघडपणे विरोधात काम केले. याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे आमदार कथोरे यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी हे पत्र दिल्याने दोन पाटील विरुध्द कथोरे असा सामना येत्या काळात रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि किसन कथोरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. भाजप नेत्यांनी वेळोवेळी या धुसफूशीवर पांघरूण घालून हा वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. आता माजी मंत्री जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्याने कथोरे यांच्या विरुध्द प्रदेश नेत्यांना कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने भाजपच्या ठाणे जिल्ह्यात मोठी बंडाळी होण्याची चिन्हे आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय उफाळून आल्याने कथोरे समर्थक प्रसंगी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच कथोरे समर्थकांनी कपील पाटील यांच्या त्रासाला कंटाळून स्वतंत्र भूमिका घेण्याची गळ कथोरे यांना घातली होती. त्यावेळी प्रदेश नेत्यांनी कथोरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. प्रदेश नेत्यांच्या एकत्रित बैठकीत कपील पाटील यांनी आपले आक्षेप स्पष्ट मांडले होते. कथोरे यांनी यावेळी कोणताही खुलासा केला नव्हता, असे जगन्नाथ पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. कपील पाटील यांच्या विजयासाठी आपल्या सांगण्यावरून मुरबाड मतदारसंघात मेळावे झाले. तेथे कथोरे उपस्थित होते. त्यानंतर कथोरे यांनी पडद्यामागून आपल्या कार्यकर्त्यांना जेथे आगरी समाजाची गावे आहेत तेथे महाविकास आघाडीचे बाळ्या मामा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे यांना मत देण्याचे फर्मान सोडले. अशा १०० कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे. भाजपच्या विजयासाठी वरिष्ठांकडून आदेश असताना कथोरे यांनी त्या आदेशाला काडीचीही किमत दिली नाही. प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना धुडकावून लावले, असा आक्षेप जगन्नाथ पाटील यांनी पत्रात घेतला आहे. कथोरे यांच्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष आहे. पक्षाच्या विरोधात आणि कपील पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किसन कथोरे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष याविषयी बोलून सविस्तर माहिती दिली आहे. इतर भाजप नेत्यांना याविषयची पत्रे पाठवून किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. जगन्नाथ पाटील (भाजप नेते) या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. केवळ गैरसमज आणि आकसापोटी मला लक्ष्य बनवले जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी सातत्याने काम करीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच. आमदार किसन कथोरे (मुरबाड)

डोंबिवलीतील कोपरमध्ये वनराई नष्ट करून बेकायदा इमारतीचे काम सुरू

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या वारंवार तक्रारी करूनही ह प्रभागाच्या तोडकाम पथकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तक्रारदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता कोपरमधील चरू बामा शाळेच्या मागील भागात कॅप्टन तुकाराम हश्या म्हात्रे रस्त्यावर कृष्णा टाॅवरजवळ जुनाट आंबे आणि वनराई तोडून त्या जागेवर भूमाफियांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत. या इमारतीच्या पायाभरणीचे काम रात्रंदिवसात पूर्ण करून पाऊस सुरू होण्यापूर्वी या इमारतीच्या उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता स्थानिक भूमाफियांनी या बेकायदा बांधकामाची उभारणी सुरू केली आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते विनोद गंगाराम जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केली आहे. उपायुक्त तावडे यांची तक्रारदार जोशी यांंनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. ह प्रभागाचे राजेश सावंत यांंनी आपण निवडणूक कामात खूप व्यस्त आहोत. आता एका बैठकीत आहोत, असे सांगून म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला, असे तक्रारदार विनोद जोशी यांंनी सांंगितले. सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू असताना मागील दोन महिन्यात ह प्रभागात एकाही बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्याने या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांवर कारवाई का करत नाहीत, अशा तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन ह प्रभागात बेकायदा बांधकामांवर का कारवाई केली जात नाही, याचा आढावा घेण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. कोपर येथे चरू बामा शाळेच्या मागे सुरू असलेले बेकायदा बांधकामा पायभारणी स्तरावर असताना तोडून टाकण्याची मागणी तक्रारदार जोशी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोपरमध्ये चरू बामा शाळा परिसरात अलीकडे एकही नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे नगररचना अधिकाऱ्याने सांगितले. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्यांचा खुराडा, जुनी डोंंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स व गटारावर बांधलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीत शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, राहुलनगरमधील रमाकांत आर्केड, सुदाम रेसिडेन्सी बेकायदा इमारती, कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरा समोरील बेकायदा इमारत. गणेशनगरमध्ये रेल्वे मैदानाच्या बाजुला सुरू असलेली बेकायदा इमारत.

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक

पनवेल-अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणात २० हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडीओचे संभाषणाचा महत्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळता आला. दीपकला शनिवारी हरियाणातील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येच्या कटातील संशयीत आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडीओ कॅालद्वारे कटातील संशयीत आरोपितांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दीपकच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीची माहिती भिवानी (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षक वरूण सिंघला यांना कळविल्यानंतर भिवानी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाने दीपकला ताब्यात घेतले. भिवानी येथील न्यायालयासमोर दीपकला हजर केल्यावर न्यायालयाने ५ जूनपर्यंत दीपकला ट्रांझीट कोठडी रिमांड दिल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी दिली.