मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात
विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली – वर्षा गायकवाड* बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे ‘रील्स’ बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.…
