Category: होम

लालपरीची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी बस नसून, राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ गेली अनेक दशके यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटीने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. राज्यात दररोज सुमारे ३०,१७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध प्रवासी सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत, तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासासाठीही ५० टक्के सवलत देण्यात येते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून, त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे. याशिवाय कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३,६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत शिक्षणातील समान संधीचे स्वप्न साकार करण्यात येत आहे. “एसटीची ‘लालपरी’ ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नाही, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानगंगा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे हे सामाजिक कार्य एसटी महामंडळ यापुढेही अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने सुरू ठेवेल,” असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

राज्य कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या नवोदित ओंकारची अपयशी झुंज

श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हॉटेल मंगलम, नरसोबा वाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील तिसऱ्या फेरीच्या…

१६२ कोटींना कंपनीची जागा विकून कंपनीला प्रचंड नफा , मात्र २४ कामगारांच्या मृत्यूनंतरही २४ कोटींची देणी मिळेनात!

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे येथील ‘विंडसर मशिन्स लिमिटेड’ कंपनीच्या ९९ कामगारांची गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली २४ कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता २४ कामगारांनी गमावलेला जीव, हा अतिशय गंभीर मुद्दा आज महाराष्ट्र विधान परिषदेत मांडला गेला. भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री  प्रमोद जठार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने या ९९ कामगारांवरील अन्यायाचा विषय आमदार  प्रमोद जठार, तसेच कामगारमंत्री आणि कामगार सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सुराज्य अभियान याचा पाठपुरावा करत आहे. हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार जठार यांनी कंपनीकडून झालेल्या अन्यायी कारभाराचा पाढा वाचला. वर्ष २००० ते २०२६ या २५ वर्षांच्या काळात कंपनीने ९९ कामगारांना त्यांच्या पगार, ग्रॅच्युइटी आणि बोनस अशा नऊ वेगवेगळ्या घटकांच्या न्याय्य रकमेपासून वंचित ठेवले आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता १६२ कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमावला; मात्र ज्यांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली, त्या वयोवृद्ध आणि आजारी कामगारांना केवळ ४.५ कोटी रुपयांची नाममात्र रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एवढेच नाही, तर कंपनीने कामगारांचे ७.४१ कोटी रुपये अनधिकृतपणे ‘राईट-बॅक’ (Write-Back) करून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता ९९ पैकी २४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित कामगार मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याची भीषण वास्तविकता त्यांनी सभागृहासमोर मांडली. आमदार जठार यांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या. कामगारांच्या हक्काची २४ कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने कृती करावी, या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी, कामगारमंत्री, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापन यांची तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि कंपनीने केलेला पीएफ घोटाळा, तसेच आर्थिक गैरव्यवहारांची ‘आर्थिक गुन्हे शाखेमार्फत’ सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आमदार जठार यांनी मांडलेल्या या वास्तवानंतर पीठासीन अधिकारी  संजय खोडके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कामगारमंत्र्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. यावर राज्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे सांगून पुढील कारवाईच्या दृष्टीने सभागृहाला आश्वस्त केले. या चर्चेअंती आमदार  जठार यांनी अन्यायग्रस्त कामगारांचे निवेदन कामगारमंत्र्यांकडे सुपूर्द केले. आता शासनाच्या या आश्वासनानंतर उर्वरित कामगारांना त्यांच्या हयात असताना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे.

काश्मीरमधील लोकांसाठी शिवसेना कटिबद्ध

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही कल्याण :  शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. काश्मीरमधील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. लडाखमधील द्रास जिल्हा रुग्णालयाला शिवसेनेने उपलब्ध केलेली सीटी स्कॅन मशीन व रुग्णवाहिका खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना राज्य संघटक आनंद परांजपे, बाजीराव चव्हाण, नितीन राठोड, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहर, लडाखचे खासदार हाजी मोहम्मद हनीफा, डॉ. मोहम्मद जाफर, अब्दुल वाहिद तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मागील काही वर्षांत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कश्मीरमधील मैत्री वृद्धींगत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कारगील युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला. आता वर्षभरात द्रासमधील जिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिका आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात आली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर शिंदे साहेब स्वत: तिथे पोहोचतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे साहेब स्वत: काश्मीरला आले. इथे अडकून पडलेल्या शेकडो महाराष्ट्रीय पर्यटकांना विमानाने पुन्हा राज्यात सुरक्षितपणे नेण्याचे काम त्यांनी केले होते. याच हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना शहिद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या कुटुंबियांना शिवसेनेने घर बांधून दिले. शिवसेना केवळ मतांसाठी नाही तर माणसुकीच्या नात्याने काम करते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काश्मीरमधील लोकांना जे जे आवश्यक असेल त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. सीमेवर काम करणाऱ्या भारतीय जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखणण्याजोगे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कर्तव्यावर असताना सहा सहा महिने जवान कुटुबियांना भेटत नाही, देशासाठी जवानांचे सर्वोच्च समर्पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि लष्कराच्या हातात देश सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. सरहद संस्थेने कश्मीरमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांचे खासदार डॉ. शिंदे यांनी कौतुक केले. लडाखमधील द्रास येथे सरहद फाउंडेशन आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सरहद शौर्यथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर खासदार खासदार डॉ. शिंदे यांनी कारगीलमधील युद्ध स्मारक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. 0000

नवी मुंबईतील “ मधुर गंधार “ संगीत वर्गाचा वर्धापन दिन सोहळा

नवी मुंबई : येथील “मधुर गंधार”  या  संगीत वर्गाचा  तृतीय “वर्धापन दिन”  सानपाडा येथील सेक्टर ८ मधील गुडविल युनिटी सभागृहात ४  जुलै रोजी मराठी व हिंदी गीतांच्या मधुर आवाजात मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती…

दिवा शिवसेना युवतीसेनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

दिवा : शिवसेना दिवा युवतीसेना आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात कल पार पडला. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही विद्यार्थी व पालकांनी…

 किरवली गावातून अवैध डबर वाहतूक रिपाईचे तहसीलदारांना निवेदन !

रिपाइं अध्यक्ष हिरामण गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा ! अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावातून अवजड वाहनांद्वारे सुरू असलेल्या कथित अनधिकृत डबर व खडी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे बोगद्याच्या कामादरम्यान ठेकेदारांनी किरवली परिसरातील काही जागा भाडेतत्त्वावर घेऊन बोगद्यातून निघालेला डबर साठवून ठेवला होता. संबंधित ठेकेदार व जागामालक यांच्यातील करार संपुष्टात आल्याचे सांगितले जात असतानाही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात डबराची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरामण गायकवाड यांनी सांगितले की, या संदर्भात किरवली सजाचे तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील रस्त्यांवरून ४ ते ८ ब्रास क्षमतेचे डंपर दिवस-रात्र धावत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच मार्गालगत जिल्हा परिषद शाळा तसेच बौद्ध वस्ती असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांमुळे गावातील नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांचे नुकसान होत असून, वाहतूक आणि ध्वनीप्रदूषणामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित वाहनांकडून आवश्यक महसूल भरला जात नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून नियमानुसार महसूल वसूल करावा, अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधित डंपर मालकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि गावातील रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही हिरामण गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, प्रांताधिकारी कर्जत, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

तुकाराम मुंढे यांचा नाशिक जिल्ह्यात धडाका सुरुच

 चार ठिकाणी दूध संकलन केंद्र, प्रक्रिया केंद्रांवर छापे हरिभाऊ लाखे नाशिक: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांची आक्रमक आणि रोखठोक शैली विशेष चर्चेत आली आहे. संपूर्ण राज्यात त्यांनी अन्नातील भेसळीविरोधात रान उठविले असून नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये दूध भेसळीच्या संशयावरून छापे टाकले. शनिवारी दिवसभर ही कारवाई सुरु होती. या छाप्यांमध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याची माहिती पुढे आली असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. सिन्नर तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी येथील दूध संकलन केंद्रे आणि प्रक्रिया केंदांवर छापे टाकले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे छापे टाकण्यात आले. कारवाईपूर्वी सकाळपासून विभागातील १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकण्यात येणाऱ्या केंद्रांवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. खात्री झाल्यानंतर स्वतंत्र पथकांव्दारे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पावडर किंवा इतर कोणत्या पदार्थांची भेसळ होत आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही साहित्यही जप्त करम्यात आल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खबरदारी म्हणून छाप्यांवेळी वावी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता. शहा गावात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच किराणा दुकाने, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने पटापट बंद झाली. ती सायंकाळपर्यंत बंदच राहिली. गोदामांचीही झडती घेण्यात आली. शहा येथील दोन, कारवाडी आणि विघनवाडी येथील प्रत्येकी एका दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावर छापे टाकण्यात आले. दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील हॉटेल आणि खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. त्यात नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आवश्यक नोंदणी व परवाना नसल्याने चार हॉटेलांना व्यवसायास प्रतिबंध करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात दोन दिवसात २० हॉटेलांची तपासणी करण्यात आली. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेलांवर कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्या अंतर्गत विविध नियम व विनियमांचे उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल आणि आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार, जळगाव येथील दोन तर नंदुरबार येथील एका हॉटेलचा समावेश आहे.

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

0000000000 अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000

 प्रस्तावित कचरा संकलन केंद्राबाबत उच्च न्यायालयात सोमवारी अंतिम सुनावणी

अर्जदारांचेच याचिककडे दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा आरोप. रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी व जऊळके खुर्द ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास स्थगिती आदेश मिळूनही सुरूवातीला असलेले स्वारस्य याचिकाकर्त्यांना राहिले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.सोमवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात आहे. राजु खंडीझोड यांनी कचरा संकलन केंद्राबाबत ग्रामस्थांना सहकार्य करावे असे सांगितल्याने टाव्हरे यांनी ॲड.वासिम सामलेवाले, ॲड. तेजपाल इंगळे यांच्या माध्यमातून रिट पिटीशन जुलै २०२५ मध्ये दाखल केली.त्यासाठीचे शासन निर्णय तसेच संबधित आदेश ही कागदपत्रे मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथून तातडीने उपलब्ध करून दिली. उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीसा पाठवून १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकल्पस्थळी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई केली आहे. याचिकेतील अर्जदार ग्रामस्थ हे सुरूवातीला दोन-तीन सुनावण्यांना उपस्थित होते व नंतर क्वचित  सुभाष बोऱ्हाडे वगळता कोणीही सुनावणीसाठी उपस्थिती दाखविली नाही. अनेक सुनावण्यांना अशोकराव टाव्हरे हेच उपस्थित होते. टाव्हरे यांनी कोणतीही रक्कम प्रवास वा इतर कारणांसाठी  घेतली नाही,जिल्हाधिकारी पुणे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विस्तृत प्रमाणपत्रे दाखल केल्याने त्यास उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागतात.याचिकेतील कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर व दोन विस्तृत प्रतिज्ञापत्रे यासाठी वकीलांनी वाढीव फी मागितली होती,परंतु ती देण्यास अर्जदारांपैकी कैलास टाकळकर यांनी नकार दिला. वाढीव फी देण्यास नकार दिल्याने ॲड.वासिम सामलेवाले यांनी यापुढे याचिकेचे कामकाज पाहणार नसल्याचे टाव्हरे यांना कळविले आहे.त्याबाबत टाव्हरे यांनी याचिकाकर्त्यांपैकी सुभाष बोऱ्हाडे यांना सांगितले असून  पदरमोड करून अंतिम सुनावणीसाठी एक  सिनियर कौन्सिल युक्तिवाद करणार असल्याचे टाव्हरे यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पडणे,बांधकामास स्थगिती आदेश मिळणे या महत्त्वपूर्ण घडामोडी घडूनही अर्जदारांना स्वारस्य नसणे हे गंभीर आहे,न्यायालय जो निर्णय देईल त्यास वकील वा मी स्वतः जबाबदार नसेल तर गुणवत्तेवर आदेश पारित होईल असे  टाव्हरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.