Category: होम

सासऱ्यांनी दिलं आयुष्याचं अनमोल गिफ्ट

दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट, जावयाला मिळालं नवजीवन मिरा – भाईंदर : नात्यांची खरी ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका सासऱ्यांनी आपल्या जावयाला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची किडनी दान केली. माणुसकी आणि नात्यांच्या भावनेचा हा सुंदर संगम मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे पाहायला मिळाला, जिथे डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ३९ वर्षीय रुग्ण, जो मधुमेहाने त्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्याही खूप अशक्त झाला होता, तो बराच काळ किडनी फेल्युअरशी झुंज देत होता. कुटुंबात योग्य डोनर मिळत नव्हता. अशा वेळी ५५ वर्षीय सासऱ्यांनी पुढाकार घेत आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला—जरी त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा होता (एबी पॉझिटिव्ह डोनर ते बी पॉझिटिव्ह रुग्ण). या प्रकरणाबद्दल बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पुनीत भुवानिया यांनी सांगितले की, हा केस वैद्यकीय आणि मानवी अशा दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत विशेष आहे. इतक्या उच्च अँटीबॉडीज असताना एबीओ इनकम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करणे खूप आव्हानात्मक असते, पण सासऱ्यांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे हे शक्य झाले. ते पुढे म्हणाले की, हा “एबीओ इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट” होता, जो सामान्य ट्रान्सप्लांटपेक्षा अधिक धोकादायक असतो. शरीरातील अँटीबॉडीज नव्या किडनीला नाकारू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी आधी विशेष “डिसेन्सिटायझेशन” प्रक्रिया करून अँटीबॉडीजची पातळी कमी केली आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली। ऑपरेशननंतर अवघ्या एका महिन्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले—रुग्ण आता डायलिसिसमुक्त झाला आहे, त्याचे वजन वाढत आहे आणि तो हळूहळू सामान्य आयुष्याकडे परतत आहे. विशेष म्हणजे किडनी दान करणारे सासरेही पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारतीय कुटुंबांची मुळे अजूनही घट्ट आहेत। सासरा आणि जावई हे नातं अनेकदा औपचारिक मानलं जातं, पण इथे ते वडील-मुलाच्या नात्यात बदलले.  ही घटना आपल्याला एकच संदेश देते—जीवन कितीही आधुनिक झालं तरी नात्यांची ऊब, त्याग आणि प्रेम हेच आपल्या संस्कृतीचं खरं बळ आहे. 00000000000

अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणारे विधान करणारे संजय शिरसाट यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध !

अनिल ठाणेकर ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित  सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून  दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे :  ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग ४ परिसरात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत  आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली…

माजी खासदार-आमदारांची पेन्शन बंद करा

मनसे नेते राजू पाटील यांची मागणी कल्याण : देशभरात खासदार-आमदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे. राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (ट्विट) या विषयावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागणीमागील प्रमुख कारण म्हणजे, आगामी काळात देशात होणारी जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. प्रतिनिधींची संख्या वाढली की, पर्यायाने माजी खासदार आणि आमदारांच्या पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर, म्हणजेच पर्यायाने जनतेवर वाढत जाणार आहे. सामान्य नागरिक आणि करदात्यांच्या पैशाचा असा वापर होणे चुकीचे आहे. ही नासाडी आताच थांबवणे गरजेचे आहे,” असे राजू पाटील यांनी नमूद केले. राजू पाटील यांनी म्हटले की, माजी आमदार म्हणून मी सुद्धा या पेन्शन योजनेत येतो, पण मलाही ही सवलत नको आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केवळ राजकीय मुद्द्यांऐवजी लोकप्रतिनिधींच्या पेन्शनसारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होऊन ऐतिहासिक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य जनतेला सुविधा देताना हात आखडता घेणाऱ्या सरकारने लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, ही यामागची मूळ भावना आहे.

लोकदरबारात प्रताप सरनाईक यांनी ७०% तक्रारींचे केले ऑन दि स्पॉट निराकरण

मीरा-भाईंदर: कधी सुस्त प्रशासन, तर कधी फाईलींच्या जंजाळात अडकलेला सामान्य माणूस… पण आज मीरा-भाईंदरमध्ये चित्र काहीसं वेगळं होतं. जनतेचा थेट संवाद आणि प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा करण्यासाठी आज मीरा भाईंदर…

कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन

अनिल ठाणेकर   ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधकी वारसा माणूसपण राखणारा, चिकित्सा करणारा आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी समाज व्यवस्था फुले यांनी उभी केली. अंधश्रद्धा, बुवाबाजीमुक्त समाज करण्याचे काम अंनिस करीत आहे. अंनिसने दोन हजार हून अधिक सत्यशोधक विवाह लावले आहेत जात,धर्म,लिंग भेदाला विरोध करण्याचा विचार जोतीराव यांनी दिला.सत्यशोधक परिषदेचा उद्देश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले वैचारिक मूल्यांचा वारसा पुढे शाहू महाराजांनी तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर हल्लीच्या काळात दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेला त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की तो वैचारिक वारसा पुढे न्यायचा. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊन ते कार्य पुढे न्यावे. असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले जन्मद्विशताब्दी वर्षाचा आरंभ,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शंभरावे वर्ष आणि लोकनेते दि बा पाटील यांची जन्मशताब्दीचे वर्ष या प्रसंगांचे औचित्य साधून  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्याशोधक परिषदेचे आयोजन १२ एप्रिल रोजी के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लौकीकाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या आणि  महात्मा जोतिबा फुले  यांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती एकेका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकावर एक रचून आणि त्यावर हाताचे मॉडेल आणि त्यावर सत्यशोधन करणाऱ्या मेंदूची प्रतिकृती असा तुकारामांच्या गाथेवर उभारलेला एक छोटासा अर्थपूर्ण मनोरा तयार करण्यात आला. मुंबई नवी मुंबई ठाणे व रत्नागिरी सह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास २५० कार्यकर्त्यांनी आणि विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उद्घाटनाचे कौतुक केले. याप्रसंगी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी याही आवर्जून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते. खासदार सुरेश म्हात्रे  यांनी या उपक्रमाचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे कौतुक केले. श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण अजिबात असू नये असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीमागे आपण उभे असून समितीच्या कार्यासाठी  सर्व प्रकारे मदत करण्याचे तसेच गरज असेल तेव्हा संसदेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतले. सुरेखा दळवी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्या कार्याविषयी विवेचन केले. सध्याच्या परिस्थितीत समाज कुंठित अवस्थेत गेलेला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे अशी  चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच हल्ली समाजाला प्रतिकांमध्ये अडकवून सांस्कृतिक विषमता आणण्याचे काम सुरू आहे असा इशारा त्यांनी दिला. सगळीकडे अंधार दाटलेला असल्यामुळे, पणती जपून ठेवा अंधार फार झाला… ही कवितेची ओळ लक्षात ठेवून अंधार वाढू देऊ नका असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. “सत्यशोधक विचार व अंनिस” या चर्चासत्रात सुशीला मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या अखंडांचा दाखला देऊन फुले यांचे विचार संविधानात आल्याचे आणि अंनिस त्यानुसारच कसे कार्य करते याचे तपशीलवार विवेचन केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांचे हे वेगवेगळे अखंड उद्धृत करून महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील अफवांचे आणि त्यातून होणार्‍या अन्याय अत्याचारांचे  फॅक्ट चेक करून या व्यवस्थेचा  भांडाफोड केल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले यांनी  त्याची संपूर्ण कारण मिमांसा करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षणाचा मार्ग कसा दाखवला याबाबत विवेचन केले. तसेच त्यांनी  सुरेखा दळवी यांच्या भाषणाचा आढावा घेतला. “जोतिबा ते दि बा-  वारसा सत्यशोधनाचा” हा दुसऱ्या सत्राचा विषय होता. प्रमुख वक्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर तसेच शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड रोशन पाटील. या सत्राचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे.  या परिसंवादात ॲड. रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, यांनी शिवरायांची उपेक्षित ठेवली गेलेली समाधी महात्मा फुले यांनी  शोधून काढली असल्याचे सांगून त्यांनी शिवराय हे रयतेचे राजे कसे होते, त्यांचा वैचारिक वारसा महात्मा फुले यांनी आणि नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे कसा चालवला, त्यांना या त्यांच्या कार्यात कसे अडथळे आणले गेले याची माहिती दिली.  रेखा ठाकूर यांनी महात्मा फुले यांच्या अखंडांचा उल्लेख करून त्याचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना शिक्षणावर भर देणे किती गरजेचे आहे या बाबत आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे यांनी परिसंवादात ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वर्तमान परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करणे किती आवश्यक आहे यावर विवेचन केले. 0000

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली अशोक गायकवाड रायगड-कर्जत :महाराष्ट्र शासनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी  शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे,त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती आणि ती त्यांनी दि.३ एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करून आदेशही निर्गमित केले होते. तरीही कृषी संशोधन केंद्रातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचारी  बाबासाहेबांप्रती घृणा, तिरस्कार, अनास्था व कमालीचा हलगर्जीपणा बाळगून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात  यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.डी. वाघमोडे आणि कार्यालय अधीक्षक न. ल.निरडे यांनी जयंती साजरी करण्याबाबत कसलेच पाऊल उचलले नव्हते, असे लक्षात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणकोणत्या कार्यालयात झाली, याचा वृत्तांत घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भेट दिली असता, सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे बाहेरगावी गेल्याचे कळले. कार्यालयाचे अधीक्षक न. ल. निरडे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल विचारणा करून  कार्यक्रमाचे फोटो देण्यास सांगितले असता त्यांनी सुरुवातीला डॉ.वाघमोडे हे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले.नंतर बोलता बोलता डॉ.वाघमोडे १४ एप्रिल रोजी रात्री बाहेरगावी गेल्याचे सांगितले. “जयंती झाली, फोटो पी. आर.ओ. डॉ. मर्दाने कडून घ्या “, असेही बिनधास्त सांगितले. निरडे यांच्या बोलताना आडखडण्यावरून आणि देहबोलीवरून ते प्रस्तुत पत्रकाराची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. वास्तविक संशोधन केंद्रात पी. आर .ओ. चे पद नाही.डॉ मर्दाने हे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा डॉ. मर्दाने यांना जयंती साजरी केल्याचे फोटो द्या, असे सांगण्यात आले, तेव्हा डॉ. मर्दाने हतबल झाल्याचे दिसून आले. डॉ. मर्दाने हे प्रस्तुत प्रतिनिधीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या त्यांच्या कक्षात घेऊन गेले.त्यांच्या कक्षातील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार होता व पेढा ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फोटोमध्ये ते स्वतः व खांडस येथील शेतकरी बळीराम ऐनकर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना दिसत आहेत.पण त्या दोघांव्यतिरिक्त तेथे कृषी संशोधन केंद्राचा एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे स्पष्ट झाले. तरीही आम्ही जयंती साजरी केली, असे चक्क खोटे विधान मग्रूरीत अधीक्षक निरडे करीत होते. जगातील विविध देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार ,जिल्हा परिषदे,पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिरीरीने साजरी करत होते मात्र संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगण्यात व्यस्त होते. या संशोधन केंद्रात मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाणीवपूर्वक साजरी करण्यात आली नव्हती. वास्तविक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.पण बऱ्याच कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी घोषित केली आहे, त्या दिवशी कृतज्ञता म्हणून प्रबोधनात्मक  किंवा त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, असे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण करणे शासनाला अपेक्षित आहे.पण काही जात्यंध अधिकारी असे कार्यक्रम घेणे टाळतात व तो दिवशी पर्यटन, खरेदी, मनोरंजन करण्यात घालवतात. परिणामतः शासन बदनाम होते. असे कृतघ्न अधिकारी, कर्मचारी देशासाठी कलंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली मग त्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्रात सदर जयंती का साजरी झाली नाही? येथील अधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री ,कुलगुरू यांच्यापेक्षा मोठे आहेत का? शासकीय आदेशाला फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती येथील अधिकाऱ्यांमध्ये का बळावत आहे ? कुलगुरूंचा धाक उरला नाही का ? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी काही डॉ. आंबेडकरप्रेमी संघटनांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमाणणाऱ्या, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कार्यालयातील संबंधित बेजबाबदार व जात्यंध अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत विविध डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरप्रेमी संघटनांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कल्याण: कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल आणि मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. जयंती उत्सवाची सुरुवात माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर ते कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह हे होते. रॅली शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मंचावरील मान्यवर आणि शिक्षकांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली आणि उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत विविध भीमगीते सादर केली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः भीमगीतांवर आधारित नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला पालकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ महोत्सव, विज्ञान प्रदर्शने, विविध सण उत्सवासह सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. यात पालक आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने सहभागी होतात. पुढील वर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव असल्याने आणखीन जोरदार कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही तांबोळी म्हणाले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, बी.जी. उन्नीथन, के.व्ही. सुर्वे, नरेंद्र सूर्यवंशी, आनंद नायर, दत्ता गायकवाड तसेच मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, शिरीन गोंसालवेझ, ममता भट्टाचार्य, कल्याणी अधारी, संगीता तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.