Category: होम

रिंग मेट्रोबाधीतांचे आधी पुनर्वसन,मग प्रकल्प सुरू करा – परिषा सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील रिंग मेट्रोबाधीतांचे आधी पुनर्वसन करावे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिषा सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबरच निष्पाप नागरिकांना बेघर करून असहाय करू नका. अन्यथा, लोकमान्यनगरवासियांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही परिषा सरनाईक यांनी दिला आहे. महापालिका मुख्यालयात शुक्रवारी रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण झाले. त्यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी विविध मुद्दे मांडले. त्याचबरोबर या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. रिंग मेट्रो प्रकल्पाला लोकमान्यनगर, वर्तकनगर, शिवाईनगरवासियांचा पाठिंबा आहे. मात्र, या भागातील नागरिकांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प राबवता कामा नये. मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना भाडे किंवा भाडेतत्त्वावरील घरे देणार असल्याचे सांगितले. पण ही घरे कुठं देणार ते स्पष्ट झाले नाही. लोकमान्यनगरसह १५०० ठाणेकरांची घरे उद्ध्वस्त करण्याऐवजी संपूर्ण रिंग मेट्रो भूमिगत पद्धतीने करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी आर्थिक वाटा उचलावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली. ठाणे शहराची ओळख ही तळ्यांचे ठाणे अशी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उड्डाणपूल व मेट्रोच्या पूलांमुळे शहराची ओळख पुलांचे ठाणे अशी होऊ नये. उड्डाणपूल व मेट्रोच्या खांबांच्या गर्दीत ठाणे शहर कुठंतरी हरविल्यासारखं वाटते. शहराच्या विकासाला विरोध नाही, मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या खांबांना विरोध आहे. वाहतूककोंडी मुक्त प्रवासासाठी उड्डाणपूल हवेत. पण भूमिगत मार्गांचाही प्राधान्याने विचार करावा. मुंबई मेट्रो ३ ही भूमिगत आहे. मात्र, रिंग मेट्रोत केवळ २ स्थानके भूमिगत ठेवण्यात आली आहेत, याकडे परिषा सरनाईक यांनी लक्ष वेधले. वर्तकनगर, रेमंड परिसराची लोकसंख्या सध्या २ लाखांपर्यंत आहे. या भागातील इमारतींचा पुनर्विकास व रेमंड संकुलातील नव्या इमारतींनंतर या भागाची लोकसंख्या ४ ते ५ लाखांवर झेपावेल. त्यामुळे रिंग मेट्रोच्या आराखड्यात वर्तकनगर व रेमंड परिसराचा समावेश करण्यासाठी कळवा-मुंब्रा डीपीआरच्या धर्तीवर नव्याने डीपीआर तयार करावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली आहे. उपवन तलावाच्या परिसरातून रिंग मेट्रो गेल्यानंतर तलाव व परिसराच्या नैसर्गिक सौदर्याला धोका पोचण्याची भीती आहे. ठाण्याचे ऑक्सिजन म्हणून उपवनची ओळख आहे. या प्रकल्पातून उपवन तलाव परिसराची हानी टाळावी. उपवन तलावाच्या समृद्ध परिसराचे जतन करावे, अशी सूचनाही परिषा सरनाईक यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव मेजर डॉ. नितिन राठोड ठामपाच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी मेजर डॉ. नितिन राठोड (से.नि.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त-१ पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेत रुजू होण्यापूर्वी…

महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमास शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या विनाशुल्क पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात चेंबूर परिसरातील शालेय ६५ कॅरम खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी यांनी शालेय खेळाडूंना कॅरम सराव व कौशल्याबाबत तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी कॅरम विषयक प्रमुख नियमांबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नरसिंगराव यांनी शालेय कॅरम खेळाडूंना बसण्याची शास्त्रीय बैठक, स्ट्रायकर सोडण्यासाठी वापरली जाणारी बोटांची पकड, सोंगट्या घेतांना घ्यावी लागणारी दक्षता, सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचा सराव आदीबाबत चँम्पियन कॅरम बोर्डवर मार्गदर्शन केले. तसेच शालेय मुलांच्या खेळाविषयक शंकांचे निरसन देखील केले. याप्रसंगी कनिष्ठ पर्यवेक्षक रघुनाथ सोनवणे, क्रीडा शिक्षक डॉ.जितेंद्र लिंबकर, डॉ. भारती ढोकरट, जागृती पाटील, स्नेहल दौंड, अर्चना साबळे, चंद्रकांत करंगुटकर आदींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात होणार आहे.

 मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा

 केतकी थिटेला दुहेरी मुकूट मुंबई : बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगरच्या सहकार्याने आयोजित गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत (२०२६) अव्वल मानांकित केतकी थिटेने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. मायरा ओकवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत केतकीने अंतिम सामन्यात १५-१२, १५-१ असा विजय मिळवला. याआधी रविवारीच केतकीने महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यातही मायरा हिचा पराभव केला होता. १९ वर्षांखालील मुले गटाचे विजेतेपद प्रविथ साहूने जिंकले. अंतिम फेरीत त्याने ऋषभ गजवानीवर १६-१४, १५-५ अशी मात केली. अव्वल मानांकित हेझल जोशीने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखत १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेतेपद मिळवले. हेझलने फायनलमध्ये मायरा गोराडियाचा १५-१०, १५-७ असा पराभव केला. निकाल (सर्व अंतिम सामने) – १९ वर्षांखालील मुले: १-श्रीहान दुबे विजयी वि.२-आरव चितलांगिया १५-७, १५-६. ११ वर्षांखालील मुले: लक्ष्य गौर विजयी वि. २-अधृत सिंग १५-९, १५-९. ११ वर्षांखालील मुली: १-काव्या सरवणकुमार विजयी वि. काशी माहेश्वरी १२-१५, १५-१३, १५-१३. १३ वर्षांखालील मुले: २-अभिमन्यू शेटे विजयी वि. १-अजिंक्य देसाई १५-१०, १५-१३. १३ वर्षांखालील मुली: १-हेझल जोशी विजयी वि. मायरा गोराडिया १५-१०, १५-७. १५ वर्षांखालील मुले: प्रबीर चीमा विजयी वि. अजिंक्य देसाई ११-१५, १५-७, १५-११.

– प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या तनया जैनची नेत्रदीपक कामगिरी

१० मीटर एअर रायफलमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई मुंबई : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये विलेपार्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (CSMSS) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील (PTKS) प्रतिभावान नेमबाज तनया एन. जैन हिने आपल्या अचूक आणि दमदार नेमबाजीचे दर्शन घडवत १० मीटर एअर रायफल प्रकारात तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली. तनयाने या स्पर्धेत सीनियर, ज्युनिअर, युथ आणि सब-युथ अशा चारही गटांत अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने ४०० पैकी तब्बल ३९७ गुण मिळवत नेमबाजीतील आपली गुणवत्ता आणि सातत्य अधोरेखित केले. चार गट, चार विजय आणि चार सुवर्णपदके, अशी दैदिप्यमान कामगिरी करत तनया जैनने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तनयाच्या या उल्लेखनीय यशामागे तिचे प्रशिक्षक स्नेहल जितेश कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अचूक मार्गदर्शन, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि अविरत सराव तसेच PTKS अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे वेळोवेळी खेळाडूंना मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर तनयाची एकाग्रता, शिस्त, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे तिने हे यश संपादन केले. तनयाच्या या शानदार कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक, क्रीडा संकुलातील पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. नेमबाजीच्या क्षेत्रात तनया भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या लढ्याला डॉ. रविंद्र शेळकेंचा सकारात्मक सूर!

  काळ्याफिती लावून अलिबागेत मूक मोर्चा; उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी शासनदरबारी व्यथा पोहोचविण्याचे दिले आश्वासन अशोक गायकवाड अलिबाग : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनीच काळ्याफिती बांधून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने शनिवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना डॉ. रविंद्र शेळके यांनी आंदोलक शिक्षकांची भूमिका गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्यांची व्यथा शासनाच्या संबंधित स्तरापर्यंत निश्चितपणे पोहोचविण्याचे आश्वासन दिले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना शुभेच्छा देतानाच, जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर शिक्षकांना निश्चितच यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या लढ्याला प्रशासनाकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा मानला जात आहे. ‘नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन द्या’ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेले कायम आस्थापनेवरील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी ३१ ऑक्टोबर २००५, १९ जुलै २०११ आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयांचा आधार घेतला आहे. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळी वागणूक देणे अन्यायकारक असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. अनिल बडेकर, शिवाजी वाघमोडे, राजेंद्र बोरसे, सुनील निकुंभ, चंद्रकांत गावंड, सुधीर शिंदे आदींनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दरम्यान, महिनाअखेरीस मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाला रायगडमधून मोठे पाठबळ देण्याचा निर्धार करण्यात आला. डॉ. शेळके यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे आता शासन या मागणीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे रायगडातील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंची १९ पदकांची लयलूट !

 – उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा मुंबई : उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन सामने गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे २ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान संपन्न झाले. त्यामध्ये सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या (SKBA) खेळाडूंनी  ११ सुवर्ण आणि ८ रौप्य मिळून  एकूण १९ पदके मिळविली !! मुंबई महानगरपालिकेच्या “शहाजीराजे क्रीडा संकुलात” मंगळवार ते शनिवार दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळात सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमी मध्ये विविध वयोगटातील मुलामुलींना बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंनी मिळविलेली पदके खालीलप्रमाणे: (1) सोहम  फाटक :- पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी  तिन्ही गटात मध्ये  सुवर्ण पदक  (2) मानसी कारेकर :- महिला दुहेरी  व  मिश्र दुहेरी मध्ये सुवर्ण पदक (3) प्रथीम मणीहर :- 17 वर्षा खालील एकेरी व दुहेरीत मध्ये सुवर्णपदक  (4) रिषभ  गजवाणी  19 वर्षाखालील दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक व एकेरी मध्ये  रौप्यपदक. (5)एक सुवर्ण एक रौप्य (6) अनिका तनेजा :-  17 वर्षी खालील दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक (7)प्रीत कौर:- 70+ मिश्र दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक  (8) सुश्रुत  करमरकर :- पुरुष दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक  (9) श्वेता ठाकूर:-   महिला दुहेरी, 70+ मिश्र दुहेरी व 80+ मिश्र दुहेरी   तिन्ही गटात  रौप्य मुकुट पदक (10)नमिता  मेहता:- महिला दुहेरी  मध्ये रौप्य पदक  p(11)अयान कुलकर्णी:- 19 वर्षा खालील दुहेरी मध्ये  रौप्य पदक  (12) मायरा  गरोदीया :- 13 वर्षा खालील एकेरीत  रौप्य पदक (13)अद्रित सिंग  :- 17 वर्षा खालील एकेरी मध्ये रौप्य पदक अशी  एकूण 11 सुवर्ण पदके व 8 रौप्यपदके.  “सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीने मिळवली आहेत””    तो स्वतः  राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचे खूप कौतुक होत आहे.

 शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना – बाळासाहेब माने

दापोली-पारगाव येथे मराठी भाषा संवर्धन व विकास आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उलवे : “मराठी ही आपली मातृभाषा आणि संस्कारांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या वैविध्यामुळे जगात मराठी माणूस चमकतोय. त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, पण त्यापेक्षा समाजात आपली गुणवत्ता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे. आजघडीला शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना बसतोय,” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने म्हणाले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, रायगड विभागाच्या वतीने मराठी विषयात विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व काव्य मैफल रविवारी रंगली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव येथे झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर तसेच दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा, शाखा वाशी, नवी मुंबईचे चेअरमन प्रा. किशोर पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार तथा उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या संजीवनी म्हात्रे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती आणि मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाचन संस्कृती जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट आणि महासंघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय महासंघ रायगडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. रेखा कटके यांनी कार्यक्रमामागील उद्देश व महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. किशोर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच मातृभाषेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला असलेले महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व समाजाने मातृभाषेच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. प्रा. संजय पाटील यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संजीवनी म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम व मराठी भाषा संमेलने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्येठ पत्रकार कृष्णा पाटील यांनीही मराठी भाषा, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता यावर आपले विचार मांडले.  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजक प्रा. रेखा कटके यांनी नमूद केले. यावेळी श्रीवर्धन येथील कार्याध्यक्ष प्रवीण कुमार पाटील, महाडवरून प्राची हाटे, प्रा. गव्हाण, प्रा. धनंजय भोसले, प्रा. शिरसाठ, प्रा. पठाण, प्रा. वडितके, एस. एस. खिराडे व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेळके कीर्तीदा यांनी केले, तर महासंघ जिल्हा सचिव प्राची हाटे यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि काव्य मैफलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

नियमबाह्य ‘सीसी’ देणाऱ्या वास्तुविशारदाची सनद कायमस्वरूपी रद्द करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा

 पोलीस उपायुक्तांकडे चौकशीसाठी गंभीर पुराव्यांची फाईल सुपूर्द – मंत्री प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर सोमवारी अचानक आक्रमक पवित्रा घेत नगर रचना विभागात मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा केला. शहरातील फोफावलेले बेकायदेशीर बांधकामे आणि महापालिकेच्या नगररचना (टाऊन प्लॅनिंग) विभागाच्या संशयास्पद कारभाराविरोधात आणि पालिका प्रशासनावर दबाव टाकून नियमबाह्य पद्धतीने नकाशे मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात विकासकांना भागीदारी दिली जाते अशी तक्रार काही लोकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. याच संदर्भात आज तक्रारींची चौकशी आणि दखल घेण्याकरिता अधिकृतरित्या अचानक नगर रचना विभागात पाहणी केली.  नियमबाह्य प्रकरणातील दोषी वास्तुविशारद, मालक आणि बिल्डरांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. Special Civil Suit No. 481/२०14 प्रकरणी न्यायालयाने ४ मार्च २०२४ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेला विवादित जागेवर ‘’यथास्थिती’ (Status Quo) स्थिती ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. महानगरपालिका स्वतः या प्रकरणात पक्षकार असतानाही नगर रचना विभागाने कोर्टाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोर्टाचा आदेश अस्तित्वात असताना २०२६ मध्ये जीएन कन्स्ट्रक्शन, स्टोनवॉल बिल्डकॉन एलएलपी आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ कंपनीशी संबंधित अनेक संस्थापक या अशा कंपन्यांमध्ये भागीदार असून त्यांच्यामार्फत नियमबाह्य पद्धतीने ३३ मजल्यांपर्यंतच्या इमारतींसाठी सीसी आणि सुधारित परवानग्या निर्गमित करण्यात आल्या. तेच सदर मौजे नवघर येथील जमिनींबाबत चंदनशांती ग्रुप आणि मूळ मालकांनी हरकती नोंदवलेल्या असताना आणि कोर्टाचा हुकूमनामा असतानाही महानगरपालिकेने नियमबाह्य सहकार्य केले. या प्रकरणात तब्बल १५० ते २५० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सहभागाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणासंदर्भात बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘मिरा-भाईंदर ही काय कोणाची खाजगी मालमत्ता आहे का? एखाद्या लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी पालिका प्रशासन बेकायदेशीर मंजुरी देणार असेल, तर ‘आमदार मोठा की कायदा?’ हा उच्च न्यायालयाने विचारलेला प्रश्न आज संपूर्ण शहराला पडला आहे. गेल्या १७ वर्षांच्या माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मी कधीही नियमबाह्य कामासाठी प्रशासनावर दबाव आणलेला नाही. स्थानिक नेत्याच्या स्वार्थी कारभारामुळे सत्ताधारी महायुती सरकार आणि भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करते, त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या स्थानिक मनमानीची गंभीर दखल घेतली पाहिजे. जनतेवर अन्याय होत असेल आणि भ्रष्टाचाराचे साम्राज्य उभे राहत असेल, तर मी गप्प बसणार नाही. या प्रकरणातील महापालिका अधिकाऱ्यांवर शासनाच्या स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, पोलिसांनी संबंधित वास्तुविशारदाची कागदपत्रे आणि परवाना तपासून, नियमबाह्य प्रकार आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या मालकांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राज्याचा मंत्री म्हणून मी करत असून प्रत्येक प्रकरणात जर नरेंद्र मेहता आणि त्यांच्या ‘सेव्हन इलेव्हन’ कंपनीचे नाव येत असेल, तर मिरा-भाईंदर ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रकरणांकडे वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.